Category: ठाणे

Thane news

शिवाजी महाराजाचे आदर्श समोर ठेवून कल्याणासाठी काम करा – छायादेवी शिसोदे

ठाणे : शिवाजी महाराजाचे आदर्श समोर ठेवून ग्रामस्थांच्या कल्याणासाठी काम करा, असे मत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी व्यक्त केले. ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे येथील आवारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेकाची मानाची गुढी उभारुन सगळ्यानी वंदन केले. राष्ट्रगीत व राज्यगीत गात उत्साही वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल गौरवपर भाषण केले. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत आपण सर्वांनी ग्रामस्थांच्या कल्याणासाठी काम करावे. संकटावर मात करत काम करण्याची प्रेरणा आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सातत्याने घ्यायला हवी. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते व सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या सदिच्छा दिल्या. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) प्रदिप कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, स्वच्छा व पाणी पुरवठा विभाग प्रमुख अतुल पारसकर इतर सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुत्रसंचालन अनिल सुर्यवंशी यांनी केले.

जिल्ह्यातील अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणार –  डॉ. गंगाधर परगे

अनिल ठाणेकर ठाणे : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली आहे.‌ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अतिसार नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्ह्यातील अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणार असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी व्यक्त केले. आरोग्य विभागामार्फत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा आज, ६ जून ते २१ जून या कालावधी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.‌ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.अतिसाराच्या उपचारासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये बाह्य रुग्ण विभागात व आंतररुग्ण विभागात ओआरएस व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार असून या कॉर्नरमध्ये ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्या उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. कार्यक्रम जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पार पाडणार असून जिल्हास्तरीय पर्यवेक्षण देखील त्यांच्याकडून केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. दरवर्षी शासनातर्फे एकाचवेळी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या अतिसाराच्या संभाव्य घटना टाळल्या जातात. या पंधरावड्या मध्ये आशा स्वयंसेविका कार्यक्षेत्रातील सर्व घरांना भेटी देणार असून ५ वर्षांखालील सर्व मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. अतिसार लागण झालेल्या सर्व मुलांना ओआरएस पाकीट व झिंक गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात येणार असून पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण व समुपदेशन केले जाणार आहे. हा कार्यक्रम राबवताना अति जोखमीचे क्षेत्र व दुर्बल घटकांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विशेष झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विटभट्टी कामगार, स्थलांतरित मंजूर, बेघर मुले आशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार असून मागील २ वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व दूषित पाणीपुरवठा क्षेत्र याकडेही प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आरोग्य सेविकेमार्फत ग्राम आरोग्य पोषण दिवशी ५ वर्षांखालील बालकांच्या माताना अतिसाराचा प्रतिबंध कसा करावा तसेच ओआरएस व झिंकचे महत्व, स्तनपान चालू ठेवणे बाबत, स्वच्छतेविषयी माहिती, शौचालयांचा वापर इत्यादिबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक देखील दाखवले जाणार आहे. चौकट जिल्हयात एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर १९० उपकेंद्रांमध्ये ० ते ५ वयोगटातील लोकसंख्या सुमारे ५२ हजार १७३ असून एकूण १ हजार ३०५ आशा स्वयंसेविकेंच्या माध्यमातून घरोघरी जावून सर्वेक्षण करून सेवा दिली जाणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठामपा प्रयत्नशील – प्रशांत रोडे

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरण पूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात यासंदर्भात गुरूवारी बैठक झाली. या बैठकीस, स्वंयसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी मंगेश पंडित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपमुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव २०२४ साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरीकांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांवर चर्चा झाली. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि सजावटीचे साहित्य यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणपती मुर्तीसाठी जनजागृतीकरता, महिती पत्रके, फलक व ध्वनीफित याद्वारे करण्यात येईल. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. पर्यावरण पूरक मूर्ती बनवून, प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्याचा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करूया, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पर्यावरण विभाग येथे संपर्क साधावा.

लवकरच शाळा सुरू होत असताना ठाणे जांभळी नाका बाजारात पालक आणि विद्यार्थी शैक्षणिक साहित्य, वह्या,पुस्तके आणि स्कूल बॅग घेण्यासाठी लगबग सुरू असताना दिसत आहे. (फोटो प्रफुल गांगुर्डे)

उल्हासनगरातील अतिरिक्त आयुक्तांच रिक्त पद १० महिन्यांनी भरले

उल्हासनगर : गेल्या 10 महिन्यांपासून रिक्त असलेले उल्हासनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्तांचे पद अखेर भरण्यात आले असून महाराष्ट्र शासनाने या पदावर किशोर गवस यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे. महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे असून एका पदावर जमीर लेंगरेकर कार्यरत आहेत. तर दुसरे अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर यांची 5 सप्टेंबर 2023 रोजी बदली झालेली आहे. तेंव्हापासून हे पद होते.मुळात किशोर गवस हे मार्च महिन्यात उपायुक्त या पदावर महानगरपालिकेत आलेले आहेत.ते परिवहन सेवेला आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रलंबित किंबहूना प्रगतीपथावर असणाऱ्या विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करत आहेत.आता त्यांची महाराष्ट्र शासनाने पदोन्नती करून त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सोपवली आहे.त्यामुळे किशोर गवस हे आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरी समस्या मार्गी लागणार असे चित्र दिसू लागले आहे.

कपिल पाटील यांच्या पराभवामुळे नैराश्यातून तरूणाची आत्महत्या

शहापूरमधील घटना कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या शहापूर तालुक्यातील साजिवली गावातील खैरेपाडा येथील संजय पद्माकर अधिकारी (३५) या भाजपच्या कार्यकर्त्याने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शहापूर तालुक्यातील भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संजय अधिकारी यांची ओळख होती. सरळांबे ग्रामपंचायत आणि परिसरातील सामाजिक कार्यात संजय आघाडीवर असायचे. कपील पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी शहापूर तालुक्यात प्रचाराचे काम केले होते. एका पायाने अपंग असुनही त्यांची पक्ष कार्यासाठीची धडपड कौतुकास्पद होती. भिवंडी लोकसभेत कपिल पाटील पुन्हा खासदार म्हणून निवडून जावेत यासाठी संजय अधिकारी यांची धडपड होती. भाजप कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी शहापूर तालुका पिंजून काढला होता. मतमोजणीच्या दिवशी कपील पाटील यांचे पक्ष प्रतिनिधी म्हणून संजय अधिकारी यांना ओळखपत्र मिळाले होते. पण मतमोजणीच्या दिवशी ते गैरहजर राहिले. त्यानंतर कपील पाटील पराभूत झाल्याची माहिती मिळताच, संजय खूप व्यथित झाले. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. रात्रीच्या वेळेत मित्रांसोबत चर्चा करत असताना आता जगण्यात काही अर्थ नाही, अशी भाषा त्यांनी केली होती. मित्रांनी त्यांना समजावले होते. असे टोकाचे पाऊन न उचलण्याचे सूचित केले होते. बुधवारी रात्री पत्नी, त्याची दोन मुले घरात झोपी गेल्यानंतर संजयने राहत्या घरात गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीला आला. आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची माहिती मिळताच कपिल पाटील यांचे कौटुंबिक सदस्य देवेश पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी अधिकारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शहापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. संजय यांच्या कुटुंबीयांना कपील पाटील फाऊंडेशनतर्फे सहकार्य केले जाणार आहे.

कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना धमकी देणारा अटकेत

कल्याण : कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांना दोन दिवसापूर्वी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकाश भीमसेन बनसोडे (५४) या इसमाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मानसिक बिघडलेली स्थिती आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमधून आपण हा प्रकार केला आहे, अशी कबुली आरोपी प्रकाश यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना दिली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी प्रकाश बनसोडे या इसमाने फेसबुक समाज माध्यमातून एका मोठ्या लघुसंदेशाव्दारे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या धमकीपत्रात महेश यांना असलेल्या राजकीय पाठबळाचा उल्लेख करण्यात आला होता. कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील गोळीबाराचे प्रकरण ताजे असताना, आता हे नवीन धमकी प्रकरण चर्चेला आले होते. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तातडीने याप्रकरणाचा तपास करून गुरुवारी धमकी देणाऱ्या प्रकाश कदम या इसमाला अटक केली होती. या इसमाची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामध्ये तो मद्यपी असल्याचे, त्याची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि त्याची मानसिक स्थिती बिघडलेली असल्याचे आढळले. याऊलट प्रकाश हा महेश गायकवाड यांचा फेसबुक मित्र असल्याचे तपासात पुढे आले. आपल्या बिघडलेल्या मानसिक स्थितीमधून हा प्रकार घडला आहे, अशी कबुली प्रकाशने पोलिसांना दिली. या प्रकारात तथ्य नसल्याचे दिसून आल्यावर त्याला योग्य ती समज देऊन पोलिसांनी त्याची सुटका केली. महेश गायकवाड यांनाही या प्रकरणाची पोलिसांनी माहिती दिली आहे.

कामगार नेते स्व. श्याम म्हात्रे यांचा ९ जून रोजी स्मृतिदिन कार्यक्रम

पनवेल : दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्याम पदाजी म्हात्रे यांचे सहावे पुण्यस्मरण ९ जून रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या कु. श्रुती शाम म्हात्रे यांनी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्व. शाम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकीतून त्यांची कन्या श्रुती म्हात्रे यांनी प्रति वर्षी विविध उपक्रम राबविले आहेत. रविवारी 9 जून रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी खांदा कॉलोनी सेक्टर 8 मधील गार्डन व्हू सोसायटीमधील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 10 वाजता आयोजित कारण्यात आला असल्याची माहिती कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांनी दिली. विविध पक्षातील नेते कार्यकर्ते समस्त कामगार वर्ग तसेच रोज बाजारातील विविध ठिकाणातील रोज बाजारातील व्यापारी वर्ग आणि आगरी शिक्षण संस्थेतील समस्त परिवार हे या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

पाण्यासाठी माजी विरोधीपक्ष नेते शानू पठाण बसले आयुक्तांच्या दारात

अनिल ठाणेकर ठाणे : मुंब्रा – कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही.  पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त  झालेले मा. विरोधीपक्ष नेते अश्रफ (शानू)…

महावितरणचा १९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांचाही सहभाग कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडलात महावितरणचा १९ वा वर्धापन दिन गुरुवारी सायंकाळी उत्साहात साजरा झाला. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, अभियंते, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महावितरणच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल, कल्याण एक आणि दोन तसेच कल्याण स्थापत्य मंडलांतर्गत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्य मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांच्या संयुक्त जंयती महोत्सवाची परंपरा सलग तिसऱ्या वर्षी कायम ठेवताना लेखक जगदिश ओहोळ यांचे प्रभावी व्याख्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाले. तर त्यानंतर ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या व्यावसायिक नाटकाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे निखळ मनोरंजन करताना त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. या कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते अनिल घोगरे, निलकमल चौधरी, संदिप पाटील, विजय मोरे, दीपक पाटील, दिलीप भोळे, संजय खंडारे, दिलीप खानंदे, महेश अंचिनमाने, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप महाव्यवस्थापक योगेश खैरनार, हविषा जगताप, उपसंचालक सुमीत कुमार, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंते, उपविभागीय व शाखा अभियंते, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य लिपिक गणराज वाळींबे यांनी केले.