Author: bittambatami.com

मुंबईतील मिठागरांवर पुनर्वसन करताना फक्त अदानीचा विचार नको –  वॉचडॉग फाउंडेशन

रमेश औताडे मुंबई : मुंबईचा विकास व ग्लोबल वॉर्मिगचा धोका पाहता भविष्यात मुंबईला पूर आणि मोठ्या वादळांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईचा विकास करताना फक्त अदानीचा विचार करू नका. मुंबईतील मिठागरांच्या जमिनीवर झोपडपट्टीचे संभाव्य पुनर्वसन  हे तर महाधोकादायक आहे. अशी भीती  वॉचडॉग फाउंडेशनने व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुंबईला समुद्र पातळीचा धोकासमुद्र पातळीत वाढ होत असल्याचा सर्वाधिक धोका मुंबई किनारपट्टीला बसणार आहे. २०५० पर्यंत समुद्र पातळीच्या संभाव्य वाढीमुळे सुमारे ९९८ इमारती आणि २४ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रभावित होणार आहे. तर भरतीच्या वेळी समुद्र पातळी वाढल्याने अंदाजे २ हजार ४९० इमारती आणि १२६ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रभावित होण्याचा इशारा आरएमएसआय या संस्थेने काही वर्षांपूर्वी दिला होता. यामुळे हाजी अली दर्गा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी-लिंक आणि मरीन ड्राईव्हवरील क्वीन्स नेकलेस पाण्याखाली जाणार असल्याची भीती संस्थेने व्यक्त केली आहे. धारावीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून अदानी कंपनीची निवड धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने केली आहे. धारावीतील प्रत्येक झोपडीधारकांना घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे धारावीतील झोपडीधारकांचे सर्वेक्षण करण्याचे काम कंपनीने हाती घेतले आहे. धारावी पुनर्विकासात अपात्र ठरणाऱ्या नागरिकांना भाडेतत्वावरील घरे देण्यात येणार आहेत. भाडेतत्वावरील घरे उभारण्यासाठी वडाळा येथील मिठागराची जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुलुंड मधील डम्पिंग ग्राउंडच्या जवळील जमिनीवर धारावीतील नागरिकांना घरे देण्याची योजना होती. या योजनेला मुलुंडकरांनी विरोध दर्शविला आहे. तर  निवडणुकीत मतांच्या जोग्व्यासाठी धारावीतील नागरिकांना वडाळा मिठागरांच्या जमिनीवर घरे देणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. या निर्णयाला वॉचडॉग या संस्थेने विरोध केला आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होणार असल्याने मुंबईसह जगभरातील समुद्र किनारी असणाऱ्या शहरांना धोका आहे असे पर्यावरण तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे अनियोजित विकास मुंबईकरांची सुरक्षितता पाहता हानिकारक ठरू शकतो. मिठागरांच्या जमिनीवर इमारती उभारल्यास भविष्यात मुंबईला धोका निर्णय होऊ शकतो. त्यामुळे धारावीकरांचे पुनर्वसन धारावी किंवा पर्यायी ठिकाणी करावे, अशी मागणी वॉचडॉग संघटनेचे पदाधिकारी गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याकडे केली आहे.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची

हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आयोजित हिन्दुस्थानी ख्याल गायन स्पर्धा  शनिवार दिनांक १५ जून २०२४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता वय वर्षे १६ ते ३० वयोगटांसाठी होणार आहे. सर्व स्पर्धक अव्यावसायिक हौशी कलाकारच असावेत. पहिले पारितोषिक १० हजार रुपयांचे आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १३ जून २०२४ आहे . अर्ज संस्थेच्या कार्यालयात तसेच फेसबुक, ट्विटर आणि संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre. org या वेब साईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी – ०२२-२४३०४१५०, ७७००९९४४९५ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पोर्टींग क्लब कमिटीची आगेकूच कायम

महिला कांगा क्रिकेट स्पर्धा ठाणे : स्पोर्टींग क्लब कमिटीने डोंबिवली क्रिकेट क्लबवर सहा धावांनी निसटता विजय मिळवत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित महिला बाद पद्धतीच्या डॉ कांगा क्रिकेट स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.  ध्रुवी पटेलच्या अर्धशतकी खेळीमुळे ३५ षटकात ८बाद १८० धावा उभारल्यावर स्पोर्टींग क्लब कमिटीच्या गोलंदाजांनी डोंबिवली क्रिकेट क्लबला ५ बाद १७४ धावांवर रोखत अंतिम फेरीच्या दिशेने आगेकूच कायम राखली. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टींग क्लब कमिटीची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीची जोडी अवघ्या १५ धावांत माघारी परतल्यावर ध्रुवी पटेलने ५४ धावा करत संघाला सुस्थितीत नेले. तन्वी चव्हाणने नाबाद २४ आणि  प्रणाली मळेकरने ११ धावांची खेळी केली. प्रीती चौधरी आणि सानिका खैरनारने प्रत्येकी दोन बळी मिळवले. दिक्षा दुबे, सायली भालेराव, ध्रुवी कापडणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.  उत्तरादाखल  लावण्या शेट्टीने अर्धशतक झळकवत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण इतर फलंदाजांनी अपेक्षेनुसार कामगीरी न केल्याने डोंबिवली क्रिकेट क्लबला पराभव पत्करावा लागला. लावण्याने ६४ आणि सायली भालेरावने ३९ धावा केल्या. अभिगील नाईक, वैष्णवी पालन, आर्या कानडे, स्वरा दिवेकर आणि अंजु सिंगने प्रत्येकी एक विकेट मिळवली. संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : ३५ षटकात ८ बाद १८० (ध्रुवी पटेल ५४, तन्वी चव्हाण नाबाद २४, प्रणाली मळेकर ११, प्रिती चौधरी ५-३७-२, सानिका खैरनार ६-३०-२, दिक्षा दुबे ४-२३-१, सायली भालेराव ६-३४-१, ध्रुवी कापडणे ७-२६-१) विजयी विरुद्ध डोंबिवली क्रिकेट क्लब : ३५ षटकात ५ बाद १७४ (लावण्या शेट्टी ६४, सायली भालेराव ३९, अभिगील नाईक ४-२९-१, वैष्णवी पालन ७-४०-१, आर्या कानडे ४-३३-१, स्वरा दिवेकर ३-२२-१, अंजु सिंग ३-१०-१ ).

मुंबईतील मोदींच्या सभेला यशस्वी करणे महायुती म्हणून आमची जबाबदारी…- – सुनिल तटकरे

मुंबई : राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मुंबई प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांशी बोलताना सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना महायुतीच्या विजयाचीही खात्री सांगितली.विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळे आणखी वेग येईल असेही सुनिल तटकरे म्हणाले. महायुतीची लाट आहे असे ते म्हणणार नाहीत आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांना कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवायचे असल्यामुळे आणि पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार लढत असल्यामुळे मतदारांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास टिकून रहावा या हेतूने त्यांनी ते वक्तव्य केले असावे यापेक्षा ग्राऊंड रिअ‍ॅलिटी फार वेगळी आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला. खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार यांना फार मोठी आघाडी म्हणजे २०१९ मध्ये भाजपला मिळाली होती त्यापेक्षा जास्त आघाडी मिळेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आम्ही सर्व जागा महायुतीमध्ये लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही जरी जागा लढल्या असल्या तरी महायुती म्हणून राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. बारामतीमध्ये निकाल काय लागणार आहे याची रोहित पवार यांनी पराजयाची प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष ट्वीट करत कबुली दिली आहे असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः बुधवारी कल्याण येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने

मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मानले आभार मुंबई :- १० राज्ये आणि ९६ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी…

फ्लॅश मॉबव्दारे मॉलमध्ये मतदार जनजागृती

नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा अधिकार असणा-या नागरिकांनी मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये नुकताच मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले पहिल्यांदाच मतदान करणारे 18 वर्षावरील युवक व युवती यांना मतदान करण्याकरीता प्रोत्साहित केले जात असून महाविद्यालयांमध्ये तसेच युवक संघटनांमध्येही मतदार जनजागृती विषयक उपक्रमांवर भर दिला जात आहे. या अनुषंगाने शनिवार व रविवारी होणारी मॉलमध्ये येणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाशी येथील इनॉर्बीट मॉल तसेच सीवूड येथील ग्रॅंड सेंट्रल मॉल या दोन ठिकाणी लोकांना चटकन आकर्षित करुन घेणा-या फ्लॅश मॉब सारख्या संगीतमय कलाप्रकाराचा मतदार जनजागृतीसाठी प्रभावी वापर करण्यात आला. मॉलमधील वातावरण खरेदीसाठी उत्साही असताना व तशा प्रकारची लगबग मॉलमधील प्रत्येक दुकानातून सुरु असताना अचानक मोठया आवाजात गीत – संगीत वाजायला सुरुवात होते. गाणे कुठे वाजते आहे याचा कानोसा घेत लोक आवाजाच्या दिशेने सूरांचा शोध घेण्यासाठी पुढे येतात. त्यावेळी त्यांना मॉलच्या तळमजल्यावर मधल्या मोकळया पॅसेजमध्ये संगीत वाजायला सुरुवात झाल्याचे लक्षात येते व त्या तालावर नृत्यासाठी सज्ज असलेले तरुण, तरुणी दिसतात. गाणे वाजायला सुरुवात होते आणि त्या तालावर ते तरुण – तरुणी समुहनृत्य सुरू करतात. बघता बघता हे नृत्य पाहण्यासाठी त्यांच्या भोवतालची गर्दी वाढत जाते. सुरूवातीच्या गाण्यानंतर चक्क मतदान विषयक जनजागृती करणारे गाणे सुरू होते. मग मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणारी गाणी एकापाठोपाठ एक नृत्यासह सादर होत जातात. तळमजल्यावरच नव्हे तर मॉलमधल्या प्रत्येक मजल्याच्या कठडयाजवळ येऊन नागरिक तळमजल्यावर नृत्य करणा-या कलावंताकडे आकर्षित होऊन गर्दी करतात. नृत्याविष्काराच्या अखेरीस 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मतदान करण्याविषयीचे फलक उंचावत केले जाते. नागरिकही या तरुणाईला प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांच्या नृत्याचे कौतुक करतात व लोकसभा निवडणूकीत आम्ही मतदान करणार आहोत अशी ग्वाही देखील देतात. वर्दळीच्या ठिकाणी अचानक सुरु होणारा गीतसंगीतमय फ्लॅश मॉब हा नागरिकांना आकर्षित करणारा व त्याच वेळी मतदानाविषयी जनजागृती करणारा असल्याने हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी झाला.

रेवदंड्यात हवामन बदलाचा फटका

रेवदंडा : मागील काही दिवसांपासून परिसरात हवामान बदलाचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. दुपारनंतर ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होत आहे. यंदा तालुक्‍यात हवामानात वेगाने बदल होत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सातत्याने बदलत्या हवामानामुळे शरीराची लाही लाही होत असून नागरिक हैराण झाले आहेत. ढगाळ हवामानामुळे हवेत मळभ दाटून आल्‍याने उष्म्याची तीव्रता वाढली आहे. सकाळी दहानंतर ते सायंकाळी सहापर्यंत नागरिक घराबाहेर पडण्याऐवजी घरातच थांबणे पसंत करताना दिसून येत असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. येथील अनेक समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी बहरून गेले आहेत. मात्र, वाढत्‍या उष्म्यामुळे पर्यटक लगेच परतत आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्याने जव्हार परिसरात अंधार

जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून जव्हार, मोखाडा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच काही वेळ कडक ऊन, तर काही वेळ ढगाळ वातावरण अशाप्रकारे सायंकाळपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता; परंतु सोमवारी  दुपारी साडेबारा वाजता वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरण थंड झाले; पण वादळामुळे रस्त्यावरील झाडे कोलमडल्याने, विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन तालुक्यात अंधार पसरला होता. तालुक्यातील ग्रामीण भागात खेडो-पाड्यांतील बहुतांश घरे विटा, माती, कौलारू, लाकडाची झोपडी, कुडाचे घर अशा ठेवणीची आहेत. गोठ्यांच्या अवतीभोवती पावसाळ्यात बचावासाठी ताडपत्री, प्लास्टिक बांधण्याची तयारी सुरू असताना जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा, चार महिन्यांसाठी गोळा केलेले सरपण आणि पावसाळ्यापूर्वीची कामे मध्यावर असताना आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांना बाधित करून अतोनात नुकसान झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पसरले आहे. तालुक्याची भौगोलिक रचनाच अशी आहे की, डोंगरउतार, दरी खोऱ्यांतील लोकवस्ती आहे. वादळी- वाऱ्यामुळे कित्येक घरांवरील सिमेंट पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या मातीच्या भिंती पडल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात गती देऊन लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे महावितरणचे अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले.

मोखाड्यात तीन दिवसांपासून नुकसान

मोखाडा : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध परिसरांत वादळासह अवकाळी पावसाने धुमशान घातले आहे. सोमवारी  झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागांतील गाव-पाड्यांमधील घरांचे नुकसान केले आहे. पावसाळ्यापूर्वी अवकाळीने घरावरील छप्पर उडवल्याने घराची डागडुजी करण्याचा मोठा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर उभा राहिला आहे. मोखाडा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी वादळी पाऊस कोसळत आहे. मात्र, सोमवारी तालुक्यातील काही भागांत वादळी, तर काही भागांत गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे वेगवेगळ्या भागांत घरांवरील छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील आसे आणि चास ग्रामपंचायतीमधील गाव-पाड्यांना सर्वाधिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धामोडी येथील प्रकाश वाजे, तर चास पांगरी येथील ढवळू वाजे यांसह अन्य गाव-पाड्यांतील आदिवासींच्या घरावरील छपरे या वादळी पावसाने उडवली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच घरावरील छप्पर अवकाळीने उडविल्याने येथील आदिवासींचा संसार उघड्यावर आला आहे. घरांची डागडुजी कशी करायची, असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. पंचनामे करण्याचे आदेश दरम्यान, नुकसानग्रस्त भागातील माहिती तलाठ्यांकडून येत आहे. तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती तहसीलदार मयूर खेंगले यांनी दिली.

उद्धव ठाकरे आज वसईत

विरार : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (ता. १४) वसईत येत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारानिमित्त वसई-माणिकपूर येथील वायएमसीए मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला ते प्रमुख म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. वसई सनसिटी येथील मैदानावर सायंकाळी साडेचार वाजता हेलिकॉप्टरमधून त्यांचे आगमन होईल. त्यानंतर येथून जवळच असलेल्या बिशप हाऊसला ते भेट देतील. त्या ठिकाणी उपस्थित नागरिक आणि धर्मगुरूंसोबत संवाद साधतील. त्यानंतर नियोजित वेळेत सभास्थळी पोहोचून सभेला मार्गदर्शन करतील. उद्धव ठाकरे यांनी ३ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांची उमेदवारी घोषित केली होती. महाविकास आघाडीने भारती कामडी यांच्या रूपाने महिला उमेदवार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी ६ एप्रिल आणि उद्धव ठाकरे यांनी १२ एप्रिल रोजी अनुक्रमे वसई व बोईसर येथे सभा घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांनीही ८ मे रोजीच्या ‘बाईक रॅली`तून विरार-नालासोपारा भागातील नागरिकांसोबत संवाद साधला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शनिवार, ११ मे रोजी पालघरमध्ये पुन्हा भेट दिली होती. या भेटीत त्यांनी येथील विविध क्षेत्रांतील संघटनांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा वसईत जाहीर सभा घेत आहेत. पर्यावरण हानी, आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, औद्योगिकीकरण, वाहतूक व्यवस्था, अनधिकृत बांधकामांमुळे शहराची होणारी वाताहत व पाणी योजना आदी विषयांवर या सभेतून ते जनतेशी संवाद साधतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.