Category: रायगड

raigad news and updates

 माथेरान झाले चकाचक

७८५ श्रीसदस्यांकडून भव्य स्वच्छता अभियान, ६ टन कचऱ्याचे संकलन, पर्यटन वाढीस मदत मुकुंद रांजाणे माथेरान : महाराष्ट्र भुषण थोर निरूपणकार तिथरूप आदरणीय  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त १मार्च रोजी माथेरान शहरात   सदस्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या अत्यावश्यक अभियानासाठी माथेरान मधील सदस्यांसह कर्जत तालुक्यातील कडाव,नसरापूर,चिंचवली,मानिवली, भडवळ, डीकसळ,किरवली येथून जवळपास ६५० श्रीसदस्य दाखल झाले होते.सकाळी आठ वाजता या अभियानास श्रीराम चौकातून सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेला कार्यक्षम  नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, गटनेते शिवाजी शिंदे,उप नगराध्यक्ष संतोष शेलार, नगरसेवक सचिन दाभेकर, सिताराम कुंभार, किरण पेमारे,सुनील शिंदे,केतन रामाणे,गौरंग वाघेला,सोहेल महापुळे,किशोर मोरे,नगरसेविका अनिता रांजाणे, अनुसया ढेबे,रिझवाना शेख, लता ढेबे, कमल गायकवाड, सुरेखा साळुंखे,अर्चना भिल्लारे, ऐश्वर्या शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. माथेरानच्या एकूण ५२ किलोमीटर परिसरातील जंगल भागात सुक्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. प्लास्टिक बाटल्या, वेफर्स ,गुटखा पाकिटे तसेच इतर प्लास्टिकजन्य सुका कचरा यावेळी सदस्यांकडून गोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे नागरी वस्तीमध्ये सुध्दा काही भागातील लोकांची आजही स्वच्छते बाबतीत मानसिकता नसल्याने आजूबाजूला गटारात कचरा टाकला जातो तो सर्व गोळा करण्यात आला. मुख्य रस्त्यावरील गटारे स्वच्छ करून पालापाचोळा,काचेच्या बाटल्या एकत्रित केल्या आहेत.मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाका, पार्किंग या भागात जवळपास ६५ गोणी कचऱ्याचे संकलन करण्यात आले.जमा करण्यात आलेला एकूण पाच ते सहा टन कचरा नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांमार्फत हातगाडी मधून डंपिंग ग्राउंडवर नेण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती. या भव्य अभियानाच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे सदस्य जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहेत.याठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम कचरा नेहमीच पहावयास मिळतो. यातील नैसर्गिक कचरा हा झाडांचा पाला असून कृत्रीम कचरा प्लास्टिक बाटल्या,पिशव्या वगैरे असतो.यासाठी सर्वांनी संकल्प करून यापुढे कापडी पिशव्यांचा वापर केल्यास निश्चितच काहीअंशी का होईना प्लास्टिक मुक्त माथेरान होण्यास सुरुवात होईल. रिझवाना शेख—नगरसेविका माथेरान

भूमी अभिलेख कार्यालयात रजा आंदोलन आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय

भूमी अभिलेख कार्यालयात रजा आंदोलन आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय अशोक गायकवाड कर्जत: विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक अर्जित रजा आंदोलन सुरू केल्याने कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. कर्मचारी कार्यालयाबाहेर असहकार आंदोलन करत उभे राहिल्याने सोमवारी सकाळपासून मोजणी, नकाशे, उतारे व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागत आहे . त्यामुळे शेतकरी, बांधकाम व्यावसायिक तसेच सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. कार्यालयाबाहेर लावलेल्या फलकावर ‘भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती (महाराष्ट्र राज्य)’ यांच्या वतीने आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कर्जत कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. १८ व २० फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणीची कामे बंद ठेवण्यात आली होती. काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर आता सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. दरम्यान, काही नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलनावर टीकाही केली. चौकट : तांत्रिक वेतन श्रेणीचा प्रश्न २०१२ पासून भूमी अभिलेख विभागातील पदांसाठी तांत्रिक शैक्षणिक अर्हता लागू करण्यात आली असली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप कारकून संवर्गाप्रमाणेच वेतन मिळत असल्याची तक्रार आहे. या संदर्भातील समितीचा अहवाल शासनाकडे सादर होऊनही निर्णय न झाल्याने असंतोष वाढला असून, आंदोलन तीव्र करण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक अर्जित रजा टाकून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कर्जत येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दररोज किमान १४ मोजणी प्रकरणांमध्ये मोजणी प्रक्रिया होत असते परंतू कार्यालयांमध्ये ०७ रोवर मशीन उपलब्ध असल्यामुळे कर्मचारी वेळेवर साईट वर पोहोचू शकत नसल्यामुळे जनतेच्या तक्रारी निर्माण होतात त्यामुळे कर्जत कार्यालयास उपलब्ध भूकरमापक यांच्या संख्यानुसार रोवर मशीन मेळाव्यात तसेच लॅपटॉप देखील मिळावेत. —शैलेश जाधव – शिरस्तेदार, कर्जत भूमिअभिलेख कार्यालय

  जिल्हा कारागृहात त्वचारोग तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न

जिल्हा कारागृहात त्वचारोग तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल यांची उपस्थिती अशोक गायकवाड अलिबाग: समता फांऊडेशन मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधीलकी जपत अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अलिबाग जिल्हा कारागृहात “त्वचारोग तपासणी शिबीर” कार्यक्रम संपन्न झाला. या आरोग्य शिबीरात डॉ.सुयश विरकर (त्वचारोगतज्ञ) यांनी बंदी बांधवांना त्वचारोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्वचारोग निदान आणि मोफत उपचार यावर भर देण्याच्या अुनषंगाने कारागृहात दाखल २९ बंद्यांची त्वचारोगबाबतची तपासणी करण्यात आली. हे आरोग्य शिबीर अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा,पुणे डॉ. सुहास वारके (भा.पो.से) व विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा पुणे योगश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या शिबिर कार्यक्रमाकरिता जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल, डॉ.सुयश विरकर (त्वचारोगतज्ञ) जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग, डॉ.निशिगंधा माळी (वैद्यकीय अधिकारी) अलिबाग, जिल्हा कारागृह, सतिश प्रभाकर जुंबळे, सोमनिंग कट्टेपा कांबळे (कारागृह शिपाई) इत्यादी कारागृह अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.

  महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न

महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे विशेष मार्गदर्शन  अशोक गायकवाड   अलिबाग :विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची…

ई रिक्षांच्या बेमुदत बंदमुळे शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

ई रिक्षांच्या बेमुदत बंदमुळे शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट मुकुंद रांजाणे माथेरान : श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे आणि त्यांना महत्वाची साथ ही ई रिक्षा समर्थकांनी दिलेल्या आर्थिक योगदानामुळे…

 गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार; राष्ट्रभक्तीचा जागर

कर्जतच्या भालिवडी कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत  गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार; राष्ट्रभक्तीचा जागर अशोक गायकवाड रायगड-कर्जत : कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त सामूहिक गीताचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत कर्जतचे तहसिलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प, पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन होताच आश्रमशाळेतील लेझीम पथकाने पारंपारिक थाटात त्यांचे जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री गुरु तेग बहादूर यांच्या स्वप्नातील ‘अखंड भारताच्या’ नकाशाची साकारलेली हुबेहूब मानवी प्रतिकृती होती. यावेळी सहभागी विद्यार्थिनींनी तिरंगी रंगांच्या टोप्या व फुगे घेऊन अखंड भारताच्या नकाशाच्या सीमारेषेवर उभे राहून प्रत्यक्ष तिरंग्याचेच स्वरूप साकारले होते. या प्रदर्शनात एका विद्यार्थिनीने श्री गुरु तेग बहादूर यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामूहिक गीतानंतर मान्यवरांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून या दिनाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. याच सोहळ्यादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी या आयोजनामागचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी विद्यार्थिनींना थोर पुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत मोलाचे मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

वन समितीच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यास मदत

वन समितीच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यास मदत मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाच्या माध्यमातून वन संरक्षण समिती कार्यरत असते. सत्ताधारी गटाच्या मर्जीतील विश्वासू कार्यकर्ते या समितीवर उत्तम प्रकारे विकास कामे करण्यासाठी नेहमीच सज्ज असतात.एकूण वीस सदस्यांची या समितीवर निवड केली जाते. जोपर्यंत सत्ताधारी गट नगरपरिषदेच्या सभागृहात अस्तित्वात असतो तोवर नेमून दिलेले कार्यकर्ते यामध्ये पन्नास टक्के महिला सदस्य असतात.ही सर्व मंडळी एकदिलाने कामे करत असतात. दस्तुरी वाहन पार्किंगच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या समितीला प्राप्त होते. त्यातूनच काहीवेळा वृक्षारोपण, ठराविक पॉईंट्सची सुरक्षा व्यवस्था, कचराकुंडी लावणे अशी महत्वपूर्ण कामे समितीचे पदाधिकारी, सदस्य करीत असतात. विशेष म्हणजे ही सर्व मोठया रक्कमेची  कामे करताना कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. समितीचे पदाधिकारी,सदस्य ह्यांच्या सामोपचारातुन कामे पूर्ण करून गावाच्या विकास कामात मदत होत असते. लाखो रुपयांची शिल्लक आजही जमा असल्याने यावेळी गावातील एकूण पाच गरजवंत महिलांना स्वच्छता कामे दिली आहेत.याकामी दर महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये पगाराच्या रूपाने या पाच महिलांना दिला जात आहे.प्लास्टिक मुक्ती त्याचप्रमाणे अन्य कचरा गोळा करण्यासाठी वन संरक्षण समितीने पुढाकार घेतला असून स्वच्छता राखण्यासाठी मदत होत आहे.यापुढे नव्याने स्थापन होणाऱ्या समितीवर सत्ताधारी गटाने बारकाईने लक्ष केंद्रित करून गावाच्या हिताच्या दृष्टीने जी काही लाखो रुपयांची शिल्लक रक्कम आहे त्याचा सदुपयोग विकास कामांसाठी करावा अशी स्थानिकांमधून मागणी केली जात आहे.

माथेरान पालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी व्हावे भास्कर शिंदे यांची मागणी

माथेरान पालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी व्हावे भास्कर शिंदे यांची मागणी मुकुंद रांजाणे माथेरान : राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या नगरपालिका क्षेत्रात ज्यावेळी विविध विषयांवर महत्वपूर्ण निर्णय अथवा विकासकामे होण्यासाठी सभा आयोजित करण्यात येते त्याबाबत इत्यंभूत माहिती गावातील जनतेला माहीत व्हावी यासाठी  होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात येत असते त्याच धर्तीवर माथेरानमध्ये सुध्दा नगरपरिषदेच्या सभागृहात होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे अशी मागणी येथील उद्योजक भास्कर शिंदे यांनी केली आहे. अनेकदा काही महत्वपूर्ण कामे परस्पर एखाद्या मर्जीतील ठेकेदाराला सुपूर्द केली जातात आणि त्यामागे खुप काही गौडबंगाल दडलेले असते. त्यामुळे होणारी विकासकामे नियोजनशून्य होऊन निधीचा अपव्यय होत असतो. ज्यावेळी सभांचे आयोजन करण्यात येते त्यावेळी चालू सभेत लोकनियुक्त सदस्य अधिकाऱ्यांचे लांगुलचालन तर करीत नाही ना किंवा एखाद्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली कोणता सदस्य नाही ना याची शहानिशा होण्यासाठी जर का सभागृहात होणाऱ्या सभांचे चित्रण प्रदर्शित केल्यास जनतेचा सुध्दा आत्मविश्वास वाढेल की ज्यांना आपण अमूल्य मत देऊन ज्यांना कार्यक्षम सदस्य समजून सभागृहात पाठवले आहे.ती मंडळी नक्कीच या गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत का ? सकारात्मक कामांना पाठबळ देत आहेत की नाही हे मतदारांना पाहणे सुध्दा आवश्यक आहे त्यामुळेच आपले मत वाया गेलेले नसून सार्थकी लागले आहे. अशा भावना निश्चितपणे त्यांना पहावयास मिळू शकतात.निवडून दिलेले लोकप्रतिनिधी खरोखरच आत्मीयतेने कामे करतात की नाही याचे ज्ञान आणि माहिती प्रत्येक घटका पर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक सभांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे परंतु सत्ताधारी गट काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रशासकीय राजवटीत कार्यालय आहे की नाही असे चित्र निर्माण झाले होते. कोणत्याही कर्मचाऱ्यांवर बंधन नसल्याप्रमाणे सर्व कारभार सुरू होता. जो तो आपल्या सोयीनुसार कार्यालयात हजर राहत होता.दिवसभरात बहुतेक कर्मचारी हे जेमतेम दोन ते तीन तास काम करताना दिसत होते.तर काही इमानेइतबारे कर्तव्य पार पाडत होते.निदान यापुढे तरी सत्ताधारी गटाचा संपूर्ण कार्यालयावर अंकुश राहील का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट काही वर्षांपूर्वीच पालीकेच्या सर्व सभा लाईव्ह केल्या जाव्यात अशी मागणी मी स्वतः तत्कालिन बहुमत असणाऱ्या सत्ताधारी गटाकडे केली होती.नगरपरिषदेच्या सर्व सभा लाईव्ह झाल्या पाहिजेत आजही या मागणीवर आम्ही ठाम आहोत.आपले लोकप्रतिनिधीं काय काम करतात,प्रभागाचे,गावाचा हिताचे निर्णय कसे घेतात हे पाहण्याची संधी लाईव्ह सभेमुळे मतदार नागरिकांना भेटू शकते. भास्कर शिंदे—उद्योजक माथेरान

माथेरान युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा

माथेरान युनियन बँकेच्या सेवेचा बोजवारा मुकुंद रांजाणे माथेरान: माथेरान मध्ये एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक असून नेहमीच या बॅंकेत सेवेचा बोजवारा पहावयास मिळत असून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सेवा उपलब्ध होण्यास दिरंगाई आणि वेळ लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. माथेरान हे पर्यटनक्षेत्र असल्यामुळे मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते सहसा कुणीही रोख रक्कम स्वतःजवळ ठेवत नसल्याने ते याच युनियन बँकेच्या भरवशावर अवलंबून असतात परंतु या बँकेचे एटीएम सुध्दा नेहमीच तांत्रिक कारणास्तव अथवा नेटवर्किंग मुळे बंद असते.याच बँकेची छोटी शाखा एका कुटूंबाकडे देण्यात आली असून त्याठिकाणी सुध्दा अनेकदा सर्व्हर डाऊन असते त्यामुळे काही व्यवहाराची कामे पूर्ण होत नाहीत. येणाऱ्या पर्यटकांना एटीएममधून पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांना बाजारात काही वस्तूंची खरेदी करता येत नाही ग्राहकांसह पर्यटक सुध्दा या बँकेच्या अकार्यक्षम सुविधेबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.माथेरान मध्ये अन्य एखादी राष्ट्रीयकृत बँक उपलब्ध व्हावी जेणेकरून ग्राहकांना याचा नाहक त्रास सोसावा लागणार नाही अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर- राजेंद्र सावंत

सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर- राजेंद्र सावंत अशोक गायकवाड अलिबाग: विधी सेवा समितीच्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येत असतात. विधी सेवा समितीकडून अनेक बाबतीत मोफत कायदेविषयक सेवा पुरविली जाते. विधी सेवा समितीच्या या कार्याची माहिती सर्वांना व्हावी तसेच सर्वांसाठी न्याय ही संकल्पना सर्वत्र पोहोचावी आणि समाजातील सर्व घटकांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी शनिवार आरसीएफ हॉल कुरूळ येथील सभागृहात संपन्न झालेल्या विधी सेवा महशिबिर, शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्यात केले. या शिबिरास जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक आँचल दलाल, जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव तेजस्विनी निराळे, जिल्हा सरकारी वकील ॲड. संतोष पवार, अलिबाग बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, जिल्ह्यातील न्यायालयांतील न्यायाधिश, शासनाच्या विविध खात्याचे अधिकारी, जिल्हा व जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समिती मधील वकील वर्ग, अनेक मान्यवर, शासकीय कर्मचारी तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत म्हणाले की, या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हे आहे. जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू जनतेला व्हावी तसेच तळागाळातील विविध समाजातील घटकांपर्यंत पोहचावी आणि कोणताही नागरिक न्यायापासून वंचित राहू नये याकरिता हा महामेळावा आयोजित करण्यात आहे. संविधानाने सर्वांना समान न्यायाची संधी दिली आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्वाचा असून सर्व घटकातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सावंत यांनी जिल्हा व तालुका स्तरावर विधी सेवा समितीकडून राबविले जाणारे विविध उपक्रम व सेवांची माहिती उपस्थितांना दिली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रायगड मधील माझ्या कारकिर्दीतील हा दुसरा महामेळावा असून अशा महामेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत कायदेविषयक ज्ञान पोहचविणे, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे हा मुख्य उद्देश असल्यामुळे महामेळावा अतिशय महत्वाचा आहे. उच्चशिक्षित व्यक्तींनाही कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा समितीने भविष्यात शाळेय स्तरावर कायद्याची तोंड ओळख देणारे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या महामेळाव्यात शासनाच्या विविध विभागांचे 32 स्टॉल लावण्यात आले असून प्रत्येक विभागांनी आपल्या असलेल्या योजनांची तातडीने, तळमळीने अंमलबजावणी करुन योजनेचा लाभ तळागाळातील दुर्बल घटकांपर्यंत पोहचवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हुडबळी नसलेला जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक माणूस हा सतत कामकाजामध्ये मग्न असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या प्रमाण शून्य असलेला हा जिल्हा आहे. जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प येत असून तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीमुळे भविष्यात रायगड जिल्हा विकासाचा केंद्र बिंदू म्हणून ठरणार आहे.याचवेळी त्यांनी महसूल खात्याकडून राबविल्या जाणाऱ्या विविध महत्त्वकांक्षी योजनांची सखोल माहिती दिली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आपल्या मनोगतात सामान्य प्रशासनाच्या विविध प्रकारच्या कर वसुलीमध्ये लोक अदालतीचा होणारा उपयोग सांगितला. तसेच त्यांच्या प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि ग्रामीण भागातील बचत गटांचे कार्य तसेच इतर बाबतीत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी आपल्या मनोगतात पोलीस विभागांकडून राबविण्यात येणारे कायदे व त्याची अंमलबजावणी याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी येथील महामेळाव्यात योजनांची मिळणारी माहिती कार्यक्रमास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे सांगितले. अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या दारी शासनाच्या योजना पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच सहकारी वकील संतोष पवार यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, विविध कायदेशीर हक्क, सरकारी योजना तसेच न्यायालयीन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात शासनाच्या विविध खात्यांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे ३२ स्टॉल लावण्यात आले होते. याच कार्यक्रमात शासनाच्या विविध खात्यांमधील लाभार्थ्यांना धनादेश तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी सांगितले की, शासनाकडून राबविण्याल्या जाणाऱ्या नाविन्य पूर्ण योजनांची माहिती तळागाळातील घटकांपर्यंत पोहचावी याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याकरिता आलेल्या सर्वांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी शासकीय योजना व कायदे विषयक असलेल्या सोयी-सुविधांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी विविध शासकीय विभागांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी करुन योजनांची माहिती जाणून घेतली.