Author: bittambatami.com

राज्य सरकारी कंत्राटदारांची उपासमार

२७ जूनला अधीक्षक अभियंत्यांच्या दारात करणार ठिय्या आंदोलन   ठाणे : राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे. मात्र, त्यांची देयके देण्यात चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागिय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या मागण्या मान्य केल्यास येत्या गुरूवारी, २७ जून रोजी, अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आवळे यांनी दिला आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास, जलजीवन मिशन विभाग, ग्रामविकास व जलसंधारणसारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार यांची अनेक प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी शासन, मंत्री व प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाही. याबाबत शासनास कंत्राटदार महासंघाने वेळोवेळी ५ मागण्याचा ड्राफ्ट दिला होता. पत्रव्यवहार व बैठक ही घेतली होते, परंतु शासन काहीही करीत नाही, असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने ही निदर्शने केली. दरम्यान,  राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास जलजीवन मिशन, जलसंधारण, स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देऊन   कंत्राटदार त्यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणारे व्यवसायिक यांची वर्षानुवर्षे देयकेच मिळत नसल्याने होणारी आर्थिक पिळवणूक व उपासमार तातडीने बंद करावी;  राज्यातील सर्व विभागाकडील कामे मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने सदर कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबविण्यात येऊ नये, आदी मागण्यांचे निवेदन महासंघाने दिले असून या मागण्यांची आठवडाभरात पूर्तता न केल्यास अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ००००

प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

अनिल ठाणेकर   ठाणे :पांढऱ्या रेशनकार्डधारकांना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेअंतर्गत  ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुख्यमंत्री या नात्याने राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळीत असून गोर-गरीब जनतेसाठी मुख्यमंत्री म्हणून आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून गोर-गरीब रूग्णांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. या आरोग्य सेवेचा फायदा ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असलेल्या पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना दिला जात आहे. त्यामुळे पांढर्‍या रेशनकार्डधारक या सुविधेपासून वंचित राहत होते. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून ज्या पध्दतीने पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना जी आरोग्य सुविधा मिळते त्याचप्रमाणे पांढर्‍या रेशनकार्डधारकांना मिळावी, अशी  मागणी जनतेतून होऊ लागली आहे. पांढरे रेशनकार्डधारक असलेले अनेक नागरिक या राज्यामध्ये असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्यावर मोफत वैद्यकिय उपचार होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर पांढर्‍या रेशनकार्डधारकांची शिधापत्रिका आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न करून महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून पांढर्‍या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सुविधा दिल्यास याचा फायदा राज्यातील गोर-गरीब समाजाला होईल व त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील. मुख्यमंत्री या नात्याने नागरिकांच्या भल्यासाठी अनेक महत्वाचे धाडसी निर्णय घेतले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील पांढर्‍या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा हाही धाडसी निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. ०००००

५ जुलैपासून जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम-  भरत बास्टेवाड

 अशोक गायकवाड अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे.…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे रिपाइं रायगड जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत

अशोक गायकवाड   रायगड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ना. रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड व कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून रिपाइं जिल्ह्याच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपदी मंत्रीपदी वर्णी लागल्याने ना. रामदास आठवले हे मंगळवारी, दि १८ जून २०२४ रोजी पुणे दौऱ्यावर जात असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, कोकण युवा सरचिटणीस जिवक गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, कर्जत तालुका संपर्क प्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड, मावळ लोकसभा उपाध्यक्ष पंकज सोनावणे, खालापूर तालुका युवा अध्यक्ष सुनिल सोनावणे, खोपोली शहर अध्यक्ष नितिन वाघमारे, राहुल महाडिक युवा नेते, रुपेश रूपवते खोपोली युवा शहर अध्यक्ष, अशोक गोतारणे , उमरोली पंचायत समिती वार्ड अध्यक्ष निलेश गायकवाड आदींनी आठवले यांचे फटाक्यांच्या आतशाबाजीत पुष्पगुच्छ, पुष्पमालेव्दारे शुभेच्छा देऊन जंगी स्वागत केले. 00000

सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांची स्वच्छता मोहीम

डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अशोक गायकवाड   नवी मुंबई : महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागातून विभागवार स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी संस्था व नागरिकांप्रमाणेच विदयार्थी युवकांचाही मोठया प्रमाणावर सहभाग असतो. अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम आज तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात सेक्टर.१० सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांनी यशस्वी केली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिरिक्त्‍ आयुकत्‍ सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली से.१० सानपाडा येथील वृक्षांच्या हरित पट्टयात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन त्यामध्ये १५ गोणी प्लास्टिक व तत्सम कचरा गोळा करण्यात आला. या मोहीमेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त्‍ डॉ. अजय गडदे, तुर्भे विभाग अधिकारी तथा सहा आयुकत्‍ भरत धांडे आवर्जुन सहभागी झाले होते. वेस्टर्न कॉलेजचे एनएसएस विदयार्थी यांच्यासह डि-मार्ट मधील कर्मचारी व कामगार यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी झालेल्या या मोहिमेच्या आयोजनात स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, स्वच्छता निरीक्षक व सफाई मित्र आणि पर्यवेक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना पर्यावरणाविषयी जागरूकता तसेच प्लास्टिक प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात आली. ००००

मुरबाड मध्ये समाधानकारक पावसामुळे शेतकरी आनंदात

राजीव चंदने   मुरबाड : मान्सून  दाखल झाला नसला तरी, मान्सून पूर्व पावसाने चांगली हजेरी लावत उघडीप दिल्याने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पेरणी सफल झाली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहे, दरवर्षी जुनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात धुमशान घालणाऱ्या मान्सून ने मुरबाड तालुक्यात हजेरी लावण्यात उशीर केला असला तरी अधून मधून पावसाची रिपरिप सुरु आहे, हे वातावरण भातशेती साठी आणि पेरणी साठी योग्य ठरले आहे, मागील वर्षी पेरणी केल्या नंतर पावसाने भरमसाठ बॅटिंग केली होती त्यावेळी पेरलेलं बियाणे तरंगले, रुजलेले पाण्यात कुजले, काही बियाणे वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना “रुजा ” (घरातच भात बियाण्यास मोड आणून तो शेतात पेरणे ) करण्याची वेळ आली होती. मात्र यंदा असे झाले नाही त्यामुळे तालुक्यातील बहुतेक ठिकाणी भातरोपे किमान वित भर वाढले आहेत. त्यात यावर्षी भात बियाणेची किंमतही वाढली आहे. खतांची किंमतही वाढली आहे.असे असताना पावसाने एक प्रकारे यावर्षी उपकारच केले आहेत अशी भावना शेतकरी व्यक्त करत असून त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. यावर्षी चांगला पाऊस आहे. पावसाने चांगली उघडीप दिली भातरोपे चांगली झाली आहेत शेतकरी शेतीपयोगी वस्तू बी, बियाणे, औजारे यांच्या किमती वाढीव झाल्या आहेत,….रमेश हिंदुराव, शेतकरी न्हावे सासणे 0000

युवा बुध्दिबळपटू एलेश त्रिपाठीचे शानदार यश

मुंबई : नुकत्याच राजस्थान मधील उदयपुर शहरात झालेल्या फिडे रेटिंग लेकसिटी ओपन बुध्दिबळ स्पर्धेत विरारच्या मटिक अकादमी शाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या एलेश त्रिपाठी याने शानदार कामगिरी करताना खुल्या गटात आठवा क्रमांक मिळवला. त्याने अपराजित राहताना ९ पैकी ७.५ गुण मिळविले. त्याने ६ लढती जिंकल्या .तर ३ सामने बरोबरीत सोडवले.रेटिंग श्रेणीत त्याचा दुसरा क्रमांक लागला.त्याला ६१ हजार रुपये रोख आणि  आर्कषक चषक भेट देण्यात आला. भारतातील ५५ ० पेक्षा जास्त बुध्दिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रसाद घाटे एलेशचे प्रशिक्षक आहेत. तसेच अर्पित पांडे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन एलेशला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळ तो बुध्दिबळ खेळत आहे.तामिळनाडू येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. उदयपुर स्पर्धेतील एलेशच्या सुरेख कामगिरी बदल शाळेच्या मुख्याधापीका सीमा बहल यांनी त्याचे खास अभिनंदन केले आहे.

आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सानपाडा येथे विदयार्थी व नागरिकांची स्वच्छता मोहीम*

अशोक गायकवाड*   नवी मुंबई : महापालिका आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागातून विभागवार स्वच्छता मोहीमा राबविल्या जात असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी संस्था व नागरिकांप्रमाणेच विदयार्थी युवकांचाही मोठया प्रमाणावर सहभाग…

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी आणखी वर्षभर

महामार्गाचे ६० टक्के काम पूर्ण   ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या सुमारे २४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. आता हा प्रकल्प आता मे २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रकल्पाचे काम लांबणीवर पडल्याने या मार्गावर आणखी वर्षभर कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई नाशिक महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. दररोज हलक्या वाहनांसह उरण जेएनपीटी येथून सुटणाऱ्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकही या मार्गावरून होत असते. हा महामार्ग असूनही अनेक ठिकाणी अरुंद आहे. तसेच रस्त्याची अवस्था देखील अत्यंत वाईट झाली आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यारित आहे. प्राधिकरणाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात माजिवडा, साकेत, खारेगाव, भिवंडी भागात मोठ्याप्रमाणात खड्डे पडत होते. येथील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. यावरून टिका होऊ लागल्याने राज्य रस्ते विकास मंडळाने माजिवडा ते वडपे या रस्त्याचे काम २०२१ पासून हाती घेतले. सुमारे २४ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. याच मार्गाला समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच येथील साकेत, खारेगाव या खाडी पूलांच्या प्रकल्पाचे महत्त्वाची कामे केली जात आहेत. तसेच भिवंडी येथील एक रेल्वे पूल आणि वडपे उड्डाणपूलाची कामांचीही यात समावेश आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचे काम वेळेत पुर्ण होऊ शकलेले नाही. या प्रकल्पाचे काम केवळ ६० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या तीन महिन्यांत उर्वरित ४० टक्के पूर्ण होणे शक्य नसल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकल्प कामाला मे २०२५ पर्यंत मुदतवाढ घेण्याचे ठरविले आहे. ठाणे शहर, घोडबंदर भागात पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे, मेट्रो मार्गिका निर्माणाची कामे यामुळे अवजड वाहनांसाठी करण्यात आलेले वाहतुक बदल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवडणूक प्रचाराच्या कालावधीतील वाहतूक तसेच निवडणूकीच्या कालावधीत मजूर गावी जाणे अशा विविध कारणांमुळे प्रकल्पाचे काम लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता वर्षभरानंतरच ठाणेकरांची कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये एकूण १ हजार १८२ कोटी ८७ लाख रुपये या प्रकल्पासाठी खर्च होत आहे. खारेगाव येथे ३८ मार्गिकांचा टोलनाका चार पदरी मुख्य मार्गिकांचे आठ पदरी मार्गामध्ये रुपांतर तसेच प्रत्येकी दोन-दोन पदरी सेवा रस्ते. महामार्गावरील महत्त्वाच्या पूलांपैकी खारेगाव पूलाचे ६२ टक्के, साकेत पूलाचे ६९ टक्के, रेल्वेपूलाचे ३० टक्के आणि वडपे उड्डाणपूलाचे ३७ टक्के काम पूर्ण झाले आहे. -0000

ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी काढले डोके वर

१५ दिवसात मलेरियाचे २५ रुग्ण तर, डेंग्यूचे ११ रुग्ण   ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात मलेरियाचे २५ तर, डेंग्यू चे ११ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. साथ आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यासह पालिकांच्या आरोग्य यंत्रणा सर्तक झाल्या असून त्यांनी उपाययजोना आखण्यास सुरूवात केली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत विशेष करुन डेंग्यू आणि मलेरियाची साथ मोठ्याप्रमाणात पसरत असते. जिल्ह्यात सध्या तरी ऊन आणि पावसाचा खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. सलग पाऊस कोसळत नसल्यामुळे वातावरणात पुन्हा उकाडा वाढतो आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखी या आजारांनी डोके वर काढले आहेत. यामध्ये तापाची साथ मोठ्याप्रमाणात असल्याची माहिती ठाण्यातील खासगी दवाखान्याचे डॉक्टर नंदकुमार ठाकूर यांनी दिली. ज्या रुग्णांना वारंवार ताप येतो आहे, त्यांनी तात्काळ चाचणी करुन घ्यावी, डेंग्यू किंवा मलेरियाची लागण झाली नाही ना हे पहावे, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला आहे. पावसाळ्याच्या कालावधीत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात पसरु नये यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जातात. यात, धुर फवारणी करणे, घरात साठविलेल्या पाण्यातील जंतू नष्ट करणे अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय, भितीपत्रकांच्या माध्यमातून साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यंदाही ठाणे महापालिकेकडून शहरातील मुख्य चौकात ‘शहर डेंग्यू मलेरिया मुक्त करुया ’ अशा मथळ्याचा फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे आजार रोखण्यासाठी कोणती कशी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मलेरियाचे २५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ठाणे १२, कल्याण-डोंबिवली सहा, नवी मुंबई एक, मिराभाईंदर पाच आणि ठाणे ग्रमाणीमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर, जिल्ह्यात डेंग्यूचे ठाणे शहरात चार, कल्याण-डोंबिवलीत दोन, नवी मुंबईत दोन आणि ठाणे ग्रामीण मध्ये तीन असे एकून ११ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 00000