Category: मुंबई

Mumbai news

Heading – निवडणुकीच्या तोंडावर शिंदे- चव्हाण एकत्र

 महायुती शिवाय पर्याय नाही – खासदार श्रीकांत शिंदे डोंबिवली :  डोंबिवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाकडून म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेल्यास महायुतीचे उमेदवार चव्हाण यांच्या विरोधात ते लढत देऊ शकतात.  दीपेश यांच्या प्रवेशाच्या पूर्वसंध्येला मंत्री चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे हे एकत्र आल्याचे दिसुन आले. यावेळी महायुती शिवाय पर्याय नाही.  मंत्री चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुका समोर ठेवून मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे यांची गट्टी जमल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी घेत तिकिटासाठी जोर लावण्यास सुरवात केली आहे. निवडणूका व इतर गणिते मांडत या पक्षातून त्या पक्षात उड्या देखील सुरू झाल्या आहेत. डोंबिवली मधील शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याची कुणकुण पक्षातील वरिष्ठांना आधीच लागली होती. पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत भाजपचे मंत्री चव्हाण आणि सेनेचे खासदार डॉ. शिंदे एकत्र आले. महायुती मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असताना हे वातावरण शांत करण्यासाठी दोघे एकत्र आल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे पिता-पुत्र यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांचे काम करायचे नाही असा निर्णय घेत असहकार पुकारला होता. त्यास मंत्री चव्हाण यांचा देखील पाठिंबा होता. मात्र नंतर महायुती झाल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी महायुतीची निष्ठा राखत, भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करून श्रीकांत यांच्यासाठी काम करण्याचे आवाहन केले होते. शिंदे यांचा विजय झाला असला तरी त्यांना फारसे मताधिक्य घेता आले नव्हते. याची पुनरावृत्ती आता विधानसभेत होणार का ? शिंदे गट विधानसभेला चव्हाण यांना मदत करणार की शांत राहण्याची भूमिका घेतात याची चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे शिंदेचे पदाधिकारी म्हात्रे हे चव्हाण यांच्या विरोधात विकासाच्या मुद्द्यावर ताशेरे ओढत होते. त्यात ते ठाकरे गटात जाणार असल्याने महायुती उमेदवार चव्हाण यांना आव्हान उभे राहू शकते.  

धारावीत बद्रीनाथ मंदिराचा आकर्षक  देखावा

मुंबई : जय महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा धारावी येथील नवरात्रौत्सवातील यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. उत्तराखंड राज्यातील या मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली गेली आहे. त्यासाठी अनेक सूक्ष्म बाबींवर विशेष काम करण्यात आले आहे. या देखाव्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. बद्रीनाथ मंदिराची ही प्रतिकृती ३० फूट उंच आणि ७० फूट रुंद आहे. चार धाम पैकी हे एक मंदिर असल्यामुळे भाविकांची एकच गर्दी होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासमवेत सचिव रामचंद्र महाडेश्वर, कार्याध्य़क्ष बबनराव घाग आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. ज्या भाविकांना एखाद्या तीर्थस्थळी जाणे तितके सोपे नसते, अशावेळी त्यांना त्या ठिकाणी गेल्याचे समाधान मिळावे, या हेतूने हे देखावे सादर करण्यात येतात. यंदाचा बद्रीनाथ मंदिराचा देखावा साकारण्यामुळे अनेक भविकांचा ओघ इथे वाढला आहे. मंडळाच्या वतीने गेली ३८ वर्षे विविध उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडात्मक उपक्रमांसाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यात येते. रक्तदान, आरोग्य, नेत्रचिकित्सा आदी शिबिरांचेही आयोजन नियमितपणे करण्यात येते. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, विविध स्पर्धा, व्याख्यानमालादखील आयोजित केल्या जातात.

चेंबूरमध्ये चाळीतील घराला भीषण आग

एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू मुंबई : चेंबूरमध्ये चाळीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ नगर परिसरात चाळीतील एका घराला आज पहाटे साडेपाचच्या सुमारास आग लागली. घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितलं जात आहे. या घरात गुप्ता कुटुंबिय राहत असल्याची माहिती आहे. ते पहाटे झोपेत असताच ही घटना घडली. या आगीत गुप्ता कुटुबांतील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. प्रेम गुप्ता (३०), अनिता गुप्ता (३०), मंजू गुप्ता (३०), परीस गुप्त (७) आणि नरेंद्र गुप्ता (१०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय या घरात इतरही काही सदस्य होते, तेदेखील या आगीत जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना आगीवरन नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती आहे.

मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा अशक्य

 महापालिका अधिकाऱ्यांची कबुली मुंबई : शहराला २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचा पुनरुच्चार महापालिका प्रशासनाने केला आहे. २४ तास पाणीपुरवठा करण्याइतकी पाण्याची उपलब्धता नसून मुंबईची भौगोलिक स्थिती आणि रचनेमुळे २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग पूर्णत: गुंडाळण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे वचन राजकीय पक्षांकडून दिले जाते. मात्र २४ तास पाणी देणे शक्य नाही, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. २०१४ मध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा करण्यात आली होती. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत वांद्रे व मुलुंड परिसरात २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोगही करण्यात आला होता. त्यावेळी या भागात पाण्याचे तास वाढवण्यात आले होते, पण २४ तास पाणीपुरवठा करता आला नाही. तेवढी पाण्याची उपलब्धता नाही, त्यामुळे ते शक्य नाही, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धरणाच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान दिली. तानसा, मध्यवैतरणा, मोडकसागर, भातसा, विहार, तुलसी, ऊर्ध्व वैतरणा अशा सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. ही धरणे पावसाळ्यात काठोकाठ भरली तरच वर्षभर पाणीपुरवठा होऊ शकतो. भविष्यातील मुंबईकरांची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या गारगाई, पिंजाळ व दमणगंगा या तीनपैकी एकही नवीन पाणी प्रकल्प मार्गी लागलेला नाही. मुंबईची भौगोलिक स्थिती हेही यामागचे कारण असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील ६० टक्के लोकसंख्या ही अनियोजित वस्त्यांमध्ये राहते. त्यामुळे मुंबईची विभागणी अडीचशे लहान लहान विभागांमध्ये करून थोड्या थोड्या विभागांना एकेका वेळी पाणीपुरवठा केला जातो.

धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन आणि नियमित करण्यासाठी समिती

मुंबई : धारावी पुनर्विकासअंतर्गत धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि नियमित करण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता राज्य सरकारने सात सदस्य समिती गठित केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहे. रखडलेला धारावीचा पुनर्विकास आता अखेर प्रत्यक्ष मार्गी लागणार आहे. सध्या धारावीतील झोपड्यांचे, बांधकामाचे सर्वेक्षण सुरू आहे. रहिवाशांची पात्रता निश्चिती केली जात आहे. दरम्यान धारावीत मोठ्या संख्येने धार्मिक स्थळे आहेत. त्यात धारावीत अनधिकृत धार्मिक स्थळेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळांचे निष्काषन आणि स्थलांतराचा प्रश्न गंभीर झाला आहे. धारावीत एक अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यावरून नुकताच तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर खऱ्या अर्थाने धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि ती नियमित करण्यासाठी राज्य सरकारने एक सात सदस्य समिती स्थापन केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार ही समिती अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत मद्रास उच्च न्यायालयाचे माजी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जी. एम. अकबर अली, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी, मुंबई; सह सचिव, उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई; सह सचिव, उप सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय; सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था); उपजिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकारी, मुंबई (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु विद्यालयातील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी आंदोलनाचा इशारा

राजेंद्र साळसकर मुंबई : शिवाजी नगर गोवंडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु विद्यालयातील कथित भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराबाबत गेल्या दोन वर्षा पासून शिक्षण उपसंचालकाकडे वारंवार तक्रारी करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या विरोधात ९ ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा गणेश राजाराम गुंडेट्टी व श्रीहरी महेश गुंडेट्टी यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. ज्या व्यक्तीने देशासाठी स्वतःचे बलिदान दिले, अंदमानच्या कारागृहात नरक याताना भोगल्या,  ज्यांनी देशाच्या हजारो पिढ्यांसमोर आपला तेजोमय आदर्श घालून दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू विद्यालयात काही समाजकंटकांनी ही संस्था ताब्यात घेऊन कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी  केला आहे. या कथित समाजकंटकांनी भायखळा येथील रामराव विठ्ठलराव पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले.त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली.निबंधकानी संस्थेचे बँक खाते गोठविले.त्यामुळे शिक्षेकत्तर कर्मचारी ३ महिने पगारापासून वंचीत राहिले. याबाबत आम्ही शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली परंतु तक्रारीची दखल घेतली नाही.अखेर न्याय मिळत नसल्याने आम्ही सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत, असे गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

धनगर आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार – बबनराव मदने

रमेश औताडे मुंबई : धनगर व धनगड या शब्दातील ‘ड’ या अक्षरामुळे गेल्या ६८ वर्षापासून धनगर समाज आजही आरक्षणापासून वंचित राहिला आहे. सरकारने जर आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर राज्यभरातील शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार असा इशारा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. धनगर एस टीआरक्षण अंमलबजावणी, आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत आमदार म्हणून धनगर समाजातील प्रतिनिधीनां संधी मिळावी. १९५६ च्या एस टी यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमे ३६ वर धनगर अशी नोंद आहे. मात्र देवनागरी लिपीत इंग्रजीमधून धनगरचे स्पेलिंग धनगर   याऐवजी धनगड असे लिहिले आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ घेवून गेल्या ६८ वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एस टी आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. धनगर समाज कोणाच्या ताटातले आरक्षण मागत नाही जे घटनेत आरक्षण दिले आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असे बबनराव मदने म्हणाले. यावेळी पक्षाच्या स्वामिनिताई चव्हाण, महेंद्र साळुंखे, श्रीकांत मयेकर, भूषण नागवेकर, समर्थ भाईंदरकर, ललन पाल, सुरेश बोहोत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुरबाडमध्ये बारामती विकासाचा पॅटर्न राबवणार— शैलेश वडनेरे

राजीव चंदने मुरबाड : ‘मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता, पाणी,आरोग्य योजनेचा बोजवारा उडाला असून पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला एक संधी दिली आणि मी आमदार झालो तर मुरबाड मध्ये बारामती विकासाचा पॅटर्न राबवणार’, असे प्रतिपादन शैलेश वडनेरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये केले आहे, मुरबाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असून माता भिमाईचे जन्म स्थान आहे. आज पर्यंत आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्यातील आंबेटेबें येथील भिमाई भुमीला भेट दिली नसून भीमअनुयायीनां उपेक्षित ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे,असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) उमेदवार शैलेश वडनेरे यांनी उपस्थित पत्रकारांना चर्चा करत असताना त्यांनी सांगितले मी आमदार झालो तर सर्वप्रथम भिमाई भुमीचा विकासाचा काया पालट केल्या शिवाय राहणार नाही,तसेच तालुक्यातील तिर्थक्षेत्राचा विकास काम हे माझे धोरण आहे, मुरबाड विधानसभा क्षेत्रा मधील अनेक वाडया पाड्यात रस्ते झाले नाही,विज पुरवठा मध्ये चाललेला सावळा गोधळ,पिण्याच्या पाण्याची समस्या असे अनेक रखडले  विकास काम पहिल्यांदा करणार असे दै, बित्तंबातमीशी बोलताना सांगितले.

‘आदिवासींचा’ एल्गार

उपसभापती झिरवाळांसह सत्ताधारी आदिवासी आमदारांनी न्यायासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी सरंक्षक झाळीमुळे बचावले. झिरवाळांना अश्रु अनावर स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत आणि त्यातही मंत्रालयात आज आदिवासी आमदारांनी आपल्या न्याय…