Category: मुंबई

Mumbai news

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू

अहमदनगर जिल्हयातून रणशिंग फुंकणार…   मुंबई : ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची आणि आमदारांची बैठक घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात भरघोस यश मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. लोकसभेला कमी खासदार आले असले तरी विधानसभेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंबर कसली आहे. या राज्यव्यापी दौऱ्यातून पक्षाची दिशा आणि भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे स्पष्ट करणार आहेत.…

लेट्स इमॅजिनचे वाडा, विक्रमगडमधील शाळांना पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई : जून महिन्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी लेट्स इमॅजिनने मॉर्गन स्टॅनलेतील कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने ( ग्लोबल व्हॉलंटरी मंथ या उपक्रमांतर्गत) वाडा आणि विक्रमगडमधील जिल्हा परिषदेच्या जवळपास 19 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. लेट्स इमॅजिनच्या पूर्णिमा नार्वेकर, मिहीर नागदा, कानन गोराडिया तसेच मॉर्गन स्टॅनलेच्या कर्मचारी प्रतिनिधीही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. मुलांप्रमाणे शिक्षकांनाही उपयोगी असे साहित्य देण्यात आले.  पूर्णिमा नार्वेकर यांनी सांगितले की गेल्या 2 वर्षांपासून शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हातात शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम लेट्स इमॅजिन करते आहे.

मुंबई शहराची जिल्हास्तरीय पंच परीक्षा ३० जूनला

मुंबई : मुंबई शहर कबड्डी असो. च्या विद्यमाने रविवार दिनांक ३० जून २०२४ रोजी जिल्हास्तरीय पंच परीक्षा घेण्यात येणार आहे. या पंच परीक्षेकरीता सोमवार दिनांक २४ जून पासून मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. तरी जिल्हा संघटनेला संलग्न असलेल्या संघाच्या ज्या सदस्यांना ही परीक्षा द्यावयाची असेल त्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पूर्ण भरून प्रवेश शुल्कसह शनि. दिनांक २२ जून पर्यंत कार्यालयात जमा करावेत. अधिक माहितीकरिता पंच समितीचे अध्यक्ष महेंद्र हळदणकर(९८६९८७८५८१) किंवा सचिव सूर्यकांत देसाई (९८६९००३२२८) यांच्याशी प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे एका परिपत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी असो. ने प्रसार माध्यमांना कळविले आहे.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २२ जूनला युवा संगीत महोत्सव

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार दिनांक २२ जून २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता युवा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रीती ठाकोरभाई देसाई यांच्या…

मुंबईत आठवलेंचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

मुंबई :  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे केंद्रात सलग तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवत आहेत. तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर रामदास आठवले यांचे मुंबईत आगमन झाले. त्यावेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे आठवलेंचे जोरदार स्‍वागत केले. मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रिपाइं कार्यकर्त्यांनी भव्य रथातून मिरवणूक काढून वाजत-गाजत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर आठवले चैत्यभूमी येथे रवाना झाले. चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रामदास आठवले यांनी विनम्र अभिवादन केले. कार्यकर्त्यापासून मंत्रिपदापर्यंत जे आहे ते सर्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला लाभले असल्याची कृतज्ञ भावना आठवलेंनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी रामदास आठवलेंवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवर्षाव केला. यावेळी सीमाताई आठवले, कुमार जित आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे उपस्थित होते. ००००००

राज्यात माकप १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक?

 पवारांसोबत झाली सकारात्मक चर्चा!   मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  शरद पवार व  जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. या प्रतिनिधीमंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, मा. आ.  नरसय्या आडम, मा. आ. जे. पी. गावीत, आ. विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, व डॉ. सुभाष जाधव यांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेल्या यशाबद्दल आणि त्यातील शरद पवार यांच्या असामान्य योगदानाबद्दल माकपच्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले.लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे, आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षांचे शरद पवार व जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले. आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत ५५ मिनिटे चर्चा केली. माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या १२ विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले.दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली. येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चाची चर्चा झाली.

 कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरात शिवसैनिकांना प्रवेश बंदी

बकरी ईदच्या दिवशी कल्याण : बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केली. यानंतर दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केलं. तसंच आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल अशीही भूमिका घेतली आहे. बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. मात्र ९० च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केलं. आज पुन्हा एकदा या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात येतं आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे तसंच त्याच परिसरात एक छोटी मशिदही आहे. त्या ठिकाणी मुस्लिम समुदाय बकरी ईदच्या निमित्ताने नमाज पठण करण्यासाठी येत असतो. त्या काळात हिंदू बांधवांना देवीचं दर्शन आणि पूजा ही काही काळासाठी बंद ठेवण्यात येते. याचा निषेध आनंद दिघेंनी सुरु केला होता. त्यांनी या विरोधात घंटानाद आंदोलन सुरु केलं होतं. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही या ठिकाणी घंटानाद करताना दिसत आहेत. आम्हाला दुर्गाडी देवीचं दर्शन करायचं आहे त्यामुळे मंदिरात जाऊ दिलं पाहिजे असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी मंदिरात जाण्यापासून रोखल्याने या ठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसनैकि जमले होते. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही काही कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे यांचे कार्यकर्ते एकमेकांत मिसळू नयेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे दोन्ही गट वेगळे ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या दोन्ही गटांनी दुर्गाडी किल्ला परिसरात काही काळ घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलकाचं म्हणणं काय? बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर प्रवेश बंदी आणि घंटानाद करु दिला जात नाही. हे आंदोलन बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने सुरु झालं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी बंदीहुकूम मोडून देवीचं दर्शन घेतलं होतं. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार. कोणत्याही दिवशी देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी असता कामा नये. देवीचं दर्शन घेणं हा हिंदूंचा हक्क आहे. असं आंदोलकांनी म्हटलं आहे.

 कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका

सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी   कल्याण: कल्याण लोकसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना चांगली मते मिळाली. त्याचा विचार करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पक्षाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नेमणुका केल्या आहेत. या नेमणुका निष्ठावंत, ज्येष्ठांना डावलून करण्यात आल्याचा आरोप करत सामान्य, निष्ठावंत शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी उघडपणे कुणीही बोलण्यास तयार नाही. शिवसेनातील बंडानंतर कल्याण परिसरातील अनेक जुने निष्ठावान, ज्येष्ठ शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांना साथ दिली. अशा शिवसैनिकांना नवीन नेमणुकांमध्ये पदस्थापना देऊन त्यांचा सन्मान करणे आवश्यक होते. परंतु त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे, असे ठाकरे गटातील ज्येष्ठ शिवसैनिकांकडून सांगण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांनी तीन लाख ८१ हजार मते मिळविली. त्याचा विचार करून ठाकरे गटाने आता आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकींच्या तयारीचा भाग म्हणून येथील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. कल्याण पश्चिम, मुरबाड विभागासाठी ॲड. अल्पेश भोईर यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भोईर हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या नियुक्तीला कोणाचा विरोध नाही, पण त्यांना टप्प्याने पदोन्न्तीने पद देणे आवश्यक होते, असे सामान्य शिवसैनिकांचे मत आहे. कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंंबरनाथ शहरासाठी जिल्हाप्रमुख म्हणून धनंजय बोडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना हे पद दिल्याचे सांगण्यात येते. नगरसेवक, विभागप्रमुख, दोनदा विधानसभा उमेदवारी, उपशाखाप्रमुख पदे धनंजय बोडारे यांनी भुषविली आहेत. आता जिल्हाप्रमुख पदही त्यांंना देण्यात आले आहे. अनेक पदे एकाच व्यक्तिला किती वेळ देणार. इतरही अनेक ज्येष्ठ कृतीशील शिवसैनिक पक्षात आहेत. त्यांचाही विचार होण्याची गरज आहे, अश मागणी सामान्य शिवसैनिक करत आहेत. दरेकर यांचे मताधिक्य वाढविंण्यासाठी ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या पदरात नव्याने नेमणुका टाकण्यात आल्याची चर्चा सामान्य शिवसैनिकांमध्ये आहे. ठाकरे गटाचे नेते मात्र हा आक्षेप खोडून काढतात. डोंबिवलीत अभिजीत सावंत या ज्येष्ठ शिवसैनिकाला शहरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याविषयी सामान्य, ज्येष्ठ शिवसैनिक कुरबुर करत आहेत. संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या नेमणुका करण्यात आल्या. त्यांच्या कार्यपध्दतीविषयी शिवसैनिक नाराजी व्यक्त करत आहेत. एकीकडे सामान्य शिवसैनिक हाच शिवसेनेचा कणा आहे, असे सांगायचे आणि निष्ठावंत, सामान्य ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून नियुक्त्या करायच्या, यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कल्याण, मुरबाड, डोंबिवली परिसरातील नेमणुकांमध्ये लक्ष घालण्याची मागणी सामान्य शिवसैनिकांकडून केली जात आहे. अधिक माहितीसाठी ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कोट पक्षाकडून करण्यात आलेल्या नव्या नेमणुकांमध्ये कोणतीही नाराजी नाही. याऊलट पक्षाने युवा कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याने शिवसैनिक आनंदात आहेत. सदानंद थरवळ (जिल्हाप्रमुख, कल्याण जिल्हा)

श्री गणेश आखाड्याचे उन्हाळी निवासी कुस्ती शिबिर संपन्न

मुंबई : मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर आयोजित २१ दिवसांच्या उन्हाळी निवासी कुस्ती, संस्कार शिबिराचा  सांगता समारंभ नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला. या शिबिरात ४० पेक्षा जास्त युवा कुस्तीपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये काही मुलींचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे कर्नाटक, म्हैसूर येथील काही कुस्तीपटूंनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात एन. आय. एस. कुस्ती प्रशिक्षक  विवेक नयकल, महेंद्र जाधव, वैभव माने, कोमल देसाई, वस्ताद रूपचंद माने यांनी कुस्तीपटूंना मार्गदर्शन केले. शिबिरातील सर्व कुस्तीपटूंना प्रमाणपत्र, चषक, ट्रेक सुट देऊन गौरविण्यात आले. यंदाचे शिबिराचे दुसरे वर्ष होते. शिबिरातील कुस्तीपटूंची २१ दिवस नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय सुभाष घाटवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. शिबिराच्या समारोप सोहळ्याला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नझरुद्दीन नायकवडी, व्यापारी हुकमीचंद जोशी, डॉ. जितकुमार यादव, उद्योजक श्री. यादव, पै. राजाराम पाटील, प्रकाश वाठारकर, गणपती जाधव (मुंबई पोलीस), माणिक पाटील NSG कमांडो, सुधाकर गायकवाड, श्री साई ज्वेलर्सचे मालक आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती. यावेळी एशियन क्रीडा, आरोग्य , नर्सरी प्रकल्प शिंदे स्पोर्ट्स , टिळक रोड , पुणे  यांच्यावतीने वस्ताद वसंतराव पाटील यांना  “महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२४” मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल सर यांनी केले.

भिवंडी तालुक्यात मुंबई ऊर्जा मार्गचे कार्य प्रगतीपथावर

भिवंडी : भारताचे ऊर्जा मंत्रालय देशाला ऊर्जेच्या बाबतीत सक्षम बनवण्यासाठी एक निश्चित ध्येय डोळ्यापुढे ठेवून कामास लागले आहे. ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विजेची मागणी आणि विद्यमान पुरवठा यातील तफावत भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. मुंबई महानगर प्रदेशाला साडेचार हजार मेगा वॅट इतका विजेचा तुटवडा भासत आहे. यापैकी २००० मेगा वॅट अतिरिक्त वीज पुरविण्याची जबाबदारी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांना देण्यात आली आहे. काही महिन्यातच हा प्रकल्प पूर्ण होणार असून सध्या भिवंडी तालुक्यात या प्रकल्पाचे कार्य जोमाने प्रगतीपथावर आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय प्रगती पोर्टलच्या माध्यमातून सदरच्या प्रकल्पपुरती करता लक्ष ठेवून आहे. प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय देखील प्रकल्प पूर्णत्वाकरिता युद्ध पातळीवर कार्य करत आहे. तूर्तास भिवंडी तालुक्यातील तीन गावांतून या प्रकल्पाची उच्च वीज वाहिनी जाते. खानिवली, तळवली तर्फे राहुर आणि कांदली तर्फे राहुर अशा तीन गावांतून जाणाऱ्या या वाहिनीची साधारणपणे लांबी ४.३ कि.मी. इतकी आहे. उच्च वीज वाहक तारा वाहून नेणारे टॉवर हे या प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. भिवंडी तालुक्यातील तीन गावांच्या 19 टॉवर उभारण्यात येणार आहेत. यातील जवळपास सर्वच टॉवर उभारणीच्या पाया बांधणीचे कार्य पूर्ण झालेले असून.१४ टॉवर उभारून पूर्ण देखील झालेले आहेत. या प्रकल्पाकरित या तीन गावांतील ९०५ भूधारकांची जमीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकरता वापरली जाणार आहे. राष्ट्रीयकृत प्रकल्पांकरता जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याचे बाबत २०२२ मधील सुधारित तरतुदींच्या अन्वये भूधारकांना जमीन वापरल्याचा परतावा दिला जाणार आहे. तूर्तास २७७ भूधारकांना परतावा देण्याचे काम पूर्ण झालेले असून उर्वरित भूधारकांना परतावा देण्याचे काम सुरू आहे. एकत्रित मिळून तब्बल २४ कोटीपेक्षा अधिक रुपयांचा परतावा भूधारक लाभार्थींना मिळणार असल्याचे समजते. गुजरात राज्यामधून येणारी ही वीज मुंबई महानगर प्रदेशात पोहोचविली जाणार आहे.पडघा ते खारघर या टप्प्यात ४०० के व्ही क्षमतेची उच्च वीज वाहक यंत्रणा उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. आगामी काळात विद्युत ऊर्जा हीच ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत राहणार आहे. घरगुती वापरण्याची उपकरणे ते थेट दुचाकी – चार चाकी वाहने हे सारे विजेवरती वापरले जात आहे. अर्थातच यामुळे विजेचा वापर वाढता राहणार आहे. मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून मिळणारी अतिरिक्त ऊर्जा ही हरित ऊर्जा असल्याकारणाने ती उपभोक्त्यांच्या खिशावरील ताण हलका करणारी ऊर्जा असेल. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी उच्चांक मोडणारे कमाल तापमान नोंदविले गेले. अशा परिस्थितीत वीज प्रवाह खंडित झाल्यास जीवाची लाही लाही होऊन उष्माघात रुग्णांचे प्रमाण वाढले होते. अशा परिस्थितीत वाढता विजेचा वापर ही मनुष्य प्राण्याची अपरिहार्यता ठरते. या पार्श्वभूमीवर मुंबई ऊर्जा मार्ग लि यांचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे हे जनतेच्या हिताचे ठरेल चौकट: प्रकल्प पूर्णत्वाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रकल्पासाठी ज्या भूधारकांची जमीन वापरली जात आहे त्यांना मिळणारा परतावा हा समाधानकारक व न्याय्य असावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्याच्या घडीला २७७ भूधारकांना आम्ही परतावा दिलेला आहे. बाकी भूधारकांना परतावा देण्याचे काम प्रामाणिकपणे सुरू आहे. – सुरजित नारायण प्रकल्प अधिकारी,मुंबई ऊर्जा मार्ग ली.