Category: मुंबई

Mumbai news

आशा सेविका चार महिने मानधनापासून वंचित

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचे काम ७४ हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक करीत आहेत. मात्र मागील चार महिन्यांपासून राज्य सरकारकडून देण्यात येणारे मानधन या आशा स्वयंसेविकांना मिळालेले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आश स्वयंसेविकांना अवघड बनले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी ७४ हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या आशा स्वयंसेविकांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून मानधन देण्यात येते. राज्यातील आशा स्वयंसेविकांना महिन्याला १३ हजार रुपये मानधन मिळते. त्यापैकी ८ हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जातात, तर मानधनाची उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाते. केंद्र सरकारकडून देण्यात येणारे मानधन आशा स्वयंसेविकांना वेळेवर मिळत आहे. मात्र राज्य सरकारच्या हिश्यातून देण्यात येणारे मानधन जानेवारीपासून मिळालेले नाही. त्यामुळे आरोग्य सेविकांची आर्थिक कोंडी होत आहे. अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका मिळणाऱ्या मानधनातूनच प्रवास खर्च करून गावागावात, खेडोपाडी जाऊन नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे काम करतात. मात्र सरकारी यंत्रणांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार महिन्यांपासून राज्य सरकारने मानधन न दिल्याने आशा स्वयंसेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना जानेवारी २०२४ पासूनचे थकीत मानधन विनाविलंब देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

निवडणुकीनंतर मुंबईची रक्तवाहिनी बेस्ट बस सेवा ठप्प होणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही बेस्ट कंत्राटदार ऐकत नसल्याने आम्ही पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. त्यामुळे बस सेवा ठप्प झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही असा इशारा बेस्ट कंत्राटी बस चालकांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. बेस्ट परिवहन सेवेत कंत्राटी बस जास्त असून बेस्ट च्या बसेस कमी आहेत.आमचे कंत्राटी वाहकांचे कामाचे तास व कामाची गुणवत्ता ही बेस्ट परिवहनच्या कायम कामगाराप्रमाणेच असताना वेतनात फरक का ? आम्ही जिवंत वाहक आहोत की अदृश्य वाहक आहोत. १७ हजारात घर चालते का ? आमचे कुटुंब या मुंबईत एवढ्या वेतनात राहू शकत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया रघुनाथ यांनी यावेळी दिली. सहा कंत्राटदार बेस्ट परिवहन सेवेत बस सह आम्हा चालकांची सेवा जनतेला देत आहेत. हे सहा कंत्राटदार गब्बर होत असताना आम्ही आत्महत्या करण्याच्या वाटेवर आलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालूनही कंत्राटदार जर ऐकत नसतील तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असे रघुनाथ यांनी सांगितले. सुट्ट्या नाहीत, कामाची गॅरंटी नाही, मेडिकल सुविधा नाही, रजेचा पगार नाही, महागाई वाढली असताना १७ हजार वेतन मिळते हे जगाच्या. पाठीवरील वाहन चालकांचे एकमेव उदाहरण असेल असे रघुनाथ यांनी सांगितले.

ब्रिटिश काळातल्या पोर्ट ट्रस्ट कामगार संघटनेला १०४ वर्ष पूर्ण

रमेश औताडे मुंबई : कोणतीही संघटना कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठी होते. त्यांच्या सहकार्यामुळेच संघटना वाढत असते.  त्यामुळे कामगार  संघटनेमध्ये कामगार कार्यकर्ते फार महत्त्वाचे असतात.  असे मत ज्येष्ठ कामगार नेते ॲड.  एस.के. शेट्ये यांनी ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या कामगार संघटनेला १०४ वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्धापन दीन समारंभ प्रसंगी व्यक्त केले. ब्रिटिश काळात ३ मे  १९२० रोजी स्थापन झालेल्या बी. पी. टी. एम्प्लॉईज जुनियनला ( आताचे नाव – मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन )     १०४ वर्ष पूर्ण झाली असून, ३ मे २०२४  रोजी माझगाव येथील  कामगार सदन सभागृहात या संघटनेचा वर्धापन दिन संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड . एस. के. शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले  की, कामगारांच्या मागण्या मिळवण्यासाठी संप हे कामगारांचे शेवटचे हत्यार आहे. परंतु हे हत्यार देखील आता बोथट झाले आहे.  सध्याच्या काळात काम करताना सहकार्य, सामंजस्य व सुसंवाद हा त्रिसूत्री  मार्ग फार उपयोगी  आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यात कामगार विरोधी  बदल केले असून,  भविष्यात कामगार संघटनांमध्ये कार्य करणे फार कठीण जाणार आहे.  केंद्र सरकारच्या धोरणामुळे कायमस्वरूपी कामगार कमी होत असून,  प्रत्येक उद्योगात कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे असंघटितांना  संघटित करणे हे खऱ्या अर्थाने कामगार चळवळी समोर मोठे आव्हान आहे.  त्या दृष्टीने कामगार कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे.  शेवटी  कामगारांचे कोणतेही प्रश्न सोडवायचे असतील तर कामगारांची एकजूट फार महत्त्वाची आहे.  या एकजूटीवरच कामगारांच्या मागण्या मान्य होऊ शकतात. असे शेट्ये म्हणाले. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज,  कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल,  सेक्रेटरी विद्याधर राणे,  सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी विजय रणदिवे, उपाध्यक्ष शीला भगत,  निसार युनूस,  प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस मनीष पाटील यांनी युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त कामगार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  युनियनचे पदाधिकारी विकास नलावडे, संदीप कदम, विष्णू पोळ,  संदीप चेरफळे, प्रदीप नलावडे, त्याचप्रमाणे  कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री गणेश आखाड्यातर्फे निवासी कुस्ती शिबिर

मुंबई : मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर पश्चिम  यांच्यातर्फे येत्या २१ मे ते १० जून २०२४ या कालावधीत उन्हाळी निवासी कुस्ती, संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय प्रशिक्षक, खेळाडू, पंच यांच्याकडून कुस्तीपटूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जाईल. तसेच नविन नियमांची माहिती करुन देण्यात येईल. कुस्तीसोबत योगासने, प्राणायामाचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. २० मेपर्यंत शिबिराच्या प्रवेशिका स्विकारण्यात येतील. शिबिराचे प्रवेश शुल्क ७०००/- रुपये आहे. नितिन शिंदे, महेंद्र जाधव, विवेक नायकल, वैभव माने, अनिल बागाव, कोमल देसाई हे सर्व एन आय एस प्रशिक्षक कुस्तीपटूंना या खेळाचे धडे देतील. शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यांना प्रमाणपत्र, ट्रॅकसूट, सन्मान चिन्ह भेट देण्यात येईल. शिबिराच्या प्रवेशासाठी मिलिंद लिमये, ९६१९०२४३३३, वसंतराव पाटील ८३२९६०९०३८, सदानंद पाटील ९३७२४१३३२५, रुपचंद माने ९८६९१०४१२२,  कोमल देसाई ७०३९१२५९८५ यांच्याशी संपर्क साधावा.

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ मे २०२४ रोजी लोकमान्य मंडळ बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, डॉ. सी. जी. देसाई मार्ग, मनमाला मंदिरासमोर, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई – ४०००१६ येथे मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार असून स्पर्धेची नावे ९ मे २०२४ रोजी सायंकाळी ठिक ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, आश्रय हॉटेलच्या मागे, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, मुंबई – ४०० ०१६ येथे क्लब मार्फत स्वीकारण्यात येतील.

रिक्षा-टॅक्सीच्या उत्पन्नात तापमानवाढीमुळे घट

उन्हामुळे मुंबईकरांचे त्रस्तीचे जीवन मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामध्ये मुंबईकर घराबाहेर पडायचं टाळत आहेत. अशा कडक उन्हातदेखील वाहतूक पोलिस, रिक्षा-टॅक्सी चालक, पोस्टमन आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात उन्हामुळे रिक्षा, टॅक्सीच्या प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाल्याचे रिक्षा, टॅक्सीचालकांनी सांगितले. मुंबईतील दादर, सीएसएमटी, भायखळा, सायन, चेंबूर आदी ठिकाणी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.  यंदा उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त होत आहेत. अशा परिस्थितीतदेखील वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिस चौकाचौकात कर्तव्य बजावत आहेत. वाहतूक पोलिसांना उन्हामध्ये शहरातील चौकात उभे राहून कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना काही काळ विसावा घ्यायचा झाल्यास त्यांना उड्डाणपूल किंवा जवळच्या झाडाखाली उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. उन्हामुळे रिक्षाचालकांचे खूप हाल होत आहेत. रिक्षाचे छत तीव्र उन्हामुळे तापत आहे. अशात वाढत्या तामपानामुळे शहरातील ६० रिक्षा रस्त्यावर असून ४० टक्के रिक्षाचालक गावी गेले आहेत, असे मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन यांनी सांगितले. सध्या प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी सांगितले. तापमान असह्य झाल्यामुळे झाडाखाली रिक्षा, टॅक्सी उभी करून चालक विसावा घेत आहेत. तापमान वाढल्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची, वाद होण्याचे प्रमाणही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

१० जूनला होणार मतदान अशोक गायकवाड मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

गारगाई प्रकल्पाला येणार वेग

मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी मुंबई : मुंबईची तहान भागविणा-ऱ्या गारगाई प्रकल्पाला आता वेग येणार आहे. या प्रकल्पाला आवश्यक असलेली परवानगी मिळाल्याने बहुतांशी पेच सुटणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला ४०० दशलक्ष लिटर जादा पाणी मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या प्रकल्पाची मदत होणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढते आहे. सध्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची कमतरता भासते आहे. दररोजच्या पाणीपुरवठ्यातील असलेली तूट भरून काढण्यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला आहे. परवानग्या आणि इतर काही समस्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता सरकारची आवश्यक परवानगी तसेच बाधित होणारी शेतजमीन, येथील चार गावातील रहिवाशांचा या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाचा आता वेग येणार असल्याचे सांगण्यात आले. पाणी पुरवठा वाढवण्यासाठी राज्य सरकारने डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीने शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. मात्र मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामुळे गारगाई पिंजाळ धरण प्रकल्प बाजूला पडला. मात्र पालिकेने आता पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नियोजित गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनोर्‍याचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे २.० किमी लांबीच्या बोगद्याचे काम नियोजित आहे. या प्रकल्पामुळे येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे, यासाठी येथील झाडे हटवावी लागणार आहेत. प्रकल्पात पर्यावरणाच्या अडचणी दूर करण्यासाठीही अभ्यास केला जाणार आहे. यावर अभ्यास करून उपाययोजनाही सूचवणार असल्याचे सांगण्यात आले. पुनरावलोकन होणार मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाल्याने होणारे फायदे, पर्यावरण रक्षणासाठी अतिरिक्त उपाय सुचवणे, प्रकल्पामुळे किती झाडे बाधित होतील, झाडे कापल्यास पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार, बुडित क्षेत्रावर होणारे परिणाम, उपाय य़ाबाबींचे पुनरावलोकन केले जाणार आहे. अभ्यासानंतर अहवालातील शिफारशींनुसार निर्णय घेतला जाणार आहे.

पथनाट्यांव्दारे निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक गायकवाड नवी मुंबई : जनजागृतीच्या विविध माध्यमांमध्ये पथनाट्य हे अत्यंत प्रभावी माध्यम असून २० मे रोजी होणा-या २५ ठाणे लोकसभा निवडणूकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांमध्ये पथनाट्याचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. या पथनाट्यांतील कलावंत समुह महापालिका क्षेत्रात संध्याकाळच्या सत्रात गर्दीच्या ठिकाणी जाऊन चौकाचौकात लोकशाहीचा जागर करीत निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. मनोरंजक पध्दतीने सादर होणारी ही पथनाट्ये मतदान करण्याचे महत्व हसतखेळत पटवून देत आहेत. हा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वांनी मिळून साजरा करावयाचा असून मतदान करून आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावयाचा आहे हे लोकांना पथनाट्याव्दारे पटवून दिले जात आहे. वाशी विभागात रेल्वे स्टेशन परिसर, मिनी सी शोअर सेक्टर ९, सेक्टर ९ मार्केट, सेक्टर १५ मार्केट, सेक्टर १० चौक तसेच नेरूळ विभागात रेल्वे स्टेशन पश्चिम बाजू आणि पूर्व बाजू, सेक्टर १० पूर्व, नेरूळ गाव, नेरूळ सेक्टर २० चौक अशा विविध ठिकाणी झालेली पथनाट्ये बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पथनाट्ये सादर केल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांची दाद देत कलावंतांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित प्रेक्षक नागरिकांनी डाव्या हाताची तर्जनी उंचावत सामुहिक सेल्फी काढून आपण मतदान करणार असल्याचे दर्शविले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर ते दिघा अशा आठही विभागांमध्ये गर्दीच्या ठिकाणी पथनाट्ये सादर करून मतदार जनजागृती केली जात असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक उपआयुक्त शरद पवार यांनी दिली आहे.

मतदात्यांसाठी मतदान केंद्रावर ‘थंडा थंडा कूल कूल’ची व्यवस्था!

मुंबई : लोकशाहीच्या उत्सवात मतदात्यांसाठी यंदा मतदान केंद्रावर थंडा थंडा कूल कूल अशीच काहीशी व्यवस्था असणार आहे. तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर अक्षरश: घामाघूम होत असून त्याचा मतदानावर परिणाम…