Author: bittambatami.com

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

मुंबई,  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा…

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १५ दुचाकी खाक

बदलापूर : वादळीवाऱ्याच्या पावसानंतर बदलापूर पश्चिमेकडील मुख्य बाजारपेठेतील वैशाली सिनेमागृह परिसरात मंगळवारी सकाळी सहा वाजता आग लागण्याची घटना घडली. या आगीत १५ दुचाकींसह सात दुकानांतील तब्बल २० जणांचे स्टॉल जळून खाक झाले. महावितरणच्या रोहित्रामध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग महावितरणच्या दुर्लक्षामुळे लागली असल्याचे येथील गाळाधारकांचे म्हणणे आहे. बदलापूर पश्चिमेकडील बाजारपेठेत वैशाली सिनेमागृह हे शहरातील मध्यवर्ती व गजबजलेले ठिकाण आहे. या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून दुचाकी पार्किंगचा व्यवसाय केला जातो. तर उर्वरित जागेत अनेक व्यावसायिक गाळे आहेत. ज्यात कपडे, चप्पल, मोबाईल कव्हर, ज्यूस सेंटर, फळे व फुले व्यावसायिक अशी सात ते आठ दुकाने होती. याच भागात महावितरणचा भला मोठा रोहित्र आहे. त्यात या रोहित्रामध्ये अनेक दिवसांपासून ठिणग्या उडत होत्या. याबाबतीत अनेकदा महावितरणकडे तक्रार केली होती, असे या गाळाधारकांचे म्हणणे आहे. तसेच सोमवारी (ता. १३) रात्रीदेखील या रोहित्रामधून फटाके फुटल्याचा आवाज आणि ठिणग्या बाहेर पडत होत्या. याबाबत तक्रार देण्यासाठी महावितरण प्रशासनाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंगळवारी सकाळी सहा वाजता काही स्थानिकांनी या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची माहिती प्रशासनाला दिली, ही माहिती मिळताच संबंधित प्रशासन व अग्निशमन दलाला प्राचारण केले. तसेच महावितरणकडेदेखील यासंदर्भात तक्रार केली, मात्र महावितरणने कॉल उचलेपर्यंत वेळ निघून गेली होती, अशी खंत येथील गाळेधारकांनी व्यक्त केली. तसेच बाजारात गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी रोहित्र असू नये, यासाठी आम्ही वारंवार महावितरणकडे पाठपुरावा करत आहोत, मात्र याकडेही महावितरणने अजूनपर्यंत लक्ष दिले नसल्याचे म्हटले. या संपूर्ण आगीत गाळेधारक व दुचाकीस्वार असे मिळून ५० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा दावा नुकसानग्रस्तांनी केला आहे. तसेच याची नुकसानभरपाई, महावितरण प्रशासनाने लवकरात लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कचऱ्याला लागलेली आग रोहित्रापर्यंत पोहोचली, त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. गेली अनेक वर्षे हा रोहित्र याच ठिकाणी आहे. जेव्हा कधी त्यात तांत्रिक बिघाड निर्माण होतो, त्यावेळी वेळीच लक्ष देऊन दुरुस्तीचे काम केले जाते. ही आग गाळेधारकांच्या निष्काळजीपणामुळे लागली आहे. त्याचबरोबर सध्या आम्ही या रोहित्रामधील जोडणी इतर ठिकाणी वळवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच या ठिकाणी ही आग कशामुळे लागली याचा तपासदेखील होणार आहे. -चांगदेव काळे, उपअभियंता, महावितरण, बदलापूर आम्ही वीस ते पंचवीस वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. येथे असलेल्या अनेक व्यावसायिकांचे हातावर पोट आहे. आमचा संसारदेखील याच ठिकाणी असतो. गेल्या अनेक वर्षांपासून या रोहित्राबाबत महावितरणकडे, आम्ही तक्रारी केल्या आहेत; मात्र महावितरणने या तक्रारींकडे कधीही सोयीस्कररीत्या लक्ष दिलेले नाही. पावसानंतर रात्री या ठिकाणी अनेकदा फटाके फुटल्यासारखे आवाज येत होते. यासंदर्भातील आम्ही व्हिडीओदेखील आहेत. रात्री यासंदर्भात तक्रार देण्यासाठी महावितरणला सतत कॉलही केले, मात्र महावितरणकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही. -निहाल मलिक, व्यावसायिक

मनसेबरोबर युती करून भाजपाने गोरगरिब उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले.

प्रा. वर्षा गायकवाड यांचा बीजेपीवर हल्लाबोल उत्तर भारतीय समाज व काँग्रेस साथ साथ, लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशात परिवर्तन करा. मुंबई : कोरोना काळात केंद्रातील भाजपा सरकारने अचानक लॉकडाऊन लावून जनतेला वाऱ्यावर सोडले. उत्तर भारतातून मुंबईत कामासाठी आलेल्या लोकांचे तर प्रचंड हाल झाले. या कठीण काळात सर्वात आधी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकार या समाजाच्या मदतीला धावून आले. कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नधान्य व गरजेचे साहित्य घरोघरी पोहचवले. उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार त्यांना गावी पाठवण्यासाठी सर्व सुविधा पुरवल्या परंतु या काळातही भाजपा सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतली होती, असा हल्लाबोल उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. सांताक्रूज येथे झालेल्या उत्तर भारतीय संमेलनात प्रा. वर्षा गायकवाड बोलत होत्या, त्या पुढे म्हणाल्या की, उत्तर भारतीय समाज व काँग्रेस पक्षाचे संबंध नेहमीच गंगा जमुना संस्कृतीसारखे राहिले आहेत. काँग्रेस पक्षानेही उत्तर भारतीयांचा योग्य तो मान सन्मान राखला आहे. मुंबईचे महापौरपद, विरोधी पक्षनेता, मंत्री, आमदार व संघटनेतही महत्वाची जबाबदारी दिली. उत्तर भारतीय समाज मुंबईच्या संस्कृतीत मिसळला आहे. काँग्रेस सरकारने हॉकर्स पॉलीसी बनवून सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी दिली परंतु कामासाठी मुंबईत आलेल्या या गोरगरिब कष्टकरी समाजावर मनसेने हल्ले केले, मारहाण केली त्याच मनसेबरोबर भारतीय जनता पक्षाने युती करुन उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. उत्तर भारतीय लोक मुंबईत दुधाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात करतात. मुंबईतील जागा एका उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजापाने लावला आहे आता त्यांची नजर तबेल्यावरही पडली आहे. दुधावरही जीएसटी लावून लूट केली जात आहे. केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल यांनीच कोरोना काळात उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे सोडताना अडवणूक केली. गोयल यांनी मासळीचा वास सहन होत नाही म्हणून ते तोंडावर रुमाल बांधून फिरतात हे लोक तुमच्यासाठी काम करणार आहेत का? सवाल विचारून, ‘भाजपा सरकार हटानी है, काँग्रेस सरकार लानी है’, असा नारा वर्षा गायकवाड यांनी दिला. या संमेलनाला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, महारष्ट्र सह प्रभारी आशिष दुआ कार्यक्रमाचे आयोजक अविनाश सिंह, संदिप शुक्ला आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कल्याण शहरात वाहतुक बदल

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आधारवाडी भागातील मैदानात होणार आहे. या सभेनिमित्ताने शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहतुक बदल लागू करण्यात आले आहेत. हे वाहतुक बदल बुधवारी दिवसभर लागू असतील. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांवर कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आधारवाडी चौक सिग्नल ते गांधारी पूल, बापगाव मार्गावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वाडेघर चौक, वाडेघर गाव, काशी दर्शन येथून निलकंठ सृष्टी गृहसंकुल मार्ग, रोनक सिटी, मुथा महाविद्यालय, वेदांत रुग्णालय मार्गे वाहतुक करतील. गांधारी चौक ते भट्टी चहा येथील संपूर्ण रस्त्यावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने भट्टी चहा, थारवानी इमारत, झुलेलाल चौक, गोदरेज हिल बारावेगाव मार्गे वाहतुक करतील. ऋतू इमारतीपुढील मार्गावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ऋतू इमारत, वेदांत रुग्णालय, मुथा महाविद्यालय, जलकुंभ येथून वाहतुक करतील. डी. मार्ट येथून अग्रवाल महाविद्यालय, मातोश्री रुग्णालयाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहने डी. मार्ट ते वसंत व्हॅली वायलेनगर मार्गे वाहतुक करतील. महाराजा अग्रसेन चौक येथून हिना गार्डन, तुलसीपुजा चौक, कस्तुरी पार्क, गणपती चौककडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. येथील वाहने महाराजा अग्रसेन चौक, वायलेनगर येथून खडकपाडा ते दुर्गाडी मुख्य वाहिनी मार्गे वाहतुक करतील. डी. बी. चौक ते गणपती चौक, निक्कीनगर मार्गावर प्रवेश बंदी असेल. ही वाहने डी. बी. चौक ते ओम रेसीडन्सी येथून, निलकंठ सृष्टी सोसायटी, काशी दर्शन इमारत मार्गे , वाडेघर गाव वाडेघर चौक मार्गे जातील. आधारवाडी सिग्नल चौक ते आधारवाडी कारागृह, डी बी चौक रस्त्यावर वाहनांस प्रवेश बंद करण्यात येईल. येथील वाहतुक वाडेघर चौक, हनुमान मंदीर वाडेघर, काशी दर्शन इमारत, समर्थ कृपा गॅरेज, निलकंठ सृष्टी, ओम रेसीडन्सी समोरून जातील. वायलेनगर पोलीस चौकी येथून आधारवाडी कारागृहाच्या दिशेने वाहतु करणाऱ्या वाहनांना या मार्गावर प्रवेश बंदी असेल. येथील वाहने वायलेनगर पोलीस चौकी ते वायलेनगर चौक येथून दुर्गाडी ते खडकपाडा मुख्य वाहिनी मार्गे जातील. क्रोमा शो-रुम येथून हरिश्चंद्र गायकर निवास, आधारवाडी चौक, रिलायन्स मार्ट, वायलेनगरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वायलेनगर, खडकपाडा चौक मार्गे वाहतुक करतील.

पावसाळ्यापूर्वी दूषित पाणी स्त्रोतांचे शुध्दीकरण करणार-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची जैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत दूषित आढळणाऱ्या पाणी स्त्रोतांचे शुध्दीकरण करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली. दूषित पाणी प्यायल्यामुळे अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर तसेच अन्य साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य तसेच पाणी व स्वच्छता विभागा मार्फत नियमित पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात येते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५ हजार ६९१ नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची जैविक तसेच रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. नळ पाणी पुरवठा योजनांचे पाणी नमुने जमा करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, हे पाणी नमुने भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अलिबाग, पेण, माणगाव, रोहा, कर्जत, महाड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतील. येथे पाणी नमुन्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येईल. या तपासणीत दूषित आढल्लेल्या पाणी नमुन्यांचे शुध्दीकरण करून, पुन्हा संबंधित पाणी नमुने तपासण्यात येणार आहेत. नळ पाणी पुरवठा योजनांच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यासोबत इतर पाणी स्त्रोतांची गुणवत्ता टिकविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून राहिल्याने विहिरी, विंधन विहिरी तसेच इतर पाणी स्त्रोत दूषित होण्याची शक्यता आहे. यामुळे या स्त्रोत परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. विहिरीं मधील गाळ काढण्यात येणार आहे. तसेच स्त्रोतांचे मजबुतीकरण करण्यात येईल. विहिरीच्या पाण्यात कचरा पडू नये यासाठी विहिरीवर झाकण किंवा जाळी टाकण्यात येणार आहे.

 राज्याचे कॅरम पंच शिबीर संपन्न

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने ११ व १२ मे २०२४ दरम्यान एल. जे. ट्रेनिंग सेन्टर, दादर, मुंबई येथे पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी व पुणे येथून स्थानिक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकंदर ४० पंच सहभागी झाले होते. यामध्ये तीन महिलांचाही समावेश होता. दोन दिवस झालेल्या या शिबिरातील पंचांना आंतर राष्ट्रीय कॅरम पंच श्री अजित सावंत व श्री केतन चिखले यांनी कॅरमच्या नियमांची सविस्तर माहिती दिली. शिवाय महाराष्ट्रात भविष्यात अधिक गुणवान पंच तयार होण्यासाठी स्वेच्छेने मार्गदर्शन करण्याची तयारी दाखविली. कॅरमच्या नियमावलीतील प्रत्येक नियमांवर या शिबिरात चर्चा करण्यात आली. शिवाय कॅरम बोर्ड वर सामन्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर कृतीद्वारे प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यावेळी आंतर राष्ट्रीय पंच श्री परविंदर सिंग ग्रोव्हर, श्री आशिष बागकार, राष्ट्रीय पंच श्री साईप्रकाश कानिटकर, श्री रमेश चव्हाण यांनीही शिबिरात सहभागी झालेल्या पंचांना विशेष मार्गदर्शन केले. स्पर्धेत पंचांचा सहभाग अतिशय महत्वाचा असून त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे कोणत्याही खेळाडूचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी पंचांची असते. त्यामुळे गेली दोन वर्षे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन अशा शिबिराचे आयोजन करत असल्याचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव श्री अरुण केदार यांनी सांगितले. शिबिराची सांगता करताना श्री अजित सावंत यांनी या शिबिरामुळे झालेला सकारात्मक बदल यापुढे सामन्यात दिसेल अशी अशा व्यक्त केली. तर श्री केतन चिखले यांनी काम करताना पंचाने आपली भूमिका निष्पक्षपणे मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शिबिरात सहभागी झालेल्या पंचानीही या शिबिराचा फायदा झाला असून यापुढे अधिक सतर्क राहण्याचे आश्वासन दिले. तर काहींनी या शिबिरामुळे पंचांची उजळणी झाल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री यतिन ठाकूर व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष श्री धनंजय पवार उपस्थित होते.

निलिमा भडगावकर चमकल्या

ठाणे : ठाण्यातील योग प्रशिक्षक आणि फिजिकल ट्रेनर निलीमा भडगावकर यांनी नुकत्याच संपलेल्या ४३ व्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगीरी साधली आहे. मास्टर्स अॅथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र आयोजित या…

मुंबईला जोडण्यासाठी भिवंडीहून लोकल ट्रेन सुरू करणार..

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे जाहीरनाम्यात आश्वासन भिवंडी: राष्ट्रवादीचे (सपा) भिवंडीतील लोकसभा उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांनी सोमवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीरनाम्याचे अनावरण केले ज्यात त्यांनी भिवंडी ते मुंबई लोकल ट्रेनने भिवंडी स्टेशन रोडवरून थेट लोकल ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. रेल्वे स्टेशन ते मुंबई, भिवंडीतील वाढत्या गोदाम उद्योगाच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांवर काम करणे आणि विविध उपाययोजना करून भिवंडीतील मरणासन्न यंत्रमाग उद्योग वाचविण्याचे आश्वासन दिले . म्हात्रे यांचा जाहीरनामा प्रामुख्याने भिवंडी लोकसभेवर केंद्रित आहे ज्यात भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण या सहा विधानसभांपैकी तीन विधानसभा आहेत. यंत्रमाग उद्योगाशी निगडित लोकांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनाम्यात जे खाजगी वीज पुरवठा कंपनीवर नेहमीच नाराज असतात, त्यांनी दावा केला की तो जिंकल्यानंतर तो टोरेंट पॉवर कंपनी भिवंडीतून काढून टाकेल आणि आणखी चांगली सेवा देण्यासाठी आणखी काही कंपनी आणण्याचा प्रयत्न करेल. तसेच रिंगरोड, काँक्रीट रस्ता आणि आवश्यक मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करून शहरातील वाहतूक कमी करण्याचे आश्वासन दिले. भिवंडीला ठाणे आणि कल्याणशी जोडण्यासाठी मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले असून त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. म्हात्रे हे भिवंडी मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात तर तिसऱ्यांदा या जागेवर निवडणूक लढवत आहेत.

मुलीच्या नातेवाइकांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने नराधमाने केले वार

कल्याण – अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने १४ वर्षीय मुलीच्या दोन नातेवाईकांवर चाकूहल्ला केल्याप्रकरणी कल्याण पोलिसांनी रविवारी २६ वर्षीय तरुणाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आरोपीने आत्महत्येचा…