Category: ठाणे

Thane news

दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश

समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव होणार- हर्षलता कदम ठाणे: एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत ठाणे शहरातील एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत चमकदार कामगिरी करुन हे दाखवून दिले आहे की जिद्दीला सीमा नसते. दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळविले आहे या विद्यार्थ्यांचा समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव करण्यात येणार आहे, असे संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी सांगितले. श्रुती खवळे या किसन नगर मधल्या मुलीने ८९.४० % मार्क्स मिळवून किसन नगर महानगर पालिकेच्या शाळेत पाहिला नंबर मिळवला आहे. धर्मवीर नगरच्या जया इंगळे हिने ८२ % मार्क्स मिळवून ती महानगर पालिका शाळा क्रं. १८ मधे पहिली आली आहे. सावरकर नगर आदित्यकुमार ठाकूरला ८३% मार्क्स मिळाले आहेत आणि सावरकर नगर महानगर पालिकेच्या शाळेत तो प्रथम आला आहे.  राबोडीच्या हबीबा अन्सारी ला ८२%, अयान अकील शेखला ८०.२% मिळाले आहेत. किसन नगरच्या सृष्टी दळवीला ७९.४%, वारली पाड्याच्या पूर्वा रहाटवळला ७८.६ %, मानपाड्याच्या प्रतीक्षा लोखंडेला ७७.६%, किसन नगरच्या मिनाक्षी कुऱ्हाडेला ७३.८०%, मानपाड्याच्या संदीप वाडू ला ७३.८ % आणि अनिकेत लोखंडेला ७२ %, कळव्याच्या आकाश कनोजियाला ७२.२%, सावरकर नगरच्या रक्षा कादळगावकरला ७३% आणि तब्बसूम नसीर खान पठाणला ७२% मार्क्स मिळाले आहेत.  राबोडीच्या आलिया शेख ला ७९.८%, आशिया पठाणला ७८% मिळाले आहेत. ढोकाळीच्या नीता बिरादरला ७५% आणि भूमिका जाधवला ७६% मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचा मुलांना फायदा झाल्याचे शाळेतील शिक्षक, पालक आणि मुलांनी आवर्जून सांगितले.  एकलव्यांमधील ३ मुली आणि १ मुलगा त्यांच्या शाळेत प्रथम आले आहेत. वडील मजुरी, आई घरकाम, पत्राचे छोटेसे घर, दाटीवाटीची वस्ती, बाजुला नाला वाहतोय, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट, कधी आई वडील गावाला व विद्यार्थी इथे दुसऱ्यांकडे राहून शाळेत जातो, घरचे काम करून शाळेत जाऊन अभ्यास करून असे घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या एकलव्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांच्या साठी नुसते पास होणे सुद्धा बोर्डात येण्यासारखे कौतुकास्पद आहे. तरीही कितीतरी मुलांना फर्स्ट क्लास मिळाला आहे. आणि वरील विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवले आहेत. या सर्व एकलव्यांचं समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जाहीर गौरव करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील विविध वस्त्यांमधून राहणारे, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत जे विद्यार्थी दहावी पास होतात त्यांचा जाहीर गौरव करून त्यांना पुढच्या शिक्षणासाठी संस्थेकडून मदत केली जाते. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले, ८१०८९४९१०२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हर्षलता कदम यांनी केले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रशिक्षण संपन्न

निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी दि. 04 जून 2024 रोजी डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.…

कोपरीत तारा माऊली संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन

माजी नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांच्यातर्फे कार्यक्रम ठाणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्ताने तारा माऊली संस्थेतर्फे कोपरी येथे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन करण्यात आले. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लेखिका-निवेदिका साधना जोशी यांचे `यशोदा ते माई सावरकर’ या विषयावरील व्याख्यानही पार पडले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती मंगळवारी उत्साहात पार पडली. कोपरीत सावरकरप्रेमींची संख्या लक्षणीय आहे. त्यानिमित्ताने कोपरीतील तारामाऊली सामाजिक सेवा संस्था, आद्यक्रांतिवीर परिवार, स्वराज महिला मंडळ, भारतीय स्त्री जीवन विकास परिषद यांच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर कट्टा व स्वा. सावरकर तरण तलाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात लेखिका साधना योगेश जोशी यांनी ‘यशोदा ते माई सावरकर’ यांचे व्याख्यान झाले. त्यात माई सावरकरांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांची मते उलगडून स्पष्ट करण्यात आली. त्याला सावरकरप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण, उद्योजिका आशाताई कुलकर्णी, प्राचार्य मकरंद घुले, मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वराज्य महिला मंडळाचे संस्थापक मनोहर चव्हाण, मंडळाच्या अध्यक्षा सविता चव्हाण, उपाध्यक्षा मिरा सिनकर, आद्यक्रांतिवीर परिवाराचे हेमंत आळवे, समाजकेवक उदय लेले, भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या पद्यजा काळे, समाजसेवक विलास कोपरकर आदी उपस्थित होते.

बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अटक करा – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : महाड येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली. जितेंद्र आव्हाड हे डाॅक्टर जितेंद्र आव्हाड नसून ते नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत. आज परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे त्यांच्या मनात परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आले. मतुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात येणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय आहे. ते आंदोलन करायला महाडला गेले आणि आंदोलन करायच्या भरामध्ये परमपूज्य,  महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे. बाबासाहेब यांच्या अवमानप्रकरणी महाड येथील पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड  त्यांच्याबरोबर फोटोत दिसणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकार्‍यांना अटक करायला हवी अशाप्रकारची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. जितेंद्र आव्हाड हे नाटककार आहेत. त्यांचे खाली डोके वरती पाय अशी स्थिती झालेली आहे. मनुस्मृती जाळायला गेले आणि फाडून आले डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि असे कृत्य करायचे हे शोभनीय नाही. आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. यामुळे बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी यावेळी व्यक्त केली. तत्पूर्वी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयासमोर, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो, मुर्दाबाद, मुर्दाबाद जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद,  जितेंद्र आव्हाड यांचे करायचे काय, खाली डोक वरती पाय अशाप्रकारच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडविण्यात आले, फोटो फाडण्यात आले व फोटो जाळण्यात येऊन जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत, सरचिटणीस रविंद्र पालव, महिला अध्यक्षा वनिताताई गोतपागर, युवक अध्यक्ष विरु वाघमारे, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सुर्यवंशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश मेहरोल, विजय देशमुख, मिलिंद डिचवलकर, विधानसभा अध्यक्ष अजय सकपाळ, प्रभाग अध्यक्ष समीर शेख, दिनेश सोनकांबळे, सुपुन मेहरा, उमर शेख, शेहबाज चेऊलकर, विजय धुमाळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आरटीई प्रवेशासाठी १५ हजार ४३० अर्ज, ३१ मेपर्यंत मुदत – बाळासाहेब राक्षे

ठाणे जिल्ह्यातील ६४२ शाळांत ११ हजार ३७७ जागा अनिल ठाणेकर ठाणे : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने दिनांक १७ मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात २९ मेपर्यंत ११ हजार ३७७ जागासाठी १५ हजार ४३० अर्ज प्राप्त झाले आहेत. सन २०२४-२५ या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१ मेपर्यंत असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे. ३१ मे नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण ६४२ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३७७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. तरी पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची काळजी घ्यावी व पालकांनी आरटीई पोर्टलवर सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

भाजपला अडचणीत आणणाऱ्या राणे बंधूना आवरा-आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका पक्षाच्या बैठकीत मांडली आहे. असे असताना भुजबळसाहेबांबद्दल निलेश राणे यांचे ट्विट करणे चुकीचे आहे. खरतर निलेश राणे…

‘एपीएमसी’त जुन्नर हापूसचा हंगाम

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात मेअखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जुन्नर आंबा हंगामाला सुरुवात होते. बाजारात सध्या ३ ते ४ गाड्या दाखल होत आहेत. प्रतिडझन जुन्नर आंब्याला ५०० ते ९०० रुपये…

मोरेकर गणित अभ्यासिकेचा शंभर टक्के निकाल

ठाणे : सेवारत्न पुरस्कार विजेते हरेश्वर मोतीराम मोरेकर संचलित मोरेकर विनाशुल्क गणित अभ्यासिकेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ४ मुले आणि ५ मुलींचा समावेश होता. या…

उल्हासनगर महापालिकेच्या रुग्णालयातील सुरक्षारक्षकाची आत्महत्या

सहा महिन्यापासून पगार दिला नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उल्हासनगर महापालिकेच्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने गेल्या ६ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. या घटनेने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचे म्हारळ गावाच्या वेशीवर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे राजू धाटावकर यांना गेल्या ६ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने लोनचे हप्ते भरू न शकल्याने सोमवारी दुपारी  3 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने शहरात संतापाचे वातावरण पसरले आहे. सदर  हॉस्पिटल हे मनपा प्रशासनाने खाजगी तत्वावर दिले असून येथील कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार दिला जातो व 12 – 12 तास काम करवून देखील वेळेवर पगार दिला जात नसल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी घसरली

मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प पालघर : स्टीलच्या कॉइल वाहून मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत घसरल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. स्टील कॉइल वाहून नेणारी मालगाडी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना या मालगाडीचे गार्डच्या डब्यासह अखेरचे सहा डबे घसरले. त्या बरोबरीने या मालगाडीच्या डब्यावर असणाऱ्या अवजड कॉईल लगतच्या लूप लाईन (स्लाइडिंग ट्रॅक) वर पसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन, तीन व चार वरील सेवा खंडित झाली आहे. त्याच बरोबरीने अप दिशेच्या विद्युत वाहिनी नादुरुस्त झाली असून पुढील किमान चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईकडून गुजरात दिशेने जाणारी वाहतूक सुरु असून धीम्या गतीने या मार्गावरून गाड्या सोडल्या जात आहेत. तरीदेखील दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.