Category: क्रीडा

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले एमसीसी लिटिल स्टार  (१४ वर्षांखालील) क्रिकेट लीग मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग (१४ वर्षांखालील) स्पर्धेत एमसीसी ठाणे अ संघाच्या विजयात शतकवीर विवान गुर्जर आणि अष्टपैलू रचित पाटील चमकले. पहिल्या सामन्यात, एमसीसी ठाणे अ संघाने विबग्योर स्ट्रायकर्सवर ५ विकेट राखून मात केली. विबग्योर स्ट्रायकर्सनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत १९४ धावा केल्या. त्यात हृदय मेहताने (५२ चेंडूत ४५ धावा) सर्वाधिक योगदान दिले. एमसीसी ठाणे संघाकडून आयुष सुतार (३/२५), रचित पाटीलने (३/३१) प्रभावी मारा केला. एमसीसी ठाणे अ संघाने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान ३२.५ षटकांत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. विवान गुर्जरने ८७ चेंडूत १०३ धावांची झटपट खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. रचित पाटीलने ३८ चेंडूत ३६ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. अष्टपैलू रचित याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. अन्य सामन्यांत, एमसीसी सांताक्रूझ व भांडुप संघांनी विजय मिळवले. संक्षिप्त धावफलक: पहिला डाव: विबग्योर स्ट्रायकर्स – ३५ षटकांत सर्वबाद १९४(हृदय मेहता ४५(५२), आयुष सुतार ३/२५, रचित पाटील ३/३१) वि. एमसीसी ठाणे अ – ३२.५ षटकांत ५ बाद १९५(विवान गुर्जर १०३(८७), दिव्यम मुथा ३/१८). निकाल: एमसीसी ठाणे अ ५ विकेट राखून विजयी. सामनावीर: रचित पाटील ३/३१ आणि ३६(३८). एमसीसी ठाणे ब – २५.५ षटकांत ९ बाद ८४(मोहम्मद अमीन ३८(५९), आयुष गुप्ता ३/८) वि. एमसीसी सांताक्रूझ ८ षटकांत २ बाद ८५(अगस्त्य २९(१२), पीयुष तिवारी २/३८). निकाल: एमसीसी सांताक्रूझ ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आयुष गुप्ता (३/८). विबग्योर स्ट्रायकर्स ३०.१ षटकांत सर्वबाद ११५(आशीर बेग २९(४९) वि. एमसीसी भांडुप – १२.२ षटकांत २ बाद ११६(आर्यन चेंबुरकर ८२(४०). निकाल: एमसीसी भांडुप ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आर्यन चेंबूरकर ८२(४०).

चिन्मय मिशनच्या ७५ व्या पवित्र अमृत महोत्सवाचे आयोजन

आर्य गुरुकुलचा समष्टी अंजनेय होम चिन्मय मिशनच्या ७५ व्या पवित्र अमृत महोत्सवाचे आयोजन कल्याण : कल्याण येथील आर्य गुरुकुल, जागतिक चिन्मय मिशनच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक तेजस्वी भाग बनले. त्यांनी समष्टी अंजनेय होमचे आयोजन शनिवारी कल्याण मध्ये  केले होते.  हा एक असा यज्ञ होता ज्याने भक्ती, शिस्त आणि दैवी कृपेला एकत्र आणले. हा कार्यक्रम केवळ एक विधी नव्हता, तर एक आध्यात्मिक जागरण होते, जे वेदांताला दैनंदिन जीवनात आणि ज्ञानाला सेवेत रूपांतरित करण्याच्या गुरुदेवांच्या दृष्टिकोनाचा प्रतिध्वनी होता. दिवसाची सुरुवात राम नामावलीच्या जपाने आणि तानपुऱ्याच्या श्रुतीने झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शांतता पसरली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्याचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण भजनांनी, कृशांक मलिक (उपाध्यक्ष, चिन्मय मिशन, कल्याण) यांच्या स्वागतपर भाषणाने आणि अलका मुतालिक यांच्या सत्काराने झाली, ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्या शब्दांनी सर्वांना आठवण करून दिली की, “अमृत महोत्सवातील आर्य गुरुकुलचा सहभाग हा तरुण पिढीसाठी आध्यात्मिक जागृतीचा एक प्रकाशस्तंभ आहे.” याठिकाणी सर्वांच्या सहभागातून सामूहिक भक्तीचे दर्शन घडले. यामध्ये ४०० तरुण साधक, ७५ मार्गदर्शक, ५० समर्पित समर्थक, २१ कुटुंबे कृतज्ञता व्यक्त करणारी आणि २१ वैदिक विद्वान यांचा समावेश होता. दिवसाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘राम-की टोळी’ मिरवणूक होती, जिथे भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे आदरपूर्वक प्रतिनिधित्व करण्यात आले. एका प्रतीकात्मक कृतीत, हनुमानाने आपली गदा अम्माजींना अर्पण केली, ज्यामुळे प्रधान होमाचा प्रारंभ झाला. या पवित्र कृतीत नम्रता, भक्ती आणि सामर्थ्य यांचा संगम होता, ज्यामुळे यज्ञाच्या गहन आध्यात्मिक महत्त्वासाठी योग्य वातावरण निर्माण झाले. स्वामिनी निष्कलानंद-जी अम्मा यांचे आशीर्वादवचन या सोहळ्याचा आत्मा होता. हा कार्यक्रम म्हणजे “अनिश्चिततेने भरलेल्या जगात, आपण जागतिक शांततेसाठी जप करूया, आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेचा स्वीकार करूया—ज्याचा अर्थ संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची प्रतिक्रिया आर्य ग्लोबल अध्यक्ष भरत मलिक यांनी दिली. तर “शिक्षण हीच पूजा आहे. आजचा यज्ञ बुद्धी, हृदय आणि हात यांना एकत्र आणतो—जे सर्वांगीण शिक्षणाचे सार असल्याचे डॉ. नीलम मलिक यांनी सांगितले.

हजारो विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनची करिअर मार्गदर्शनाची दीपमाळ

हजारो विद्यार्थ्यांसाठी अंतरंग फाऊंडेशनची करिअर मार्गदर्शनाची दीपमाळ कल्याण : करिअरच्या वाटेवर उभ्या असलेल्या किशोरवयीन मनांमध्ये संभ्रम असतो, प्रश्न असतात, भीती असते… पण योग्य शब्द, योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं की तीच मनं स्वप्नांकडे झेप घेऊ लागतात. ठाणे जिल्ह्यात हेच घडलं. कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर आणि नवी मुंबई या महानगरपालिकांच्या सहकार्याने अंतरंग फाऊंडेशनने राबवलेली तीन भागांची ऑनलाइन करिअर वेबिनार मालिका म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उजेडाची दीपमाळ ठरली. ५५ हून अधिक शाळांमधील इयत्ता ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमाने केवळ माहिती दिली नाही, तर विचारांना दिशा दिली, मनाला बळ दिलं आणि स्वप्नांना पंख दिले. “करिअर म्हणजे फक्त नोकरी नाही, तो स्वतःला घडवण्याचा प्रवास आहे” ही भावना या वेबिनार मालिकेच्या प्रत्येक संवादातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजली. शिक्षण, IT, AI आणि सोशल सेक्टरसारख्या विविध क्षेत्रांतील अनुभवी वक्त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले अनुभव उघडले—संघर्षांचे दिवस, अपयशांचे क्षण, यशाची पहिली पायरी आणि त्या प्रवासातून शहाणपणाची शिदोरी मिळाली. शब्दांतून फक्त कथा नव्हत्या, तर आयुष्याची शिकवण होती; सल्ल्यांत फक्त मार्ग नव्हता, तर आत्मविश्वासाची ज्योत होती. त्यामुळे करिअर ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी पुस्तकातली माहिती न राहता, जिवंत अनुभव बनून उभी राहिली. प्रश्नोत्तर सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी भीती झटकली, संकोच बाजूला ठेवला आणि मनातले प्रश्न मोकळेपणाने विचारले. विचार करण्याची सवय, प्रश्न विचारण्याची हिंमत आणि स्वतःचं मत ठामपणे मांडण्याचं धाडस या उपक्रमातून नकळत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजत गेलं. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदाच “मी करू शकतो” हा विश्वास चमकताना दिसला. ऑनलाइन स्वरूपामुळे हा उपक्रम केवळ काही शाळांपुरता मर्यादित राहिला नाही. वर्गखोल्यांतील टीव्ही, प्रोजेक्टर, मोबाईलच्या स्क्रीनवरून एकाच वेळी हजारो विद्यार्थी या वेबिनारशी जोडले गेले. शहर, उपनगर, परिसर यांची सीमा मिटली आणि करिअर मार्गदर्शनाचा प्रकाश ठाणे जिल्ह्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात पोहोचला. या यशामागे शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, समन्वयक आणि महानगरपालिकांचे भक्कम पाठबळ होते. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता, चळवळ बनला. अंतरंग फाऊंडेशनने या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाची नवी संस्कृती रुजवली असून, भविष्यात अधिक व्यापक, अधिक समावेशक आणि अधिक प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा संस्थेचा निर्धार या यशस्वी वेबिनार मालिकेतून ठामपणे अधोरेखित झाला आहे.

 पराभूत उमेदवार प्रजासत्ताक दिनी करणार अर्धनग्न उपोषण

निवडणूक प्रक्रियेत घोळ पराभूत उमेदवार प्रजासत्ताक दिनी करणार अर्धनग्न उपोषण अनिल ठाणेकर ठाणे: नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत सदोष यंत्रणा वापरून मतदान प्रक्रियेत घोळ घातला आहे, असा आरोप करीत नव्याने निवडणूक घ्यावी, या मागणीसाठी अपक्ष उमेदवार रवींद्र चांगो शिंदे हे प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी राज्य निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. ठाणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधून रवींद्र शिंदे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, हा पराभव सदोष प्रक्रियेतून झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. रवींद्र शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात झालेले मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही निवडणूक नियमबाह्य झाली असल्याने ही निवडणूक रद्द करून फेरमतदान घ्यावे. तसेच, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर आयोगाने कार्यवाही न केल्याने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या उपोषणादरम्यान, असंविधानिक पॅनल पद्धती रद्द करावी, व्हीव्हीपॅट सुविधा सुरू करावी अथवा मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, जिथे बिनविरोध प्रक्रिया राबविली आहे; त्या ठिकाणी माघार घेणाऱ्यांची चौकशी करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, असे रवींद्र शिंदे यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई विभागीय केंद्रांतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे!!! माननीय कुलगुरू महोदयांच्या आदेशानुसार ८ फेब्रुवारीला श्री बापूसाहेब विसपुते बी.एड. कॉलेज, पनवेल येथेयुवा शक्ती फाउंडेशन आणि श्री डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वरील लिंकवर आपली नोंदणी करून या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व उत्कृष्ट रोजगाराची संधी मिळवावी, असे आवाहन मुंबई विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ. वामन नाखले यांनी केले आहे.सर्व केंद्रप्रतिनिधींना विनंती करण्यात येते की, कृपया ही माहिती सर्वत्र पोहोचवावी. या रोजगार मेळाव्यास केवळ मुक्त विद्यापीठाचेच नव्हे, तर इतर विद्यापीठांतील विद्यार्थीही नोंदणी करू शकतात.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यास नोंदणी करावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक(YCMOU) तर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ९७०७९६५७४२,८८७९33८८33

अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’ हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘संवाद’ पत्रिकेच्या वतीने विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि सृजनशीलतेला वाव देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून येत्या दिनांक २३ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेसाठी ‘ज्ञानगंगा घरोघरी – यशवाणी कानोकानी’, ‘मुक्त विद्यापीठातील शिक्षण – विकासाचे लक्षण’, ‘प्लास्टिक हटवा – पर्यावरण वाचवा’ व ‘मुक्त विद्यापीठ – ‘संवाद’ पत्रिका’ असे चार विषय आहेत. त्यापैकी एका विषयावर आधारित ए फोर आकारातील जाहिरात ही आकर्षक मजकूर, लक्षवेधी चित्र आणि विषयाला सुसंगत घोषवाक्यासह असावी. तसेच स्पर्धकांनी ही जाहिरात बहुरंगी भित्तीपत्रक (पोस्टर) स्वरूपात तयार करून पीडीएफ, जेपीईजी किंवा पीएनजी स्वरूपात paikrao_vk@ycmou.digitaluniversity.ac या मेल आयडीवर पाठवावी. सोबत स्पर्धकाने आपले पूर्ण नाव, शिक्षणक्रमाचे नाव, अभ्यासकेंद्राचे नाव, केंद्र संकेतांक आणि कायम नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण ठरणाऱ्या प्रथम पाच जाहिरातींना विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात येईल. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठ पत्रिका ‘संवाद’चे कार्यकारी संपादक प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले आहे.

कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्त राबविले विविध उपक्रम

कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्त राबविले विविध उपक्रम कल्याण : कल्याण पूर्व येथील कल्याणी दुर्गा माता मंदिरात वसंत पंचमीच्या निमित्ताने विद्येची देवी माँ सरस्वतीची पूजा-अर्चा श्रद्धा व उत्साहात करण्यात आली. मिथिलाजन एज्युकेशनल सोशल अँड रिलिजियस ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कल्याणी दुर्गा माता मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन, सरस्वती पूजन, हवन तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. वसंत पंचमीच्या खास प्रसंगी मिथिलाजन ट्रस्टच्या माध्यमातून ज्ञानाची देवी माँ सरस्वतीची पूजा करण्यात आली तसेच शेकडो गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेची फी भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही करण्यात आली. या उपक्रमाबाबत मिथिलाजन ट्रस्टचे अध्यक्ष संजीव मिश्रा यांनी सांगितले की, मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच उद्देशाने दरवर्षी ट्रस्टकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी, सुमित झा, दीपक मिश्रा, केशरी पांडेय, आनंद झा आदींचे मोलाचे योगदान लाभले.

मिरा-भाईंदरचा कुस्तीपटू सूरज माने यांना राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक

मिरा-भाईंदरचा कुस्तीपटू सूरज माने यांना राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक मिरा – भाईंदर मिरा -भाईंदरचा प्रतिभावान कुस्तीगर सूरज माने याने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झालेल्या २० वर्षांखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्राभरातील २० कुस्तगरांशी स्पर्धा करताना, मानेने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या श्री गणेश आखाड्याचे प्रतिनिधित्व करत आणि क्रांतीवीर जी.डी. बापू लाड मिशन ऑलिम्पिक कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या मानेने छत्रपती संभाजीनगरच्या रुपेश धनवतवर १२-२ अशा एकतर्फी विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर त्याने सोलापूरच्या विवेक भालेकरवर १२-१ असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत सोहेल शेखला ११-४ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत, मानेने धाराशिवच्या हृषिकेश भोसलेवर ८-६ असा विजय मिळवला. अंतिम फेरीत मानेचा सामना नाशिकच्या ऋत्विक सामोरेसोबत झाला. सामन्याच्या बहुतेक वेळेस आघाडीवर असूनही, मानेने शेवटच्या क्षणी काही महत्त्वाचे गुण गमावले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मानेचे हे पहिले राज्यस्तरीय पदक आहे. श्री गणेश आखाड्याचे मुख्य प्रशिक्षक वसंत पाटील यांनी त्याच्या भविष्यातील यशाबद्दल विश्वास व्यक्त केला. अभिनव कॉलेजमध्ये कला शाखेच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मानेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन

‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’त शौर्याला नतमस्तक अभिवादन पराक्रम दिनाला प्रचंड प्रतिसाद मुंबई, दि. (प्रतिनिधी) “स्वातंत्र्य मागून मिळत नाही… ते हिसकावून घ्यावे लागते!” या तेजस्वी विचारांचे मूर्त रूप असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पराक्रम दिनी, भारतीय शौर्य, त्याग आणि बलिदानाचा जिवंत इतिहास अनुभवायला मिळाला तो ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ या भव्य, भावनांनी ओथंबलेल्या कार्यक्रमातून. प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन व नृतनाट्य प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात साकारलेला हा ध्वजांकित उपक्रम म्हणजे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता तर तो होता सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाच्या श्वासाचा, त्यागाच्या प्रत्येक थेंबाचा आणि मातृभूमीसाठी धडधडणाऱ्या प्रत्येक हृदयाचा जयघोष! या राष्ट्रभक्तीने भारलेल्या संध्याकाळी शौर्यचक्र विजेते सेवानिवृत्त हवालदार मधुसूदन सुर्वे (२१ पॅरा एस.एफ.) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रणांगणावर प्राणांची पर्वा न करता देशासाठी उभे राहणाऱ्या या वीराच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृह भारावून गेले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या ‘ऑक्सिजन लेडी’ सुमेधा ताई चिथडे यांच्या कार्यकथनाने प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सियाचेनसारख्या दुर्गम प्रदेशात सैनिकांसाठी उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांमागची त्यांची निःस्वार्थ भावना म्हणजे आधुनिक भारतातील देशसेवेचा तेजस्वी अध्याय ठरला.यावेळी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी ओंकार मुळ्ये, भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर नारायण वाडकर, तसेच राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त उपनिरीक्षक  मंगेश नाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवाची झळाळी दिली. या सन्मानसोहळ्याला सांस्कृतिक अभिव्यक्तीची भावस्पर्शी जोड देताना युवकांनी सादर केलेल्या पारंपारिक नृत्य-संगीत सादरीकरणांनी भारताचा आत्मा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा केला. प्रत्येक ताल, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भावात “जय हिंद” गुंजत होते. याच मंचावर ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे दिग्दर्शक  विजय कलमकर तसेच ज्येष्ठ मॅरेथॉन धावपटू व सुवर्णपदक विजेते  महादेव समजीस्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या गौरवशाली पराक्रम दिन सोहळ्याला पितांबरी प्रॉडक्ट्स व इंडियन ऑइल यांचे मोलाचे प्रायोजन लाभले, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., सुनील दळवी एमएफ इन्व्हेस्टमेंट्स, जाधव फूड्स, अद्वैता वास्तु, बीऑ.न स्टोअर, रुचिसूत्र यांनी सहप्रायोजक म्हणून भक्कम साथ दिली.  ‘भारतोत्सव – द सोल ऑफ इंडिया’ हा कार्यक्रम म्हणजे एक संकल्प — देशासाठी जगण्याचा, एक श्रद्धांजली बलिदानाला आणि एक जागरण, प्रत्येक भारतीयाच्या मनातील पराक्रमाला!

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात

जखमी कासवावर उपचार करून सोडले समुद्रात धवल लक्ष्मी हे स्थानिक नावही दिले कासवाने केला १८४७ किलोमीटरचा प्रवास योगेश चांदेकर पालघरः अरबी समुद्रालगत डहाणू येथे वन विभागांतर्गत सागरी कासव संक्रमण उपचार केंद्र आहे. या केंद्रात समुद्रात जखमी झालेल्या कासवांवर उपचार केले जातात. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण मध्य समुद्रात वावरणारे कासव डहाणूनजीक आढळले. हे कासव जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याला फिजिओथेरपी देण्यात आली. समुद्रात ते पोहण्यास सक्षम आहे, की नाही याचा विचार करून नंतर ते समुद्रात सोडण्यात आले. धवल लक्ष्मी हे कासव दक्षिण मध्य समुद्रात पोहोचले आहे. डहाणू येथील सागरी कासव संक्रमण केंद्र कासवांवरील उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी ओलिव्ह रीडले, ग्रीन सी, लॉगर हेड, हॉक्सबीन यासारख्या कासवाच्या प्रजाती आढळतात. असंख्य समुद्र कासवांना जीवदान देण्याचे कार्य डहाणूच्या समुद्रालगत असलेल्या कासव संक्रमण उपचार केंद्रात केले जातात. फिजिओथेरपीने उपचार दहा ऑगस्ट रोजी ओलिव्ह रीले जातीचे कासव जखमी अवस्थेत आढळले होते. अशक्त व जखमी अवस्थेत कासव पाहिल्यानंतर तेथील मच्छीमारांनी वनविभागाला कळवले. वनविभागाच्या ‘रेस्क्यू टीम’ने या जखमी कासवाला सागरी कासव उपचार केंद्रात दाखल केले. कासवावर फिजिओथेरपी तसेच अन्य औषधोपचार करण्यात आले. स्टमक ट्यूबच्या मदतीने त्याला खाद्य देण्यात आले. जखमांवर योग्य ते उपचार आणि योग्य काळजी घेतली गेली. २९.६ किलो वजनाचे हे कासव महाराष्ट्रात प्रथमच आढळले. ते पोहण्यास सक्षम झाल्यानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. अशा प्रकारचा हा प्रयोगही महाराष्ट्रात पहिलाच होता. सॅटेलाईट टॅगच्या मदतीने लक्ष या कासवाचा समुद्रातील प्रवास कसा असेल, यावर देखरेख ठेवण्यासाठी संशोधकांनी भारतीय वन्य जीवन संस्थेच्या मदतीने सॅटेलाईट टॅग बसवला. मादी जातीच्या या कासवाचे नाव धवललक्ष्मी असे ठेवण्यात आले. धवल कंसारा यांचे  ४ फेब्रुवारी २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांची आठवण म्हणून तसेच डहाणूला असलेल्या महालक्ष्मी देवीमुळे या कासवाचे नाव धवल लक्ष्मी असे ठेवण्यात आले. वीस नोव्हेंबरला हे कासव समुद्रात सोडण्यात आले. धवल कंसारा यांनीच ‘ॲनिमल सेविंग ग्रुप’ स्थापन केला होता. त्यामुळे त्याचेच नाव या कासवाला देण्यात आले. आता ते समुद्रात सोडण्यात आले असून, त्याची अचूक दिशा सॅटेलाईटमधून कळते. सध्या ते डहाणूपासून १८४७ किलोमीटर अंतरावर दक्षिण मध्य समुदात आहे. कासवावर बसवलेले सॅटेलाईटची कालावधी एक वर्ष इतके आहे. त्यातील यंत्रणा ही कासव पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर पडल्यास कासवाची अचूक दिशा दाखवते. मासेमारांच्या जाळ्यात अडकून जखमी डॉ. दिनेश व्हिनेरकर व डॉ.जानवी जाधव, टीटीसीमधील प्राणी रक्षक रेमंड डिसोझा व प्रतिक वाहुरवाघ आणि ‘वाईल्ड लाईफ कन्झरवेशन’ आणि ॲनिमल वेलफिअर असोसिएशन’ चे सर्व सदस्य एरिक ताडवाला, पूर्वेश तांडेल, मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी व संपूर्ण वन अधिकाऱ्यांनी या कासवावर उपचार करून लक्ष ठेवले. सागरी कासव हे मुळात समुद्रात असलेल्या गाळ स्वच्छ करण्याचे काम करतात. अनेकदा ते मच्छीमारांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात पडतात. अशावेळी त्यांची सुटका जाळ्यातून होत नाही. त्यांना अंतर्बाह्य जखमा होऊ शकतात. बरेच मच्छीमार ही वेगवेगळी जाळी वापरत असतात. त्याला घोस्ट नेटजाळी’ म्हणतात. श्वास घेता न आल्याने त्याला जखमा होतात. त्याला ‘ल्फोटिंग सिंड्रोम’ असे म्हणतात. त्याच्या पोटात बऱ्याचदा प्लास्टिक दिसते. धवल प्राणीप्रेमी धवल लक्ष्मी नावामागे एक खूप मोठे कारण आहे, ज्या सागरी बचावासाठी व सागरी कासव केंद्र उभारणी करण्यामागे त्याने पहिले पाऊल उचलले. वन्यजीव रक्षक धवल कंसारा म्हणून नामांकित असा एक वन्यजीव प्रेमी होता. तो आज जगात नाही. त्यांच्या आठवणी टिकून राहाव्यात, म्हणून धवल असे व लक्ष्मी म्हणजे डहाणूमध्ये सुप्रसिद्ध असलेली महालक्ष्मी मंदिर आहे. त्याला अनुसरून धवल लक्ष्मी असे नाव त्या कासवाला देण्यात आले.