Category: रायगड

raigad news and updates

महेंद्र थोरवे मार्गदर्शनाखाली शिवमंदिराचा जीर्णोद्धार

माथेरान : कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील शिव मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सोहळा शनिवार दि. 18 मे रोजी उत्साहात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने संपन्न झाला. शनिवारी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, होम हवन, भजन कीर्तन यासह भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिव मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी श्रीरंग आप्पा बारणे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून यथोचित सत्कारही केला.तीन दिवस जीर्णोद्धार कामी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कर्जत (पोसरी) येथील मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री महादेवाचे दर्शन घेतले. त्यामुळे पोसरी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या आध्यात्मिक कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. पोसरी येथे पुरातन काळापासून असलेल शंभू महादेवाच मंदिर हे आम्हा ग्रामस्थांच नेहमीच श्रद्धास्थान राहिल आहे त्यामुळे या शिव मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अत्यंत जवळून काम करण्याची संधी मला मिळाली आणि आज हे शिव मंदिर पूर्ण झाल्यानंतर एक ग्रामस्थ म्हणून मलाही मनस्वी समाधान मिळत आहे -महेंद्र थोरवे आमदार, कर्जत विधानसभा

एसटीपी ठेकेदाराकडुन रस्ते पूर्ववत करण्यास शर्थीचे प्रयत्न सुरू !

पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी माथेरान : दरवर्षी माथेरान मध्ये अडीचशे ते तीनशे इंच पावसाची नोंद होते. अतिवृष्टीमुळे नेहमीच रस्त्यावर पावसाळी पाणी वाहून जात असल्याने रस्त्यांची वाताहत होते यासाठी सनियंत्रण समितीच्या परवानगीने माथेरान या अतिसंवेदनशील क्षेत्रात रस्त्याची धूप थांबविण्यासाठी क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार गावातील अनेक ठिकाणी सुरुवातीला पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते त्यानंतर दस्तुरी ते पांडे रोड पर्यंतच्या मुख्य मार्गावर धुळीमुळे व्यापारी वर्गाचे दुकानातील सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान व्हायचे यासाठी हा मुख्य रस्ता धूळविरहित करण्यासाठी एमएमआरडीए च्या माध्यमातून काम सुरू केले होते परंतु अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या कामावरसुध्दा नेहमीप्रमाणे आक्षेप घेण्यात आल्यामुळे हे महत्वपूर्ण काम अर्धवट स्थितीत आहे. नुकताच सांडपाणी प्रक्रिया कामी रस्त्यांची खोदाई करून मलनिस्सारण पाईप लाईन टाकण्यात आली आहे.हे रस्ते खोदताना जे काढलेले पेव्हर ब्लॉक होते ते पुन्हा लावू नये असा पवित्रा  विकासाला विरोध करणाऱ्या गावातील काही मंडळींनी घेतला होता.त्यामुळे जर का ह्या खोदलेल्या रस्त्यांवर काढण्यात आलेले पेव्हर ब्लॉक लावले नसते तर आगामी काळात अतिवृष्टीमुळे लोकांच्या घराघरात पावसाळी पाणी जाऊन वित्तहानी झाली असती याकामी गावातील अन्य काही अभ्यासू,गावाचे हित पाहणाऱ्या लोकांच्या आग्रहास्तव हे रस्ते अबाधित राहण्यासाठी, गावाची सुंदरता टिकून रहावी धुळीचे साम्राज्य पसरू नये यासाठी संबंधीत ठेकेदाराला सूचित केल्यावर रस्ते पूर्ववत करण्यात येत आहेत. सनियंत्रण समितीने मुख्य रस्त्यावरील नवीन क्ले पेव्हर ब्लॉकचा विषय न्यायालयात प्रविष्ट असल्याने ब्लॉकचे नवीन काम बंद केले आहे. काही राजकीय पक्षांची मंडळी येथील काही भोळ्या भाबड्या लोकांना हाताशी धरून आतापर्यंत जी जी विकासकामे झाली आहेत त्यास केवळ आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी विकासाला विरोध करत आहेत. परंतु राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून शासनाच्या वतीने येणाऱ्या विकासकामांला नाहक विरोध करून सर्वसामान्य लोकांचे आणि भावी पिढीला अधोगतीला नेण्यास कारणीभूत ठरत आहेत. जर इथल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना या गावात पर्यटन क्रांती घडवायची असेल तर विकास कामांना सहकार्य करणे ही काळाची गरज आहे. श्रेयवादामुळे आर्थिक लाभासाठी झटणारी काही मंडळीना गावाबद्दल काहीही सहानुभूती नसून आपला स्वार्थ कसा साधता येईल याकडेच त्यांचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे. असे सूर सर्वत्र स्थानिकांमधून  ऐकावयास मिळत आहेत. ——————————————————- क्ले पेव्हर ब्लॉक ही माथेरानचे रस्ते बनविण्याकरिता काळाची गरज आहे. दर वर्षी माथेरान मध्ये जास्त पाऊस होत असल्यामुळे रस्ते वाहून जात होते याचा विचार करून मॉनेटरिंग कमिटीने क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला. परंतु अर्धा रस्ता झाल्यानंतर या ब्लॉकला विरोध होतोय. दगड मातीचे रस्ते बनविन्याकरिता मोठया प्रमाणात दरवर्षी दगड माती उपलब्ध  होत नसल्याने भविष्यात  माथेरानचे संपूर्ण रस्ते बनविण्याकरिता क्ले पेव्हर ब्लॉक शिवाय पर्याय उरलेला नाही. वसंत कदम—-अध्यक्ष शिवगर्जना मित्र मंडळ माथेरान

सुप्रसिध्द भजन गायक समर्थबुवा पाटील यांचा तिरुपती येथे संगीत भजनाचा कार्यक्रम

अशोक गायकवाड अलिबाग :रोहा तालुक्यातील दापोली गावचे रहिवासी व अलिबाग येथे वास्तव्यास असलेले, सुप्रसिध्द भजन गायक समर्थबुवा पाटील यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम २७ मे ला दुपारी आंध्र प्रदेशातील ‘ तिरुपती तिरुमाला देवस्थान’ येथे सादर होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे. तिरुपती देवस्थान तर्फे प्रायोजित या भजनाचे थेट प्रक्षेपण ‘एस व्ही बी सी’ या चॅनेल वर ” नाद निराजमन ‘ या कार्यक्रमातून दुपारी ठीक ३:१० ते ४:३० वा. पर्यंत सादर होणार आहे.जेष्ठ भजन गायक पं. हरिश्चंद्र बुवा लोणारकर यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित संगितबद्ध केलेल्या विविध भजन रचना या कार्यक्रमात सादर केल्या जातील. समर्थ बुवांना हार्मोनियम वर साथ नरेशबुवा कडू, तबला साथ जगदीश पाटील-लोणारकर करतील . तरुण , होतकरू कलाकार विराज म्हात्रे ( मानी ) हे पखवाज वर साथसंगत करतील. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे. अनेक प्रतिष्ठित देवस्थान ठिकाणी या मंडळाने भजन सेवा सादर केल्या आहेत. श्रीविठ्ठल रखुमाई देवस्थान पंढरपूर, श्री अंबाबाई देवस्थान कोल्हापूर, श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, ख्वाजा हजरत मोईनउद्दीन चिस्ती दर्गा अजमेर- राजस्थान, श्री अगस्ती आश्रम अकोले, महर्षी चांगदेव देवस्थान पुणतांबा, ई. चा समावेश आहे. तिरुपती देवस्थान मध्ये कार्यक्रम सादर करण्याची ही सहावी वेळ असून मुख्य रंगमंचा वर तिसऱ्यांदा मिळालेल्या या भजन संधी बद्दल वायशेत येथील श्री. गंगादेवी भजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी देवस्थान चे आभार व्यक्त केले आहेत व अधिकाधिक भजन रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

हॉटेल धारकांना पाणी मस्त ,नागरिक पाण्याविना त्रस्त !

वीज, पाणी नॉट रीचेबलमुळे पर्यटनावर परिणाम माथेरान : मागील तीन दिवसांपासून माथेरान मध्ये वीज आणि पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने ऐन सुट्टयांचा हंगाम असताना याचा पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यातच ई रिक्षांना चार्जिंग नसल्याने ही सेवा सुध्दा कोलमडून गेली होती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना सुध्दा दूरवर शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागली आहे.शारलोट लेक येथे जनरेटर असताना देखील त्याचा वापर न केल्यामुळे पाणी पुरवठा केला गेला नाही. तर संध्याकाळच्या दरम्यान तीन दिवस सतत वादळी वारा आणि पाऊस यामुळे नेटवर्किंग सेवा उपलब्ध होऊ शकली नाही. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आणि सततच्या विजेच्या लपंडावामुळे उष्मां अधिक जाणवत होता. विशेष म्हणजे येथील हॉटेल धारकांना मुबलक पाणी पुरवठा केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हॉटेल धारक कधीच स्थानिकांनी उभारलेल्या आंदोलनात अथवा ग्रामस्थांशी हितसंबंध ठेवत नाहीत. मुळात त्यांची अनधिकृत वाढीव बांधकामे असल्याने हॉटेल धारक शासनाच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. त्यांना मुबलक पाणी पुरवठा केला जातो आणि गावातील नागरिकांना पाण्यावाचून दिवस काढावे लागतात हा जरी संशोधनाचा विषय असला तरी जे माजी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे पण पदाशिवाय इथली नेतेमंडळी पुढाकार घेत नाहीत हे दुभाग्यच म्हणावे लागेल असे स्थानिक बोलत आहेत.

कर्जत तालुक्यात वारा, वादळ व पावसामुळे महावितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान 

वीजपुरवठा पुर्ववत करण्याची कामे युध्दपातळीवर रायगड : दि.१३ मे २०२४ रोजी वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे रायगड जिल्हा हवामान विभगाकडून खबरदारीच्या सूचना करण्यात आले होते. या दिवशी, कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार, वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने,वीज पुरवठ्याची वाताहात होऊन, तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. बऱ्याच  ठिकाणी उच्चदाब व लघुदाब  वाहिनीचे पोल पडले होते, विद्युत रोहित्र निकामी झाले होते. आशा प्रसंगी महावितरण कर्जत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून खंडित वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे प्रयत्न करीत होते. सोमवारी झालेली पडझडीमुळे विस्कळीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येत होता व बहुतांशी भागाचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे . परंतु दि. १६ मे २०२४ रोजी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने व भोगावणाऱ्या वाऱ्याने कर्जत तालुक्यात पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे महावितरणचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नेरल इन्कमर उच्चदाब  वाहिनीवर ७ पोल, कडाव उच्चदाब  वाहिनीवर १७ पोल व अंजप उच्चदाब  वाहिनीवर ७ पोल पडल्याच्या घटना संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारस समोर आलेले आहेत. प्रसंगी लघुदाब  वाहिनीचे अंदाजे ५० पोल पडले आहेत. या घटनेमुळे कर्जत तालुक्यातील बऱ्याच गावांचा वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. अशा परिस्थितीत वीज ग्राहकांना वीजपुरवठा विना गैरसोय होत आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे क्षतीग्रस्त वीजवाहिन्या, पोल, डीपी , इत्यादी   महावितरण तर्फे सदर काम लवकरात लवकर करण्याचा अथक प्रयत्न चालू असून, सदर वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे कामे युध्दपातलीवर  सुरु आहेत.  तरी, महावितरण भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी कर्जत तालुक्यातील वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे अहवान केले  आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देणार-पुनिता गुरव

अशोक गायकवाड रायगड : जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करु नयेत.…

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी

१० जून पूर्वी अर्ज सादर करा – शशिकला अहिरराव अशोक गायकवाड रायगड :सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली मध्ये प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश घेवून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज १० जून २०२४ पूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण ता.पेण येथे सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण शशिकला अहिरराव यांनी केले आहे.* या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, यासाठी मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.१ लाख इतकी असावी, इयत्ता १ ली ते प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ६ वर्षे पूर्ण असावे, वय ३१ डिसेंबर २०२४ रोजी ६ वर्षे पूर्ण असावे, त्याचा जन्म ०१ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान झालेला असावा, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा जन्माचा दाखला तसेच, अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे, आधारकार्डची झेरॉक्स जोडण्यात यावी, विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत, खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या/पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही.

98 हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन

रायगड जिल्ह्यात खरिप हंगामात अलिबागः रायगड जिल्ह्यात येत्या खरिप हंगामात 98 हजार 487 हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.  3 हजार 23 हेक्टरवर नाचणीची लागवड होणार आहे.  यंदाच्या खरिप हंगामात एकूण 1 लाख 1 हजार 510 हेक्टर क्षेत्रावर  पिकांची लागवड करण्यात येणार आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 400 हेक्टर जास्त भात  लागवडीचे  नियोजन  नयोजन जिल्ह्याच्या कृषी विभागाने केले आहे. रायगड जिल्हा   भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे शेतीक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे देखील शेतजमीन नापिक  होत  आहे. शेती परवडत नाही म्हणून शेतकरी शेती करत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस भाप लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतकरण्यासाठी प्रात्साहन देण्या करिता कृषिविभाग प्रयत्न करत असतो. यंदा देखील कृषिविभागाने भात लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 400 हेक्टर जास्त क्षेत्रावर भात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी 89 हजार 463 हेक्टरवर भातपिकाची लागवड झाली होती. यावर्षी सुमारे 400 हेक्टरने भाताचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यात 13 हजार हेक्टर, मुरुड 3 हजार 234 हेक्टर, पेण तालुक्यात 11 हजार 553 हेक्टर, खालापूर तालुक्यात 2 हजार 852 हेक्टर, पनवेल 8 हजार 705 हेक्टर, कर्जत तालुक्यात 9 हजार 110 हेक्टर, उरण तालुक्यात 2 हजार 436 हेक्टर, माणगाव तालुक्यात 11 हजार 526 हेक्टर, तळा तालुक्यात  2 हजार 120 हेक्टर, रोहा तालुक्यात 10 हजार 645 हेक्टर, सुधागड-पाली तालुक्यात 5 हजार 420 हेक्टर, महाड तालुक्यात 10 हजार 588 हेक्टर, पोलादपूर 3 हजार 235 हेक्टर, म्हसळा तालुक्यात 2 हजार 460 हेक्टर, श्रीवर्धन तालुक्यात 1 हजार 603 हेक्टर असे 98 हजार 487 हेक्टवर भात पिकाचे नियोजन आहे. रायगड जिल्ह्यातील यंदा खरिप हंगामात 3 हजार 23 हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यचे नियोजन करण्यात आले आहे.मागील वर्षी 2 हजार 761 हेक्टरवर नाचणी पिकाची लागवड झाली होती. यंदा  अलिबाग तालुक्यात 85 हेक्टर, पेण तालुक्यात 175 हेक्टर, खालापूर तालुक्यात 45 हेक्टर, पनवेल 40 हेक्टर, कर्जत तालुक्यात 125 हेक्टर, माणगाव तालुक्यात 868 हेक्टर, रोहा तालुक्यात 315 हेक्टर, तळा तालुक्यात 200 हेक्टर, सुधागड-पाली तालुक्यात 250 हेक्टर, महाड तालुक्यात 210 हेक्टर, पोलादपूर 270 हेक्टर, म्हसळा तालुक्यात 348 हेक्टर, श्रीवर्धन तालुक्यात 92 हेक्टर असे 3 हजार 23 हेक्टरवर नाचणी पिकाचे नियोजन आहे.

माथेरानच्या जान्हवी शिंदेला सीबीएसई दहावीच्या परीक्षेत घवघवीत

माथेरान : माथेरानच्या जान्हवी सुरेश शिंदे हिने सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. जान्हवीने 94.96 टक्के गुण प्राप्त केले असून तिने ( मुंबई )परेल येथील सोशल सर्व्हिस लीग या शाळेतुन मार्च मध्ये दिल्लीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला.  शिक्षिका मिस पद्मा, मिस भूमी लालन, मिस मीना मकवाना , मिस ताहीरा, मिस जरीन या  शिक्षकांनी उत्तम रित्या अभ्यास करून घेतल्याने इतके गुण प्राप्त करू शकले अशी भावना जान्हवी हिने व्यक्त केली व डॉक्टर बनण्यासाठी भरपूर मेहनत घेणार असल्याचे तिने सांगितले  जान्हवीचे पालक  सुरेश व अंकिता शिंदे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की आम्ही तिच्यावर अभ्यासाचे कोणतेही दडपण येऊ दिले नाही मोठ्या अपेक्षा लादल्या नाहीत तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. प्रा गवाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेंट झेव्हिएर्स शाळेचे शिक्षक योगेश जाधव, मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला अध्यक्षा प्रतिभा घावरे  , कुलदीप जाधव, वर्ष्या शिंदे , सुहासिनी दाभेकर यांनी जान्हवीचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

कर्जतमध्ये मतदानावर पावसाचे विघ्न अजित नैराळे, डॉ. शीतल रसाळ, आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया संपन्न अशोक गायकवाड कर्जत : देशाच्या १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे. मावळ मतदारसंघात ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवार,( दि. १३ मे )रोजी पार पडले. यामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३.३० मिनिटांच्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सायंकाळी बाहेर पडणारा मतदार पाऊसामुळे अडकून पडला. दरम्यान, पावसाच्या विघ्नामुळे मतदानाच्या टक्क्यांवर देखील परिणाम झाला आहे.ही निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली. मावळ मतदारसंघात गेले काही दिवस प्रचाराच्या तोफा धडधडत होत्या. अशात दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने असल्याने लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर सोमवार,(दि. १३ मे) रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तर शहरी भागात साधारण ११ नंतर तुरळक मतदार दिसत होते. ११ नंतर उन्हाचा तडाखा बसत असला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. तालुक्यातील किरवली, हलिवली,कर्जत दहीवली, कशेळे, धामोते, नेरळ दहीवली, कोठिंबे आदी भागात दुपारी देखील मतदार गर्दी करून होते. तर धामोते, कर्जत दहीवली येथील मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकार वगळता बाकी ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले. तसेच नेरळ येथील ८१ क्रमांक आनंदवाडी केंद्रावर दिव्यांगासाठी विशेष केंद्र तयार करण्यात आले होते. दरम्यान, १८९ कर्जत मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.१५ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत १४.२७ %, दुपारी १ वाजेपर्यंत २९.४७ %, दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.०३% तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान पार पडले. अशात दुपारी ३.३० वाजता अवकाळी पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे ऊन कमी झाल्यावर बाहेर पडण्यासाठी थांबलेला मतदार अडकून पडला. साहजिकच याचा फटका हा उमेदवारांना बसणार आहे. मावळ मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य सोमवार, दि.१३ मे) रोजी मतपेटीत बंद झाले आहे. येत्या ४ जून रोजी निकाल असणार आहे. तेव्हा या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांना पथक निहाय एकूण १ हजार १७ बॅलेट युनिट, ३४९ कंट्रोल युनिट आणि ३४९ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप केले होते. ही प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी  विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली.