Author: bittambatami.com

ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक पुसायचा आहे !

राजन विचारे यांना मतदारांची साथ ठाणे : महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे या सच्चा शिवसैनिकाला मतदारांनी साथ दिली आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे. अशी साद घालत विचार यांनी आज जोरदार प्रचार केला. ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात केलेली कामे,युद्धपातळीवर सुरू असलेली प्रकल्प त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी मी कटिबध्द असल्याचा विश्र्वास विचारे यांनी मतदारांना दिला. यावेळी जागोजागी मतदारांनी तुफान प्रतिसाद देत विचारे यांचे स्वागत केले. त्यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ता अनिश गाढवे, संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, उप जिल्हाप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्वयक संजय तरे, सह समन्वयक राम काळे, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, अरविंद भोईर, साईनाथ पाटील, मयूर पैलकर, प्रतिक राणे, जिवाजी कदम, युवासेना अधिकारी किरण जाधव, राज वर्मा, महिला उपविभाग संघटक राजेश्री सुर्वे, सुनंदा देशपांडे, वैशाली शिंदे, युवासेना आरती खळे, पूजा भोसले, विद्या कदम, ज्योती दुग्गल, उषा बोरुडे, गीता चव्हाण, कविता नार्वेकर, कॉंग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी अध्यक्ष सुहास देसाई, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम खामकर, महेश म्हात्रे सरचिटणीस कॉंग्रेस, आपचे सलुजा, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी घोडबंदर येथील हायलँड पार्क ढोकाळी येथून प्रचाराला सुरूवात झाली. रुणवाल सिटी येथून पुढे बाळकुम नाका, दादलानी पार्क, बाळकुम पाडा, लोढा कॉम्प्लेक्स, माजिवडा गाव, ऋतू पार्क,आनंद पार्क, श्रीरंग सोसायटी,वृंदावन सोसायटी, रुस्तमजी, पंचगंगा,राबोडी, मीनाताई ठाकरे चौक,गोकुळ नगर गोल्डन डाईज, नारळीपाडा, रुणवाल नगर, कोलवाड, जागमाता मंदिर,कोलबाड, प्रताप सिनेमा, खोपट, गोकुळदास, सिद्धेश्वर तलाव, टेंभी नाका,सिविल हॉस्पिटल,उथळसर, सेंट्रल मैदान पोलीस लाईन, धर्मवीर शक्तीस्थळ,खारकर आळी, सिडको, स्टेडियम ठाणा कॉलेज,खारटन रोड, तलावपाळी सिग्नल, काँग्रेस कार्यालय अशा परिसरातून प्रचाराची रॅली निघाली. अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड – विचारे या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू घसरली असून त्यांना चांगलाच घाम फुटलेला असल्याचा आरोप विचारे यांनी केला. त्यामूळेच वायफळ भाषण करण्यात ते व्यस्त आहेत. मुळात लोकसभा सारख्या निवडणुकीत देशहिताचे, राष्ट्रहिताचे, राज्याच्या दृष्टिकोनातून विकासाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवेत. मात्र त्यांचा अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड करून जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला.

धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच, मग प्रसंग खोटे कसे?

राजन विचारे यांचे मिंधेना रोखठोक प्रतिउत्तर ठाणे : प्रतिनिधी – धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होता त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवले मग हे प्रसंग खोटे कसे असा सवाल उपस्थित करीत महाविकास आघाडीचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्याच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २ वर्षानंतर त्यांना आपण खोटं दाखवले असल्याची कबुली देतात याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखविला असल्याचा आरोप विचारे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१३ मध्ये ते पाच आमदारांना घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेवटच्या बंडा पर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. मात्र त्यांना केवळ शिवसेना संपावयाचीच होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यावर केला आहे.  आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते, असे देखील शिंदे म्हणाले होते, मात्र मागील दोन निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचेच काम शिंदे यांनी केले. ठाण्यातील सर्व यंत्रणा मिंधे तिकडे घेऊन जात असत त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कामावर निवडून आलो आहे. शिंदे यांनी केलेले बंड फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठीच होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. यांनी केवळ सेटिंगचे राजकारण केले शिंदे यांनी पहिले आमदराकीचे तिकीट मीच मिळवून दिले. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय काय केले त्याची उत्तरे आधी द्या असा सवालही त्यांनी केला. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, कॉंग्रेस, राष्ट्रवादी फोडली. केवळ सेटींगचेच राजकारण तुम्ही आतापर्यंत करीत आला आहेत. तसेच आता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास विचारे यांनी यावेळी व्यक्त केला. गोल्डन गॅंगचा “लीडर” म्हणून म्हस्के प्रसिद्ध नरेश म्हस्के कोरोना काळात कुठे होता, घरात बसून होता, महापौर पदाच्या कारर्कीद काय काम केले हे सांगावे, केवळ गोल्डन गँगचा लिडर म्हणूनच त्याची आतापर्यंत प्रसिद्धी राहिली आहे. ठाणे महापालिका लुटण्याचे काम मिंधे आणि म्हस्के याने केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली त्यामुळे तुमच्या मनात दिघे यांच्यावरील प्रेम काय आहे हे जनतेला माहित आहे. शिवसेनेत मला ४० वर्ष झाली, यांचा उदय साहेब गेल्यानंतर झाला आम्ही टेभी नाक्यावरील साहेबांचे कट्टर कार्यकर्ते होतो आणि अजूनही आहोत. मला शिवसेनेत ४० वर्ष झाली या बाकीच्यांचा उदय साहेब गेल्यानंतर झाला आहे. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते, दिघे साहेबानी मोठं वादळ येऊन सुद्धा पक्ष एकसंघ ठेवला. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता. याना मात्र शिवसेना संपवायची होती असा आरोप विचारे यांनी मुख्यमंत्र्यावर केला.

जळगावचा नईम तर मुंबईची काजल अंतिम विजेते 

राज्य कॅरम स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब ( क्षात्रैक्य समाज, मुंबई ) यांच्या संयुक विद्यमाने वनमाळी हॉल, दादर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम…

 महिला गटाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

७१वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे, श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला गटात  कर्नाळा क्रीडा (रायगड), प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे) या…

अवयवदान वाढणे ही काळाची गरज – राजीव निवतकर

मुंबई : कोणत्याही ठिकाणी असूद्या प्रतीक्षा यादी असतेच. आरोग्य विभागही त्याला अपवाद नाही. आपले अवयव किती अनमोल असतात याची आपल्याला किंमत नसते. आज राज्यात अवयव मागणी मोठी आहे. प्रतीक्षा यादी…

आचारसंहितेत अडकला ‘आनंदाचा शिधा’

रमेश औताडे मुंबई : हातावर पोट असणाऱ्यांनी रोज कमवायचे व रोजचा उदरनिर्वाह करायचा असे असताना शिधावाटप दुकानाचा आधार होता.पोटाची खळगी भरताना सरकारने दिलेले खराब का असेना ते खाऊन तृप्तीची ढेकर देणारा मेरा भारत महान असे म्हणणारा गरीब नागरीक आनंदी असायचा. मात्र त्याचा आनंद मात्र निवडणुकीमुळे लुप्त झाला आहे. शिधावाटप अधिकारी म्हणतात की,  निवडणुकीनंतर ‘आनंदाचा शिधा’ मिळेल. गुढीपाडवा तरी गोड होईल या आशेवर चार पाच चकरा शिधा दुकानावर मारून आलेले शिधा ग्राहक मात्र भर उन्हाळ्यात शिधा न मिळाल्याने नाराज झाले आहेत. गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली होती. गुढीपाडवा साजरा केला तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली मात्र शिधा काही मिळाला नाही.आता निवडणूक आहे त्यामुळे आतपण शिधा वाटप नाही. शंभर रुपयांत शिधा अशी जाहिरात करण्यासाठी सरकारने करोडो रुपये खर्च करून आपलीच पाठ थोपटली.त्यानंतर साडी वाटप सुरू केले. फाटक्या साड्या देऊन गरिबांची चेष्टा केली.अशी प्रतिक्रिया शिधापत्रिका धारक देत आहेत. मतदार राजा हा निवडणुकीत उमेदवारांच्या मागे मोफत वडापाव व पाणी पित भिकाऱ्यासारखा फिरत आहे.त्याला किमान शिधा तरी द्या अशी मागणी होऊ लागली आहे.आज भूक लागली आहे निवडणूक झाल्यावर सोने जरी दिले तरी त्याने भूक शमणार आहे का ? असा संतप्त सवाल गरीब जनता करत आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा मिळत नसल्याने मतदार राजा आनंदी नाही.

३७वी डॉ. श्रीधर देशपांडे स्मृती समर्लिग क्रिकेट स्पर्धा  

ओंकार, सिद्धेश चमकले ठाणे : ओंकार करंदीकर,अश्विन माळीची गोलंदाजी आणि राहुल कश्यपच्या नाबाद खेळी मुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने रॉयल क्रिकेट क्लबचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित ३७ व्या डॉ श्रीधर देशपांडे स्मृती समर्लिग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रॊयल क्रिकेट क्लबला ६१ धावांमध्ये गुंडाळल्यावर ८.२ षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या ६४ धावांसह विजय इंदप क्रिकेट क्लबने आगेकूच कायम राखली. ओंकार करंदीकर, अश्विन माळी आणि स्वप्नील दळवीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत रॉयल क्रिकेट क्लबला ६१ धावांवर रोखले. भावेश पवारच्या २६ धावांचा अपवाद वगळता रॉयलचे इतर फलंदाज छाप पाडू शकले नाहीत. ओंकार आणि अश्विनने प्रत्येकी तीन, स्वप्नील दळवीने दोन आणि प्रतीक जयस्वालने एक गडी बाद केला. त्यानंतर राहुल कश्यपच्या नाबाद ३२ धावांमुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने ८  गडी राखून पराभव केला. सिद्धेश भगतने १३ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : रॉयल क्रिकेट क्लब : १५.४ षटकात सर्वबाद ६१(भावेश पवार २६, ओंकार करंदीकर ४-११-३, अश्विन माळी ४-१५-३ स्वप्नील दळवी ०.४- १-२) पराभूत विरुद्ध विजय इंदप क्रिकेट क्लब : ८.२ षटकात २ बाद ६४ ( राहुल कश्यप नाबाद ३२, सिद्धेश भगत १३, राहुल म्हात्रे २-२१-१, गणेश मोरे ३-१८-१).

रिपाइं (आठवले) जिल्हा महिलाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

अनिल ठाणेकर ठाणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला ठाण्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रिपाइंच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षा मनिषा करलाद  यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी विटावा येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, मा. विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मनिषा करलाद यांनी विटावा, रेतीबंदर, माजीवडा आदी भागातील कार्यकर्त्यांसह हा पक्ष प्रवेश केला. रामदास आठवले हे भाजप सोबत गेले आहेत. सध्या भाजपकडून संविधानविरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याविरोधात लढण्याची भूमिका घेण्याऐवजी आठवले भाजपला साथ देत असल्याने आपण संविधान रक्षणासाठी शरदचंद्र पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणार आहोत, असे करलाद यांनी सांगितले. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी करलाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान,  मनिषा करलाद आणि त्यांचे दिवंगत पती गणपत करलाद हे दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत सक्रीय आहेत. नामांतर लढा, रिडल्स आदी आंदोलनात हे दाम्पत्य सक्रीय होते. गणपत करलाद यांच्या निधनानंतर मनिषा करलाद यांनी ही परंपरा सुरू ठेवली होती. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विटावा परिसरातील ताकद अधिकच वाढली आहे.

मुंबईतील भूखंडाच्या ई लिलावासाठी पुन्हा तीन दिवसांची मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध वापरासाठी राखीव असलेल्या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात येणार होती. मात्र तत्पूर्वीच सोमवारी मंडळाने निविदा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिली. मुंबई मंडळाने मार्चमध्ये १७ भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार मालवणी, कांदिवली, टागोरनगर (विक्रोळी), कन्नमवार नगर (विक्रोळी), प्रतीक्षा नगर आणि जोगेश्वरी येथील भूखंडांचा ई लिलावात समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मनोरंजन मैदान अशा विविध वापरासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. विविध क्षेत्रफळाच्या या भूखंडांसाठी मुंबई मंडळाने एक बोली निश्चित केली आहे. ४५ हजार ३०० रुपये प्रति चौरस मीटरपासून १ लाख ६ हजार १७० रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली निश्चित करण्यात आली आहे. या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारी निविदाकार संस्था, व्यक्तींना हे भूखंड वितरीत करण्यात येणार आहेत. ई लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना बोली रक्कमेच्या एक टक्के अनामत रक्कम अदा करावी लागणार आहे. मुंबई मंडळाला या भूखंड विक्रीतून किमान १२५ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. या १७ भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २६ एप्रिल होती. मात्र आचारसंहिता आणि अधिक प्रतिसाद मिळावा या उद्देशाने निविदा सादर करण्याची मुदत संपण्याआधीच या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार निविदा प्रक्रियेस ७ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत मंगळवार, ७ मे रोजी संपणार होती. मात्र तत्पूर्वीच निविदा सादर करण्यास मंडळाने तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता इच्छुकांना १० मेपर्यंत निविदा सादर करता येतील, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ठाण्यात पाणी बचतीसाठी पालिकेने लागू केले निर्बंध;

उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई ठाणे : तीव्र उन्हामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असून त्याचबरोबर विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. यामुळे तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे आणि इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई करण्यात आली असून त्याचबरोबर तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई केली आहे. या आदशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, गावे यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर, ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाणी बचतीसाठी १० जूनपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यानुसार दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर निर्बंध असणार आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी बचत करावी, असे आवाहन महापालिकेने केले. शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जावू नयेत. त्याऐवजी कूपनलिकेच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अशी सूचना महापालिकेने नागरिकांना केली आहे. अंगणात पाणी मारू नये. नळ सुरू ठेऊन कपडे धुणे, भांडी घासणे, दात घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती तातडीने दुरुस्त करावी.  सोसायटीतील गळकी टाकी, जलवाहिनी, व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत. इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होवू नये याची दक्षता घ्यावी. त्यासंदर्भात, तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा अशी गळती आढळल्यास संबंधीत इमारतीचे-सोसायटीची नळ जोडणी खंडीत करण्यात येईल. आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये.  स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पाण्याचा अनावश्यक साठा करू नये तसेच, साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी. इमारती, सोसायटी, संकुलांमधील तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरू नये आणि वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करुन एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत.  कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल आणि मशीनचा वापर पूर्ण क्षमतेने होईल. कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुवून निर्माण होणार निरुपयोगी पाणी साठवण करुन पुढचे दोन दिवस फ्लशसाठी, बाथरुम धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी तसेच बगीच्यासाठी वापरावे, अशी सूचनाही प्रशासनाने केली आहे.