Category: होम

‘नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका’

मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज मुंबई : नेत्यांच्या वाहनांना जागा करून देण्यासाठी परिसरात रस्ते बंद करून नका, सह्याद्री अतिथी गृह आणि वर्षा बंगल्यावर होणाऱ्या राजकीय बैठका मंत्रायलात घ्या अशा स्वरुपाच्या मागण्या मलबार हिल येथील रहिवाशांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांमुळे परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच शिंदे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्याविरोधातही नागरिकांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांना आता ठाकरे सेनेचा उमेदवार जवळचा वाटू लागला आहे. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरात मात्र वाहनतळाच्या विषयावरून नागरिक संतापले आहेत. या परिसरातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर आपला जाहीरनामा तयार केला आहे. या जाहीरनाम्यात मलबार परिसरातील विविध प्रश्नांसंबंधी मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पर्यावरण, प्रदूषण हे विषय मुख्यत्वे घेण्यात आले असून त्यानंतर वाहनतळाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. यामिनी जाधव यांची अनुपस्थिती दक्षिण मुंबईत महायुतीतर्फे शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अरविंद सावंत उभे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच दोन उमेदवारांमध्ये ही लढाई होणार आहे. मलबार हिल हा परिसर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून त्यांना यावेळी शिवसेनेच्या दोन उमेदवारांमधून एक उमेदवार निवडावा लागणार आहे. मात्र मलबार हिलच्या रहिवाशांनी आपला जाहीरनामा देण्यासाठी यामिनी जाधव आणि सावंत यांना निमंत्रण दिले असता जाधव यांनी प्रतिसाद दिला नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तर अरविंद सावंत यांनी मात्र रविवारी कमला नेहरू उद्यानात रहिवाशाची भेट घेतली. त्यामुळे भाजपच्या या मतदारांमध्ये उमेदवाराबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. जाहीरनाम्यात मागण्या कोणत्या? चांगले रस्ते, पदपथ, वाहनतळाची सुविधा, मलबार हिलमधील हिरवाई टिकवावी, मलबार हिल जलाशय जतन करावे, हॅगिंग गार्डनला धक्का लावू नये, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना कठोर दंड करावा. लोकप्रतिनिधींच्या निधीचा वापर सोयीसुविधांसाठी करावा, सुशोभिकरणासाठी नको. पाणी, रस्ते, कचऱ्याच्या तक्रारींसाठी ऑनलाईन सुविधा हवी.

सफाई कामगारांना घनकचरा विभागात हजर राहण्याचे आदेश

शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करणाऱ्या कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागातील अनेक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, अधिकाऱ्यांचे शिपाई, टपाल वाहक म्हणून काम करतात. रस्त्यावर झाडू मारण्यापेक्षा कार्यालयात ऐषआरामात काम करण्यास मिळत असल्याने हे कामगार वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने प्रभाग कार्यालये, पालिका मुख्यालयांमध्ये कार्यरत आहेत. अशा सर्व सफाई कामगारांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर व्हावे, असे आदेश घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सोमवारी दिले. कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्याचे अभियान यशस्वी होत आहे. या कामासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची नितांत आवश्यकता आहे. आता कार्यरत असलेले बहुतांशी सफाई कामगार हे ५० वयाच्या पुढील आहेत. त्यांची क्रयशक्ती कमी झाली आहे. सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले ३५ ते ५० वयोगटातील अनेक सफाई कामगार वर्षानुवर्ष नगरसेवक, आमदार, राजकीय नेते यांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचे दालन, यापूर्वी महापौर, सभापती यांच्या दालनात शिपाई, प्रभागात फेरीवाला हटाव पथकात वर्णी लावून घेण्यात यशस्वी झाले आहेत. रस्त्यावर काम करण्यासाठी घनकचरा विभागाला सफाई कामगारांची आवश्यकता असताना, ६० हून अधिक सफाई कामगार प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथक, साहाय्यक आयुक्तांचा शिपाई, टपाली, आवक जावक लिपिक म्हणून काम करत आहेत. सफाईचे मूळ काम सोडून त्यांना प्रशासकीय कामात सहभागी होण्याची मुभा दिली कोणी, असे प्रश्न करत काही माजी नगरसेवक, काही जागृत नागरिकांनी यासंदर्भात पालिका आयुक्त, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन उपायुक्त अतुल पाटील यांनी पालिकेच्या दहा प्रभागांमध्ये जे सफाई कामगार अन्य कामे करत आहेत. त्यांनी तातडीने आपल्या मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. सफाई कामगारांची बदली अन्य कोणत्याही विभागात करू नये, असे आयुक्तांचे स्पष्ट आदेश आहेत. सफाई कामगारांचे नियंत्रक म्हणून उपायुक्त घनकचरा हे नियंत्रक अधिकाऱी आहेत. असे असताना प्रभागातील साहाय्यक आयुक्त घनकचरा विभागाची परवानगी न घेता सफाई कामगारांना आपल्या अधिकारात अन्य विभागात बदली करत आहेत, असे उपायुक्त पाटील यांच्या निदर्शनास आले आहे. अशा नियमबाह्य नियुक्त सफाई कामगारांनी तातडीने सफाई कामगार म्हणून घनकचरा विभागात तातडीने हजर व्हावे, असे आदेश उपायुक्त पाटील यांनी दिले आहेत. काही दिवसापूर्वी ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील सफाई कामगार दिलीप उर्फ बुवा भंडारी यांनी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या बरोबर रेल्वे स्थानक भागात मंडप टाकण्यावरून हुज्जत घातल्याने अंगचोर सफाई कामगारांचे प्रकरण उघडकीला आले आहे. घनकचरा विभागातील सफाई कामगारांनी प्रभागात विनामंजुरी इतर विभागात सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने पदस्थापना घेतल्या असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित साहाय्यक आयुक्तांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाईल. सफाई कामगारांनी आपल्या मूळ घनकचरा आस्थापनेत तातडीने हजर व्हावे. -अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग.

माथेरानच्या जान्हवी शिंदेला सीबीएसई दहावीच्या परीक्षेत घवघवीत

माथेरान : माथेरानच्या जान्हवी सुरेश शिंदे हिने सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. जान्हवीने 94.96 टक्के गुण प्राप्त केले असून तिने ( मुंबई )परेल येथील सोशल सर्व्हिस लीग या शाळेतुन मार्च मध्ये दिल्लीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला.  शिक्षिका मिस पद्मा, मिस भूमी लालन, मिस मीना मकवाना , मिस ताहीरा, मिस जरीन या  शिक्षकांनी उत्तम रित्या अभ्यास करून घेतल्याने इतके गुण प्राप्त करू शकले अशी भावना जान्हवी हिने व्यक्त केली व डॉक्टर बनण्यासाठी भरपूर मेहनत घेणार असल्याचे तिने सांगितले  जान्हवीचे पालक  सुरेश व अंकिता शिंदे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की आम्ही तिच्यावर अभ्यासाचे कोणतेही दडपण येऊ दिले नाही मोठ्या अपेक्षा लादल्या नाहीत तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. प्रा गवाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेंट झेव्हिएर्स शाळेचे शिक्षक योगेश जाधव, मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला अध्यक्षा प्रतिभा घावरे  , कुलदीप जाधव, वर्ष्या शिंदे , सुहासिनी दाभेकर यांनी जान्हवीचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई : शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे संपन्न झालेल्या प्रतिमापूजन प्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात आणि इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नाही!

विरोधी पक्षांकडून संविधान बदलले जाणार असल्याचे सांगत समाजाची दिशाभूल! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलणे कुणालाही शक्य नसून विरोधकांकडून संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ज्या काँग्रेसने संविधान बदलून देशात आणीबाणी लावली, तीच काँग्रेस आज संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवते, हे दुर्दैवी आणि दुटप्पीपणाचे असल्याची टीकाही खासदार शिंदे यांनी केली. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते. कल्याणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बुद्धभूमी फाउंडेशनने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना खासदार शिंदे यांनी विरोधकांवर हा हल्ला चढवला. याप्रसंगी बोलताना कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी गेल्या १२ वर्षांपासून होत होती. पण माझ्याकडे ही मागणी आल्यानंतर त्याचा लगेचच पाठपुरावा सुरू केला आणि जागेचे आरक्षण बदलून तिथे फक्त पुतळाच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या स्मारकात ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांनी केलेला संघर्ष, डिजिटल पुस्तके, इतकेच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवाज देखील ऐकता येणार आहे. त्यामुळे हे फक्त स्मारक नव्हे, तर ज्ञानकेंद्र असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. आज विरोधकांकडे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मुद्देच नसून त्यामुळे देशाचे संविधान बदलले जाणार असल्याच्या अफवा पसरवत समाजाची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मात्र याच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांचा निवडणुकीत पराभव केला होता, हे आज विसरून चालणार नाही, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने संविधान दिन साजरा करणे सुरू केले, संविधान यात्रा सुरू केली, इतकेच नव्हे, तर नवीन संसद भवनालाही संविधान भवन असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्य सरकारकडून इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात असून लंडनमधील बाबासाहेबांच्या राहत्या घरातील स्मारकही आपले सरकार उभारत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्यांच्या आणि माथी भडकावणाऱ्यांच्या बाजूने नव्हे, तर आपल्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी समस्त समाजाला केले. कल्याणमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनकडून तथागत भगवान गौतम बुद्धांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यांच्या काही प्रलंबित विषयांसाठीही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. २०१४, २०१९ मध्ये आपण मला भरभरून प्रेम दिले. आता २०२४ मध्ये पुन्हा एकदा भन्तेजींनी मला आशीर्वाद दिला असून आपणही पाठीशी उभे राहाल याची खात्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौतम रत्न महाथेरो, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष देवचंद अंबादे, रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षक वामन म्हात्रे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्यासह केतन रोकडे, भारत सोनवणे, सुबोध भारत, शेखर केदारे, मिलिंद सपकाळ, प्रशांत भंडारे, अशोक भोसले, संजय राक्षसकर, प्रशांत बनसोडे, राजेंद्र नितनवरे, भूषण यशवंतराव, नुपूर घाडीगावकर, रोहित डुमणे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेतील जखमींना अडीच लाखापर्यंत मदत

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घाटकोपर दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट मुंबई : वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांनात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजावाडी हॉस्पिटल येथे जाऊन भेट दिली. सद्यस्थितीमध्ये राजावाडी हॉस्पिटलमध्ये १ व्यक्ती ICU मध्ये असून इतरांच्या प्रकृतीमध्ये समाधानकारक सुधारणा होत असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यामंत्री यांच्याशी चर्चा करून जखमींना कायद्यातील तरतुदींप्रमाणे योग्य तो आर्थिक मोबदला दिला जाईल, असे देखील पालकमंत्री लोढा यांनी सांगितले. ६०% पेक्षा कमी व्यंग असल्यास अशा व्यक्तींना ७५,००० रुपये तसेच ६०% पेक्षा जास्त व्यंग असल्यास, त्या व्यक्तींना अडीच लाख रुपये सरकारद्वारे देण्यात येतील. तसेच किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा यावेळी पालकमंत्री लोढा यांनी केली आहे. सदर जाहिरातीचे मोठे होर्डिंग हे पेट्रोल पंपाजवळ अनधिकृतरित्या बांधण्यात आले होते. महापालिकेने नोटीस बजावून सुद्धा होर्डिंग हटवण्यात आले नाही. त्याचे सेफ्टी ऑडिट किंवा तत्सम प्रक्रिया सुद्धा झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पोलीस पकडतील, त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. ही दुर्घटना नसून हत्या आहे असे मंत्री लोढा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

श्रीकांत शिंदेंच्या प्रचार रॅलीत एकनाथ शिंदे होणार सहभागी!

गुरुवारी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात निघणार रॅली! डोंबिवली : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाररॅलीत सहभागी होणार आहेत. गुरुवारी १६ मे रोजी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण भागात ही रॅली निघणार असून यावेळी राज्यातील मंत्री, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा सोपवली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीत आले होते. यानंतर आता येत्या गुरुवारी, १६ मेला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे डोंबिवलीत येत आहेत. डोंबिवलीच्या नांदीवली येथील स्वामी समर्थ चौकातून सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रचार रॅलीला सुरुवात होईल. यानंतर डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण असा ४ किमीचे मार्गक्रमण करून आजदे गावात रॅलीचा समारोप होईल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे. या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, आमदार, नेते आणि मान्यवर मंडळी सहभागी होणार आहेत. तर महायुतीचे कार्यकर्तेही हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी होणार असल्याची महिती शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली आहे.

स्वच्छतासखींची आरोग्य तपासणी

जागतिक मातृदिनानिमित्त नवी मुंबई : स्वच्छतेच्या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या आरोग्याची काळजी घेणा-या स्वच्छतासखींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी आरोग्यम् संस्थेने पुढाकार घेऊन स्वच्छताकर्मींविषयी आपुलकी दाखवत हे शिबीर आयोजित केल्याबद्दल प्रशंसा केली. नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि आरोग्यम् सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नमुंमपा आयुक्त्‍ डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात ‘’सन्मान मातृत्वाचा, स्वच्छतासखींचा आरोग्याचा” या शिर्षकांतर्गत आयोजित स्वच्छतासखींच्या आरोग्य तपासणी शिबीराप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करित होते. यावेळी घनकचरा व्यावस्थापन विभागाचे सहा.आयुक्त श्री.जयंत जावडेकर, आरोग्यम् संस्थेच्या प्रमुख श्रीम.शमिका सुतार व डॉ. राहुल वडके उपस्थित होते. स्वच्छताकर्मी हे एक प्रकारे शहराचे आरोग्यसैनिक असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची जपणूक करणे हे कर्तव्य असून त्यादृष्टीने तसेच ‘घरातील स्त्री निरोगी असेल तर घर सुखी’ या भूमिकेतून आपल्या आईबद्दल मनात असलेली कृतज्ञतेची भावना स्वच्छतासखींची आरोग्य्‍ तपासणी करुन व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपस्थित शंभराहून अधिक स्वच्छतासखींची रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन पातळी अशी विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. दिनांक 15 व 16 जून रोजी आरोग्यम् मार्फत आयोजित केल्या जाणा-या मोठया स्वरूपातील आरोग्य शिबीरात पुढील चाचण्या करणे गरजेचे असलेल्या स्वच्छतासखींच्या आवश्यक चाचण्या केल्या जाणार आहेत. यावेळी उपस्थित महिलांना व्यक्तिगत स्वच्छता आणि आरोग्याविषयी नामांकित आरोग्य तज्ज्ञ डॉ. राहुल वडके यांनी मार्गदर्शन केले. आरोग्यम् संस्थेच्या प्रमुख श्रीम.शमिका सुतार यांनी नवी मुंबई शहराविषयी कृतज्ञता म्हणून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून स्वच्छतासखींसाठी मातृदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आरोग्य शिबीराचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले.

मावळ मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान – दीपक सिंगला

अशोक गायकवाड पुणे :वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात सहभाग घेतला. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली असून अंदाजे सरासरी ५२.३० टक्के मतदान झाले आहे, अशी प्राथमिक माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. आपल्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना युवा युवतींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रांवर दिलेल्या विविध सोयीसुविधांबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले. मावळ लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड पिंपरी असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३८ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदानाचे प्रमाण उरण विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून आले. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात साधारणपणे तिपटीने वाढ होऊन ते १४. ८७ टक्के इतके झाले. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २७.१४ टक्के इतके झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ३६.५४ टक्के मतदान पार पडले. ५ वाजेपर्यंत सरासरी ४६.०३ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते. सकाळी मतदानापुर्वी झालेल्या मॉक पोलवेळी २५ बॅलेट युनिट ६ कंट्रोल यूनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. यामध्ये पनवेल (१ बीयु, ३ व्हीव्हीपॅट), कर्जत (३ बीयु, २ व्हीव्हीपॅट), उरण (६ बीयु, २ व्हीव्हीपॅट), मावळ (३ बीयु, १ सीयु, ४ व्हीव्हीपॅट), चिंचवड (९ बीयु, ३ सीयु, २ व्हीव्हीपॅट), पिंपरी (३ बीयु, २ सीयु, १ व्हीव्हीपॅट) मतदान यंत्रांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया सुरू असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघात १२ बीयु, ४ सीयु आणि ७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. तर पनवेलमध्ये ४ व्हीव्हीपॅट, कर्जतमध्ये ६ व्हीव्हीपॅट, उरणमध्ये २ व्हीव्हीपॅट, मावळ ६ व्हीव्हीपॅट आणि पिंपरी २ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेतील मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्र वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेवून होते. याद्वारे मतदान केंद्राशी समन्वय साधून नियंत्रण करण्यात येत होते. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात देखील नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला होता. यामध्ये अनुक्रमे राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी आणि अर्चना यादव यांच्याद्वारे मतदान केंद्रावर लक्ष ठेवले जात होते. तसेच समन्वयासाठी समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे हे देखील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित राहून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधत होते. निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली. निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर तसेच निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी भर उन्हात देखील मोठ्या संख्येने मतदार मतदान करण्यासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रे विशेष स्वरूपात सजविण्यात आली होती. त्यामध्ये महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी नियुक्त महिला पोलीस अशा सर्व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. युवा संचलित मतदान केंद्रावर युवा वयोगटातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित मतदान केंद्रेही साकारण्यात आली होती. तर कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळाच्या संकल्पना साकारण्यात आली होती. तसेच आदर्श मतदान केंद्रावर मतदानाच्या अनुषंगाने सर्व सेवासुविधा आणि आवश्यक त्या अतिरिक्त सुविधांसह संस्कृती दर्शवणारी रचना करण्यात आली होती. अशी सर्व मिळून १४ महिला संचलित मतदान केंद्रे, १४ युवा संचलित मतदान केंद्र आणि ६ संस्कृती जोपासणारे व ३४ आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर, एन सी आर डी स्टर्लिंग स्कूल भोसरी, ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडी, डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज शाहूनगर येथे असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रावर संकल्पित हरीत मतदान केंद्र साकारण्यात आली होती. या हरित मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना विविध जातीच्या वनस्पती तसेच वृक्षांच्या प्रजातींबद्दल माहिती जाणून घेतली. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस सह वैद्यकीय सुविधा, आशा सेविका, प्रतीक्षा कक्ष तसेच पाळणाघर, हिरकणी कक्ष, व्हिलचेअर, व्हिलचेअर मदतनीस, उन्हापासून संरक्षणासाठी शेड व मंडप, वाहनतळ इ. सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आल्याने ज्येष्ठ मतदारांसह दिव्यांग मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाकडून पुष्प देऊन स्वागत केल्याचा क्षण मतदारांसाठी उत्साह वाढविणारा ठरला. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान जनजागृतीबाबत सुविचार, घोषवाक्ये, आकर्षक छायाचित्रे अशी सजावट करून मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. याठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी काढली. यामध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. मतदान केंद्रावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह सुरक्षितपणे नेमून दिलेल्या स्थळी घेऊन येण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली. मतदान यंत्रे निश्चित केलेल्या ठिकाणी संकलित करून बालेवाडी येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्ष (स्ट्रॉन्ग रूम) येथे सुरक्षित जमा केले जाणार आहेत.

ठाण्यातील होर्डिंग्ची होणार झाडाझडती

ठाणे : घाटकोपर येथे जाहिरात होर्डिग्ज कोसळून १४ जणांचा बळी गेल्यानंतर ठाणे शहरातील मोठमोठ्या होर्डिंग्जमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका सतर्क झाली असून शहरातील सर्वच होर्डिंग्जची झाडाझडती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व होर्डिंग्जमालकांना बुधवारी (ता. १५) होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानंतर योग्य ती कार्यवाही होणार आहे. ठाणे शहरात प्रवेश केल्यापासून ते अगदी गायमुखपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत सर्वत्र महाकाय होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात सुमारे अशी ५२८ होर्डिंग्जचे मनोरे आहेत; मात्र प्रत्येक पावसाळ्यात या होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर येतो. ठाण्यात यापूर्वीही जाहिरात होर्डिंग स्टँड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये मासुंदा तलावसमोरील शिवाजी मैदानाबाहेरचे होर्डींग केसळले होते. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गेल्यावर्षी ६ मार्चला झालेल्या अवकाळी पावसात कापूरबावडी परिसरातील होर्डिंग कोसळून सहा वाहनांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील या होर्डिंगसचे कालबद्ध पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना गेल्या वर्षी तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या होत्या. तसेच दुर्घटना घडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व होर्डिंग मालकांनी हे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केल्याची माहिती पालिकेने दिली; पण तरीही घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर ‘भय इथले संपत नाही’ अशीच परिस्थिती आहे. वास्तविक पालिकेच्या तिजोरीत भर पडावी, यासाठी होर्डिंगच्या मनोऱ्यांना परवानगी देण्यात आली; पण हे होर्डिंग पावसाळ्यात जीवघेणे ठरण्याची भीती बळावली आहे. घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक धोका रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगची सर्वाधिक संख्या घोडबंदर भागात असल्याचे आढळते. ढोकाळी, मानपाडा, कापूरबावडी, गायमुख येथून जाणाऱ्या महामार्गाला लागून असे शेकडो होर्डिंग आहेत. लवकरच ठोस भूमिका घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पालिकेने सर्व होर्डिंग मालकांची बैठक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्टसह सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. धोका किंवा दुर्घटना टाळण्यासाठी कोणते नवीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत. यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.