Author: bittambatami.com

लिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी ठाणे हॉकी अकादमीचा पुढाकार

ठाणे : ठाणे हॉकी अकादमीच्या उन्हाळी शिबिराची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने झाली, भारतीय हॉकीचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो आणि भारताच्या आशिया चषक प्रतिनिधी वैशाली पवार आणि मध्य रेल्वेचे ॲथलेटिक प्रशिक्षक नागेश शेट्टी यांच्या यांच्या उपस्थित उद्घाटन संपन्न झाले. या शिबिरात एकूण ४७ खेळडु  सहभागी झाले होते, ते सर्वजण आपली कौशल्ये सुधारण्यासाठी आणि क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तींकडून शिकण्यास उत्सुक होते. शिबिराची सुरुवात व्यावसायिक खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्याने झाली, ज्यामध्ये प्रतिभा आणि खेळाबद्दलची आवड दिसून आली. या सामन्याने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही तर नवीन खेळाडूंना त्यांच्या खेळात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणाही दिली. मुकेश ठोंमरे यांनी डेकॅथलॉनचे आभार व्यक्त केले. त्यांनी शिबिरासाठी त्यांचे मैदान उदारपणे देऊ केले, खेळाडूंना सराव आणि सुधारण्यासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली. या व्यतिरिक्त, इनसोलार, एक सोलर पॉवर ईपीसी कंपनी, सर्व सहभागींसाठी हॉकी स्टिक्स, बॉल आणि टी-शॉर्ट्स प्रायोजित केले, ज्यामुळे कार्यक्रमात एकतेचा आणि सांघिक भावनेचा स्पर्श झाला. या उन्हाळी शिबिरात या प्रतिभावान तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देणे आणि त्यांची कौशल्ये विकसित करणे सुरू ठेवत त्यांना पाठिंबा दर्शवावा. हॉकीच्या जगात यश मिळवण्याचे त्यांचे ध्येय असल्याने त्यांचा जयजयकार करूया. प्रशिक्षक पीटर मिनेझेस आणि सहाय्यक प्रशिक्षक जेफ्री मार्सेडो त्यांच्या उत्कृष्ट कोचिंग शैलीसाठी आणि भविष्यातील प्रतिभा निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.असे मुकेश ठोमरे यांनी सांगितले.. ठाणे हॉकी अकादमीचे गजानन गंधे, ॲड मुकेश ठोमरे आणि नागेश शेट्टी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले दोन महिने अथक परिश्रम घेतले.

कांगा क्रिकेट स्पर्धा

डोंबिवली  क्रिकेट क्लब उपांत्यपूर्व फेरीत ठाणे : डोंम्बिवली क्रिकेट क्लबने पाटण क्रिकेट क्लबचा १२४ धावांनी  दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित डॉ. एच. डी. कांगा बाद पद्धत क्रिकेट स्पर्धेच्या ब गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करताना २४३ धावांचे आव्हान उभे केल्यावर सागर मिरमॉटने पाच आणि शित रंभीयाने तीन बळी मिळवत  पाटण क्रिकेट क्लबला ११९ धावांवर गुंडाळून विजयावर शिक्कामोर्तब  केले . पाटण क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. प्रणव यादवने  ९७  चेंडूत ११३ धावांची खेळी करत डोंबिवली क्रिकेट क्लबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. अंकित नाईकसाटमने   ४४ धावांचे योगदान दिले.  इशानने तीन  आणि चेतनने दोन बळी मिळवले. या आव्हानाचा बचाव करताना सागर  मिरमॉटने  १९ धावांत ५ बळी मिळवत पाटण क्रिकेट क्लबला धक्का दिला.  शित रंभीयाने तीन आणि सोहंम सावंतने दोन बळी मिळवत  संघाच्या विजयात योगदान दिले. पराभूत संघाकडून सौरभने २६ आणि जिगरने २५ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : डोंबिवली क्रिकेट क्लब  : ४५ षटकात सर्वबाद २४३ ( प्रणव यादव ११३, अंकित नाईकसाटम ४४ इशान ८-३३-३, चेतन ९-३९-२,) विजयी विरुद्ध  पाटण क्रिकेट क्लब : ३० षटकात सर्वबाद ११९ ( जिगर २५, सौरभ २५  सागर मिरमॉट ७-३-१९-५, शित रंभीया ६-२३-३, सोहम सावंत ४-१९-२).

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोई-सुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सोई-सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेऊन जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी दिव्यांग मतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उल्हासनगर मतदार संघाची यंत्रणा मतदानासाठी सज्ज

उल्हासनगर – कल्याण लोकसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या उल्हासनगर विधानसभा मतदार संघाची यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे.त्याकरिता 251 मतदान केंद्र,120 कंट्रोल व बॅलेट युनिट आणि 130 VVPAT यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप-विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय तसेच निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दोन टप्यात कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. उल्हासनगर विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या ही 2 लाख 48 हजार 904 आहे.मागच्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 49.6 टक्के मतदान झाले होते.यावेळेसच्या निवडणुकीत आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती केली असून त्यास किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो हे 20 मे रोजी होणाऱ्या मतदाना नंतर स्पष्ट होणार आहे.

राणीबागेत दुर्मिळ झाडांचा बीएनएचएसकडून शोध

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात अनेक दुर्मिळ झाडांच्या प्रजाती आहेत. या प्रजातींची ओळख बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) नुकतीच केली आहे. बीएनएचएस ही संस्था नैसर्गिक वारशाचा अभ्यास, संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या ‘ट्री वॉक’ या उपक्रमामधून अनेक दुर्मिळ प्रजातींची ओळख पटल्याचा आनंद झाल्याचे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांना सांगितले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या भारतातील प्रमुख वन्यजीव संशोधन संवर्धन संस्थेच्या माध्यमातून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात नुकताच ट्री वॉक हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बीएनएचएस सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने बागेतील समृद्ध फुलांची विविधता पाहण्याची अनोखी संधी सदस्यांना उपलब्ध झाली. बीएनएचएसच्या सदस्यांनी बागेचे निरीक्षण केले असता, तेथे त्यांना विविध प्रकारच्या देशी आणि विदेशी झाडांच्या प्रजाती नजरेस पडल्या. प्रत्येक झाडाची स्वतःची अनोखी कथा आणि महत्त्व आहे. ट्री वॉकचे नेतृत्व सेंट झेवियर कॉलेजमधील सहायक प्राध्यापक डॉ. राजदेव सिंग आणि निवृत्त प्राध्यापक मानेक मिस्त्री यांनी केले. प्रो. सेंट झेवियर कॉलेज, स्वीडल सेरेजो, बीएनएचएस प्रोग्राम्स विभागातील वनस्पतीशास्त्रज्ञ आणि शिक्षक आसिफ खान यांनी सांगितले की, आमच्या राणीबाग येथील ट्री वॉकला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला आनंद झाला, बीएनएचएस ट्री वॉक मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात आणि आजूबाजूला अशा निसर्गभ्रमणाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे. उपक्रमात १७ सदस्यांचा सहभाग राणी बागेच्या प्रवेशद्वारावरील जुन्या बाओबाब ट्री येथून झाडांचे निरीक्षण करत बीएनएचएसच्या १७ सदस्यांनी ‘ट्री वॉक’ला सुरुवात केली. सदस्यांना मॅजेस्टिक हेवन लोटस ट्री, कॅन्डल ट्री, प्राईड ऑफ इंडिया ट्री, वीपिंग पेपरबर्क, एलिफंट ॲपल आणि अगदी चॉकलेट किंवा कोकाओ ट्रीसारखी अनेक दुर्मिळ झाडे दिसली.

नवमतदारांचा कल नोटाकडे

मुंबई : राज्यात पक्षामधील फाटाफूट, बदलत्या वैचारिक, राजकीय भूमिका यामुळे झालेला वैचारिक गोंधळ हा १८ ते २३ या वयोगटातील नवमतदारांच्या पचनी पडलेला दिसत नाही. केवळ राजकीय स्वार्थासाठी होत असलेले पक्षांतर, काही क्षणात बदलेल्या वैचारिक भूमिका हे राज्यासाठी काही नवीन नाही. मात्र हा राजकीय गोंधळ तरुणाईच्या समजण्याच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे यावेळी मतदान करायचे, पण ते ‘नोटा’ला करू, अशा भावना या नवमतदारांकडून व्यक्त होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यात ३० हजार आणि उपनगर जिल्ह्यात सुमारे ८० हजार नवमतदारांच्या नावांची नोंदणी झाली आहे. पहिल्यांदा मतदान करणारा हा तरुण वर्ग मतदानासाठी उत्साही आहे. तसेच निवडणूक आयोगही नवमतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे म्हणून शाळा-कॉलेज, सोशल मीडियातून आवाहन करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या नवख्या मतदारांना राज्यात गेल्या दोन वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फाटाफूट फारशी भावली नाही. नवमतदारांच्या बोलण्यातून ते प्रकर्षाने जाणवत आहे. मुंबईत तर एकाच पक्षातील सहकारी असलेले एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांऐवजी ‘नोटा’ ला मतदान करत आपली नाराजी दाखवण्याची मानसिकता या तरुणांची असल्याचे दिसत आहे. नाराजीचे प्रतिबिंब आपल्या पसंतीचा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्यास कोणाला मतदान करायचा, असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहायचा. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ‘नन ऑफ द अबाव्ह’ (नोटा) म्हणजेच वरीलपैकी कोणीही नाही, हा पर्याय दिला होता. त्यामुळे अनेक मतदार हा पर्याय निवडताना दिसतात. दरम्यान, नोटाला मिळालेली मते कुठेही ग्राह्य धरली जात नसली तरी मतदारांना नाराजी व्यक्त करण्याचा एक ठोस पर्याय आहे. यंदा २०१९ च्या तुलनेत नोटाला जास्त मते मिळतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.

‘आरटीई’च्या निर्णयाने ग्रामीण भागातील पालकांना दिलासा

जव्हार : सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमुळे तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान गेल्या काही वर्षांपासून उंचावण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या पायाभूत सुविधा योग्यप्रकारे राबविण्यात आल्याने प्रगतीला सुरुवात झाली आहे; परंतु राज्य सरकारने घेतलेल्या ‘आरटीई’च्या खोडसाळ प्रवेशप्रक्रियेमुळे येथील आदिवासी विद्यार्थी हे इंग्रजी माध्यम व दर्जेदार शिक्षणापासून दूर राहण्याची शक्यता होता. स्पर्धेच्या युगात टिकण्यास असमर्थ ठरतील, म्हणून तालुक्यातील आदिवासी पालकांनी एकत्र येऊन काही शैक्षणिक संघटनांचा पाठिंबा घेत या प्रवेशप्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे न्यायालयाने या प्रवेशप्रक्रियेला स्थगिती देऊन जुन्याप्रमाणेच आरटीई प्रवेशप्रक्रिया व्हावी, असे सांगितल्याचे पालकांनी सांगितले. वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होऊन या स्पर्धेच्या युगात अस्तित्व टिकावे, म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के प्रवेश दिला जातो; परंतु सरकारने यंदा लाभार्थ्यांच्या राहत्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावरील इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह मराठी अनुदानित, विनाअनुदानित व जिल्हा परिषद शाळांनाही ‘आरटीई’चे नियम लागू केले होते. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया मंदावली होती. त्यासाठी मुदतवाढ द्यावी लागली; परंतु स्वयंअर्थसहाय्यित मराठी व इंग्रजी शाळा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडले. त्यामुळे सरकारने ‘आरटीई’ची प्रवेशप्रक्रिया नव्याने होणार आहे. त्यातून अनुदानित शाळा वगळण्यात येणार असल्याचे जव्हार येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सांगण्यात आले. नवीन प्रवेशप्रक्रियेला मंगळवार (ता. १४)पासून सुरुवात झाली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने केलेली चुकीची अधिसूचना घटनेच्या कलम १४ म्हणजे समानता आणि कलम २१चे उल्लंघन करणारी आहे, असे संघटनेच्या वतीने सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. तरीदेखील वेगवेगळे प्रयोग हे खासगी व इंग्रजी शाळांवर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागातून होत आहे. जव्हार तालुक्यातील तीन इंग्रजी शाळांत जवळपास ४० विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची संधी गेल्या काही वर्षांपासून मिळत आल्याने शिक्षणात बदल होत गेला. त्यामुळे येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असो किंवा इतर आव्हानात्मक शिक्षणाला पात्र ठरतील. – सचिन चव्हाण, पालक न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रके रद्द करून स्वयंअर्थसहाय्यित शाळांचा समावेश करून पुन्हा प्रवेशप्रक्रिया राबवावी, असे पत्र काढले. त्यामुळे प्रक्रिया सुरू केली जाईल. – पुंडलिक चौधरी, गटशिक्षणाधिकारी, जव्हार

‘मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी !’

कलर्स मराठीच्या लोगोमध्ये बदल .. कलाकारांनी व्हिडिओंद्वारे मतदारांना केले आवाहन मुंबई : कलर्स मराठी वाहिनीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब लोगोमध्ये बदल केलेला दिसत आहे. बदललेल्या नव्या लोगोमध्ये एका बोटावर शाई लागलेली दिसतेय, ज्यामुळे मत दिल्याचे सूचित होत आहे. मागील काही वर्षात मतदानाचा टक्का फार कमी झाला आहे. या नव्या लोगोच्या बदलामुळे लोकांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि एक स्थिर देशासाठी त्याची आवश्यकता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा कलर्स मराठीचा उद्देश आहे. कलर्स मराठीने नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. नुकतेच कलर्स मराठीच्या कलाकारांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरून विविध व्हिडिओंद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान करण्यासाठी बाहेर या , वोटिंग करणे हा तुमचा हक्क आणि जबाबदारी आहे. देशासाठी एक पाऊल उचलून मतदान करा. आपल्या एका मताने देशाचे कल्याण होईल. मतदार हे टीव्ही आणि सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात करतात, हीच गोष्ट लक्षात घेऊन कलर्स मराठीने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे. कलर्स मराठीने केलेला हा बदल प्रेक्षकांना मतदान करण्याची प्रेरणा देईल आणि त्यांना मतदान करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करेल. कारण मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी!

98 हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन

रायगड जिल्ह्यात खरिप हंगामात अलिबागः रायगड जिल्ह्यात येत्या खरिप हंगामात 98 हजार 487 हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.  3 हजार 23 हेक्टरवर नाचणीची लागवड होणार आहे.  यंदाच्या खरिप हंगामात एकूण 1 लाख 1 हजार 510 हेक्टर क्षेत्रावर  पिकांची लागवड करण्यात येणार आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 400 हेक्टर जास्त भात  लागवडीचे  नियोजन  नयोजन जिल्ह्याच्या कृषी विभागाने केले आहे. रायगड जिल्हा   भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे शेतीक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे देखील शेतजमीन नापिक  होत  आहे. शेती परवडत नाही म्हणून शेतकरी शेती करत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस भाप लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतकरण्यासाठी प्रात्साहन देण्या करिता कृषिविभाग प्रयत्न करत असतो. यंदा देखील कृषिविभागाने भात लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 400 हेक्टर जास्त क्षेत्रावर भात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी 89 हजार 463 हेक्टरवर भातपिकाची लागवड झाली होती. यावर्षी सुमारे 400 हेक्टरने भाताचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यात 13 हजार हेक्टर, मुरुड 3 हजार 234 हेक्टर, पेण तालुक्यात 11 हजार 553 हेक्टर, खालापूर तालुक्यात 2 हजार 852 हेक्टर, पनवेल 8 हजार 705 हेक्टर, कर्जत तालुक्यात 9 हजार 110 हेक्टर, उरण तालुक्यात 2 हजार 436 हेक्टर, माणगाव तालुक्यात 11 हजार 526 हेक्टर, तळा तालुक्यात  2 हजार 120 हेक्टर, रोहा तालुक्यात 10 हजार 645 हेक्टर, सुधागड-पाली तालुक्यात 5 हजार 420 हेक्टर, महाड तालुक्यात 10 हजार 588 हेक्टर, पोलादपूर 3 हजार 235 हेक्टर, म्हसळा तालुक्यात 2 हजार 460 हेक्टर, श्रीवर्धन तालुक्यात 1 हजार 603 हेक्टर असे 98 हजार 487 हेक्टवर भात पिकाचे नियोजन आहे. रायगड जिल्ह्यातील यंदा खरिप हंगामात 3 हजार 23 हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यचे नियोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी 2 हजार 761 हेक्टरवर नाचणी पिकाची लागवड झाली होती. यंदा  अलिबाग तालुक्यात 85 हेक्टर, पेण तालुक्यात 175 हेक्टर, खालापूर तालुक्यात 45 हेक्टर, पनवेल 40 हेक्टर, कर्जत तालुक्यात 125 हेक्टर, माणगाव तालुक्यात 868 हेक्टर, रोहा तालुक्यात 315 हेक्टर, तळा तालुक्यात 200 हेक्टर, सुधागड-पाली तालुक्यात 250 हेक्टर, महाड तालुक्यात 210 हेक्टर, पोलादपूर 270 हेक्टर, म्हसळा तालुक्यात 348 हेक्टर, श्रीवर्धन तालुक्यात 92 हेक्टर असे 3 हजार 23 हेक्टरवर नाचणी पिकाचे नियोजन आहे.

शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  ठाण्यातील तलावपाळी परिसरात ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली. स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली.  ठाणे शहरातील मासुंदा तलाव, रंगो बापूजी गुप्ते चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या  छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला. रणविजय ढोल पथक, सारजी लेझीम पथक यांच्या सहभागासह निघालेल्या या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. यावेळेस आयोजक प्रफुल वाघोले यांनी, ठाणे शहरात प्रथमच शंभूराजांच्या जयंतील उत्सव साजरा करण्यात आला आहे. काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजी राजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आला असल्याचे सांगितले. या सोहळ्याच्या आयोजनात मंगेश आवळे, नितीन लांडगे, रविंद्र कोळी, विजय त्रिपाठी, जितेंद्र यादव, रामानंद यादव, संतोष राणे, निलेश हातणकर, महेश मोरे संतोष मोरे, गजानन चौधरी, अनिल नलावडे चेतन शिंदे, शिवाय एगडे, प्रतिभा शिर्के, सुभाष देवरे आदींनी मोलाची भूमिका बजावली होती.