Category: होम

 राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व गुंड प्रशांत देशमुख यांना अटक करा !

शिवाजीराव जोंधळे हत्येप्रकरणी समर्थ समाज ट्रस्टचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांची मागणी अनिल ठाणेकर     ठाणे : शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, नामचीन गुंड प्रशांत देशमुख, तसेच गीता खरे, वर्षा देशमुख, प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, स्नेहा खरे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी जाहीर मागणी शिवाजीराव जोंधळे यांचे ज्येष्ठ सुपुत्र व समर्थ समाज ट्रस्टचे अध्यक्ष सागर जोंधळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी त्यांच्या आई व ट्रस्टच्या उपाध्यक्षा वैशालीताई शिवाजीराव जोंधळे, भाऊ व ट्रस्टचे सेक्रेटरी देवेंद्र शिवाजीराव जोंधळे, बहिणी श्वेतांबरी शिवाजीराव जोंधळे, वैष्णवी गायकवाड, भाऊ किशोर जोंधळे आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते. शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना यकृताचा कर्करोग झाला होता. या आजारपणचा गैरफायदा घेऊन त्यांची संपत्ती, मिळकत, जमीन,  व्यापारी गाळे, सोने, रोकड अशी कोट्यावधीची प्राॅपर्टी शिवाजीराव यांच्याशी विवाहबाह्य संबंध असलेल्या गीता खरे व त्यांच्या परिवाराने  हडप केली तसेच शिवाजीरावांवर उपचारात अक्षम्य हलगर्जीपणा करुन त्यांची नियोजनबद्ध हत्या घडवून आणली. याबाबत विष्णुनगर पोलीसांत तक्रार करुनही त्यांनी गीता खरे व त्यांच्या परिवारावर कोणतीही कारवाई न केल्याने अखेर कल्याण प्रथम वर्ग न्यांयालयाने याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने, याप्रकणी गीता खरे,वर्षा देशमुख, प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, स्नेहा खरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गीता खरे व त्यांच्या कुटुंबियांना शिवाजीराव जोंधळे यांच्या हत्येप्रकरणी सक्रिय सहकार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व नामचीन गुंड प्रशांत देशमुख यांच्यावरही शिवाजीराव जोंधळे हत्याप्रकरणात गुन्याची नोंद करुन त्यांनाही अटक करावी अशी जाहीर मागणी समर्थ समाज ट्रस्टचे अध्यक्ष सागर जोंधळे यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘शिवाजीराव जोंधळे यांचे गेले ३० वर्षाचे आमचे मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रीतम देशमुख हा माझा नातेवाईक असल्याने तेवढाच माझा संबंध आहे.पण सागर जोंधळे यांना मी ओळखत नाही, ते काळा की गोरा मला माहित नाही. त्यामुळे सागर जोंधळे यांनी दावा केलेल्या प्रकरणाशी माझा काहीही  आणि कोणताही संबंध नाही.याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याने पोलीस योग्य तो तपास करतीलच.’

५८ वी सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

मुंबई संघाला विजेतेपद मुंबई : सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे सुरु असलेल्या ५८ व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या संघाने महिला सांघिक गटाचे विजेतेपद पटकाविले. साखळी गटात मुंबईने आपले सर्व सामने जिंकून ८ गुणांची कमाई करत या गटाचे विजेतेपद पटकाविले. तर ठाण्याचा संघ व पुण्याच्या संघात प्रत्येकी ४ गुण झाल्याने बरोबरी झाली. परंतु गुणकोष्टकाच्या आधारे ठाण्याच्या संघाला उपविजेतेपद तर पुण्याच्या संघ तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे घोषित करण्यात आले. मुंबई संघातर्फे काजल कुमारी व अंबिका हरिथ हिने एकेरीचे सामने जिंकले. तर ऐशा साजिद खान व मिताली पाठक जोडीने आपले दुहेरीचे सामने जिंकले. पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल अनिल मुंढे ( पुणे ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१९, २३-१० फहीम काझी ( मुंबई ) वि वि योगेश परदेशी ( पुणे ) १९-२१, २५-१४, २५-१० रिझवान शेख ( मुंबई उपनगर ) वि वि झैद फारुकी ( ठाणे ) २५-०, २५-१० योगेश धोंगडे ( मुंबई ) वि वि विकास धारिया ( मुंबई ) २५-१०, १४-१० महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल काजल कुमारी ( मुंबई ) वि वि अंजली सिरीपुरम ( मुंबई ) २२-२१, २४-१८ दीक्षा चव्हाण ( सिंधुदुर्ग ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुबई उपनगर ) २५-४, १२-११ मधुरा देवळे ( ठाणे ) वि वि पुष्कर्णी भट्टड ( ठाणे ) २४-१०, २२-८ समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) ११-२०, २३-१०, २०-९ ०००००

 मंडप परवानगीसाठी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित

 इकोफ्रेंडली ‘प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन नवी मुंबई : यावर्षी 7 ते 17 सप्टेंबर या कालावधीत श्रीगणेशोत्सव – 2024 आणि 03 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सवामध्ये अवलंबावयाच्या प्रक्रियेबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 14 ऑगस्टला विशेष बैठक संपन्न झाली असून या बैठकीत देण्यात आलेले निर्देश तसेच शासनाकडून मागील वर्षी पर्यावरणपूरक सण साजरा करणेच्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार – 1.  सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. 2.  मा. न्यायालयाने निर्गमीत केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबधीत स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. 3.  सर्व गणेशभक्त, गणेशोत्सव मंडळे आणि नागरिक / भक्तजनांना विनम्र आवाहन करण्यात येते की, शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरिस (पी ओ पी) पासून घडविलेल्या श्री गणेशमूर्तीं / दुर्गामातेची विक्री अथवा खरेदी करु नये. 4.  प्लास्टर ऑफ पॅरिस (पी ओ पी) मूर्तींऐवजी शाडू मातीपासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. 5.  पारंपारिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. 6.  सार्वजनिक उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. 7.  सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे (उदा. रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व वस्तू यांचा वापर टाळण्यात यावा. 8.  वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. 9.  आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच कोर्टाच्या निर्णयानुसार ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. 10.  श्रीगणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादींद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. 11.  श्रीगणेश मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन इच्छिणा-या भाविकांसाठी स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. 12.  विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले (बालके) आणि वरिष्ठ नागरिकांनी, गर्भवती महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. 13.  विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने शक्य झाल्यास श्रीगणेशमुर्तींच्या विसर्जनाकरिता त्याच परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच महानगरपालिकेमार्फत निर्मित कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात यावे. 14.  महाराष्ट्र शासन तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या तसेच वेळोवेळी दिलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु  होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही महाराष्ट्र शासनाच्या मागदर्शक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील  अनुपालन करावे. 15.  गणेशोत्सव व   नवरात्रौत्सवाच्या   अनुषंगाने   अवलंबविण्याच्या   परवानगी   प्रक्रियेबाबत   विभाग स्तरावर सर्व विभाग कार्यालयांमध्ये बैठक आयोजित करण्यात येणार असून, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर बैठकीस उपस्थित रहावे व नियमानुसार उत्सव साजरे करावेत. 16.  नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173/2010 संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडप उभारणेची परवानगी देण्याची “इ-सेवा संगणक प्रणाली” महापालिकेने विकसीत केली आहे. सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव मंडळे व नागरिक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या https:// app.nmmconline.in या संकेतस्थळावर (Website) गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणेकरिता परवानगी अर्ज करण्याची मुदत दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून कार्यालयीन वेळेमध्ये ऑनलाईन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. मंडप उभारणीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कोणतेही शुल्क अथवा अनामत रक्कम आकारण्यात येणार नाही.  तसेच नवरात्रौत्सवासाठी सुध्दा याच वेबसाईटवरवर मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. दोन्ही उत्सवासाठी उत्सव सुरु होण्यापूर्वी दहा दिवस अगोदर ऑनलाईन प्रणालीव्दारे परवानगी देणे आवश्यक आहे असे सूचित करण्यात येत आहे. 17.  गणेशोत्सव व नवरात्रौत्सव याकरिता सर्व संबधीत विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करु नये, तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरु नये. महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर निष्कासनाची तसेच कायदेशीर कार्यवाही केली जाईल. सर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ / नागरिकांनी याची दक्षता घ्यावी असेही सूचित करण्यात येत आहे.…

‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ अभियानात केंद्रस्तरावर माथेरानच्या प्राथमिक शाळेने मारली बाजी

माथेरान : सन 2023 /24 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा” हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता १/१/२४ ते १५/२/२०२४ या कालावधीत राबविण्यात आले या अभियानास  विद्यार्थी, शिक्षकांबरोबर  माजी विद्यार्थी पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास 95 टक्के विद्यार्थी शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद देखील करण्यात आली आहे. या अभियानात तालुका जिल्हा व राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आली आहेत या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. माथेरान सारख्या दुर्गम भागातील वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळेने या स्पर्धेत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. मराठी माध्यमाच्या या नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक वर्ग अत्यंत आत्मीयतेने विद्यार्थ्यांना घडविण्याचे प्रांजळपणे प्रयत्न करत असून शिक्षक वृंद पदवीधर असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमा बरोबरच उत्तम नागरिक होण्याचे संस्कार देखील केले जात आहेत. या शाळेत सर्वसामान्य लोकांची मुले शिक्षण घेत असून याच शाळेच्या जडणघडणी मधून अनेक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात जाण्यासाठी सोपस्कार झाले आहे. परंतु सद्यस्थितीत सुशिक्षित असो किंवा अशिक्षित पालक वर्ग यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना पाठवण्यात अधिक रस दिसत आहे. आर्थिक परिस्थिती जरी बेताची असली तरीसुद्धा इंग्रजीचे खूळ डोक्यात भिनल्याने मराठी शाळेची पटसंख्या दरवर्षी कमी होत चालली आहे. निदान मुलांवर उत्तम संस्कार घडावेत यासाठी पालकांनी मराठी शाळेला प्रथमतः प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे अभ्यासू नागरिक बोलत आहेत. नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल या शाळेला केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्थानिकांनी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ——————————————————- मागील अनेक दिवसांपासून शिक्षक वर्गाने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे आणि त्यांचे सर्व सहकारी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असताना मुलांना पुस्तकी अभ्यासक्रमा बरोबर सामाजिक उपक्रमावर भर घालतात. त्या सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन. शिवाजी शिंदे– माजी विरोधी पक्षनेते माथेरान नगरपालिका ——————————————-;;——– मा. मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या अभियानात सहभाग घेतला. सर्व शिक्षक आणि पालक यांनी या करीता योगदान दिले. शाळा या पुढे गुणात्मक कामगिरी करून आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिलीप अहिरे— मुख्याध्यापक ०००००

१०० एकर वनजमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होणार – डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर   ठाणे : शहरात सुमारे १०० एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे.  शंभर एकरची वन जमीन अवघ्या ३१ कोटींमध्ये विकण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी, एका ट्रस्टचा ट्रस्टी आणि बिल्डर यांचा सहभाग आहे. या संदर्भात आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टमधील ट्विटमध्ये म्हटले आहे. यामुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ठाण्यात झालेल्या वनजमिनीचा घोटाळा उघडकीस आणण्याचे सूचक विधान केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ठाण्यामध्ये येत्या काही दिवसांतच एक मोठा स्कॅम उघडकीस येणार आहे.महाराष्ट्र राखीव वने असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीने विकण्याचे कारस्थान केले आहे आणि त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेले आहेत. ३१ कोटी रूपयांमध्ये ही जमीन विकण्यात आलेली आहे. पण, राखीव वने विकण्याचा अधिकार कोणाला आहे? त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे? अन् यामध्ये ट्रस्टी, परवानगी देणारे, विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह कायदेशीररित्या उघड केला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात येईल. जवळपास १०० एकर पेक्षा अधिक ही जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्रॉड पोलिसांनी पकडलेले आहेत. ही जमीन कोणाची असेल, हे त्या बिल्डरला हे ट्वीट वाचल्या-वाचल्या लगेच समजेल !” जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी या घोटाळ्यात कोण सहभागी असावे, कोणता ट्रस्ट याची चर्चा रंगली आहे. 000000

सुदर्शन दीपक चव्हाण याचा विशेष सन्मान

ठाणे,  येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण यांचे सुपुत्र व सुलोचना देवी सिंघानिया स्कूलचा विद्यार्थी सुदर्शन दिपक चव्हाण हा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत राज्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.…

२०४७ पर्यंत विकसित भारत देशाची ओळख होईल.- राज्यपाल राधाकृष्णन

अशोक गायकवाड रायगड : भारतामध्ये सेवा क्षेत्रातील नेतृत्वासोबतच जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत ही आपली ओळख असणार आहे. या काळात तरुणांना मोठया प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे. प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित करावे. कठोर आणि प्रामाणिक मेहनत आणि सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.* डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे च्या २६ व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपमुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाट, विद्यापीठ कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.नरेंद जाधव आदी उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, नव्या पिढीने तंत्रज्ञान, संशोधन, विचार आणि अर्थ अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल. भारताची झपाट्याने होणारी वाढ, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आणि जागतिक स्तरावर वाढते महत्त्व यामुळे आजच्या पदवीधरांसाठी अकल्पनीय संधी निर्माण झाल्या आहेत.आपण आपले ध्येय निश्चित करून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी-केंद्रित धोरण तयार केले आहे. याचा फायदा निश्चित होणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होईल.. तसेच हे नवीन विचार आणि नवीन उर्जा निर्माण करेल आणि बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करेल आणि उद्योजक पर्यावरण प्रणाली तयार करण्यासाठी सहाय्यक होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपल्या भारताची संस्कृती जिवंत राहिली व तिचे जतन झाले आहे त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशवासीयांना संविधान मिळाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून देशाचे नाव मोठे करणे व अर्थव्यवस्था सुदृढ करण्याबाबत आवाहन केले. पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, एखा‌द्याचा ‘जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासासाठी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा आणि ज्ञानाच वापरआपल्या दैनंदिन आयुष्यात करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे राजदूत या नात्याने संपूर्ण राष्ट्रासाठी भरीव योगदान द्यावे असे सांगितले. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आपल्याला देशाला बलशाली बनवायचे आहे. यासाठी प्रत्येक युवकांने आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा. आपले सामाजिक भान आणि दायित्व कायम लक्षात ठेवावे असे सांगितले. विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून सेवा सुविधा देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले. राज्यपाल महोदय व मंत्री महोदयांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठातील सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

कान्होजी आंग्रे यांच्या जयंतीनिमित्त श्रीनिवास मुडगेरिकर यांनी केले अभिवादन

अशोक गायकवाड अलिबाग :१८ ऑगस्टला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आरसीएफच्या कुरुळ वसाहतीच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या सरखेलांच्या पुतळ्यास आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरिकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आरसीएफच्या वित्त संचालक श्रीमती नझहत शेख, कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर, मुख्य महा व्यवस्थापक नितीन हिरडे, महा व्यवस्थापक सर्वश्री संजीव हरळीकर, सुधीर कोळी, अभय काळबांडे, व्ही. मगेश, सिआयएसएफचे डेप्युटी कमांडंट संदीप चक्रवर्ती, उप महा व्यवस्थापक विनायक पाटील, अधिकारी- कर्मचारी संघटना प्रतिनिधींनी सरखेलांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. यावेळी शिवप्रेमी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

कातकरी समाजाच्या कुटुंबाना हक्काची मिळणार घरे

पालकमंत्र्यांनी स्वतःची जमीन देऊन सोडविला प्रश्न राज भंडारी   पनवेल :जिल्ह्यातील कातकरी समाजाचा ७० भटक्या कुटुंबाच्या घरांसाठी जागेची समस्या होती. वर्षानुवर्षे त्यांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित होता. सरकारकडे या समाजातील कुटुंबाना देण्यासाठी जमीन उपलब्ध नव्हती. जेव्हा ही समस्या सिंधुदुर्गनगरी येथील जनता दरबारात मांडण्यात आली त्यावेळी ही समस्या ताबडतोब सोडविण्यात आली. यासाठी आपण स्वतःची ओसरगांव येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आणि जागा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे या कातकारी बांधवांना लवकरच हक्काची घरे उपलब्ध होतील, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. जनता दरबारात ८२ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७४ अर्जाचे निरसन झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःची जमीन देण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे या सर्व कुटुंबांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार मानले आणि असा नेता किंवा मंत्री आम्ही कधीच पाहिला नाही. वर्षानुवर्षे आम्ही भटकत होतो पण आता आम्हाला हक्काचा निवारा मिळाला आणि आता आमच्या सर्व पिढ्या हक्काच्या घरात राहतील त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे , अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला. या कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. या प्रसंगी रवींद्र चव्हाण यांच्या सोबत भाजप आमदर नीतेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ. अजित गोगट आदींसह खाते प्रमुख तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. जनता दरबार हा प्रसिद्धीसाठी नाही. या पूर्वी सुद्धा जिल्ह्यात असे जनता दरबार होत होते. आज झालेल्या जनता दरबारात ८२ अर्ज दाखल झाले होते. पैकी ७४ अर्जाचे निरसन झाले आहे. सर्वसामान्यांचे तक्रारीचे निरसन होणे हेच खरे या जनता दरबाराचे यश आहे, असे प्रत्युत्तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदर वैभव नाईक यांच्या टीकेला दिले. आमदर नाईक यांनी पालकमंत्र्याचा जनता दरबार हा निवडणुकांसाठी फार्स असल्याची टीका केली होती. सार्वजनिक बांधकाम हायवे आणि पाटबंधारे विभागातील सर्व ९ अर्जाचे निरसन केले असून पोलीस प्रशासनाचे दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ग्रामविकास विभागाअंतर्गत सर्व १६ अर्जाची पूर्तता झाली असून कृषी व आरोग्य विभाग ५, मध्यम पाटबंधारे आणि नियोजन विभाग ३, समाज कल्याण विभाग २, नगर विकास खारभूमी विभाग ६ असे विभागनिहाय अर्ज निकाली काढल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले. उर्वरित अर्जावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ हजार ८५९ युवक – युवतींना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत १ हजार उमेदवारांना विविध विभागात रोजगार देण्यात आला आहे. उर्वरीत उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाकडील रोजगार विषयक उपक्रमांची माहिती द्यावी, असे निर्देश ना. चव्हाण यांनी दिले. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गाव पातळीवर घराघरात पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत जिल्हयात आतापर्यंत १ लाख ५० हजार ३८३ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील १ लाख ४४ हजार ८७४ अर्ज पात्र ठरले आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार सोमवारी कणकवली मतदारसंघातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील नागरिकांसाठी सिंधुदुर्गनगरी येथे जनता दरबार झाला. तसेच मंगळवारी कुडाळ – मालवण मतदारसंघातील नागरिकांसाठी आणि बुधवारी सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांसाठी याच ठिकाणी जनता दरबार संपन्न झाला. या सर्व जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला.

 मुंबईत ‘रेलनीर’चा पुरवठा बंद

अंबरनाथच्या ग्रामस्थांचे आयआरसीटीसी, ठेकेदाराविरोधात आंदोलन मुंबई : अंबरनाथ येथे आयआरसीटीसीद्वारे ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा मध्य आणि पश्चिम रेल्वेवर केला जातो. मात्र, अंबरनाथ येथील काकोळे ग्रामस्थांकडून आयआरसीटीसी आणि परप्रांतीय ठेकेदाराविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे रेलनीर बाटलीबंद पाण्याची पुरवठा व्यवस्था खंडित झाली आहे. आयआरसीटीसीने मुंबईतील रेल्वे स्थानकांतील रेलनीरचा पुरवठा पुढील सूचनेपर्यंत बंद केला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)द्वारे ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकात आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये केला जातो.अंबरनाथ येथील ‘रेलनीर’च्या कारखान्यातून बाटलीबंद पाणी पोहोचवण्याचे काम मालवाहतुकीद्वारे काकोळे ग्रामस्थ करत होते. मात्र, मेपासून वाहतूक ठेकेदार मनोज खाद्यायान भांडार मुझ्झफरपूर याने मालवाहतुकीचा कारभार हाती घेतला. त्यामुळे १२ मालवाहतूकदार ग्रामस्थांची सेवा बंद झाली. तर, वाहतूक ठेकेदार भांडार यांनी ही सेवा मिलेनियम ग्रुप ऑफ कंपनीकडे दिली. परिणामी, काकोळे ग्रामस्थ आर्थिक कोंडीत सापडले आहेत. याबाबत आयआरसीटीसी, रेलनीर, वाहतूक ठेकेदार यांच्या विरोधात ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा/कर्जत, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकात, हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, वापी आणि वलसाड स्थानकात ‘रेलनीर’चा बाटलीबंद पाण्याचा पुरवठा बंद राहणार आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांनी पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर रेल्वेने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्यांच्या बाटल्यांची विक्री केली जाईल. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नवीन वाहतूक ठेकेदार नेमला. मात्र, मालवाहतुकीचे काम पुन्हा काकोळे ग्रामस्थांना मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि नवीन वाहतूक ठेकेदार यांच्या बाजू ऐकून मध्यम मार्ग काढला जाईल. मालवाहतूक खंडित झाल्याने पुढील दोन दिवस मुंबईतील रेल्वे स्थानकात ह्यह्णरेलनीरह्णह्ण बाटलीबंद पाण्याचा पुरवठा बंद राहील, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले. मेपासून काकोळे गावातील १२ मालवाहतूकदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांची सेवा खंडित केली. त्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. – नरेश गायकर, उपसरपंच, काकोळे गाव, अंबरनाथ 00000