Author: bittambatami.com

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक- पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन मतशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे. सन-२०२४-२५ या वर्षाकरिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आली होती. आता सन-२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनालाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन-२०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीये साठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे.

इतिहासात पहिल्यादांच ठाकरेंनी दिले ‘पंजा’ला मत

मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय खास आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल आपण पाहू शकत आहोत. दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अशा प्रकारचं राजकारण पहिल्यांदाच महाराष्ट्र अनुभवत आहे. यातच यंदा इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील कोणीतरी जाहीरपणे काँग्रेसला मतदान केल्या असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये आज पाचव्या टप्प्यातील लोकसभेचे मतदान होत असून मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई ईशान्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदार संघाचा समावेश आहे. मातोश्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. हे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांमध्ये येते. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोघांचाही उमेदवार नाही. या ठिकाणी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली असून भारतीय जनता पक्षाने उज्जवल निकम यांना संधी दिली आहे. अशावेळी जनता कोणाला साथ देते हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे. तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून ते यंदा काँग्रेसला मतदान करतील असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यामुळे इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसच्या हाताला ठाकरेंच मत मिळाल अस चित्र आहे. असं जरी असलं तरी दुसरीकडे दक्षिण मध्य मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने राज ठाकरेंनी धनुष्यबाणाला म्हणजेच राहुल शेवाळेंना मतं दिले असल्याची चर्चा आहे. अशावेळी एका ठाकरेंनी धनुष्यबाणाला तर दुसऱ्या ठाकरेंनी हाताला मत दिलं असल्याचं म्हटले जात आहे. या गोष्टीची चर्चा दिवसभर मुंबई सह राज्यामध्ये पाहिला मिळाली.

एमबीए सीईटीचा निकाल जाहीर

मुंबई : सीईटी सेलने एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीईटी कक्षामार्फत ९ ते ११ मार्च राज्य व राज्याबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एक लाख ५२ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७८ परीक्षा केंद्रावर एक लाख ३८ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सीईटी सेलच्या वतीने यावर्षी परीक्षेसंदर्भात आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यामध्ये ४१५ विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यापैकी (युनिक) आक्षेप ९९ होते. सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, सीईटी सेलच्या वतीने १३ परीक्षा आतापर्यंत झाल्या आहेत. यापैकी १० अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, लॉ पाच वर्षे आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे.

एक लाख ८४ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

महाड : पहिली ते आठवीमध्ये शिकणारे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी त्‍यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, याचबरोबर पटसंख्या वाढावी यासाठी, समग्र शिक्षा अभियानांतर्गत सरकारने मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. त्‍यानुसार सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्‍तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील मुले व खास करून मुलींमध्ये शाळा गळतीचे प्रमाण अधिक असते. पुस्तके नसल्याने अनेक मुले शाळेपासून दूर राहतात. शाळेतील पटसंख्या तसेच उपस्‍थिती वाढावी, याकरिता विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीत शिकवणाऱ्या एक लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके (एकात्मिक पुस्तक संच) सरकारमार्फत मोफत पुरवण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून शाळास्तरापर्यंत पोहोचती करण्यात येणार आहे. ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील पदाधिकारी, अधिकारी, पालक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पाठ्यपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय, वर्गनिहाय, माध्यमनिहाय, पंचायत समितीनिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी आणि शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करणेबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत नियोजन करण्यात यावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निकष पात्र शाळांना अशा प्रकारच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. कोट जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका शाळा आणि खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करू नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिली जातील. – पुनिता गुरव, प्राथमिक विभाग, रायगड

कामोठेत रंगले कुस्तींच्या दंगलीचे अधिवेशन

पनवेल : भव्य मैदान आणि त्यात आकर्षक रोषणाईसह लाल मातीचा दर्जेदार आखाडा, भव्य व्यासपीठ, शेकडो मान्यवरांची उपस्थिती, तिन्ही दिशेला हजारोंच्या संख्येने भरलेली भरगच्च प्रेक्षक गॅलरी, हलगीचा ठेका, दणदणीत सूत्रसंचालन, दक्ष पंच, कुस्तीचा जादूगार पैलवान देवा थापाची चपळाई अशा सर्व सूत्रांचे एकीकरण करत कामोठेत कुस्तींच्या दंगलीचे अधिवेशन रंगले! निमित्त होते ते पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात ‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी २०२४’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील पैलवान देवा थापा आणि हिमाचल प्रदेशमधील पैलवान नवीन चौहान यांची बिग शो मॅच आकर्षण ठरली. यामध्ये देवा थापा याने नवीन चौहानला चीतपट करून बाजी मारली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुस्तीपटू या कुस्तीच्या दंगलीत सहभागी झाले होते. एकास एक सरस अशा कुस्त्यांनी वातावरणात जल्लोष पहायला मिळत होता. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके यांच्या हस्ते झाले. या वेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रविण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, दिलीप पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, तेजस कांडपिळे, अमर पाटील, गोपीनाथ भगत, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, शिला भगत, कुसूम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, भाऊ भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विद्या तामखेडे, रुपेश पावशे, विनोद नाईक, हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव, यांच्यासह इतर पदाधिकारी, तालुका कुस्तीगीर असोसिएशनचे सदस्य आणि मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कुस्तीगीर पैलवान नुसता ताकदवान असून चालत नाही, तर त्याच्याबरोबर अंगात चपळता असली पाहिजे. डावपेच टाकण्याची पद्धतही महत्त्वाची असते. यातून खर्‍या अर्थाने आपले जीवन घडवण्याचे काम कुस्तीगीरांमधून होत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, काही वर्षांपूर्वी येथे मोठ मोठ्या कुस्त्यांचे सामने भरवले जात होते. कोरोनानंतर ते बंद झाले. परेश ठाकूर हे खेळामध्ये नेहमीच रस घेत असतात. त्यामुळे त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुस्तीचे सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यातून कुस्तीपटूंना अपेक्षेपेक्षा जास्त प्रोत्साहन मिळालेले दिसत आहे. हिंदकेसरी योगेश दोडके हे राज्य कुस्ती असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांनी परेश ठाकूर यांची आज रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परेश ठाकूर आपल्या जिल्ह्यात कुस्तीला चालना देतील. पनवेल तालुक्यात कुस्तीचा आखाडा होणे गरजेचे आहे. गव्हाण ग्रामपंचायतीत आम्ही सिडकोकडे २० हजार मीटरचा प्लॉट मागितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे, त्याच्या बाजूला एक एकर जागा कुस्तीचा आखाडा बनवण्यासाठी घेण्याचा आमचा मानस आहे. सिडकोच्या परवानगीसाठी वेळ लागेल, पण मनामध्ये आलंय त्यामुळे ते पूर्ण केले जाईल, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परेश ठाकूर यांच्यावरील प्रेमामुळे उपस्थित राहिलेल्या सगळ्यांचे आभार मानून भावी काळात कुस्तीगीरांनी स्पर्धेत अधिक जोमाने भाग घ्यावा, असे आवाहन केले व परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार निरंजन डावखरे यांनी परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त मातीतील कुस्ती आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. ते म्हणाले, आपल्या मातीबरोबर जोडून ठेवण्यासाठी या पद्धतीचे खेळ आवश्यक आहेत. हल्ली आपण पाहतो की कबड्डी, कुस्ती मॅटवरच खेळ जास्त होतात. अशा वेळी मातीतील कुस्तीचा खर्‍या अर्थाने आनंद आपल्या इथे पहायला मिळत आहे. यातूनच परेशशेठ यांची नाळ येथील मातीशी जुळल्याचे दिसून येते. नेपाळमधील पैलवान देवा थापा यांनी म्हटले की, परेश ठाकूर यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अनेक ठिकाणी गेलो, पण पनवेकरांसारखे प्रेम मला कोठेच मिळाले नाही. मला आपण बोलवल्याबद्दल धन्यवाद! गिरवले (ता. पनवेल) येथील पैलवान प्रतिक हातमोडे यांनी सांगितले की, या सामन्यांचे आयोजन चांगले आहे. विशेष म्हणजे बक्षिसाची रक्कमही चांगली आहे. कुस्तीत वन मॅन शो असतो. मनापासून आवड असेल तरच या खेळात येणे चांगले, कारण यामध्ये खाणे-पिणे व्यवस्थित लागते. पनवेल भागात आखाडा तयार झाला, तर निश्चितच त्याचा फायदा आमच्यासारख्या कुस्तीपटूंना होईल. * गदा जिंकणारे कुस्तीपटू अमेघा अरुण घरत, खोपटे-उरण वैष्णवी दिलीप पाटील, कल्याण सौरभ पाटील, सीकेटी-पनवेल

भाजपा आमदार व पदाधिकाऱ्यांची बूथला भेट

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ठिकठिकाणच्या बूथला भेट देऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी मेहनत घेतली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी शहरातील बूथला भेट दिली. तेथील भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मतदानाची माहिती घेतली. तसेच त्यांना विविध सूचना दिल्या. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाण्यात मतदारांची परवड, जबाबदार संबंधितांवर कारवाई करा – डॉ. संजय मंगला गोपाळ

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघ अंतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघातील  मतदान व्यवस्थेत अव्यवस्था,.ना पिण्याचे पाणी, ना पंखे, मतदारांच्या अंगावरुन वाहत होत्या घामाच्या धारा. मतदारांच्या या प्रचंड परवडीला जबाबदार संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र समन्वयक डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघांतील ठाणे विधानसभा क्षेत्रातीलमतदारसंघात कोलशेत -ढोकाळी येथिल श्री. शरदचंद्र मिनी स्पोर्ट्स कॅाम्पलेक्समध्ये बॅडमिंटन हॅालमध्ये तात्पुरते तंबू उभारून मतदानाचे ४ बुथ्स – बुथ क्र. ११७ ते १२० – उभारले होते. येथे सकाळी ७ः१५ ते ८ः४५ अशी दीड तास रांग लावल्यावर मतदार मतदान करू शकले. सर्व बुथ्सवर प्रचंड रांगा. बॅडमिंटन हॅालमध्ये ४ बुथ्सचे मिळून साधारणतः हजार एक स्त्री – पुरुष मतदार रांगेत उभे होते. तापमान होतं ३३ डिग्री सेल्सियस व आद्रतेमुळे जाणवत होतं ३९ डिग्री सेल्सियस. सर्व जण रांगेत उभे राहिल्यावर ५ च मिनिटात घामाने निथळत होते. नंबर लागे पर्यंत तासाभरात घामाची नखशिखांत आंघोळ! ना पंखे ना पिण्याचं पाणी ना वरीष्ठ नागरिक व दिव्यांगांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय.दुपारी तापमान ३८-३९ पर्यंत गेले होते.म्हणजे जाणवणारं तापमान ४५ डिग्री सेल्सियस होते. मतदानाचा हक्क बजावायला आलेल्या नागरिकांची ही परवड झाली होती. या परवडीला जबाबदार अधिकार्‍यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करावी अशी मागणी डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे.

कळवा- मुंब्रा परिसरात मतदान प्रक्रिया संथ, व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची घटना घडल्याचा दावा !

जितेंद्र आव्हाड यांची संबंधितांवर कारवाईची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : कल्याण लोकसभा अंतर्गत कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील मुंब्र्यातील बाबाजी पाटील शाळेत अतिशय संथगतीने मतदान सुरु असल्याचे दिसून आले. यामुळे एकाच जागेवर दोन दोन तास रांगेत मतदार उभे असलेले आढळून आले. तर अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या घटनाही घडल्याचे मतदारांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या या कार्यपद्धतीवर मतदारांनी व स्थानिक आमदार डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली. कल्याण लोकसभा मतदार संघाअंतर्गत  मुंब्रा – कळवा विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २४३ या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट (VVPAT)  मशीन बंद पडलेल्या आहेत, अशा स्वरुपाच्या सकाळी बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बाबींची दखल घेवून अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून खातरजमा केली असता व्हीव्हीपॅट (VVPAT) बंद पडल्याची बाब आढळून आली  नाही. सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्षात व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच इतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु मतदान सुरळीत सुरू होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली असून सदरच्या रांगा आटोक्यात आणल्या असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू  होते. सर्व झोनल अधिकारी व केंद्राध्यक्षांना मतदानाचा वेग वाढविण्याच्या सुचना दिल्या असून १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान व्यवस्थितरित्या सुरू असल्याचे अतिरिक्त सहायक  निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी नमूद  केले.

काजल आणि फहिमला अंतिम जेतेपद

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा ( पश्चिम ) येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शिवतारा कॅरम क्लबच्या फहिम काझीने मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ०-२५, २०-१०, २५-११ असे नमवून विजेतेपद पटकाविले. तर दुसरीकडे आपल्या अनुभवाच्या जोरावर इंडियन ऑईलच्या काजल कुमारीने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लबच्या रिंकी कुमारीचा २५-१, २५-१३ असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्यांना लोकमान्य मंडळाचे कार्याध्यक्ष मनोहर गोडसे, लोकमान्य नगरचे कार्याध्यक्ष सुहास बेडेकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार, उपाध्यक्ष केतन चिखले, मानद सरचिटणीस अरुण केदार व सहसचिव संजय बर्वे यांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरुष एकेरी गटाचे उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) वि वि ओमकार टिळक ( ए. के. फाउंडेशन ) ५-२३, १८-१७, १९-५ फहिम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि प्रशांत मोरे ( रिझर्व बँक ) २५-८, ०-२५, २५-१२ महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी.) २०-२, २५-० रिंकी कुमारी ( पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लब ) वि वि अंबिका हरिथ ( रिझर्व्ह बँक )  ०-२५, १९-१४, २२-०

शहापूरमध्ये मतदार महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्था

खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती. आजनुप ग्रामपंचायतमधील बोण्डरपाडा, भेरेपाडा, दापूर, माळ कातकरीवाडी येथील मतदारांची नावे इतर वाड्यांमधील केंद्रांवर गेल्याने मतदारांची गैरसोय झाली; मात्र मतदारांनी रखरखत्या उन्हात मतदान केंद्र गाठून आपला हक्क बजावला. मतदारांना मनस्ताप सहन करावा लागल्याने पुढील निवडणुकीतही अशीच व्यवस्था असल्यास मतदान करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच पुढील निवडणुकीसाठी नवीन सर्वेक्षण करून मतदारयाद्यांची छाननी करावी. मतदार राहत असलेल्या ठिकाणची खात्री करून मतदारयाद्या तयार कराव्यात, अशी मागणी उपसरपंच अजय कथोरे यांनी केली आहे.