Category: होम

ऑलिवंट, ऑर्थर, एस पुलांच्या पुनर्बांधणीची गरज नाही

रेल्वे प्रशासनाचे मुंबई महानगरपालिकेला पत्र मुंबई : माझगाव येथील ऑलिवंट पूल, आर्थर पूल, भायखळा येथील एस पूल या तीन पुलांच्या पुनर्बांधणीची सध्या गरज नसल्याचे रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेला कळवले आहे. रेल्वेमार्फत १० ते १५ वर्षांनंतर या पुलांच्या पुनर्बांधणीबाबतचे पुनरावलोकन करण्यात येईल. त्यामुळे तूर्तास या पुलांचे कोणतेही काम हाती घेण्यात येणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई शहर भागातील पुलांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमधील (महारेल) अधिकाऱ्यांची बुधवार, १५ मे रोजी संयुक्त बैठक पार पडली. मुंबई शहरात सुरू असलेली पुलांची कामे वेगाने, तसेच नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या बैठकीत दिले. मुंबई महानगरपालिका आणि महारेल यांच्यात रेल्वेवरील पूल बांधणी कामात समन्वय असावा, जेणेकरून नागरिकांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल. तसेच पुलांच्या पुनर्बांधणी कामांदरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावू नयेत, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई शहर भागातील जीर्ण पुलांची दुरूस्ती आणि वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिका आणि महारेलने संयुक्तपणे रेल्वेवरील पुलांची कामे हाती घेतली आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर, उप प्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (व्यवसाय विकास आणि वित्त) सुभाष कवडे, महारेलचे व्यवस्थापक (नियोजन) जितेंद्र कुमार, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक असीतकुमार राऊत, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक श्रीरामगिरी श्रीकांत आदी उपस्थित होते. मुंबईत रेल्वे मार्गांवर असलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचा खर्च महानगरपालिकेमार्फत करण्यात येतो. प्रत्यक्ष पूल उभारणी प्रकल्पाची कामे ही महारेलमार्फत करण्यात येत आहेत. मुंबई शहर भागातील रे रोड, भायखळा, टिळक पूल (दादर) आणि घाटकोपर येथील पुलांच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तीन पुलांच्या पुनर्बांधणी प्रस्तावाला मंजुरी मुंबई शहरातील करी रोड पूल, माटुंगा (रेल्वे खालील पूल), महालक्ष्मी पूल आदी पुलांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजुरी देण्यात आली. या पुलांच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू आहे. या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे. तीन पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय पुनरावलोकनानंतरच ऑलिवंट, ऑर्थर आणि एस (भायखळा) या तीन पुलांचा सद्यस्थितीबाबत रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला आहे. मध्य रेल्वेने २४ एप्रिल २०२४ रोजी महापालिकेला पत्र पाठविले आहे. हे पूल सुस्थितीत असून सद्यस्थितीत या पुलांची पुनर्बांधणीची आवश्यकता नाही असे या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. मुंबई शहरातील चार पुलांच्या कामाची सद्यस्थिती रे रोड पूल – ७७ टक्के काम पूर्ण. हा पूल वाहतुकीसाठी नोव्हेंबर २०२४ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. भायखळा पूल – ४२ टक्के काम पूर्ण. हा पूल वाहतुकीसाठी ऑक्टोबर २०२५ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. टिळक पूल – ८ टक्के काम पूर्ण. घाटकोपर पूल – १४ टक्के काम पूर्ण.

मुरबाड भागात बस न पाठविल्याने कथोरे समर्थक नाराज

मोदींच्या कल्याणमधील सभेसाठी कल्याण : भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपील पाटील आणि मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे हातात हात घालून एकत्रित प्रचार करत असताना पाटील समर्थक काही पदाधिकारी कथोरे समर्थकांना लोकसभा निवडणूक वातावरणातही दुजाभावाची वागणूक देत असल्याने कथोरे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी कल्याणमध्ये प्रचार सभा होती. या सभेसाठी मुरबाड भागातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांनी अधिक संख्येने यावे म्हणून या भागाचे आमदार किसन कथोरे यांनी जय्यत तयारी केली होती. या तयारीप्रमाणे कपील पाटील यांच्याकडून मुरबाड भागात या कार्यकर्त्यांना कल्याण मधील सभा ठिकाणापर्यंत आणण्यासाठी बसची व्यवस्था केली जाईल, असे आमदार कथोरे समर्थकांना वाटले होते. परंतु, ठरल्याप्रमाणे मुरबाडमधील काही भागात भाजप कार्यकर्त्यांना आणण्यासाठी पाटील समर्थकांकडून बस पाठविण्यात आल्या नाहीत, त्यामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे समजते. सकाळी ११ वाजल्यापासून मुरबाड मधील अनेक नागरिक, भाजप कार्यकर्ते आपल्या गावच्या नाक्यावर उमेदवार कपील पाटील यांच्याकडून पाठविण्यात येणाऱ्या बसची वाट पाहत बसले होते. शेवटपर्यंत बस न आल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. मोदी यांच्या सभेसाठी विशेष निमंत्रितांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष अति महत्वाच्या व्यक्तिंसाठी तयार करण्यात आलेल्या प्रवेश पासवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, श्रमजिवी संघटनेचे विवेक पंडित, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील असे एकूण २८ जणांच्या प्रतिमा आहेत. या मध्ये मुरबाड मतदारसंघाचे आमदार असुनही आणि या भागाचे तारांकित प्रचारक असुनही किसन कथोरे यांची या विशेष पासवर प्रतिमा नाही. त्यामुळेही कथोरे समर्थक नाराज झाले आहेत. कपील पाटील यांना कथोरे यांच्या प्रचार कामाविषयीची माहिती आहे, पण कपील पाटील यांचे उजवे, डावे समर्थक कथोरे यांना प्रत्येक गोष्टीत डावलून पाटील आणि कथोरे यांच्यात दुरावा निर्माण करत असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारे कटु वातावरण आवश्यक नसताना ते मुद्दाम निर्माण केले जात असल्याबद्दल भाजपच्या मुरबाड भागताली अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्य्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाटील समर्थकांनी मात्र मुरबाड भागात वेळेवर बस पाठविल्या होत्या, असे सांगितले. कथोरे गावागावात मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्याने त्यांच्या विजयासाठी कपील पाटील या्ंच्या विजयासाठी कथोरे यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव पिंजून काढला आहे. कोणत्याही परिस्थितीत पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यासाठी कथोरे प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. कोट “भिवंडी,कल्याणमधील महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपण कपील पाटील यांचा कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार करत आहोत. कोठेही नाराजी, कुरबुरीचे वातावरण नाही. कुठे असेल तर ते तात्काळ शमविले जाते. काल मोदींच्या सभेसाठी मुरबाड भागातून बहुतांशी कार्यकर्ते दाखल झाले होते.” किसन कथोरे, आमदार, मुरबाड विधानसभा.

मोदींच्या सभेमुळे प्लास्टिक कचरा वेचकांची चांदी

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण मधील सभेसाठी ठाणे, पालघर जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक आले होते. कडक उन्हामुळे सतत तहान लागत असल्याने प्रत्येक नागरिक, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या हातात पाण्याची बाटली होती. पण ही पाण्याची बाटली सुरक्षेच्या कारणास्तव सभा मंडपात नेण्यास नागरिकांना पोलिसांकडून मज्जाव केला जात होता. अशा सर्व बाटल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कोपऱ्यावर फेकून देण्यात येत होत्या. सभा संपल्यानंतर या पाण्याने भरलेल्या, रिकाम्या बाटल्यांचा खच वेचण्यासाठी कचरा वेचकांची झुंबड उडाली होती. शहरात फिरून दिवसभरात एक पोते प्लास्टिकच्या बाटल्यांनी भरत असताना मोदींच्या बुधवारच्या सभेने कचरा वेचकांना सभा स्थळी एकाच जागी तीन ते चार पोती (गोणी) प्लास्टिकच्या बाटल्या मिळाल्या. या बाटल्या गोणीत भरताना कचरा वेचक पती, पत्नी, त्यांची मुले आनंदित होती. मुख्य प्रवेशद्वारावर पडलेला पाण्याच्या बाटल्यांचा खच कसा काढायचा असा प्रश्न सुरक्षा व्यवस्थेवर होता. परंतु, त्यांचे हे काम कचरा वेचकांनी तात्काळ पार पडले. मोदींच्या सभेसाठी पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, भिवंडी, वाडा परिसर, ठाणे जिल्ह्यातून शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण भागातून नागरिक बस, टेम्पो, इतर खासगी वाहनांनी आले होते. कडक ऊन, अंगाच्या काहिलीने नागरिक सततच्या तहानेने व्याकुळ होत होते. शरीरात पाण्याची कमतरता नको म्हणून आयोजकांनी प्रत्येक नागरिक, कायकर्त्याच्या हातात एक पिण्याची प्लास्टिकची बाटली दिली होती. या बाटल्या हातात घेऊन नागरिक, कार्यकर्ते सभा स्थानी दाखल होत होते. अशा दाखल होणाऱ्या नागरिक, कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशव्दारावर सुरक्षेच्या कारणास्तव तपासून मग सभा मंडपात सोडले जात होते. यावेळी नागरिकांच्या हातामधील पाण्याची बाटली मुख्य प्रवेशव्दाराच्या कोपऱ्यावर सुरक्षा तपासणीच्या वेळी काढून टाकण्यास सांगण्यात येत होती. नागरिकांनी अशाप्रकारे शेकडो बाटल्या सभा प्रवेशद्वाराच्या कोपऱ्यावर फेकल्या होत्या. बाटल्या बाहेर टाकल्या शिवाय कोणालाही सभा मंडपात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे नागरिक हातामधील पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर फेकून मंडपात प्रवेश करत होते. सभा मंडपात जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. सभा संपल्यानंतर नागरिकांची पायावर पाय देत सभा मंडपाबाहेर पडण्याची घाई सुरू असताना, सभा मंडपाच्या मुख्य प्रवेशव्दारावर मात्र कचरा वेचकांची गोणी घेऊन प्लास्टिक बाटल्यांचा पडलेला खच वेचण्यासाठी झुंबड उडाली होती. निवडणूक आहे की नाही याचे भान आपल्या उपजीविकेच्या काळजीने नसलेल्या कचरा वेचकांना कल्याणमध्ये नरेंद्र मोदी कशासाठी आले होते, हे समजले नसले तरी मात्र एक दिवसात मोदींच्या सभेमुळे आपणास एकाच जागी तीन ते चार गोणी प्लास्टिकच्या बाटल्या मात्र मिळाल्या, याचा आनंद कचरा वेचक कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होता. लोकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे तेथे प्लास्टिकचे कप, बाटल्या मिळतील हे माहिती होते. त्यामुळे आम्ही मुख्य रस्त्यावर आम्हाला मुख्य प्रवेशद्वारापर्यंत बाटल्या वेचण्यासाठी कधी प्रवेश मिळतो याची वाट पाहत होतो. सभा संपल्यानंतर ती संधी मिळाली, असे कचरा वेचक दिव्या रमण्णा या महिलेने सांगितले.

भारतीय मसाल्यांची परदेशातील बदनामी थांबवा

राष्ट्रीय निर्यातदार संघटनांची मागणी रमेश औताडे मुंबई : ब्रँडेड मासाल्यामध्ये किटकनाशक अंश सापडल्याने सिंगापूर व हाँगकाँग या देशाने भारतातील एव्हरेस्ट व एम डी एच या मासाल्याबाबत नाराजी व्यक्त करत भारताला पत्रव्यवहार करत हे पदार्थ योग्य कसे ? असा सवाल केला आहे. यामुळे भारताची बदनामी झाली असल्याचा आरोप राष्ट्रीय स्तरावरील चार मसाला निर्यातदार संघटनांनी केला असून या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केली आहे. इथिलिन ऑक्साईड हे किटकनाशक मसाले नाशवंत होऊ नये म्हणून जगभर प्रमाणात वापरण्याची मान्यता आहे. मसाले निर्यात करणारा भारत हा सर्वात मोठा देश असून 14 लाख मेट्रिक टन मसाले भारत निर्यात करतो.4 बिलियन ची आर्थिक उलाढाल या व्यवसायात आहे. सर्व ग्राहकाला  शुद्ध माल देण्यासाठी भारताचे मान्यताप्राप्त प्राधिकरण कार्य करत असताना नाहक बदनामी करण्यासाठी हे एक षडयंत्र रचले जात आहे.असे निर्यातदार असोशीयशन चे अध्यक्ष हितेश गुतका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इथिलिन ऑक्साईड चेप्रमाण कमी जास्त होण्याची अनेक कारणे आहेत. गोदाम मधून हाताळणी होताना, जहाजात संपर्कात येणारी वेगवेगळी कंटेनर, कामगारांची हाताळणी, मेडिकल पदार्थ स्पर्श, त्या त्या देशातील हवामान, अशी अनेक कारणे असताना व भारतीय अन्न पदार्थ प्राधिकरणाने निर्यात होताना खात्री करून प्रमाणित केल्यानंतर संबंधित देशांनी त्यांच्या प्रगोगशाळेत केलेल्या चाचणीचा दाखला देत भारतातील पदार्थ खराब असल्याचा अंदाज देणे हे कितपत योग्य आहे असा सवाल निर्यातदार असोशीयशन चे अध्यक्ष हितेश गुतका यांनी यावेळी केला आहे.

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा!

कल्याण : कल्याणमधील अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. कल्याण येथे आयोजित मेळाव्यामध्ये हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. याबद्दल खासदार शिंदे यांनी क्षत्रिय समाजाचे आभार व्यक्त केले आहेत. कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरात उत्तर भारतीय क्षत्रिय समाज मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. या समाजासाठी कल्याणमध्ये हिंदी भाषी भवनाची निर्मिती केली जात असून त्याचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. या भावनात उत्तर भारताच्या संस्कृतीचे दर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील १० वर्षात आपणा सर्वांच्या पाठबळाने कल्याण लोकसभेत रस्ते, उड्डाणपूल, रेल्वेसंबंधी कामे, आरोग्य सेवांचे बळकटीकरण यासह अनेक विकासकामे केली असून आता तर कल्याण डोंबिवलीत मेट्रोचे काम देखील सुरू झाल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. भविष्यात कल्याण लोकसभेचा चेहरामोहरा बदलणार असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठबळाने कल्याण लोकसभेची ही विकासाची घोडदौड सुरू असून त्यामुळे येत्या २० मे रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले. याप्रसंगी भाजपाचे माजी नगरसेवक कमलेश राय, शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, युवासेनेचे विनीत पांडे, उपनेत्या विजया पोटे यांच्यासह संदीप सिंह, सुनील सिंह, पी.पी. सिंह, बी.पी. सिंग, राजेंद्र सिंह, कमलेश सिंह, राणाप्रताप सिंह, सुभाष सिंह, ए.जी. सिंह आणि उत्तर भारतीय क्षत्रिय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला स्वच्छताकर्मींनी केला मतदानाचा निर्धार

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूकीचे मतदान सोमवारी 20 मे रोजी असून त्यामध्ये प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावणेबाबत स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये विविध घटकांना सामावून घेतले जात असून जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला स्वच्छताकर्मींच्या आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी उपस्थित शंभरहून अधिक स्वच्छतासखींना अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी मतदानाचे महत्व सांगितले. तसेच प्रत्येक स्वच्छतासखींनी आपला मतदानाचा हक्क बजावावा तसेच कुटुंबियांनाही बजाविण्यास सांगावे असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी सर्व स्वच्छतासखींनी ज्या डाव्या हाताच्या बोटावर मतदान केल्याची खूण अर्थात शाई लावण्यात येणार आहे ती तर्जनी उंचावून मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला व आमच्यासारखाच सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे प्रतिकात्मक आवाहन केले.

कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून ७ लाखांची रोख रक्कम जप्त

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील १४२ कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) पथकाने काल रुपये ७ लाख इतकी संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांच्याकडे आढळलेल्या बेकायदेशीर वस्तू जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथे काल दि. १४ मे २०२४ रोजी एसएसटी पथकातील कर्मचारी प्रवासी पुलावरील टिकीट खिडकीजवळ प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत असताना जयेश पोटे (रा.पुना लिंक रोड कोळसेवाडी, कल्याण (पूर्व)) यांच्याकडे असलेल्या बॅगेबाबत विचारणा केली. त्यावेळी बॅगेमध्ये रोख रक्कम असल्याचे संबंधितानी सांगितले. परंतू, सदर रोख रक्कमेबाबत संबंधितांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदरची रक्कम रुपये ७ लाख पंचनामा करून जप्त करण्यात आली. जप्त केलेली रक्कम कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सीलबंद करून जमा करण्यात आले असल्याची माहिती 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे पथकप्रमुख दिपेश राठोड यांनी दिली आहे.

नमुंमपा अतिक्रमण विभागाने हटवले 15 अनधिकृत होर्डींग

यापुढेही सुरू राहणार अनधिकृत होर्डींगविरोधी धडक कारवाई नवी मुंबई : 13 मे रोजी सायं. 4 नंतर आकस्मिक वादळ व पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने तसेच या कालावधीत मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना लक्षात घेत राज्य शासनाच्या आदेशाच्या पार्शवभूमीवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 14 मे रोजी दूरदृश्य प्रणालीव्दारे तातडीने बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी नमुंमपा क्षेत्रात ठिकठिकाणच्या होर्डिंग स्वरुपातील जाहिरात फलकांचे संरचनात्मक परीक्षण (Structural Audit) करण्याच्या यापूर्वीच 30 एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी झाली असल्याची खातरजमा करुन घ्यावी आणि अनधिकृत होर्डींग हटविण्याची कार्यवाही सुरू करावी असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याचप्रमाणेसिडको, एमआयडीसी, रेल्वे, सायन पनवेल महामार्ग अशा ठिकाणी असलेल्या होर्डींगबाबतही संरचनात्मक परीक्षण करून घेणेबाबत सूचित केले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाने लगेचच तत्पर कार्यवाही सुरू करून परवाना विभागाकडून परवानाधारक होर्डींगची माहिती प्राप्त करून घेत अनधिकृत होर्डींग हटविण्याच्या कार्यवाहीला तत्परतेने सुरूवात केली. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच विभागांमध्ये तेथील विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांचे समक्ष तोडक कार्यवाहीस सुरूवात करण्यात आली. 15 एप्रिल रोजी सायं. 5 वाजल्यापासून 16 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत अनधिकृत होर्डींग विरोधातील धडक कारवाईत आकाराने मोठे होर्डींग स्वरूपातील 15 अनधिकृत जाहिरात फलक अविश्रांत काम करून हटविण्यात आले. यामध्ये बेलापूर स्टेशन लगत तसेच बेलापूर अग्निशमन केंद्राच्या बाजूला सार्वजनिक शौचालयाच्या जवळ पदपथावर असलेल्या अशा 2 ठिकाणच्या मोठ्या होर्डींग निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर 1 शिरवणे येथे प्लॉट क्र. 43 वर असलेले 3 मोठे अनधिकृत होर्डींगही हटविण्यात आले. वाशीगाव मधील कृष्णा रेस्टॉरंट जवळ विनापरवानगी उभारण्यात आलेले 2 मोठे होर्डींग तसेच तुर्भे विभागात सानपाडा स्टेशनच्या पूर्व भागात असलेल्या 4 अनधिकृत होर्डींगवर तोडक कारवाई करण्यात आली. घणसोली विभागात एमआयडीसी भागात गवळीदेव स्थळाच्या पुढे सेंट्रल रोडवर असलेली दिशादर्शक कमानीची लोखंडी फ्रेम होर्डींग काढण्यात आले. ऐरोली विभागात सेक्टर 3 बसडेपो मधील 1 अनधिकृत होर्डींग तसेच दिघा येथे हॉटेल मुंबई एक्सप्रेसच्या समोरील 2 मोठे अनधिकृत होर्डींग निष्कासित करण्यात आले. अशाप्रकारे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत काल संध्याकाळपासून पहाटे 5 वाजेपर्यंत अनधिकृत होर्डींग हटविण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आली असून आजही ठाणे बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात अनधिकृत मोठे होर्डींग हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढील काळात ही कारवाई अशीच तीव्रतेने सुरू राहणार असून नवी मुंबईत कोणतीही दुर्घटना घडू नये याकरिता महानगरपालिका दक्ष असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी स्पष्ट केले आहे.

वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन.

वर्षा गायकवाड लढवय्या नेत्या, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कट्टीबद्ध – रमेश चेन्नीथला उत्तर मध्य मुंबईसह मुंबईचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार – वर्षा गायकवाड मुंबई : निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय करणार यासाठीचे न्याय पत्र वर्षा गायकवाड यांनी सादर केले आहे. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनीही आयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी काम केले आहे. वर्षा गायकवाड वडिलांचा वारसा पुढे नेत असून त्या लढवय्या नेत्या आहेत. आमदार व मंत्री म्हणून काम करत असताना मुंबईकरांच्या प्रश्नासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना विजयी करुन संसदेत पाठवा, मुंबईकरांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासठी त्या कट्टीबद्ध आहेत, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. उत्तर मध्य मुंबईच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात काय केले व पुढे काय करणार यावर ते बोलत नाहीत. प्रत्येक भाषणात मोदी हिंदू, मुस्लीम, पाकिस्तान यावरच बोलत असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. ४ जूनला देशातील भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईकरांना भेडसावत असलेल्या समस्यांवर जनतेशी चर्चा करून एक त्रिसुत्री बनवण्यात आली असून या न्यायपत्राच्या माध्यमातून मुंबईकरांचे प्रश्न मांडलेले आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबईतील मोकळ्या जागांचे संवर्धन करणे, झाडांची कत्तल होऊ नये, विमानतळ फनेल झोन मधील पुनर्वसनासाठी विशेष धोरण आखले जावे यासाठी प्रयत्न केला जाईल. मुंबईची जीवनवाहिनी लोकलमधील गर्दी कमी व्हावी यासाठी लोकलची संख्या वाढवणे, लांब पल्ल्याच्या रेल्वेचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. हाऊसिंग सोसायट्यांवर लावलेला अन्यायकारक जीएसटी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबई शहरात प्रदुषण ही सुद्धा एक महत्वाची समस्या असून त्यावर उपाय योजना करण्यावरही भर दिला जाईल, असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्षाने न्यायपत्र जाहीर केलेले आहे, ५ न्याय आणि २५ गॅरंटी दिलेल्या आहेत. इंडिया आघाडीला जनतेचे १०० टक्के समर्थन मिळत असून पाचव्या टप्यातही जनतेचे समर्थन कायम राहिल. मुंबईतील महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, आमदार अमिन पटेल, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, संगठन प्रभारी प्रनिल नायर, खजिनदार संदीप शुक्ला, प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, आनंद शुक्ला, महेंद्र मुणगेकर, आदी उपस्थित होते.

24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज-सुषमा सातपुते

ठाणे :  येत्या  20 मे 2024 रोजी संपन्न होणा-या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 24-कल्याण लोकसभा मतदार संघाची मतदान प्रक्रियेची यंत्रणा सज्ज असून, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करुन मतदाराचा आपला हक्क बजवावा, असे आवाहन 24-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले. 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील एकूण 6 विधानसभा मतदार संघात 1960 मतदान केंद्रे असून 10 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तसेच जास्त घनता असलेल्या ठिकाणी म्हणजे एकूण 1012 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही व वेब कास्टींगची सुविधा पुरविण्यात आली आहे.  सद्यास्थितीतील तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर 1 मेडिकल कीट तसेच किमान आवश्यक सुविधांची (पिण्याचे पाणी, रॅम्प, शौचालय इ.) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदानाचे ठिकाणी आरोग्य सेविका/आशा सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे. मतदारांना मतदार यादीतील नोंदीबाबतच्या तपशिलाच्या मतदार स्लिप वाटण्याचे काम पूर्ण झाले आहे. निवडणूकीकामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचा-यांचे द्वितीय प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून, “सक्षम प्रणालीद्वारे” विनंती करण्यात आलेल्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांगाना रांगेत उभे न राहता मतदान करता येणार आहे.  तसेच अंध दिव्यांग मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र तळ मजल्यावर घेण्यात आले असल्याचे  निवडणुक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी नमूद केले. सद्यास्थितीपर्यंत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी संदर्भात 5 FIR नोंदविण्यात आले आहेत. 149 कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातील 216 मतदान केंद्रात पर्दानशीन महिला मतदार असल्यामुळे या प्रत्येक केंद्रात महिला मतदार कर्मचा-याची नेमणूक करण्यात आली आहे. आता पर्यंत C Vigil ॲपवर 318 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, सदर तक्रारींचे निवारण या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदार संघांनी विहीत वेळेत केलेले आहे. 24-कल्याण लेाकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 1 दिव्यांग मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र , महिला मतदार कर्मचा-यांचे मतदान केंद्र आणि युवा मतदार कर्मचारी उपलब्ध झाल्यास प्रत्येक मतदार संघनिहाय 1 युवा मतदार कर्मचारी केंद्र मतदानासाठी उपलब्ध राहणार आहे. 24-कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही सुरेंद्र बाजपेयी बंदीस्त सभागृह, वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्राँगरुमची व्यवस्था सावित्रीबाई फुले कला मंदिरातील तळघरात (Basement) करण्यात आली असून, तेथे राज्य पोलीस, राज्य राखीव दल व केंद्रीय पोलीस सुरक्षा दल अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते  यांनी दिली.