Category: ठाणे

Thane news

 आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ आता ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी अनिल ठाणेकर ठाणे, शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पालकांना आता ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी केवळ १ किमी अंतरातील शाळा निवडण्याची मर्यादा असताना आता पालकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे अधिकाधिक पात्र बालकांना इच्छित शाळांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, १६ मार्चपर्यंत ज्या पालकांनी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांना अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित पालकांना पोर्टलवर पॉप-अप विंडोच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत अधिकाधिक पात्र बालकांचा समावेश व्हावा, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार अर्ज भरण्याची मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शाळांच्या अंतराची अट शिथिल केल्यामुळे पालकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सर्व पात्र पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत.” तरी सर्व संबंधित पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करून अथवा नवीन अर्ज सादर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व शाळांनी ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

धर्मराज फाऊंडेशन आयोजित निळजे लोढा पलावा महोत्सव उत्साहात संपन्न

धर्मराज फाऊंडेशन आयोजित निळजे लोढा पलावा महोत्सव उत्साहात संपन्न दिवा: धर्मराज फाउंडेशनच्या वतीने निळजे लोढा पलावा येथे आयोजित करण्यात आलेला ‘निळजे लोढा पलावा महोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या महोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, निळजे येथे २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात उदघाटन समारंभासह सांस्कृतिक कार्यक्रम, लोकगीतांचे कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, ब्युटी मेकअप स्पर्धा, फॅशन शो तसेच महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम असे विविध उपक्रम पार पडले. विशेष म्हणजे महिला दिनानिमित्त महिलांसाठी मार्गदर्शन व खेळ पैठणी यांसारख्या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच “एक शाम बुजुर्गों के नाम” या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मराज फाउंडेशनचे अध्यक्ष महेंद्र धर्मराज पाटील तसेच सर्व कमिटी सदस्य, महिला कमिटी आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महोत्सवामुळे परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व मान्यवर, सहकारी व उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

शाहीर सिताराम शिंदे व लेखिका दीपा पवार यांना महा. अनिसचा ‘समता सन्मान पुरस्कार’ बहाल

शाहीर सिताराम शिंदे व लेखिका दीपा पवार यांना महा. अनिसचा ‘समता सन्मान पुरस्कार’ बहाल अनिल ठाणेकर ठाणे, विवेक जागर संस्था अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्हा यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘समता सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते, गीतकार व गायक शाहीर सिताराम शिंदे तसेच लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा पवार यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम जनता केंद्र, ताडदेव, मुंबई सेंट्रल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंनिसचे राज्य पदाधिकारी विजय परब, नंदकिशोर तळाशीलकर, पत्रकार अमेय तिरोडकर, व्हिजन फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच मुंबई जिल्ह्यातील विविध शाखांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर शिंदे यांनी अंनिससाठी लिहिलेल्या गीतांनी झाली. घाटकोपर शाखेच्या निर्मला माने यांनीही स्वरचित गीत सादर केले. ‘Give to Gain’ या महिला दिनाच्या थीमवर आधारित सत्रातून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष यश यांनी प्रास्ताविक करत स्त्री-पुरुष समानतेविषयी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मान्यवरांचे व्हिडिओ प्रदर्शित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तुषार शिंदे यांनी दीपा पवार यांची, तर संदेश बालगुडे यांनी शाहीर सिताराम शिंदे यांची मुलाखत घेतली. दीपा पवार यांनी आपल्या खडतर आणि अंगावर काटा आणणाऱ्या जीवनप्रवासाविषयी सांगताना भारतातील सुमारे ११ टक्के म्हणजे जवळपास १५ कोटी लोक नोंद नसलेल्या श्रेणीत जगत असल्याचे वास्तव मांडले.पालावरच्या जीवनातून आंतरराष्ट्रीय परिषदांपर्यंतचा प्रवास ‘माझ्या समस्या मीच मांडेन’ या प्रेरणेने घडल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील वंचित घटकांच्या समस्या जगासमोर मांडत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शाहीर सिताराम शिंदे यांनी पत्रिकेतील भाकितामुळे परिचित कुटुंबातील लग्न मोडल्याची घटना पाहिल्यानंतर अशा अंधश्रद्धांविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्र अंनिसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. महिलांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी आशयसंपन्न गाणी त्यांनी लिहिली असून ती महाराष्ट्रभर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. “मला सत्कार करून निवृत्त करू नका; तुमच्यासोबत काम करत राहायचे आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना पत्रकार अमेय तिरोडकर म्हणाले की, सध्याच्या पत्रकारितेवर भाष्य करत समाजात प्रश्न निर्माण करणारी पत्रकारिता आवश्यक आहे. दीपा पवार व शाहीर शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याचे त्यांनी कौतुक केले. ‘समता सन्मान’ हा केवळ सोहळा नसून विचार पुढे नेणारा उपक्रम आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका सवाखंडे यांनी केले. शेवटी ‘हम होंगे कामयाब’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांची उपांत्य फेरीत धडक दिली.

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६ शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांची उपांत्य फेरीत धडक दिली. ठाणे :- शिवशंकर, जय बजरंग-वाशिंद, मोरया क्रीडा, जय हनुमान-काल्हेर यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धेत उपांत्या फेरीत धडक दिली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील  खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात सुरु असलेल्या प्रथम श्रेणी पुरुषांच्या उपांत्यापूर्व फेरीत कल्याणच्या शिवशंकर मंडळाने विजय क्रीडा मंडळाचा प्रतिकार ४१-३१ असा मोडून काढत उपांत्या फेरी गाठली. पूर्वार्धात लोण देत २३-१६ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशंकरने उत्तरार्धात आणखी एक लोण देत १० गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. मंगेश सोनावणे, सुमित साळुंखे यांच्या धारदार चढयांना तुषार भोईर याची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. विघ्नेश चौधरी, रोनक पाटील यांचा चढाई पकडीचा खेळ विजय मंडळाचा पराभव टाळण्यास दुसऱ्या सामन्यात जय बजरंग-वाशिंद संघाने श्री समर्थ मंडळावर ४१-१९ अशी सहज मात केली. आक्रमक खेळ करीत जय बजरंगने पहिल्या डावात २ लोण देत २५-०८ अशी आघाडी घेत आपला विजयाचा पाया रचला. दुसऱ्या डावात सावध खेळ करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. राजू कथोरे, दर्शन पवार यांच्या झंझावाती चढयांना अतुल देसलेची मिळालेली पकडीची साथ यामुळे जय बजरंगने सहज विजय मिळविला. श्री समर्थच्या ओमकार म्हात्रेचा या सामन्यात प्रभाव पडला नाही. मोरया मंडळाने जय बजरंग-खारेगाव संघाचा ५०-२४ असा पाडाव करीत उपांत्या फेरी गाठली. विश्रांतीपर्यंत ३लोण देत ३०-१० अशी आघाडी घेत मोरयाने आपला विजय आधीच  निश्चित केला होता. विश्रांतीनंतर औपचारिकता पूर्ण करीत आणखी एक लोण देत सामना आपल्या खिशात टाकला. परेश हरड, धीरज तरे, अजय पाटील यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जय बजरंगच्या सोहम मोरे, आर्यन पाटील यांची या सामन्यात मात्र चालली नाही. शेवटच्या सामन्यात जय हनुमान-काल्हेर संघाने हुतात्मा शांतराम संघावर ३७-०८ असा सहज विजय मिळविला. गौरव पाटील, हर्ष भोईर, वैभव पाटील यांच्या तुफानी खेळाने हा विजय सोपा केला.

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे २८ मार्च रोजी ‘मर्मबंधातली ठेव’

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे २८ मार्च रोजी ‘मर्मबंधातली ठेव’ पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्मृत्यर्थ विशेष कार्यक्रम ठाणे : पंडित प्रभाकर कारेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २८ मार्च रोजी दुपारी `मर्मबंधातली ठेव’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना मोफत प्रवेश असून, कार्यक्रमाच्या प्रवेशिका ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांचे दादा पाटील वाडी येथील जनसंपर्क कार्यालय व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले आणि विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या गायकीचा ठसा रसिकमनांवर गेली अनेक वर्षे उमटविणारे अलौकिक स्वरप्रतिभा, कसदार आणि भारदस्त आवाज लाभलेले तसेच दाणेदार आकर्षक तानांसाठी ओळखले जाणारे गुरुतुल्य गायक आणि गोमंतकीय रत्न, पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर अर्थात सर्वांचे लाडके कारेकर बुवा होत. शास्त्रीय गायनाव्यतिरिक्त त्यांनी अभंग, नाट्यसंगीतात आपली विशेष छाप पाडली आणि नाट्यसंगीताचे वेड असलेल्या रसिकमनावर अधिराज्य गाजवले. बऱ्याच संगीत नाटकातील प्रसिद्ध नाट्यपदं तसेच अभंग,भावगीतं कारेकर बुवांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली, त्यांच्या नावावर कोरली गेली आणि लोकप्रिय झाली. प्रिये पहा, चंद्रिका ही जणू, सुकांत चंद्रानना, धन्य आनंद दिन, शतजन्म शोधिताना, बोलावा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, ही त्यातील काही निवडक गाजलेली गीते आहेत. कारेकर बुवांच्या याच गाजलेल्या, आणि काही निवडक रचनांचा “मर्मबंधातली ठेव” हा कार्यक्रम होणार आहे. गायक श्रीरंग भावे, ओंकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी, गोव्यातील संदेश खेडेकर आणि कारेकर बुवांचे जेष्ठ शिष्य आणि ठाण्यातील नामवंत गायक पंडित सुरेश बापट हे कारेकर बुवांना सांगीतिक मानवंदना देतील. नीला सोहनी, हर्षल काटदरे, सुहास चितळे, गणेश मेस्त्री आणि धनंजय पुराणिक या प्रतिथयश वादकांची समर्पक साथ लाभणार आहे. तसेच अनघा मोडक या निवेदनाची धुरा सांभाळतील.

एकनाथ शिंदेंकडून आमदार मंदा म्हात्रे यांच्या तब्बेतीची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस

एकनाथ शिंदेंकडून आमदार मंदा म्हात्रे यांच्या तब्बेतीची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस अनिल ठाणेकर ठाणे, बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची विचारपूस केली. मंदा म्हात्रे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मंदा म्हात्रे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी त्यांना धीर देत, “आपण तब्येतीची पूर्ण काळजी घ्या. मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपण लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हाल,” असे सांगितले. या घटनेनंतर बेलापूर मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे. मंदा म्हात्रे या बेलापूर मतदारसंघातील सक्रिय आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समजताच अनेकांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्षपदी मेधा पाटकर यांची फेरनिवड

श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्षपदी मेधा पाटकर यांची फेरनिवड अनिल ठाणेकर ठाणे : श्रमिक जनता संघ युनियनचे हीरक महोत्सवी वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन रविवारी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ११५ मध्ये आयोजित करण्यात आले होते. या वेळी संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. तर सरचिटणीसपदावर सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांची निवड करण्यात आली आहे. ठाण्यातील कळवा येथील महापालिका शाळा क्रमांक ११५चे सभागृहात रविवारी १५ मार्च रोजी संपन्न झालेल्या श्रमिक जनता संघ युनियनच्या हीरक महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. दिवसभर चाललेल्या या सभेत अध्यक्षपदी – मेधा पाटकर, उपाध्यक्षपदी – डॉ संजय मंगला गोपाळ व पर्वत सोनेर, सरचिटणीस – जगदीश खैरालिया, चिटणीस म्हणून सुनील कंद, सुनील दिवेकर, संजय चौहान आणि खजिनदार पदावर अविनाश नाईक, सहखजिनदार म्हणून सुदर्शन साहु यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. या वेळी नआणि मध्य प्रदेशातील युनियनच्या विविध आणि महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण, भुसावळ, नंदुरबार सह मध्य रेल्वेच्या युनियनचे सभासदांनी निवडलेले राष्ट्रीय जनरल कौन्सिल आणि राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्यांची देखील निवड झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. श्रमिक जनता संघ युनियनची स्थापना स्वातंत्र्य सेनानी वसंतराव खानोलकर यांनी १९६६ साली केली होती.  हीरक महोत्सवी वर्ष साजरा करताना कामगारांच्या न्याय हक्कांसाठी १९७५ पासून प्रदीर्घ काळ केवळ श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार कार्यकर्ता ते श्रमिक अधिवक्ता म्हणून झटणारे ज्येष्ठ विधिज्ञ यांचे युनियनच्या अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते विशेष गौरव या वेळी करण्यात आले.  या वेळी ॲड रविंद्र नायर यांनी बोलताना सांगितले की, कामगारांना फक्त कोर्टाच्या लढाईने न्याय मिळू शकत नाही तर न्यायासाठी कामगारांची संघटित शक्ती व रस्त्यावरील आंदोलने ही आवश्यक आहे. संघटना व कानूनी संघर्ष साथ साथ असणे आवश्यक आहे. फक्त श्रमिकांच्या बाजुंनी उभं राहण्याचा आमच्या सारख्या काही वकीलांनी संकल्प केला आहे. मात्र ही संख्या हवी तितकी नाही.ही सुध्दा वस्तुस्थिती आहे.सर्वसाधारण सभेचे समारोप करताना वरिष्ठ अधिवक्ता रवींद्र नायर यांचं विशेष सत्कार करताना युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी सांगितले की, आज युनियनच्या हीरक महोत्सवी वार्षिक सभेत रस्त्यावर लढाई सुरू असताना कानुनी लढाईत श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे रवींद्र नायर सारख्या खर्या हिर्याचं गौरव करताना खूप आनंद होतो आहे. श्रमिक जनता संघ युनियनला अनेकदा अडचणीच्या प्रसंगी नायर यांचा सल्ला आम्हाला मोलाचा ठरला आहे. आपल्या युनियनच्या कार्यकर्त्यांनी संघटनेची भूमिका व विचारधारेला अनुसरून कार्य करत राहण्याचा निर्धार आवश्यक आहे. कोणत्याही कायदेशीर अधिकार पेक्षा शसंवैधानिक अधिकार श्रेष्ठ आहे आणि संवैधानिक हक्कांपेक्षा ही मानवी हक्के अधिक महत्त्वाची आहेत. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी होणारी दिरंगाई म्हणजेच न्याय नाकारणे अर्थात अन्यायच आहे. अनेक कायदे अस्तित्वात असताना योग्य व वेळेवर अंमलबजावणी होत नसल्याने श्रमिकांचे प्रचंड प्रमाणात शोषण होत आहे. स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षेचा कायदा अस्तित्वात असताना देखील शासन पुढाकाराने हस्तक्षेप का करत नाही? इतकेच नव्हे तर किमान वेतन अधिनियम १९४८ ची अंमलबजावणी खुद्द महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग करत नसल्याने ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना सहा सहा वर्षे कि मान वेतन कायद्यानुसार वेतन मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. परंतु “सत्य परेशान हो सकता है अपराजित नहीं!” आपल्या न्याय हक्कांसाठी सातत्याने अश्या वेळी आम्हालाच करावं लागतं. हे लोकशाही देशात भूषणावह नाही. आता तर केंद्र सरकारने कामगार हिताचे ४४ कामगार कायद्यांपैकी २९ कामगार हिताचे कायदे निरस्त करून मालक हितासाठी ४ श्रम संहिता लागू करत आहेत. कामगार कायद्याचे आधार घेऊन आम्ही बाजू मांडत होतो, आता सरकारने कामगार कायद्यात बदल करून  मालक वर्गाला श्रमिकांच्या न्याय हक्कांवर अतिक्रमण करण्याची खुली सूट सरकारने दिली जाणार आहे..समता, बंधुता, न्याय आणि श्रमिक अधिकार ही मंजिल श्रमिक जनता संघाने स्वीकारली आहे. आता एकजुटीने अंतिम क्षणापर्यंत संवैधानिक व मानवी हक्कांसाठी अहिंसक मार्गाने संघर्ष करण्याचा आपला निर्धार करूया, असं आवाहन ही त्यांनी केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल ते जागतिक कामगार दिन १ मे २०२६ पर्यंत  युनियनच्या सर्व युनिट्स वर विविध कार्यक्रम आयोजित करून “ श्रमिक जागरण पंधरवडा “ साजरा करण्याची घोषणा ही शेवटी त्यांनी केली.अधिवेशनात कामगार कष्टकरी जनसमुहांच्या हितासाठी किमान वेतन अधिनियमाची अंमलबजावणी व दर पाच वर्षांनी किमान वेतनाचे मुल्यांकन करून श्रमिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी योग्य वेतन दर लागू करावे, श्रमिकांचे आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य कामगार विमा योजना लागू होण्यासाठी मासिक वेतन मर्यादा एकवीस हजारांपासून किमान पन्नास हजार रुपये करावी, धनिकांच्या संपत्ती वर किमान दोन टक्के टैक्स लावा जेणेकरून सामान्य नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर योजनांसाठी निधी उपलब्ध होईल, श्रमिकांवर शोषण करणाऱ्या मालक धार्जिण्या चार श्रमसंहिता रद्द करा, कामगार हिताचे प्रभावी कायदे अंमलात आणा, ठेका मजदूरांना न्याय, श्रमिक वस्त्यांमध्ये निवारा, शुद्ध पाणी, दवाखाने, शिक्षण, शौचालय आदी जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्या, महिलांना सन्मान, नशाबंदी हो. आदी विविध प्रस्तावावर सखोल चर्चा होऊन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.अधिवेशनात श्रमिक जनता संघ युनियनच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विविध युनिट्सचे दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ठाण्यातील पाणी पुरवठा विभागाचे संघटक गणेश चव्हाण, रस्ता सफाईचे भास्कर शिगवण, शिक्षण विभागाचे सुनील दिवेकर, नरेश घाणेकर, विशाल कांबळे, संतोष देशमुख, अजय भोसले आदींसह समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव लतिका सुमो. यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष श्रम घेतले.

 क्लस्टर योजनेविरोधात २७ गावांतील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक

क्लस्टर योजनेविरोधात २७ गावांतील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक परिपत्रक फाडत, जाळून केला निषेध व्यक्त कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या क्लस्टर योजने विरोधात स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून  या पार्श्वभूमीवर २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समिती आणि येथील नागरिकांनी आज केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. यावेळी या शासन निर्णयाची होळी करत आणि परिपत्रकाचे कागद फाडत निषेध व्यक्त केला. क्लस्टर योजना, ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन बिझनेस हब यांसारख्या विविध योजनांमुळे २७ गावांतील स्थानिक नागरिक व भूमिपुत्रांवर परिणाम होत आहे. २७ गावांचा विकास नाही, सुविधा नाही तर मग मालमत्ता कराची सक्ती चालणार नाही अशी भूमिका यावेळी या नागरिकांनी घेतली. यावेळी मोर्चेकर्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकत लवकरच केडीएमसी महापौर, आयुक्त, २७ गावांतील लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची संयुक्त बैठक लावून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे अध्यक्ष सुमित वझे यांनी सांगितले. आंदोलकांचे म्हणणे आहे की, केवळ क्लस्टर योजनाच नाही तर ग्रोथ सेंटर आणि बुलेट ट्रेन बिझनेस हब यांसारख्या विविध मोठ्या प्रकल्पांमुळे २७ गावांतील मूळ रहिवासी आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर गदा येत आहे. या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणी आणि इतर सोयीसुविधा मिळत नसताना केवळ प्रकल्पांचा भार लादला जात असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. जोपर्यंत गावांचा खरा विकास होत नाही आणि सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत मालमत्ता कराची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा पवित्राही ग्रामस्थांनी यावेळी घेतला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांची भेट घेतली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुमित वझे, उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. अतिरिक्त आयुक्तांनी आंदोलकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि या विषयावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. लवकरच केडीएमसीचे महापौर, आयुक्त, २७ गावांतील सर्व लोकप्रतिनिधी आणि संघर्ष समिती यांची एक संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत सर्व तांत्रिक आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा

कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करा शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी कल्याण :  मध्य रेल्वेवरील कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करणे, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण, दिवा सीएसएमटी जलद लोकल, कोपर-वसई रेल्वेच्या फेऱ्या वाढवणे, कळवा-ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्पाला गती आणि प्रत्येक स्टेशन्सवर मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल्स सुरु करावेत, अशा रेल्वेसंबधींच्या अनेक मागण्यांचे निवेदन आज शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत सादर केले. कल्याण मतदार संघातील ८० टक्के प्रवासी लोकलचा वापर करतात. त्यामुळे कल्याण मार्गावर सर्व लोकल १५ डब्ब्यांच्या करणे आवश्यक आहे. कोकण मार्गावरील मेल एक्सप्रेस फेऱ्यांची संख्या वाढवणे आणि ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांची सुविधा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी खासदार डॉ. शिंदे यांनी केली. कल्याण लोकसभा मतदार संघात आजच्या घडीला ५ ते ६ हजार कोटींची रेल्वेची कामे सुरु आहेत. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेसाठी येथील प्रवाशी १५ ते २० वर्षांपासून वाट पाहत होते. २०१४ मध्ये केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कल्याण मतदार संघातील रेल्वेच्या कामांना गती मिळाली. आज ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले. तसेच कल्याण ते अंबरनाथपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरु आहे. मात्र ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी  खासदार डॉ. शिंदे यांनी केली. यासाठी आवश्यक भूसंपादन, रेल्वे मार्गावरील झोपड्यांचा प्रश्न आणि नागरिकांचे पुनर्वसन याबाबत रेल्वे मंत्र्यांनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा. याबाबत राज्य सरकार, एसआरए यांच्यासोबत चर्चा करुन धोरण बनवावे, असे खासदार डॉ. शिंदे सुचवले. महाराष्ट्रात रेल्वेचे १ लाख ७० हजार कोटींची कामे सुरु आहेत. २०२६-२७ साठी महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार कोटींची तरतूद केली आहे. त्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. कल्याण यार्ड रिमॉडलिंगसाठी ८०० कोटींची तरतूद केली आहे. बुलेट ट्रेन आणि दिल्ली मुंबई रेल्वे कॉरिडोर लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडोर, पुणे हैद्राबाद हायस्पीड कॉरीडोरमुळे प्रवाशांना फायदा होईल आणि वेळेची मोठी बचत होईल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. १९१६ मध्ये महात्मा गांधी यांनी रेल्वेतील असुविधांबाबत लेख लिहला होता. दुर्देवाने २०१४ पर्यंत ११४ ही परिस्थिती तशीच होती, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी काँग्रेसवर केली. आज रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम एनडीए सरकारने केले. संपूर्ण देशात वंदे भारत ट्रेन सुरु आहेत. रेल्वेने विस्तार करतानाच विश्वविक्रम देखील केला आहे. चिनाब नदीवरील रेल्वेचा ब्रिज हा आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. मागील १२ वर्षांत मध्य रेल्वेवरील प्रश्नांना प्राधान्य दिल्याबद्दल माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, पियूष गोयल आणि विद्यमान मंत्री अश्विन वैष्णव यांचे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी खास आभार मानले.

शहपूरात रानमेवा दाखल कैऱ्या,करवंद,तोरणं विक्रीसाठी दाखल आदिवासींना मिळाला रोजगार

शहपूरात रानमेवा दाखल कैऱ्या,करवंद,तोरणं विक्रीसाठी दाखल आदिवासींना मिळाला रोजगार ठाणे प्रतिनिधी करवंद,जांभळं,कैऱ्या,तोरणं ,हा दाट जंगलात मिळणारा उन्हाळ्यातील खास रान मेवा विक्रीसाठी आता आदिवासी शहापूर बाजारपेठेत दाखल झाले आहेत.या रानमेवा विक्रीतून स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे . शहापूर तालुक्यातील वासिंद किन्हवली,शेणवा, डोळखांब,खर्डी,कसारा या परिसरातील दऱ्याखोऱ्यांत वास्तव्य करणारे आदिवासी जंगलात भटकंती करुन करवंद ,कैऱ्या,तोरणं आदी रानमेवा गोळा करुन उन्हाळ्यात शहरात विक्रीसाठी घेऊन येतात हा रानमेवा मिळविण्यासाठी पहाटेच आदिवासी घराबाहेर पडतात जंगलात जमा केलेला हा रानमेवा एका टोपलीत भरुन नंतर पळसाच्या द्रोणात ठेवून विक्रीसाठी शहरात आणला जातो ऊन्हाळ्यातच मिळणारा हा दुर्मीळ असा रानमेवा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते आहे.१० ते २० रुपये वाटा याप्रमाणे कैऱ्या,करवंद,तोरणं,यांची विक्री केली जाते या रानमेव्याच्या विक्रीतून पुर्ण दिवसभरात २०० ते ३०० रुपयांची कमाई होते असे सुकरी भला या आदिवासी महिलेने सांगितले हा रानमेवा शहापूरसह कल्याण,डोंबिवली,ठाणे,येथील बाजारपेठेत आदिवासी विक्रीसाठी आणतात या रानमेव्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिने आम्हाला रोजीरोटी मिळत असते असे या व्यवसायातील आदिवासी सांगतात.