Author: bittambatami.com

…तर लाखोंच्या संख्येने होणारी वृक्षतोड निश्चित थांबू शकेल- वैभव कुलकर्णी

इको फ्रेन्डली लाईफच्या माध्यमातून  समृद्ध भारत निर्माण करण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम ठाणे : दिवसेंदिवस वातावरणातील तापमान अधिकाधिक तीव्र होताना आपणास जाणवत आहे. दिवसागणिक वाढत चाललेली उष्णता अशीच वाढत राहिली तर पुढच्या काही वर्षातच भारतातील जीवसृष्टी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.  जर येणाऱया काळात मनुष्यनिर्मित आपत्तीमुळे आरोग्यपुर्ण जीवनच जगता येणार नसेल तर  अशा भौतिक सुख निर्मितीचा उपयोग काय ?  यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे, ती ओळखून संपूर्ण भारतभर 700 कोटी फळझाडे लावून फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प इको फ्रेन्डली लाईफ या पर्यावरणवादी संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. याची सुरुवात ५ जुन रोजी पर्यावरण दिनापासून करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सरकारी प्रशासकीय आस्थापनांचा सहभाग मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.  त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याबरोबर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्वेसर्वा पर्यावरण तज्ञ अशोक एन.जे. यांच्यासोबत सिद्धांत चासकर, कुणाल  बागुल,  सागर झेंडे, किशोर बनकर, राहूल गायकवाड आदी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यामधील  शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, जव्हार, वाडा, मोखाडा, इत्यादी तालुक्यातील फळझाडांच्या लागवडीवर यावेळी  सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या ७०० कोटी फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याच्या संकल्पनेला कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या उपक्रमाकरिता  सामाजिक वनिकरण विभागाकडून काही प्रमाणात फळझाडे उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले. तसेच आता वेळ खूप कमी आहे. पुढील वर्षीय योग्य नियोजन करून या उपक्रमाकरिता अधिक फळझाडे तयार करण्यास संबंधितांना सांगता येईल त्यामुळे फळझाडांच्या रोपाची उपलब्धता अधिक होऊ शकेल. असे कुलकर्णी म्हणाले. ठाणे जिल्हा वनरक्षक विभागाचे संतोष रास्ते यांनी देखील या उपक्रमाला रोपे देण्याची तयारी दर्शवली. तसेच भविष्यात मोठ मोठ्या कंपन्यांचा सीएसआर फन्ड या उपक्रमाकरिता कसा मिळेल याकरिता प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामिण भागात होणारी प्रचंड वृक्षतोड थांबवण्यासाठी ग्रामिण भागातील संपूर्ण गाव कंपन्यांनी दत्तक घेऊन त्यांचा सीएसआर फंन्ड त्या गावातील शेतकऱ्यांसाठी इन्सेन्टीव्ह म्हणून दिल्यास ही वृक्षतोड पुर्णपणे थांबू शकते, असा आशावाद रास्ते यांनी व्यक्त केला. तसेच  राज्यशासनाच्या पातळीवर या प्रकारचा जीआर काढून प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी पब्लिक प्रा.पार्टनरशीप म्हणजेच पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था व पर्यावरण विभाग यावर देखरेख ठेवून लाखोंच्या संख्येने होणारी वृक्षतोड निश्चित थांबू शकेल, याबाबत सविस्तर चर्चा करताना ते पुढे म्हणाले,  वनखात्यातील वर्कस पडीत जागा ह्या पुर्ण वृक्षलागवडीखाली आणता येतील त्यासाठी सामाजिक संस्था व वनखाते महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये नियमानुसार एग्रीमेन्ट करून मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड करून जोपासता येईल. म्हणजेच प्रा.पब्लिक प्रार्टनरशीपमधून हे यशस्वी करता येईल. तसेच ८०० कि.मी.च्या संमृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूंनी योग्य नियोजन करून फळझाडांची लागवड केल्यास संपूर्ण रस्ता सावलीमध्ये राहील. तापमान कमी होईल व फळझाडांचाही लाभ घेता येईल. पब्लिक प्रा.पार्टनरशीपमधून हे सहज करता येऊ शकते.  या संदर्भात सरकारकडे कृती योजना सादर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले, संपूर्ण भारतभर 700 कोटी फळझाडे लावून फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम 5 जून 2024 पासून अर्थात जागतिक पर्यावरण दिनापासून सुरु करण्यात येत आहे.  ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या ठिकाणी धडक कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात आपण सहभागी होण्यासाठीचे निवेदन आणि इको फ्रेन्डली लाईफच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या कार्यक्रमाची रुपरेषा असलेली माहिती पुस्तिका संस्थेचे प्रमुख पर्यावरण तज्ञ अशोक एन.जे. यांनी मान्यवरांना दिली.

जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपाकडून दहन

आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. तसेच त्यांच्या छायाचित्राला काळे फासले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनातून आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यातील कोर्ट नाका, कळवा, भीमनगर आणि कोपरीत झालेल्या आंदोलनात आव्हाडांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच चितळसर पोलिस ठाणे व वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, उत्तराखंडमधील ऋषीकेश येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करीत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, वृषाली वाघुले-भोसले यांनी आव्हाडांवर कारवाईची मागणी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात आंदोलन करून आव्हाडांचा धिक्कार करण्यात आला. ठाण्यातील कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात आमदार संजय केळकर यांच्यासह ठाणे शहर विधानसभा निवडणूकप्रमुख सुभाष काळे, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, माजी नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनिल हंडोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, राजेश मढवी, विक्रम भोईर, महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथे झालेल्या आंदोलनात आव्हाडांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. त्यानंतर भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष आनंद बनकर यांनी वर्तकनगर पोलिसांना निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या आंदोलनात महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, भाजयुमोचे शहराध्यक्ष सुरज दळवी, वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जायसवाल, लोकमान्य नगर मंडल अध्यक्ष निलेश पाटील, बाळा केंद्रे, राम ठाकूर, वीरसिंह पारछा आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचे सहप्रभारी भरत चव्हाण, माजी नगरसेवक सुरेश कांबळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. समीरा भारती, सहसंयोजक कृष्णा भुजबळ, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, वागळे मंडल अध्यक्ष सचिन सावंत, इंदिरानगर मंडल अध्यक्ष दयाशंकर यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. त्यानंतर सुरेश कांबळे यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर कळवा येथे भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडल अध्यक्ष सुदर्शन साळवी, सोहेल शेख, हिरोज कपोते यांनी आंदोलन करून आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

माझी वसुंधरा अभियानातील पर्यावरण जागरूकता उपक्रमात

नवी मुंबईकरांचा उत्साही सहभाग नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागातून नवी मुंबई महानगरपालिका नानाविध उपक्रम राबवित असून शाश्वत पर्यावरण विकासाकडे वाटचाल करीत आहे. या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 21 मे पासून नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणारे पथनाट्य सादरीकरण, सोसायट्यांमध्ये कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत नागरिक शहराचे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी कशा प्रकारे हातभार लावू शकतात याविषयी माहिती देणारी व त्यांना त्यासाठी प्रोत्साहित करणारी हस्तपत्रके छापण्यात आली असून त्याचे वितरण पर्यावरण स्वयंसेवकांमार्फत घराघरात जाऊन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरिक विरंगुळ्यासाठी येत असतात अशा जागा आणि नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी पर्यावरण जागृती स्टॉल लावून नागरिकांना माहिती दिली जात आहे. या सप्ताहभरात आठही विभागांमध्ये प्रत्येकी तीन ते चार मुख्य ठिकाणी हे किऑक्स लावण्यात आले असून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविण्यात येणा-या या सर्वच उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने त्यांची व्यापकता वाढवून त्यामध्ये सातत्य ठेवले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड यांनी सांगितले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील भीमनगर येथे माझ्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी…

आरुष कोल्हेची  नाबाद शतकी खेळी

ड्रीम इलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा वेंगसरकर संघ गावस्कर संघाने शास्त्री संघाला २०९ धावांवर रोखले मुंबई, ३० मे :  आरुष कोल्हेच्या (खेळत आहे १८३)  दमदार  नाबाद शतकी खेळीमुळे वेंगसरकर संघाने ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या शेवटच्या साखळी लढतीत पहिल्या दिवशी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या दोन्ही लढतीत शतकाने हुलकावणी दिलयानंतर आज मात्र त्याने सारी कसर भरून काढण्याच्या जिद्दीने फलंदाजी केली आणि समोरून अन्य फलंदाजांची पाहिजे तेवढी साथ मिळत नसतानाही आपल्या धावांचा ओघ कायम राखला. त्याच्या नाबाद १८३ धावांमुळे वेंगसरकर संघाने पहिल्या दिवसाखेर ८६ षटकांत ७ बाद ३१९ धावांचा डोंगर उभा केला आहे.  त्यांच्या रोशन फारुकी (२२), अरहाम जैन (१८), लक्ष्मणप्रसाद विश्वकर्मा (२३) आणि दर्शन राठोड (खेळत आहे २२) यांची त्याला सुरेख साथ लाभली.  तेंडुलकर संघाच्या अनुज सिंग (३५/२), मोक्ष निकम (५०/२) आणि आर्यन कुमार (४८/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. कर्नाटक स्पोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत सुनील गावस्कर संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या रवी शास्त्री संघाला ४६.४ षटकांत २०९ धावांवर रोखले. प्रवीर सिंग याने ६२ धावांत ४ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखविला तर शौर्य राणे (४४ धावांत ३ बळी) आणि शेन रझा (३४ धावांत २ बळी) यांनी देखील अचूक गोलंदाजी केली.  रवी शास्त्री संघासाठी यश सिंग या सलामीवीराने (५३)केवळ ३५ चेंडूत अर्ध शतकी खेळी करताना ११ चौकार ठोकले. शाहिद खान याने ६८ तर कबीर जगताप याने नाबाद ७४ धावांची खेळी करून संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना गावस्कर संघाने  ३२ षटकांत २ बाद १०३ धावा केल्या आहेत, त्यात देवाशिष घोडके याचा ४२ धावांचा वाटा होता. संक्षिप्त धावफलक : कर्नाटक स्पोर्टींग – रवी शास्त्री संघ – ४६.४ षटकांत सर्वबाद २०९ (यश सिंग ५३, शाहिद खान ६८, कबीर जगताप नाबाद ७४; शेन रझा ३४/२, शौर्य राणे ४४ धावांत ३ बळी, प्रवीर सिंग ६२ धावांत ४ बळी) वि. गावस्कर संघ –  ३२ षटकांत २ बाद १०३  (वेदांग मिश्रा २४, देवाशिष घोडके ४२, अगस्त्य काशीकर खेळत आहे २५) ओव्हल मैदान – वेंगसरकर संघ – ८६  षटकांत  ७  बाद ३१९ (रोशन फारुकी २२, अरहाम जैन १८, आरुष कोल्हे  खेळत आहे १८३ , उज्ज्वल सिंग १५, दर्शन राठोड खेळत आहे 22; अनुज सिंग  ३५ धावांत २ बळी ,  मोक्ष निकम  ५०  धावांत २ बळी, आर्यन कुमार ४८ धावांत २ बळी) वि. तेंडुलकर संघ.   फोटो ओळी –  पहिल्या दिवसाअखेर नाबाद १८३ धावांची खेळी करणारा वेंगसरकर संघाचा फलंदाज आरुष कोल्हे.

पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा शनिवारी

मुंबई : येत्या १ व २ जून रोजी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर जूनिअर, मास्टर्स I,II,III,IV (इक्यूप्ड) पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परळ व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ज्युनिअर गटामध्ये राष्ट्रीय विजेते हर्षदा गोळे, अमृता भगत, सेजल मकवाना, तपस्या मते, सानिका मालसुरे, तर महिला मास्टर्समध्ये डॉ. शर्वरी इनामदार, नीता मेहता, मयानी कांबळे या पुण्याच्या राष्ट्रीय विजेत्या खेळाडू आणि पुरुष मास्टर्समध्ये महेश पाटील, प्रशांत जगताप, जितेंद्र यादव, रवींद्र साळवे, आदिनाथ शेकडे हे राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू सहभागी होणार आहेत. या राज्य स्पर्धेतून १६ ते २१ जून २०२४ पतियाळा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका या इमेलवर maharashtrapowerlifting 2020@gmail.com पाठवाव्यात. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुर्यकांत गर्दे, ९८६९७३६७११, प्रशांत सरदेसाई ९८२०३७०४९७, श्री जितेंद्र यादव ९८१९५९३५९० यांच्याशी संपर्क साधावा.

९० फुटी रस्त्यावरील विजेचा लपंडाव कायम

सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने ठाकुर्ली रहिवासी हैराण कल्याण : ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील गृहसंंकुलांमध्ये मागील तीन महिन्यांंपासून महावितरणच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. आतातर उन्हाची काहिली, घामाच्या धारांनी नागरिक हैराण आहेत. अशा परिस्थितीत ९० फुटी रस्ता भागात पाच ते सहा तास वीज पुरवठा बंद राहत असल्याने रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. ९० फुटी रस्ता परिसरात मध्यमवर्गियांची सर्वाधिक वस्ती आहे. या भागातील अनेक नोकरदार घरातून कार्यालयीन काम करतात. काही जण विदेशातील आपल्या कार्यालयातील कामकाज घरबसल्या करतात. या सर्वांंना या खंडित वीज पुरवठ्याचा सर्वाधिक त्रास होतो. ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील विजेचा लपंडाव कायम, सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकाराने रहिवासी हैराण अनेक घरांंमध्ये बिछान्याला खिळून असलेले वृध्द, ज्येष्ठ नागरिक, लहान बाळे आहेत. वीज गेली की या मंडळींना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते. ९० फुटी रस्ता भागातील सततच्या वीज लपंडावाची समस्या कायमची मिटविण्यासाठी या भागासाठी स्वतंंत्र वीज पुरवठा यंत्रणा बसवावी, अशी मागणी खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता भागातील रहिवाशांकडून केली जात आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता गेलेली वीज दुपारी चार वाजले तरी आली नव्हती. तोपर्यंत रहिवासी घरात बटाट्यासारखे उकडून निघाले होते. अनेक नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन या सततच्या वीज लपंडावाबद्दल जाब विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून सुरू आहेत. त्यांनाही या खेळखंडोब्याचा फटका बसत आहे. महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, एमएमआरडीएकडून ठाकुर्ली भागात रस्ते काम सुरू आहे. त्यांनी काम करताना जेसीबीच्या साहाय्याने महावितरणची महत्वाची वीज पुरवठा करणारी भूमिगत वाहिनी खराब केली. त्यामुळे अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. ही माहिती एमएमआरडीएच्या अधिकारी, ठेकेदारांनी तात्काळ महावितरणला देणे आवश्यक होेते. पण, एमएमआऱडीए अधिकाऱ्यांनी ही माहिती महावितरणला न देता याविषयी गुपचिळी धरून राहणे पसंंत केले. खंंबाळपाडा भागातील वीज पुरवठा खंंडित झाल्याच्या तक्रारी महावितरण कार्यालयात आल्या. त्यावेळी सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेऊनही खंडित वीज पुरवठ्याचा तपास लागत नव्हता. अखेर रस्ते खोदकाम करताना झालेल्या बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे महावितरण अधिकाऱ्यांना समजले. एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महावितरणला मनस्ताप आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएला दंड ठोठावण्याच्या हालचाली केल्या. जोपर्यंत एमएमआरडीए दंड भरत नाही, तोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत न करण्याची भूमिका महावितरण अधिकाऱ्यांनी घेतली. या कलगीतुऱ्यात नागरिकांची घुसमट झाली. अखेर सामोपचाराने हा विषय मिटवून खंबाळापाडा भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. खंबाळापाडा भागातील एका सोसायटीत तांत्रिक बिघाड झाला होता. तो बिघाड काढताना एमएमआरडीएकडून रस्ते काम करताना जेबीसीकडून महावितरणची वीज वाहिनी खराब झाल्याचे निदर्शनास आले. तो बिघाड दुरुस्त करून या भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. – चंदन मोरे, साहाय्यक अभियंता, महावितरण.

डोंबिवलीतील घरडा सर्कल रस्ता मतमोजणीसाठी ४ जून रोजी बंद

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी घरडा सर्कल जवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात ४ जून रोजी होणार आहे. या कालावधीत क्रीडासंकुला बाहेरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक येण्याची शक्यता विचारात घेऊन सावळाराम महाराज क्रीडासंकुला समोरील घरडा सर्कल लगतचे सर्व रस्ते ४ जून रोजी पहाटे पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत वाहतूक विभागाकडून बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत नागरिकांनी घरडा सर्कल जवळील पर्यायी रस्ते मार्गावरून वाहतूक करण्याची सूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, प्राणवायू सिलिंडर, अग्निशमन यंत्रणा, पोलीस वाहने, हरित मार्गिका यांच्यासाठी मात्र घरडा सर्कल रस्ता खुला राहील. कल्याण-शिळफाटा, कल्याण, बदलापूर परिसरातून येणारी वाहने घरडा सर्कलमार्गे डोंबिवली शहरात प्रवेश करतात. या वाहनांच्या धावेमुळे या भागात वाहन कोंडी होण्याची शक्यता विचारातून घेऊन मतमोजणीच्या दिवशी घरडा सर्कल रस्ता वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. बंद रस्ते व पर्यायी मार्ग डोंबिवली शहरातून टिळक चौक, शेलार नाका मार्गे घरडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम रुग्णालय येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने शिवम रुग्णालय येथे उजवे वळण घेऊन डोंबिवली जीमखाना, सागर्ली मार्गे इच्छित स्थळी जातील. सुयोग हाॅटेैल, रिजन्सी अनंतम, पेंढरकर महाविद्यालय मार्गे घरडा सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर. आर. रुग्णालय येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने आर. आर. रुग्णालय येथे डावे वळण घेऊन मिलापनगर, कावेरी चौक येथून इच्छित स्थळी जातील. खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली रस्ता, पंचायत बावडीकडून येणाऱ्या, विको नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस हाॅटेलजवळ वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने खंबाळपाडा, ९० फुटी रस्ता, टाटा नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. आजदेगाव, आजदेपाडा कमान येथून घरडा सर्कलकडे येणाऱ्या, बंदिश पॅलेसकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना घरडा सर्कल येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने घरडा सर्कल येथे येऊन शिवम रुग्णालयाकडे जाऊन तेथून ती डोंबिवली जीमखाना मार्गे इच्छित स्थळी जातील. विको नाकाकडून बंदिश पॅलेसकडे हाॅटेलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हाॅटेल मनीष गार्डन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मनीष गार्डनजवळ उजवे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.

अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई

बेकायदा पब, हुक्का पार्लर, डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष ठाणे : पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर जाग आलेल्या ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात बेकायदा सुरू असलेल्या ११ हॉटेल आणि बारचे परवाने निलंबित केले असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांनी बेकायदा पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तसेच अशा अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिला आहे. ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी यापुर्वीच ठाणे पोलिसांकडे केली होती. परंतु त्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याबद्दल केळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुणे येथील पोर्श अपघाताप्रकरणानंतर ठाण्यातील बेकायदा हाॅटेल, पब, हुक्का पार्लर आणि डान्स बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार केळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून ठाण्यातील तरुण पिढ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर डान्स बार, पब आणि हुक्का पार्लर या अवैध व्यवसायांविरुद्ध महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून यासंदर्भात लोक चळवळही सुरू केली. यावर अधिवेशनातही आवाज उठवला. यानंतर ठाण्यातील या अवैध व्यवसायांवर कारवाई झाली. पण, त्यांनतर पुन्हा हे व्यवसाय सुरू होत असल्याची बाब आमदार केळकर यांनी आयुक्त डुंबरे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या अशा व्यवसायांवर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अवैध व्यवसायांवर नियमित आणि ठोस कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर अशा अवैध व्यवसायांना त्या-त्या विभागातील स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार राहणार असल्याचे सांगून त्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डुंबरे यांनी यावेळी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. या संदर्भात ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये यासाठी या अवैध व्यवसायांविरुद्ध लोकचळवळ सुरू केली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मागील काळात काही पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने काम केले, परंतु काही ठिकाणी दुर्लक्ष झाले. त्यामुळे यावर ठोस कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तांना भेटून अनेक मागण्या केल्या. त्या मान्य करून त्याची अंमलबजावणी तातडीने करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. संजय केळकर (आमदार, ठाणे शहर)

रस्त्यावरील बालकांप्रती संवेदनशील व्हावे…!

कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत- प्रियंक कांगजू ठाणे : स्त्यावरील बालकांच्या समस्येबाबत समाजाने संवेदनशील होणे आवश्यक असून त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न समाजातील सर्व घटकांकडून होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली चे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात श्री.कांगजू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील बाल हक्क संरक्षण विषयाबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, एनसीपीसीआर, नवी दिल्ली च्या मेजर श्रीमती रुपाली बॅनर्जी, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जे.जे.बी. मेंबर, ठाणे स्वाती रणदिवे, कामगार उपायुक्त ठाणे लक्ष्मण सावंत, महिला व बाल कल्याण अधिकारी श्रीमती चारुशिला खरपडे, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, ठाणे मनपा चे दशरथ  वाघमारे, सहयोग ट्रस्ट अध्यक्ष विश्वकांत लोकरे, फिरते पथक अल्ताफ काजमी, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या तेजश्री शिंदे, महिला व बाल कल्याण विकास प्रतिनिधी जि.प.ज्योती प्रकाश महाडीक आदि मान्यवर उपस्थित आहेत. या बैठकीत प्रामुख्याने रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांच्या समस्यांविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष श्री. प्रियंक कांगजू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, वर्ष 2016 पासून या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली, राज्य शासन आणि विविध सामाजिक संस्था यांच्या एकत्रित समन्वयातून मार्गदर्शक कार्यपद्धती आखण्यात आली आहे. फक्त एका मुलाचे पुनर्वसन हा या समस्येवरील परिणामकारक उपाय नसून त्या मुलासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे शाश्वत पुनर्वसन गरजेचे आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रस्त्यावरील मुले व त्यांचे कुटुंब यांची आर्थिक क्षमता वाढविणे आवश्यक असून या मुलांना शाळेत भरती करणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व समस्यांवर “सहकारी तत्त्वावरील निवारागृहे” हा एक परिणामकारक उपाय होवू शकतो, असेही त्यांनी सुचविले. याबाबत भोपाळ येथील प्रकल्पाचे त्यांनी उदाहरण दिले. ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही सामाजिक संस्थांसह या प्रकल्पास भेट देवून तेथील कार्यपद्धतीचा अभ्यास करावा आणि ठाणे जिल्ह्यातही अशा प्रकारचा प्रकल्प उभारावा, असेही श्री. कांगजू यांनी सुचविले. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.महेंद्र गायकवाड यांनी महिला व बाल विकास विभागाने बाल हक्क संरक्षण संदर्भात केलेल्या कामकाजाची माहिती अध्यक्ष महोदयांना दिली. त्याबद्दल श्री.कांगजू व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व महिला बालविकास विभागाने केलेल्या कामांचे विशेष कौतुकही केले. शेवटी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.