Author: bittambatami.com

‘सांग सांग भोलानाथ निवडून येणार काय?’

मुंबई : लोकसभा निवडणुकांचा खरा खेळ नव्या युगातील नव्या माध्यमांवर अधिक खेळला जात आहे. प्रत्येक पक्षाच्या तथाकथित ‘वॉर रुम’मध्ये मोबाइल, लॅपटॉप या आधुनिक शस्त्रांद्वारे सेकंदागणिक पोस्ट, रील्स, ट्विट, रिपोस्टच्या माध्यमातून…

कलियुगात अजूनही माणुसकी जिवंत आहे…

रमेश औताडे मुंबई : आज एक रुपया कोणी कुणाला सोडत नसल्याच्या कलियुगात एका रुग्णाची १२ हजार रुपयाची बॅग त्याला शोधून परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा कामगार दिनी सत्कार झाल्याने अजूनही माणुसकी…

रिपब्लिकन बहुजन सेनाचे उमेदवार विजय घाटे ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

नितीन दूधसागर ठाणे : कुठे पोकळ आश्वासनांची खैरात , तर कुठे जातीय वादाची किनार घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसविण्यासाठी “रिपब्लिकन बहुजन सेना” ने आपला उमेदवार श्री विजय ज्ञानोबा घाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. २५  ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये मॅडम यांच्याकडे श्री. विजय घाटे यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्त  केला आहे. महा युती आणि महा आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर ‘रिपब्लिकन बहुजन सेना’ ने २५ ठाणे लोकसभा मतदार संघात श्री विजय ज्ञानोबा घाटे यांना पक्षाचे तिकीट दिले आहे.  गुरुवारी ०२/०५/२०२४ रोजी , विजय घाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  ठाणे मतदार संघात जनतेला बदल हवा आहे , सामाजिक आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव विजय घाटे यांना असून , ते या निवडणुकीत नक्कीच करिष्मा करतील , असा विश्वास ‘रिपब्लिकन बहुजन सेना’ च्या कार्यकर्त्यांना आहे.  निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी  ‘रिपब्लिकन बहुजन सेना’चे राष्ट्रीय महासचिव श्री. मुश्ताकजी मलिक , केंद्रीय सल्लागार श्री . नरेशजी भोईर, राष्ट्रीय कोषाध्यक्षा सौ. संजीवनी लोखंडे , राष्ट्रीय प्रवक्ता  श्री जगदीशजी सोनटक्के, राष्ट्रीय किसान अध्यक्ष श्री. राज आर्याजी, महाराष्ट्र प्रवक्ते श्री . प्रा. व्यंकटेशजी कांबळे ,  ठाणे शहर प्रमुख श्री. शिवराज कोटे, माथाडी कामगार अध्यक्ष श्री. शौकत शेख, मजदूर युनियन आघाडी अध्यक्ष श्री. सुनील जैस्वार, महाराष्ट्र संघटक श्री. किशोर लासुरे, महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सौ. शोभा आर्याजी , बिल्डर असो.अध्यक्ष  श्री. हिम्मत विसरिया , मीरा-भायंदर अध्यक्ष श्री. अनिश कांबळे, नेहा जाधव, फरीद सय्यद, सज्जादभाई सय्यद, कामगार आघाडी नेते श्री. विनय डोळस ,इत्यादी मान्यवर रॅलीत उपस्थित होते.

परवीनकुमार थिंड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी झाली निवड मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी परवीनकुमार थिंड यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी ही माहिती दिली. निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांचा पत्ता : निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,  29-मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, सरकारी वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051. त्यांचा संपर्कासाठी  मोबाईल क्रमांक (+)९१ ८९२८५७१२५३ असा आहे. दरम्यान, निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मुळे यांच्यासह पोलिस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, खर्च पथक प्रमुख  आदी उपस्थित होते.  या बैठकीत निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी नामनिर्देशन व्यवस्था, ETPBMS वेळापत्रक, घरपोच मतदान, पोस्टल बॅलेट मतदान, मतदानाच्या तयारी आदी बाबतचा आढावा घेतला. खर्चाच्या दृष्टिकोनातून आदर्श आचारसंहिता आणि संवेदनशील भागात सतर्कता बाळगावी, अशा सूचना देत त्यांनी मुक्त आणि नि:पक्ष मतदान घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतानाच उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर होणाऱ्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक परवीनकुमार थिंड यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम व सनियंत्रण कक्षास 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्री. थिंड यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड उपस्थित होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. थिंड माध्यम कक्षाचे कामकाज, दैनंदिन पाठविले जाणारे अहवाल, समाजमाध्यम, वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांचे सनियंत्रण कशा प्रकारे केले जात आहे, याची माहिती घेतली. सध्या वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा समाजमाध्यमांचा अधिकाधिक प्रचार उमेदवार करताना दिसतात. त्यामुळे या माध्यमाद्वारे उमेदवारांच्या प्रचाराकडे आणि त्यावर केल्या जाणाऱ्या खर्चावर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या भेटीत श्री. थिंड यांनी माध्यम कक्षांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

परिचारिकेला मारहाण केल्याच्या निषेधार्थ भाभा रुग्णालयात आंदोलन

मुंबई : कुर्ला येथील मुंबई महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयात बुधवारी रात्री ११.३० वाजता महिला रुग्ण व तिच्या नातेवाईकांनी रुग्ण कक्षातील परिचारिकेला शिवीगाळ करीत मारहाण केली. यामुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारी सकाळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्वरित अटक करावी आणि परिचारिकांच्या सुरक्षेसाठी रुग्ण कक्षात सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी करत जोरदार आंदोलन केले. परिचारिकांच्या आंदोलनामुळे रुग्ण सेवेवर परिणाम झाला. कुर्ला येथील भाभा रुग्णालयात महिला रुग्ण कक्षात रात्रपाळीला असलेल्या परिचारिका मोहिनी मातेरे यांनी रात्री रुग्णांना औषध देण्याच्या वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी अल्पवयीन रुग्ण असलेल्या मुलीने तिच्या सोबतच्या मित्र व नातेवाईकांना बाहेर पाठविण्यास नकार दिला. मात्र रुग्णांना औषध देण्याबरोबरच कक्षाची सफाई करायची आहे, तसेच हा महिला कक्ष असल्याने रात्री उशिरा पुरुष थांबू शकत नसल्याचे त्यांनी रुग्ण व तिच्या नातेवाईकांना सांगितले. मात्र ती रुग्ण ऐकण्यास तयार नव्हती. तिने मला रुग्णालयात राहायचे नाही असे सांगत रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) घेतली. त्यानंतर थोड्या वेळाने ती आपल्या काही नातेवाईकांसोबत पुन्हा रुग्णालयात आली आणि तिने मोहिनी मातेरे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. हा प्रकार मातेरे यांनी परिचारिका प्रमुख आणि वैद्यकीय अधीक्षक यांना सांगितला आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारी सकाळी कामावर रुजू न होता आंदोलन केले. सबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना अटक करवी. तसेच प्रत्येक कक्षामध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी परिचारिकांकडून करण्यात आली. दरम्यान या संदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद्मश्री आहिरे यांच्यासोबत परिचारिकांच्या झालेल्या बैठकीत सुरक्षा रक्षक प्रमुखांनी पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याचा मुद्दा निदर्शनास आणला. यावर आहिरे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील, असे आश्वासन परिचारिकांना दिले. रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला मारहाण केल्यामुळे सर्व परिचारिकांनी आंदोलन केले. या घटनेमुळे परिचारिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना त्वरित अटक करून परिचारिकांना संरक्षण देण्याची व्यवस्था करावी. – ॲड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना

आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ

ठाणे : आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत दि. १६.०४.२०२४ ते ३०.०४.२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. परंतु या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी दि. १०.०५.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यासाठी दि. ०२/०५/२०२४ पर्यंत एकूण ४ हजार ४५० अर्जांची नोंदणी पूर्ण (CONFIRM) झालेली आहे व १४ हजार ९६५ अर्जांची नोंदणी अपूर्ण (NOT CONFIRM) असल्याचे दिसून येत आहे. तरी नोंदणी अपूर्ण असलेले बालकांचे अर्ज (NOT CONFIRM) दि. १०/०५/२०२४ पूर्वी पूर्ण (CONFIRM) करून घ्यावेत. तसेच या प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या (वंचित गट– SC/ST/NT/VJ/OBC/SBC , दुर्बल गट–१ लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग– बालकांचे ४०% अपंगत्व) जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रक्रियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण २ हजार ६२० पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८६८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून  https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new  या वेबसाईटवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पंचायत समिती व महानगर पालिका स्तरावर मदतकेंद्र सुरू करण्यात आल्या आहेत. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centre), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

दीड लाख विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

डॉ. भरत बास्टेवाड व पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दीड लाख विद्यार्थांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके अशोक गायकवाड अलिबाग : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानातंर्गत रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार १६२ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर, ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकार्‍यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. चौकट मोफत पाठ्यपुस्तक देण्यात येणारे जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत सर्वात जास्त ४९ हजार ९३३ विद्यार्थी पनवेल तालुक्यात असून, अलिबाग १३ हजार २२, पेण १५ हजार ३२५, उरण ९ हजार ५९८, कर्जत २० हजार ३५७, खालापूर १५ हजार ३३८, सुधागड ७ हजार ३०३, रोहा १० हजार ६१३, माणगाव ११ हजार ७६५, महाड ११ हजार २२९, पोलादपूर २ हजार ६४०, म्हसळा ४ हजार २६, श्रीवर्धन ५ हजार ७४९, मुरुड ४ हजार ७२८, तळा २ हजार ५३६ विद्यार्थी आहेत.

निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक

ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धा ठाणे : सामनावीर ठरलेल्या निखिल पाटीलचे नाबाद दमदार शतक, साहिल गोडेच्या ९१ धावा आणि गोलंदाजांच्या एकत्रित चांगल्या कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबच्या ब संघाने ए.टी स्पोर्ट्सचा १९८ धावांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी – २० क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय मिळवला. फलंदाजांच्या आक्रमक खेळामुळे २५८ धावांचा पर्वत उभा केल्यावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाच्या गोलंदाजांनी ए,टी स्पोर्ट्सला ६० धावांवर गुंडाळत विजयावर शिक्कामोर्तब केले. दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर सुरु असलेल्या स्पर्धेतील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निखिल पाटील आणि साहिल गोडेने ए.टी. स्पोर्ट्सच्या गोलंदाजांचा अक्षरशः फडशा पाडला. निखिलने नाबाद ११८ धावांची खेळी केली. ४८ चेंडूत शतक साकारणाऱ्या निखिलने ९ चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले. साहिलने ३६ चेंडूत ९१ धावांची बहुमूल्य खेळी साकारताना १२ चौकार आणि पाच षटकार मारले. धृमील मटकरने नाबाद ३० धावा केल्या. या डावात योगेश सावंतने दोन, अश्विन यादव आणि सिद्धार्थ यादव यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. त्यानंतर मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या ए टी स्पोर्ट्सच्या फलंदाजाना खेळपट्टीवर टिकू न देता गोलंदाजांनी विजयाचा मार्ग मोकळा केला. संक्षिप्त धावफलक : एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ( ब संघ ) : २० षटकांत ४ बाद २५८ ( निखिल पाटील  नाबाद ११८, साहिल गोडे ९१, धृमील मटकर नाबाद ३०, योगेश सावंत ४-२५-२, अश्विन यादव ४-४९-१, सिद्धार्थ यादव ४-५२-१) विजयी विरुद्ध ए टी स्पोर्ट्स : १२.१ षटकात सर्वबाद ६० ( कौशिक शुक्ला १८, शिवम घोष १५ , हेमंत बुचडे २-४-२, अमित पांड्ये २-७-२,अर्जुन शेट्टी २-७-२, धृमील मटकर १.१ – २-१, अमन खान १-४-१,नंदन कामत३-१३-१.) सामनावीर – निखिल पाटील.

गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंची चमक

मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गाव चिखले, जि. पालघर येथे मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात , मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवानांनी भरघोस बक्षिसांची लयलूट केली. मनीषा शेलार हिने महिला गटातील फायनलची गदे वरील कुस्ती जिंकली. कोमल पटेल, मनस्वी राऊत, कविता राजभरने आपल्या लढती सहज जिंकून चषक पटकावले. सूरज माने, सूर्यकांत देसाई, आदर्श शिंदे, अभिषेक इंगळे यांनी देखील प्रतिस्पर्ध्यांना लिलया आस्मान दाखवून रोख रकमेची पारितोषिके आणि पदके मिळवली. या सर्व कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक किसन कदम यांचे निधन

मुंबई : लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेचे माजी क्रीडा शिक्षक, बुजुर्ग क्रीडा प्रशिक्षक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त किसन  सखाराम कदम यांचे १ मे रोजी सकाळी चेंबूर येथील कोळेकर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. निधना  समयी ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. चेंबूर हायस्कूल या चेंबूर च्या पहिल्या शाळेत काम करत असताना भ. मा. पंत यांच्या तालमीत कदमसर तयार झाले. बास्केटबॉल, खोखो, ॲथलेटिक्स अश्या विविध खेळांच्या स्पर्धांत राज्य व राष्ट्रीयस्तरावर कदमसर सहभागी झाले होते. त्यांनी या विविध खेळात अनेक खेळाडू तयार केले. त्यानंतर पंत सरांबरोबर जवाहर विद्याभवन व श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळा  स्थापन करून गरीब मुलांना शिक्षण देण्यात सरांचा मोठा वाटा होता. कदम सरांच्या १ खेळाडूला अर्जुन पुरस्कार, १४ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, २२ खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाले. सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या खेळाडूंनी  आशियाई स्पर्धेत देखील भरघोस पदकांची कमाई केलेली आहे. चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत कदम सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.