Author: bittambatami.com

आठ अधिकाऱ्यांना मिळाले पोलिस महासंचालक पदक

नवी मुंबई : महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल राज्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस पदक आणि पोलिस शौर्य पदकासह पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने २०२३ या वर्षातील उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) जाहीर झाले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झालेल्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील सहायक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दगडू सापते, पोलिस हवालदार संदीप मनोहर ढवळे, गिरीष रामचंद्र किंद्रे, सतीश दत्तात्रय साळुंखे, गिरीष विनायक चौधरी, कृष्णा जयराम गावित आणि दत्तात्रय किसन भगत यांचा समावेश आहे. या सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कळंबोली येथे पोलिस मुख्यालय येथे होणाऱ्या पथसंचालनावेळी या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

दिव्यांग, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांत मतदान जागृती

पनवेल : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४च्या पार्श्‍वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये नुकताच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास स्वीप पथकप्रमुख शहर अभियंता संजय जगताप, दिव्यांग विभागप्रमुख प्रकाश गायकवाड, स्वप्नाली चौधरी उपस्थित होते. तसेच शुक्रवारी कामोठे येथे बचत गटांतील महिलांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी बचत गटाच्या महिलांनी रॅली काढली. प्रभाग समिती ‘ब’ हद्दीतील कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल इत्यादी ठिकाणी मतदान जनजागृतीचे बॅनर लावण्यात आले. आशा सेविकांनी सेक्टर पाच, कामोठे, साईनगर, दर्गा वाडी, नवीन पनवेल, कळंबोली येथे जनजागृती केली.

रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथके नेमण्यात यावीत

रोकड वाहतूक रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांचे निर्देश ठाणे : मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलगाड्यांमधून निवडणुक काळात रोख रक्कमेची वाहतूक होण्याची शक्यता व्यक्त करत असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीफची कुमक वाढवावी, अशी सुचनाही त्यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना आणि राहील गुप्ता उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या लोकसभा मतदारसंघातील निवडणूका नि:पक्षपातीपणे, शांततेत आणि भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे. सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय ठेवावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी बैठकीत दिले. मुंबईची जीवनवाहिनी ही लोकल सेवा आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात रेल्वे स्थानके आहेत. लोकल सेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रोकडची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत रेल्वे स्थानकांवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याची सूचना निरिक्षकांनी बैठकीत केली. मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीएफची कुमक वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले. भिवंडी, ओवळा – माजिवडा हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कळविण्यात यावे. सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले.

श्री नारायण गुरु कॉलेज कॅरम स्पर्धेत पौरस करगुटकर विजेता

मुंबई : खालसा कॉलेजच्या पौरस करगुटकरने श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स-चेंबूर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतर कॉलेज एकेरी कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या ज्युनियर कॅरमपटूनी निर्णायक फेऱ्यांमध्ये चुरशीचा खेळ केल्यामुळे स्पर्धा रंगतदार झाली. अंतिम फेरीत पौरस करगुटकरने मॉडेल कॉलेज-डोंबिवलीच्या समृध्दी घाडीगावकरचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. श्री नारायण गुरु कॉलेज समितीचे अध्यक्ष एम.आय.दामोदरन व जनरल सेक्रेटरी ओ.के. प्रसाद, उपप्राचार्य डॉ. जयश्री व्यंकटअचलम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी स्पोर्ट्स डायरेक्टर प्रोफेसर पूनम मुजावर, स्पोर्ट्स प्रोफेसर रेश्मा खुदाबक्ष, प्रोफेसर नाहीद शेख, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व प्रॉमिस सैतवडेकर, कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. निर्णायक फेरीतील पहिल्या सेटमधील पहिलाच बोर्ड ५-० असा घेत समृध्दी घाडीगावकरने पौरसविरुध्द दमदार प्रारंभ केला. परंतु त्यानंतर सावध व अचूक खेळ करून प्रत्येक बोर्ड घेत पौरस करगुटकरने पहिला सेट ८-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये राणीवर सतत कब्जा मिळवीत पौरसने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि १५-२ असा विजय मिळवीत अंतिम फेरी जिंकली. राष्ट्रीय ख्यातीचे उदयोन्मुख कॅरमपटू अंकित मोहिते व निलांश चिपळूणकर यांना हरवून समृध्दी घाडीगावकरने निर्माण केलेली विजेतेपदाची दावेदारी अखेर फोल ठरली आणि तिला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पौरस करगुटकरने पोद्दार कॉलेजच्या रुची माचीवलेचा ७-१०, १३-०, १३-७ असा तर समृध्दी घाडीगावकरने हिंदुजा कॉलेजच्या निलांश चिपळूणकरचा ८-६, ९-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. विविध जिल्ह्यातील कॉलेज कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटू गोविंदराव मोहिते अमृत महोत्सवी चषक आंतर कॉलेज कॅरम स्पर्धेचे आयोजन २९ जूनला आयडियलतर्फे होणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते व संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.

३७वी श्रीधर देशपांडे स्मृती टी -२० समरलीग क्रिकेट स्पर्धा

आर्यनचे बळींचे सप्तक ठाणे : आर्यन दलालच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्यामुळे यजमान स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने सलग दुसरा मोठा विजय मिळवत ३७ व्या श्रीधर देशपांडे स्मृती टी -२० समरलीग क्रिकेट स्पर्धे च्या बाद फेरीत स्थान मिळवले. आर्यनने सात बळी मिळवत मुंबई क्रिकेट अकॅडमीला अवघ्या ४९ धावांवर गुंडाळल्यावर यजमानांनी ४.२ षटकात एका फलंदाजांच्या मोबदल्यात ५३ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा यजमानाच्या कर्णधाराचा निर्णय आर्यनने  एकदम सार्थ ठरवला. आर्यनने केवळ १९ धावांच्या मोबदल्यात सात फलंदाजाना माघारी पाठवले. आर्यनच्या गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या दोघांच फलंदाजांना दुहेरी धावांचा पल्ला पार करता आला. विक्रम पैच्या १४ आणि अक्षत कांबळेच्या १० धावांमुळे मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या खात्यात बऱ्यापैकी धावा जमा झाल्या. त्यांनतर शंकर सुब्रमणियमने १० चेंडूत तीन चौकार मारत नाबाद १६ धावा केल्या. तर पहिल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या अथर्व अधिकारीने १३ चेंडूत पाच चौकारासह नाबाद २४ धावांची खेळी केली. संक्षिप्त धावफलक : मुंबई क्रिकेट अकॅडमी : १२ षटकांत सर्वबाद ४९ ( विक्रम पै १४, अक्षत कांबळे १० , आर्यन दलाल ४-१-१९-७, यश जठार ३-०-१२-२, तुषार कार्विझया २-०-६-१) पराभूत विरुद्ध स्पोर्टींग क्लब कमिटी : ४.२ षटकात १ बाद ५३ (शंकर सुब्रमणियम नाबाद १६, अथर्व अधिकारी नाबाद २४, शिवेन मिश्रा २-०-१९-१).

पॉवरलिफ्टिंग खेळाचा प्रशिक्षण वर्ग

मुंबई : येत्या ६ ते २० मे दरम्यान ठाणे (पूर्व) येथील धि युनायटेड स्पोर्ट्स क्लबमध्ये सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी पॉवरलिफ्टिंग खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती पुरस्कार प्राप्त नामवंत पॉवरलिफ्टिंग खेळाडू अनंत चाळके यांच्यातर्फे या खेळाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी या खेळाकडे आकर्षित व्हावे हा या प्रशिक्षण वर्गाचा मूळ हेतू आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९३२४५०६०६६ अथवा ९७०२१७१००४ यावर संपर्क साधावा.

नवी मुंबईतील स्वच्छताकर्मीही करताहेत मतदान करण्याविषयीचे आवाहन

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूक 20 मे रोजी संपन्न होत असून या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावावा यादृष्टीने व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती मोहिमेमध्ये विविध प्रसार माध्यमांचा वापर करण्यात येत असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. नवी मुंबई हे स्वच्छतेत देशामध्ये अग्रमानांकित असणारे शहर असून येथील सेवाभावी वृत्तीने काम करणारे स्वच्छताकर्मी दैनंदिन स्वच्छता कार्याप्रमाणेच विविध लोकोपयोगी उपक्रमातही मनापासून सहभागी होत असतात. या अनुषंगाने स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करणारे बिल्ले (Badges) लावून त्या माध्यमातून मतदान करण्याविषयी संदेश प्रसारण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर हे बिल्ले झळकत असून, त्यावर असलेल्या ‘मी मतदान करणारच. तुम्हीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावा. माझे मत माझा अधिकार’ – अशा मजकुरातून अभिनव पद्धतीने मतदान करण्याविषयीचे आवाहन केले जात आहे. याशिवाय महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीही मतदान करण्याविषयीच्या जनजागृतीपर संदेशांचे प्रसारण करीत आहेत.

प्रचार अर्थपूर्ण व्हायचा तर…

मागोवा विठ्ठल जरांडे वादग्रस्त विधाने आणि कमरेखालचे वार यामुळे निवडणुकीची प्रचारपातळी खालावली आहे. झालेली आणि रखडलेली विकासकामे आणि त्यामुळे जनसामान्यांचे बाधित होत असलेले आयुष्य हा प्रचारसभांमधील हुकमी मुद्दा ठरु शकतो.…

राजस्थानचे आकर्षक किल्ले

राजस्थानचे नाव घेताच राजवाडे आणि किल्ले आठतात. या शहरामध्ये तुम्हाला प्रेक्षणीय स्थळांपासून खरेदीपर्यंत अनेक ठिकाणे पाहायला मिळतील. हे शहर ऐतिहासिक किल्ल्यांसाठी जगप्रसिद्ध तर आहेच पण त्यांचा इतिहाससुद्धा जाणून घेण्यासारखा आहे.…