Author: bittambatami.com

मालमत्ता भाडे तत्त्वावर देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

ठाणे : वस्तू व सेवा कर कार्यालय, ठाणे येथील कार्यालयीन कामकाजाकरिता ठाणे महानगर क्षेत्राच्या हद्दीतील मध्यवर्ती ठिकाणी व्यवसायिक स्वरुपाची सुमारे 12000 चौ.फुट ते 14000 चौ.फुट इतक्या जागेची आवश्यकता आहे. इच्छुक मालमत्ताधारकांनी यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्यकर सह आयुक्त, ठाणे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. इच्छुक मालमत्ता धारकांनी मालमत्ता भाडे तत्त्वावर देण्यासाठीच्या प्रस्तावासह राज्यकर सहआयुक्त (प्रशा.), कार्यालय, ठाणे, 3 रा मजला वस्तु व सेवा कर कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, येथे संपर्क साधावा, असे ठाणे राज्यकर सह आयुक्त (प्रशासन) यांनी कळविले आहे. 00000000

शेतकऱ्यांनी डिएपी खतास पर्यायी खते वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

ठाणे : महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. चालू खरिप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयाचे कृषी उपसंचालक (खते) संदिप तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे की, डिएपी (Di-Ammonium Phosphate) खतामध्ये 18 टक्के नत्र तर 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत. डिएपी खताची कमतरता भरुन काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त  खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे. एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16 व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो. त्याच बरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असून डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखील डिएपी खतास उत्तम पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

परळ बीआयटी वसाहतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारावे

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची महापालिका आयुक्तांकडे मागणी   मुंबई : परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी वसाहतीपर्यंत पोहचताना अनुयायी तसेच देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वास्तूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक स्वरुपात विकसित करुन दोन्ही बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना देण्यात आले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे साक्षी दरेकर, भरत घोलप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. परळ विभागात बीआयटी वसाहत असून त्याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९१२ ते १९३२ या कालावधीत आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास होते. त्यांनी या ठिकाणाहून सामाजिक चळवळीला सुरुवात केली होती. त्यामुळे ही वास्तु पाहण्यासाठी देश- विदेशातून हजारोंच्या संख्येने पर्यटक तसेच अनुयायी येत असतात. परंतु त्या वास्तुपर्यंत पोहचण्यासाठी लोकांना अडचण होते. त्या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक तसेच कमान नाही. त्यामुळे पर्यटक तसेच अनुयायींना अडचणींना सामोरे जावे लागते.या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी बीआयटी वसाहतीच्या दोन्ही बाजूला म्हणजेच परेल ब्रीजच्या बाजूस विठ्ठल चव्हाण मार्ग या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे तसेच प्रभादेवी परेल स्थानक येथून येणाऱ्या मार्गावर सुभाष डांबरे रोड या ठिकाणी सन्माननीय माता रमाई यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी भाजपा शिष्टमंडळाने केली. 00000

दिव्यात घाणीचे साम्राज्य

कचऱ्यातून होतोय नागरिक, लहान मुलांचा प्रवास   ठाणे :  रात्री धुवाधार पडलेल्या पावसामुळे दिव्यात बऱ्याच भागात पावसाचे पाणी साठले. तर आता दिव्यात पावसात नालेसाफाई सुरु असून नाल्यातील कचऱ्याचा गाळ हा बाहेरच टाकला गेल्याने ठामपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला केराच्या टोपलीत टाकल्याचे चित्र दिसत आहे. त्या नाल्या बाहेरच्या कचऱ्याच्या गाळातून, पावसाच्या साठलेल्या घाण पाण्यातून आज सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना तर शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यातूनच मार्गक्रमण करावे लागले. ठामपा क्षेत्रातील सर्व प्रभाग समितींमध्ये नालेसफाई सुरु आहे. तर या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तत्काळ उचलण्यात यावा. याने परिसरात दुर्गंधी, रोगराई पसरणार नाही, अशा सूचना ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या होत्या. पण या आयुक्तांच्या आदेशाला दिव्यात कचऱ्याच्या टोपलीत टाकल्याचे दिसत आहे. दिव्यातील प्रत्येक नाल्याच्या सफाईनंतर त्यातील गाळ हा बाहेरच ठेवला गेल्याचे नागरिक सांगत आहेत. त्या गाळातूनच नागरिकांना चालावे लागत आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती तर्फे पावसात नालेसफाईची कामे सुरु आहे. एकाच वेळी दोन तीन नाल्यातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे. तर दिवा स्टेशन जवळील पूर्वेत श्लोक नगर येथील नारायण भगत परिसरात मोठ्या नाल्याची सफाई गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु आहे. पण परवा या नाल्यातून कचऱ्याचा गाळ काढण्यात आला. पण तो कचऱ्याचा गाळ लगेचच न उचलल्याने रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे तेथे गुडघाभर पाणी साचले.या गुडघाभर घाण पाण्यातून न जाता नाल्याच्या भिंतीवर चढून सकाळी नागरिक कामाला गेले आहेत. तर शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या आई वडिलांनी उचलून तेथून मार्ग काढला आहे. या नारायण भगत परिसरात अंदाजे पन्नास हजार ते दिड लाखांची लोकवस्ती आहे. तसेच या सर्वांना कामाला जाण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी, दिवा स्टेशनला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. पण तोच नाल्याच्या कचऱ्यामुळे, घाण पाण्याने भरलेला असल्याने तेथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.डोंगर परेदशी, उप मुख्य स्वच्छता निरिक्षक, घनकचरा व्यवस्थापन विभाग – दिव्यात एकाच वेळी दोन, तीन नाल्यांची सफाई सुरु आहे. आम्ही नाल्यातील कचऱ्याचा गाळ काढल्यावर एक दोन दिवस तो कचरा तसाच ठोवतो. कारण उचलून नेताना नाल्यातील कचऱ्यासोबत आलेले घाण पाणी इतरत्र पडत जाते. त्यामुळे तो पूर्ण रस्ता घाण होतो. तर त्या गाळाच्या, घाण पाण्याच्या दुर्गंधीने रोगराई पसरु शकते. तर आता पाऊस सुरु झाल्यापासून आम्ही तो कचरा तातडीने उचलून टाकतो.

माथेरानकरांसह पर्यटकांचा खड्डेमय प्रवास

माथेरान : माथेरान या पर्यटन नगरीत मुख्य प्रवेशद्वारा पासूनच येणाऱ्या पर्यटकांना शहरात येण्यासाठी वाहतुकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यातच मुख्य रस्त्यावरील नव्याने लावण्यात आलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याना अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे पायी चालत येणाऱ्या पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असून ह्या ब्लॉकच्या रस्त्यात काही निकृष्ठ दर्जाच्या ब्लॉकची माती होऊन जागोजागी खड्डे पडले आहेत. उन्हाळ्यात हे खड्डे बुजविण्यासाठी काही संघटनानी पुढाकार घेतला होता परंतु नेहमीच विकासाला विरोध करणाऱ्या काही मंडळींनी पर्यावरण वाद्याना सदर बाबतीत माहिती देऊन रस्ते आहेत त्याच परिस्थितीत राहावे असे बोलले जात आहे. याच रस्त्यावरून पर्यटक, शालेय विद्यार्थी, आबालवृद्ध त्याचप्रमाणे घोडे,ई रिक्षा जात असतात. या खड्डयामुळे अनेक पर्यटकांना पाय मुरंगळुन दुखापत झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना करून सर्वाना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्थानिक बोलत आहेत. 0000

अभिजीत कांबळे यांचे ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ विषयावर व्याख्यान

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील विकासात महत्वपूर्ण योगदान असणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा देण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या 26 मे रोजीच्या 150 व्या जयंती दिनाच्या औचित्याने शनिवार दि. 22 जून 2024 रोजी, सायं 6.30 वा., वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच डिजीटल अशा तिन्ही प्रसार माध्यमांमध्ये वीसहून अधिक वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले व सध्या बीबीसी मराठीचे संपादकपद भूषविणारे संपादक, व्याख्याते श्री. अभिजीत कांबळे यांचे ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे प्रमुख साधन आहे हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण प्रसारावर विशेष भर दिला. त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्रियांच्या शिक्षणाकडेही प्राधान्याने लक्ष दिले. शिक्षणाचे महत्व ओळखून त्याकाळी ठोस भूमिका घेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीच्या शैक्षणिक विचारांना या निमित्ताने उजाळा मिळणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15,  ऐरोली येथे उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या विचारसूत्रावर आधारित ‘ज्ञानस्मारक’ म्हणून येथे भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी नावाजले आहे. याठिकाणी ‘विचारवेध’ शृंखलेंतर्गत नियमित आयोजित करण्यात येत असलेल्या मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांतून श्रोत्यांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करुन दिली जात आहे. या व्याख्यानांना नागरिकांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. आधुनिक विज्ञाननिष्ठ समाजक्रांतीचे उद्गाते म्हणून मानांकित राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वस्पर्शी कार्याला अभिवादन करण्यासाठी व त्यांचे अतुलनीय कार्य जाणून घेण्यासाठी शनिवार, दि. 22 जून 2024 रोजी, ऐरोली मुलुंड खाडी पुलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सायं. 6.30 वा. आयोजित करण्यात आलेल्या नामवंत व्याख्याते व संपादक श्री. अभिजीत कांबळे यांच्या ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ या व्याख्यानाप्रसंगी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. ०००००००

 ‘निरंजन डावखरे यांच्याकडून कोकणातील युवाशक्तीसाठी कार्य’

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे मत   भिवंडी: कोकणासह ठाणे जिल्ह्यातील युवाशक्तीसाठी आमदार निरंजन डावखरे यांनी कार्य केले आहे. कोकणासह ठाणे जिल्ह्यातील सर्व स्तरांतील प्रश्न मांडून ते सोडविणाऱ्या महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज येथे केले. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपासह महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी भिवंडी शहरातील ओसवाल हॉलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आज उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, सौ. नीलिमा डावखरे, लोकसभा समन्वयक जितेंद्र डाकी, हरिश्चंद्र भोईर, रामनाथ पाटील, यशवंत सोरे, छत्रपती पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कोकणातील पाच जिल्ह्यात पसरलेल्या पदवीधर मतदारसंघाचे प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी सातत्याने मांडले. कोकणातील युवा शक्तीच्या प्रगतीसाठी ते कार्य करीत होते. पदवीधर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांचे प्रश्न मांडण्याबरोबरच सामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यांना विकासकार्य करण्याची संधी पुन्हा देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी झटावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. भिवंडी शहरात ३०९६ व भिवंडी ग्रामीणमधील ३ हजार २४१ मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांनी थेट संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशवासियांनी पसंती दिल्याने पुन्हा `एनडीए’चे सरकार स्थापन झाले. केंद्र सरकारकडून भातपिकासह विविध पिकांच्या आधारभूत किंमती वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारकडून विविध लोकोपयोगी निर्णय घेतले गेले. देशातील आरोग्य व्यवस्था सक्षम केली जात असतानाच, महाराष्ट्र सरकारनेही काल पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही मोफत उपचार लागू केले. राज्य सरकारमध्ये शिक्षकांसह विविध पदांच्या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय महायुतीच घेऊ शकते, असे नमूद करून श्री. कपिल पाटील यांनी भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण भागातील प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 000000

उल्हासनगरात नालेसफाईचा बोजवारा

संततधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी साचले पाणी   उल्हासनगर : संततधार व रिमझिम पावसामुळे शांतीनगर स्मशानभूमी, कल्याण-बदलापूर रस्ता, गोलमैदान, विदर्भवाडी आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. नालेसफाई न झाल्याने, पाणी तुंबल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून शाळा क्रं-१४ येथे एक झाड पडल्याची घटना घडली आहे. तर रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. उल्हासनगरात सकाळपासूनच रिमझिम व संततधार पाऊस सुरू झाल्याने, शहरातील सखल भागात पाणी साचल्याचे चित्र होते. शांतीनगर स्मशानभूमीच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने, काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. महापालिका कर्मचारी व अग्निशमन विभागाने तुंबलेल्या पाण्याला मार्ग मोकळा केला. शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या स्टेट बँक, राधास्वामी सत्संग, अनिल-अशोक चित्रपटगृह व शांतीनगर प्रवेशद्वार आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. याव्यतिरिक्त गोलमैदान, गुलशननगर, खेमानी रस्ता, मयूर हॉटेल व आयआयटी कॉलेज रस्ता आदी ठिकाणी पाणी साचले. वेळीच नालेसफाई न झाल्याने शहराची तुंबापुरी झाल्याचा आरोप होत आहे. तसेच रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी न भरल्याने, रस्ते खड्डेमय झाले असून याचा त्रास नागरिकांसह वाहनचालकांना होत आहे. गायकवाड पाडा नाला खोदल्याने नागरिक त्रस्त ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गायकवाड पाडा येथील एक लहान नाला खोदल्याने, नागरिकांसह शाळेकरी मुलांना नाल्यावरील पाईपवरून नाला ओलांडून जावे लागत आहे. संततधार पाऊस सुरू राहिल्यास, एकदी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 000000

३० जूनपर्यंत चिकू फळपिक विमा योजनेत सहभागी व्हा – दीपक कुटे

ठाणे- येत्या मृग बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे चिकू फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषि विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल दि. १६ जूनपासून सुरु झाले असून ३० जून २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. जादा आर्द्रता व जास्त पाऊस या हवामान धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धारित केलेल्या कालावधीत फळ पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे. योजनेची वैशिष्ट्ये : १ ठाणे जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात चिकू पिकाच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. २. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल. ३. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. ४. या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हे. मर्यादेपर्यंत राहील. विमा अर्जासोबत फळबागेचा जिओ टॅगिंग (Geo Tagging) असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. ५. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. ६. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ७. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळणेसाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असावे. ८. फळपिक विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.  ९. विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे. १०. विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग  लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याने भरलेला विमा हप्ता जप्त होईल. ११. योजनेत भाग घेण्यासाठी चिकू  फळपिकाचे उत्पादनक्षम वय ५ वर्षे आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(टोल फ्री नं. १८००२०९५९५९) मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत चिकू पिकाकरीता ३० जून आहे, असेही दिपक कुटे यांनी कळविले आहे. विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./ हेक्टर) :- ठाणे जिल्ह्यात चिकू फळपिकासाठी चालू वर्षी विमा संरक्षित रक्कम रु. ७०, ०००/- असून विमाहप्त्यात शेतकरी हिस्सा रु.१२, २५०/- इतका आहे. तालुकानिहाय अधिसूचित महसूल मंडळांची यादी :- चिकू पिकासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव व शहापूर तालुक्यातील किन्हवली व डोळखांब ही महसूल मंडळे अधिसूचित आहेत. विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी – जादा आर्द्रता व जास्त पाऊस – दि.१जुलै ते ३० सप्टेंबर. प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर) – १. या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग ५ दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रतिदिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास रु. ३१,५००/- देय राहिल. २. या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग १० दिवस ९० टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन २० मि. मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ८ दिवस झाल्यास रु. ७०,०००/- देय राहिल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम रु, ७०,०००/-. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीशी   संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले आहे. 0000

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या

कर्ज योजनांसाठी संकेतस्थळावरून अर्ज करण्याचे आवाहन   ठाणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत दारिद्र्य रेषेखालील बेरोजगारांकरिता विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी www.lokshahir.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. अनुसूचित जातीतील युवकांनी या संकेतस्थळावर जाऊन विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती – मांग, मातंग, मिनी मादिंग, मादिग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग-गारुडी, मांग-गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 3,00,000/-) बेरोजगारांकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत थेट कर्ज योजना (कर्ज मर्यादा रु.1.00 लाख) तसेच केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या पीएम एजेएवाय योजनांचे कर्ज प्रस्ताव/अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आले असून www.lokshahir.in अशी आहे. या सुविधेचा ठाणे जिल्ह्यातील मांतग समाजातील शहरी / ग्रामीण भागातील इच्छुक / पात्र व्यक्तीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा. कर्जप्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजुरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा मजला, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, सहयाद्री शाळेच्या बाजुला, खारेगाव, कळवा (प), ठाणे ४००६०५. दूरध्वनी क्र. ०२२-२५३८८४१३. या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) च्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी कळविले आहे. 000000