Author: bittambatami.com

शाहिद खानच्या शतकाने शास्त्री संघ २२९

ड्रीम एलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा चिन्मय दुखंडेचे ६ बळी मुंबई :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दोन दिवसीय  साखळी लढतीत रवी शास्त्री संघाने शाहिद खानच्या (१०४ धावा) शतकी खेळीमुळे सर्वबाद २२९ धावा केल्या. याच लढतीत  वेंगसरकर संघाच्या लेगस्पिनर  चिन्मय दुखंडे याने ४० धावांत ६ बळी घेण्याची करामत   केली. पहिल्या दिवसाअखेर वेंगसरकर संघाने बिनबाद ८३ धावा करत जोरदार प्रदर्शन केले आहे.  कर्नाटक सपोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत गावस्कर संघाने तेंडुलकर संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिवसाखेर ९ बाद २४९ धावा केल्या आहेत. ओव्हल मैदानावरील लढतीत रवी शास्त्री संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहिद खान याने ११५ चेंडूत १२ चौकारांसह १०४ धावा करताना पाचव्या विकेटसाठी पार्थ ठाकूर (२७) यांच्यासह ९८ धावांची भागी रचली. आयांश चित्कारा (२१) आणि वेदांत कडू (१९) यांनीही संघाच्या धावसंख्येत थोडी भर टाकली.  वेंगसरकर संघाच्या चिन्मय दुखंडे याने आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने ४० धावांत ६ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला ६७ षटकांतच २२९ धावांवर रोखण्याची करामत केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अरहाम जैन (खेळात आहे ३५) आणि ईशान पाठक (खेळात आहे ४०) या सलामीवीरांनी २५ षटकांत ८३ धावांची अभेद्य भागी रचत वर्चस्व राखले आहे. कर्नाटक सपोर्टींगवरील लढतीत सुनील गावस्कर  संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ९ बाद २४९ धावांची मजल मारली आहे. ७ बाद १५९ अशा डळमळीत अवस्थेनंतर  कर्णधार शेन रझा (५२) याच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि त्याने आठव्या विकेटसाठी आयुष गोहो  (२२) यांच्यासह केलेल्या ४२ धावांच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे ही मजल मारली आहे. गावस्कर संघासाठी स्वानंद पालव (२८), स्मित ठाकूर (३१), वेदांग मिश्रा (४८) यांनीही  फलंदाजीत योगदान दिले. तेंडुलकर संघासाठ कर्णधार हर्ष कदम याने ३३ धावांत ४ बळी  तर मोक्ष निकम याने ५७ धावांत ३ आणि हार्दिक गजमल याने ४९ धावांत २ बळी मिळविले आहेत. उद्या सामनाच दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. संक्षिप्त धावफलक –  ओव्हल मैदान =  रवी शास्त्री संघ – ६७ षटकांत सर्वबाद २२९ (आयांश चित्कारा २१, शाहिद खान १०४, पार्थ ठक्कर २७, वेदांत कडू १९; चिन्मय दुखंडे ४० धावांत ६ बळी) वि. दिलीप वेंगसरकर संघ – २५ षटकांत बिनबाद  ८३ (अरहाम जैन खेळत आहे ३५, ईशान पाठक खेळात आहे ४०). कर्नाटक सपोर्टींग = सुनील गावस्कर संघ – ९५ षटकांत ९ बाद २४९ (स्वानंद पालव २८, स्मित ठाकूर ३१, वेदांग मिश्रा ४८, शेन रझा ५२, आयुष गोहो २२; हार्दिक गजमल ४९ धावांत २ बळी, हर्ष कदम ३३ धावांत ४ बळी, मोक्ष निकम ५७ धावांत ३ बळी) वि. सचिन तेंडुलकर संघ.विजय बने – ९८१९०५९६७७ फोटो ओळी –  रवी शास्त्री संघाचा शतकवीर शाहिद खान (१०४ धावा) आणि दिलीप वेंगसरकर संघाचा चिन्मय दुखंडे (४० धावांत ६ बळी).

कल्याणहून होणार ‘कांगा  लिग’ क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

ठाणे  : मुंबईत होत असलेल्या  प्रसिद्ध कांगा लिग क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथमच कल्याणमध्ये खेळाडूंची निवड होणार आहे. कांगा लिग क्रिकेट स्पर्धेत खेळणा-या खेळाडूंना पुढे जाण्याची संधी असते. या नामांकित स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक होतकरू क्रिकेटपटू कायम उत्सुक असतात. यंदा प्रथमच कल्याण परिसरातील क्रिकेट खेळाडूंची निवड कल्याण मध्येच होणार आहे. शुक्रवार दिनांक ३१मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ही निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. युनियन क्रिकेट ॲकडमी , पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे ही निवड प्रक्रिया होणार आहे. कांगा लिग ‘फ’  क्रिकेट टीम निवडीसाठी वयाची कोणतीही अट नाही. तरी इच्छुक खेळाडूंनी मोठ्या संख्येने या निवड चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन युनियन क्रिकेट ॲकदमीचे तुषार सोमाणी यांनी केले आहे.

अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन – जितेंद्र आव्हाड

ठाणे : अनाधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महिना १५ लाखांची मागणी काही नेत्यांकडून केली जात असून ते दिले नाही तर आमचे ऑफिस कसे चालणार असा सवालही केला जात आहे. याशिवाय निवडणुकीसाठी अनाधिकृत बांधकामाचे पैसे काहींना हवे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले नंतरही आजही कळवा, मुंब्य्रात ही बांधकामे उभी राहत असल्याचेही ते म्हणाले. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या दोन दिवसात कळवा, मुंब्य्रात सध्या सुरु असलेल्या अनाधिकृत बांधकामांची यादीच सादर करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. कळवा गावात, व्यायामशाळेशेजारी कोणाची बांधकामे सुरु आहेत, त्याचीही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी हिरवा कपडा टाकून ही बांधकामे राजरोसपणे केली जात असल्याचेही ते म्हणाले. चंदा दो और धंदा लो अशी परिस्थिती आहे. त्यात ठाणे महापालिकेचे सर्वच अधिकारी सहभागी आहेत. यात सहभागी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  तत्काळ निलंबनाची कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र ती कारवाई होणार नसल्याचेही ते म्हणाले. एकूणच अनाधिकृत बांधकामांना खतपाणी घालण्याचे काम सुरु असून कळवा, मुंब्रा बकाल करण्याचा मनसुबा आखला जात असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या अनाधिकृत बांधकामा संदर्भात एसआयटी लावून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. अनधिकृत बांधकामांना ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभाग जवाबदार असल्याचा आरोप ही आव्हाड यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही ही बांधकामे उभीच राहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही काही ठिकाणी कारवाई करण्यात आलेल्या बांधकामांच्या ठिकाणी देखील पुन्हा बांधकामे उभी राहत असून त्याकडेही कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.

‘कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही विचारधारा सोडणार नाही…’

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये – अजित पवार मुंबई – निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद…

पदवीधर-शिक्षक निवडणूक, मतदार नोंदणीसाठी आज अंतीम मुदत – अमोल यादव

ठाणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही मंगळवार, २८ मे २०२४ असून हे अर्ज पदनिदर्शत ठिकाणी ऑनलाईन व ऑफलाईन स्विकारले जातील अशी उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नामनिर्देंशपत्रे  शुक्रवार दिनांक ३१ मे, २०२४ स्विकारली जातील. ही नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी शुक्रवार दिनांक 7 जून, 2024 ही अंतिम मुदत राहील. बुधवार २६ जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रमासाठी २४ मे २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि. २८ मे, २०२४ पर्यंत https://gterollregistration.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज  स्विकारले जातील. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर नागरिकांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी असे आवाहन उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्यातील खोडाळ्यातील तलावाने गाठला तळ!

नळाद्वारे दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात मोखाडा : अर्धा मोखाडा तालुका पाणी टंचाई चा सामना करत आहे. तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतची ऐकमेव नळपाणीपुरवठा योजना यशस्वी आहे. मात्र, गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठला आहे. तलावात केवळ गाळाचे पाणी शिल्लक आहे. त्यामुळे नागरीकांना गाळ आणि चिखल मिश्रित पाण्याचा नळाद्वारे पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांना दुषित पाणी प्यावे लागते आहे. परिणामी नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोखाड्यातील आदिवासी गावपाडे, वस्त्या पाणी टंचाई चा सामना करत आहेत. तालुक्यातील टंचाई ग्रस्त गावपाड्यांना शासनाने टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. तालुक्यातील विहीरी कोरड्या पडल्या आहेत, बोअरवेल आटल्या आहेत. तसेच पाणी साठा आटल्याने, बहुतांश नळपाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरीकांची तहान भागवण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे. दरम्यान, शाश्वत पाणी साठा व योग्य नियोजनामुळे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीची नळपाणीपुरवठा योजना सुरू आहे. मात्र, गावाला पाणी पुरवठा करणारा गावतलावाने, तळ गाठला आहे. तलावात केवळ गाळ आणि चिखल मिश्रित पाणी शिल्लक राहिले आहे. याच पाण्याचा ग्रामस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांना गाळ मिश्रित दुषित पाणी प्यावे लागते आहे. परिणामी नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकार तसेच साथींचे आजार बळावण्याची भिती निर्माण झाली आहे. विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागते नळाला दुषित पाणी येत असल्याने, टमटम अथवा पाणी पुरवठा करत असलेल्या, वाहनातील  50  लिटरच्या ड्रमच्या पाण्यासाठी  50  रूपये नागरीकांना मोजावे लागत आहे. तसेच एका  20  लिटर पाण्याच्या जार साठी  40  रूपये देऊन ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत आहे. ज्यांची पाणी विकत घेण्याची ऐपत नाही. त्या गरीब कुटूंबातील महिलांना अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरच्या विहीरीवरून पायपीट करत पाणी आणावे लागते आहे. जलजीवन मिशन चे काम रखडले जलजीवन मिशन योजनेंतर्गत संपूर्ण तालुक्याचे काम ईगल ईन्फ्रा ईडिया या कंत्राटदाराने घेतले आहे. मार्च  2024  पर्यंत काम पुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, हे काम अजुनही पुर्ण झालेले नाही. त्यामुळे यावर्षी ही तालुक्याला पाणी टंचाई चा सामना करावा लागतो आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला देखील त्याचाच फटका बसल्याने, येथील नागरीकांना टंचाई ला तोंड देत, दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.

मुंबईत २१ जूनला डाक अदालतीचे आयोजन

तक्रार ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी-सुनिल थळकर अशोक गायकवाड रायगड : मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे २१ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई यांच्या कार्यालया‌द्वारे दि.२१ जून २०२४ रोजी, दुपारी ३.०० वाजता १२७ वी डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत ०/० मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स चौथा माळा, मुंबई ४००००१ यांच्याकडे दि.०७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे., असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.

सुएसो माध्यमिक विद्यालयाचा दहावी परिक्षेचा निकाल ८६.३६ टक्के

ॲड. प्रसाद पाटील यांनी केले अभिनंदन अशोक गायकवाड अलिबाग :सु.ए.सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के लागला आहे. स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी अभिनंदन केले आहे. सु ए सो माध्यमिक विद्यालय, कुरुळ माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के लागला आहे. कुमारी शबा रिजवाना रजिउल्ला सिद्दीकी हिने ८४.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कुमारी अपूर्वा धनश्री माधव गोसावी हिला ७८.४० टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर प्रणय भारवी भरत कांबळे याने ७८.२० टक्के मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील , शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व ज्यांना यश मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करावा असे आवाहन केले आहे. सर्व पालक, ग्रामस्थ, शाळेचे हितचिंतक यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्यातुन पर्यावरण विषयक जनजागृती-शिरिष आरदवाड

अशोक गायकवाड नवी मुंबई : माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करून पथनाट्यांतुन जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (२) शिरिष आरदवाड यांनी दिली आहे. शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ ४.० अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून २१ मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य २२ ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे.

सेवा संस्था तयार करणार नवीन रोड मॅप

2030 पर्यंत ठाणे जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सोशल एम्पॉवरमेंट अँड वॉलेटरी असोसिएशन (सेवा) संस्थेने नवी दिल्ली येथे (19 व 20 मे ) पार पडलेल्या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आयोजित बालविवाहावरील कार्यशाळेत भाग घेतला. ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेच्या 200 सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन 2024-25 साठी बालविवाहाच्या विरोधात रोडमॅप तयार केला आहे, 2030 पर्यंत देशातून बालविवाह दूर करण्याचा दृढनिश्चय केला आहे. कार्यशाळेत एकत्रित केलेल्या उपाययोजना  आणि त्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी, ठाणे जिल्ह्यातील  कार्यरत असलेली सेवा संस्थाही 2030 पर्यंत ठाणे जिल्हा आणि शेवटी राज्य बालविवाहमुक्त करेल असा विश्वास आहे. 2022 मध्ये तळागाळात सुरू करण्यात आलेल्या ‘बालविवाह मुक्त भारत’  मोहिमेचा  प्रभाव आणि सहयोगींचे जाळे लक्षणीयरीत्या विस्तारले आहे. गेल्या वर्षीपर्यंत देशातील 17 राज्यांतील 300 जिल्ह्यांमध्ये या अभियानाच्या 161 सामाजिक संस्था कार्यरत होत्या, तर आता ही मोहीम 22 राज्यांमध्ये पोहोचली आहे. यापैकी बहुतांश जिल्हे हे असे आहेत की ज्यांची ओळख बालविवाहाचे उच्च दर असलेले जिल्हे म्हणून करण्यात आली आहे. मुलांची तस्करी आणि बाल लैंगिक शोषण यांसारख्या मुलांच्या सुरक्षितता आणि संरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवरही संस्था काम करत आहे. नुकतेच ठाणे जिल्ह्यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे एकूण 18 बालविवाह सेवा संस्थेने प्रशासनाच्या मदतीने  थांबविले आहे. बालविवाह मुक्त भारत मोहीम देशातून बालविवाह दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या निकट समन्वयाने कार्य करते. कार्यशाळेत ठरवण्यात आलेल्या रोडमॅपची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित करताना बालविवाह मुक्त भारत मोहिमेचे निमंत्रक रवीकांत म्हणाले, “समाजातील खोलवर रुजलेल्या सामाजिक दुष्प्रवृत्तीचे उच्चाटन करण्यासाठी अशा मोठ्या प्रमाणावर संयुक्त धोरणात्मक प्रयत्नांची गरज आहे. बालविवाह जर आपल्याला या आव्हानाला सामोरे जायचे असेल, तर त्यासाठी एक सामान्य आणि विचारपूर्वक धोरण राबविणे आवश्यक आहे. कार्यशाळेतून मिळालेल्या अनुभवांबद्दल आणि शिकण्याबद्दल बोलताना, सेवा संस्थचे  संचालक ॲड. अशोक पवार म्हणाले, आमच्यासारख्या अनेक संस्था बाल हक्कांसाठी काम करत आहेत. यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करत आहोत. बालविवाह समाप्त करण्याचे सामाईक उद्दिष्ट या कार्यशाळेत आम्ही नवीन आणि लक्ष्याभिमुख पद्धती शिकलो आणि आम्ही तळागाळात नवीन कल्पना राबवू आणि आम्ही पंचायत, जिल्हा परिषद आणि एकत्र काम करत राहू आपल्या जिल्ह्य़ातील पंच-सरपंचांनी जनजागृती मोहीम आणि कायदेशीर हस्तक्षेप करून लोकांमध्ये नैतिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याबरोबरच बालविवाह हा गुन्हा आहे आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील याची जाणीव करून देता येईल, मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर हस्तक्षेप हे सर्वात प्रभावी साधन आहे. या स्वयंसेवी संस्थांचा उद्देश बालविवाहविरोधी कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि बालविवाह प्रतिबंध अधिकारी (CMPO) यांच्या समन्वयाने जनजागृती मोहीम चालविणे, लोकांना बालविवाह न करण्याबद्दल पटवून देणे आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे हा आहे. उपायांच्या मदतीने बालविवाह रोखले पाहिजेत. प्रसिद्ध बाल हक्क कार्यकर्ते भुवन रिभू यांनी त्यांच्या ‘व्हेन चिल्ड्रन हॅव चिल्ड्रन: टिपिंग पॉइंट टू एंड चाइल्ड मॅरेज’ या पुस्तकात बालविवाह बंद करण्यासाठी सुचवलेली कृती योजना हा या मोहिमेचा गाभा आहे, असेही ते म्हणाले.