Category: ठाणे

Thane news

कामोठेत रंगले कुस्तींच्या दंगलीचे अधिवेशन

पनवेल : भव्य मैदान आणि त्यात आकर्षक रोषणाईसह लाल मातीचा दर्जेदार आखाडा, भव्य व्यासपीठ, शेकडो मान्यवरांची उपस्थिती, तिन्ही दिशेला हजारोंच्या संख्येने भरलेली भरगच्च प्रेक्षक गॅलरी, हलगीचा ठेका, दणदणीत सूत्रसंचालन, दक्ष पंच, कुस्तीचा जादूगार पैलवान देवा थापाची चपळाई अशा सर्व सूत्रांचे एकीकरण करत कामोठेत कुस्तींच्या दंगलीचे अधिवेशन रंगले! निमित्त होते ते पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात ‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी २०२४’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील पैलवान देवा थापा आणि हिमाचल प्रदेशमधील पैलवान नवीन चौहान यांची बिग शो मॅच आकर्षण ठरली. यामध्ये देवा थापा याने नवीन चौहानला चीतपट करून बाजी मारली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुस्तीपटू या कुस्तीच्या दंगलीत सहभागी झाले होते. एकास एक सरस अशा कुस्त्यांनी वातावरणात जल्लोष पहायला मिळत होता. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके यांच्या हस्ते झाले. या वेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रविण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, दिलीप पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, तेजस कांडपिळे, अमर पाटील, गोपीनाथ भगत, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, शिला भगत, कुसूम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, भाऊ भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विद्या तामखेडे, रुपेश पावशे, विनोद नाईक, हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव, यांच्यासह इतर पदाधिकारी, तालुका कुस्तीगीर असोसिएशनचे सदस्य आणि मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कुस्तीगीर पैलवान नुसता ताकदवान असून चालत नाही, तर त्याच्याबरोबर अंगात चपळता असली पाहिजे. डावपेच टाकण्याची पद्धतही महत्त्वाची असते. यातून खर्‍या अर्थाने आपले जीवन घडवण्याचे काम कुस्तीगीरांमधून होत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, काही वर्षांपूर्वी येथे मोठ मोठ्या कुस्त्यांचे सामने भरवले जात होते. कोरोनानंतर ते बंद झाले. परेश ठाकूर हे खेळामध्ये नेहमीच रस घेत असतात. त्यामुळे त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुस्तीचे सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यातून कुस्तीपटूंना अपेक्षेपेक्षा जास्त प्रोत्साहन मिळालेले दिसत आहे. हिंदकेसरी योगेश दोडके हे राज्य कुस्ती असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांनी परेश ठाकूर यांची आज रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परेश ठाकूर आपल्या जिल्ह्यात कुस्तीला चालना देतील. पनवेल तालुक्यात कुस्तीचा आखाडा होणे गरजेचे आहे. गव्हाण ग्रामपंचायतीत आम्ही सिडकोकडे २० हजार मीटरचा प्लॉट मागितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे, त्याच्या बाजूला एक एकर जागा कुस्तीचा आखाडा बनवण्यासाठी घेण्याचा आमचा मानस आहे. सिडकोच्या परवानगीसाठी वेळ लागेल, पण मनामध्ये आलंय त्यामुळे ते पूर्ण केले जाईल, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परेश ठाकूर यांच्यावरील प्रेमामुळे उपस्थित राहिलेल्या सगळ्यांचे आभार मानून भावी काळात कुस्तीगीरांनी स्पर्धेत अधिक जोमाने भाग घ्यावा, असे आवाहन केले व परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार निरंजन डावखरे यांनी परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त मातीतील कुस्ती आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. ते म्हणाले, आपल्या मातीबरोबर जोडून ठेवण्यासाठी या पद्धतीचे खेळ आवश्यक आहेत. हल्ली आपण पाहतो की कबड्डी, कुस्ती मॅटवरच खेळ जास्त होतात. अशा वेळी मातीतील कुस्तीचा खर्‍या अर्थाने आनंद आपल्या इथे पहायला मिळत आहे. यातूनच परेशशेठ यांची नाळ येथील मातीशी जुळल्याचे दिसून येते. नेपाळमधील पैलवान देवा थापा यांनी म्हटले की, परेश ठाकूर यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी अनेक ठिकाणी गेलो, पण पनवेकरांसारखे प्रेम मला कोठेच मिळाले नाही. मला आपण बोलवल्याबद्दल धन्यवाद! गिरवले (ता. पनवेल) येथील पैलवान प्रतिक हातमोडे यांनी सांगितले की, या सामन्यांचे आयोजन चांगले आहे. विशेष म्हणजे बक्षिसाची रक्कमही चांगली आहे. कुस्तीत वन मॅन शो असतो. मनापासून आवड असेल तरच या खेळात येणे चांगले, कारण यामध्ये खाणे-पिणे व्यवस्थित लागते. पनवेल भागात आखाडा तयार झाला, तर निश्चितच त्याचा फायदा आमच्यासारख्या कुस्तीपटूंना होईल. * गदा जिंकणारे कुस्तीपटू अमेघा अरुण घरत, खोपटे-उरण वैष्णवी दिलीप पाटील, कल्याण सौरभ पाटील, सीकेटी-पनवेल

भाजपा आमदार व पदाधिकाऱ्यांची बूथला भेट

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ठिकठिकाणच्या बूथला भेट देऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी मेहनत घेतली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी शहरातील बूथला भेट दिली. तेथील भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मतदानाची माहिती घेतली. तसेच त्यांना विविध सूचना दिल्या. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाण्यात मतदारांची परवड, जबाबदार संबंधितांवर कारवाई करा – डॉ. संजय मंगला गोपाळ

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघ अंतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघातील  मतदान व्यवस्थेत अव्यवस्था,.ना पिण्याचे पाणी, ना पंखे, मतदारांच्या अंगावरुन वाहत होत्या घामाच्या धारा. मतदारांच्या या प्रचंड परवडीला जबाबदार संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र समन्वयक डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघांतील ठाणे विधानसभा क्षेत्रातीलमतदारसंघात कोलशेत -ढोकाळी येथिल श्री. शरदचंद्र मिनी स्पोर्ट्स कॅाम्पलेक्समध्ये बॅडमिंटन हॅालमध्ये तात्पुरते तंबू उभारून मतदानाचे ४ बुथ्स – बुथ क्र. ११७ ते १२० – उभारले होते. येथे सकाळी ७ः१५ ते ८ः४५ अशी दीड तास रांग लावल्यावर मतदार मतदान करू शकले. सर्व बुथ्सवर प्रचंड रांगा. बॅडमिंटन हॅालमध्ये ४ बुथ्सचे मिळून साधारणतः हजार एक स्त्री – पुरुष मतदार रांगेत उभे होते. तापमान होतं ३३ डिग्री सेल्सियस व आद्रतेमुळे जाणवत होतं ३९ डिग्री सेल्सियस. सर्व जण रांगेत उभे राहिल्यावर ५ च मिनिटात घामाने निथळत होते. नंबर लागे पर्यंत तासाभरात घामाची नखशिखांत आंघोळ! ना पंखे ना पिण्याचं पाणी ना वरीष्ठ नागरिक व दिव्यांगांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय.दुपारी तापमान ३८-३९ पर्यंत गेले होते.म्हणजे जाणवणारं तापमान ४५ डिग्री सेल्सियस होते. मतदानाचा हक्क बजावायला आलेल्या नागरिकांची ही परवड झाली होती. या परवडीला जबाबदार अधिकार्‍यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करावी अशी मागणी डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे.

कळवा- मुंब्रा परिसरात मतदान प्रक्रिया संथ, व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची घटना घडल्याचा दावा !

जितेंद्र आव्हाड यांची संबंधितांवर कारवाईची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : कल्याण लोकसभा अंतर्गत कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील मुंब्र्यातील बाबाजी पाटील शाळेत अतिशय संथगतीने मतदान सुरु असल्याचे दिसून आले. यामुळे एकाच जागेवर दोन दोन तास रांगेत मतदार उभे असलेले आढळून आले. तर अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या घटनाही घडल्याचे मतदारांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या या कार्यपद्धतीवर मतदारांनी व स्थानिक आमदार डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली. कल्याण लोकसभा मतदार संघाअंतर्गत  मुंब्रा – कळवा विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २४३ या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट (VVPAT)  मशीन बंद पडलेल्या आहेत, अशा स्वरुपाच्या सकाळी बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बाबींची दखल घेवून अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून खातरजमा केली असता व्हीव्हीपॅट (VVPAT) बंद पडल्याची बाब आढळून आली  नाही. सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्षात व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच इतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु मतदान सुरळीत सुरू होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली असून सदरच्या रांगा आटोक्यात आणल्या असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू  होते. सर्व झोनल अधिकारी व केंद्राध्यक्षांना मतदानाचा वेग वाढविण्याच्या सुचना दिल्या असून १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान व्यवस्थितरित्या सुरू असल्याचे अतिरिक्त सहायक  निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी नमूद  केले.

शहापूरमध्ये मतदार महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्था

खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती. आजनुप ग्रामपंचायतमधील बोण्डरपाडा, भेरेपाडा, दापूर, माळ कातकरीवाडी येथील मतदारांची नावे इतर वाड्यांमधील केंद्रांवर गेल्याने मतदारांची गैरसोय झाली; मात्र मतदारांनी रखरखत्या उन्हात मतदान केंद्र गाठून आपला हक्क बजावला. मतदारांना मनस्ताप सहन करावा लागल्याने पुढील निवडणुकीतही अशीच व्यवस्था असल्यास मतदान करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच पुढील निवडणुकीसाठी नवीन सर्वेक्षण करून मतदारयाद्यांची छाननी करावी. मतदार राहत असलेल्या ठिकाणची खात्री करून मतदारयाद्या तयार कराव्यात, अशी मागणी उपसरपंच अजय कथोरे यांनी केली आहे.

यादीत नावच सापडत नसल्याने मतदार हैराण

डोंबिवली, : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते; मात्र अनेक ठिकाणी मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.…

मिरा-भाईंदरमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी मतदारांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत ३७.५६ टक्के मतदान झाले होते. सकाळी पहिल्या तासात मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून आली.…

नववधूसारखे सजले मतदान केंद्र

ठाणे : ठाण्यातील सखी मतदान केंद्र हे नववधूसारखे सजविण्यात आले होते. आकर्षक फुग्यांच्या कमानीने तर लाल, हिरवी मॅट अंथरली होती. महिला मतदारांनी सुविधांचा लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सेल्फी पाईंटवर मतदानाचे फोटो काढले तसेच इतरांना मतदानासाठी समाजमाध्यमांवरून आवाहन केले. एकंदर सखी मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदान केंद्रावर ‘सुस्वागतम्’ असे लिहिलेल्या कमानी उभारल्या होत्या. महिलांसाठी बैठक व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. महिला कर्मचारी मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करत होत्या. सेल्फी पॉईंटची खास सुविधा उभारली होती. त्यावर आम्ही ‘मी मतदान केलं तुम्ही केलं का?’, असे वाक्य ठळकपणे लिहिले गेले होते. सेल्फी काऊंटर फुग्यांनी सजविले होते. मतदानावेळी असुविधा होऊ नये, याची विशेष खबरदारीदेखील घेण्यात आली होती. तर काही केंद्रांवरील असुविधांबद्दल मतदारांनी नाराजी व्यक्त केली. ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ३३२ येथे युवा मतदार केंद्रात सेल्फी स्टॅन्ड उपलब्ध नव्हता. तर ओवळा माजिवड्यात मतदान केंद्र क्र. ४३९ या ठिकाणी मतदारांनी गर्दी केली आहे; मात्र पिण्यासाठी पाणी व पंख्याची सोय नसल्याने गर्मीने काही मतदार वैतागून मत न देता मागे फिरल्याचे चित्र दिसले. गुलाबी वस्त्र परिधान महिलांना निर्भय मतदान करता यावे, यासाठी सखी मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होती. मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंतचे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळले. दिवसभर येथील मतदान केंद्राचे वातावरण उत्साहपूर्ण होते. सखी या केंद्रावरील कर्मचारी महिलांनी खास गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले होते.

‘मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..’

मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला! डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडेल आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मतदारांची मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. उन्हाच्या तीव्र झळा, त्यात नाव भेटत नसल्याने नागरिक हैराण होते. मतदान केलं नाही तर पगार कापला जाण्याची भीती, तसेच काहींचे पहिलेच मतदान असून त्यांना ते करता न आल्याने मतदारांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले. कल्याण मतदारसंघाच्या अंतर्गत कल्याण ग्रामीण, डोंबिवली मतदान केंद्रावर (Dombivli Polling Station) मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदार याद्यांचा घोळ पाहता भर उन्हात लोक मतदानासाठी बाहेर पडले. नाव सापडत नसल्याने मतदार गोंधळून गेले आहेत. राजकीय पक्ष, नगरसेवक यांनी मतदारांची नावे शोधण्यासाठी बुथ लावले आहेत. दुपारच्या वेळी मतदारसंघात मतदान केंद्राऐवजी राजकीय पक्षाच्या बुथवर मतदारांची झुंबड उडाली होती. मात्र, नाव न सापडत नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून 5 वर्षे सतत काम केले पाहिजे. तरच हा गोंधळ पुढे होणार नाही, अशी मागणी शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली. पगार कापला जाण्याची भीती विशेष म्हणजे, मतदान न केल्यास तीन दिवसांचा पगार कापला जाणार असल्याची नोटीस कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची यादीत नावेच नसल्याने हे मतदार रडकुंडीला आले आहेत. आम्हाला कोणीतरी मतदार यादीत नाव नाहीये इतकं तरी लिहून द्यावं, अशी याचना ते करत आहेत. आमचा हक्क आहे, आम्हाला आजच मतदान करायचं आहे, अन्यथा आमचा पगार कापला जाईल, त्याची जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न नोकरदार करत होते. आमच्या घरात एकूण 9 ते 10 मतदार आहेत. यातील 2 जणांची केवळ नाव मतदार यादीत आली. बाकी सर्वांची नावे नाहीत. आम्हाला के.सी.गांधी येथे जाऊन 17 नंबरचा फॉर्म भरून घेऊन या, मग मतदान करता येईल असं सांगितलं. तिथे गेल्यावर असा कोणता फॉर्म नाही तुम्हाला मतदान करता येणार नाही असं सांगितलं गेलं. माझे वडील 85 वर्षाचे आहेत. दरवेळी ते मतदान करतात. आताच नाव कसे त्यांचे कट झाले. म्हणजे आम्ही मतदान करायचंच नाही का? असा सवाल डोंबिवलीतील राहुल पाटील यांनी उपस्थित केला.

ऐन मतदानाच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकाने

ठाणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने मतदार मतदानासाठी बाहेर उतरला असतानाच मध्य रेल्वेने मतदानाच्या दिवशी रेल्वेची वाहतूक सुट्टीच्या वेळापत्रकाने सुरू केली आहे. पूर्वी मुंबईत राहणारे अनेक रहिवासी ठाणे किंवा त्यापल्याड राहण्यास गेले आहेत. परंतु त्यांचे मतदान मुंबई तसेच उपनगरात असते. परंतु मध्य रेल्वेचे वेळापत्रक रविवारच्या दिवसाचे असल्याने या मतदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आजपासून सुरू झाले आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरीही काही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामानिमित्त बाहेर पडावे लागत असते. तसेच गेल्या काही वर्षांपासून मुंबई तसेच उपनगरात राहणारा मतदार पुनर्विकास तसेच राहण्यास स्वस्त पर्याय म्हणून ठाणेपल्याड राहण्यासाठी गेला आहे. यातील अनेकांचे मतदान हे त्यांच्या पूर्वीच्या वास्तव्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे मतदार देखील मतदानाच्या दिवशी बाहेर पडू लागले आहेत. अत्यावश्यक सवेतील कर्मचाऱ्यांना मतदान केल्यानंतर त्यांच्या कामाच्या ठिकाणी जावे लागते. असे असतानाच मध्य रेल्वेने सोमवारी सुट्टीच्या म्हणजेच रविवारच्या वेळापत्रकानुसार वाहतूक सुरू केली आहे. त्याचा परिणाम मतदारांना सहन करावा लागत आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार वाहतूक होत असल्याने रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षा करत या मतदारांना स्टेशन परिसरात थांबावे लागत आहे.