Category: ठाणे

Thane news

भयमुक्त मतदानासाठी ठाणे पोलिस सज्ज

ठाणे : ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी (ता. २०) होणारे मतदान भयमुक्त आणि शांततेत पार पडावे, यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांनी कंबर कसली आहे. स्वतःच्या हक्काच्या फौजफाट्यासह जिल्ह्याबाहेरील सात हजारांहून अधिक पोलिसांची कुमक मदतीला मागवली आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, नाशिक, पुणे आदी पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर मुंबई आणि ठाण्यात राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत विविध पक्षांचे मोठे नेते ठाणे, मुंबईत प्रचाराला आले. आता या मतदारसंघात इतर जिल्ह्यांतील पोलिसदेखील दाखल झाले आहेत. ठाणे, मुंबईत शिगेला पोहोचलेला प्रचार आणि २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नयेत, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात जिल्ह्याबाहेरील सात हजारांहून अधिक पोलिस कुमक मागवण्यात आली आहे. त्यामध्ये तीन पोलिस उपायुक्त, नऊ सहायक पोलिस आयुक्त आणि १९ पोलिस निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ८० प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी- चिंचवडमधील ६९० अंमलदार, तीन हजार ४९१ होमगार्ड असा सात हजारांहून अधिकचा फौजफाटा आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, सात पोलिस उपायुक्त यांच्यासह आठ हजार पोलिसांचे संख्याबळ आहे. राखीव पोलिसांच्या २५ कंपन्या तैनात ठाणे ग्रामीण पोलिसांचेही चार हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या मदतीला असणार आहेत. हा संपूर्ण फौजफाटा मतदान केंद्र आणि ईव्हीएम मशीन असलेल्या स्ट्रँगरूमच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणार आहे. ठाणे जिल्ह्यात राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव पाेलिसांच्या २५ कंपन्या राहणार आहेत. यातील एका कंपनीत १२० कर्मचारी असल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिकचा हा फाैजफाटा यात राहणार आहे. असा असेल पहारा ठाणे शहर परिमंडळ एकमध्ये सातारा, पुणे शहरामधून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तीन कंपन्या, राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात आहे. परिमंडळ दोन भिवंडीत सीआयएसएफच्या पुणे आणि धाराशिवच्या चार कंपन्या तैनात आहेत. परिमंडळ तीन कल्याणमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या रत्नागिरी आणि धाराशिवच्या दोन, कर्नाटकची एक आणि पुणे ग्रामीणची एक अशा पाच कंपन्या तैनात आहेत. उल्हासनगर परिमंडळमध्ये सिुंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या चार एसआरपीएफ तसेच बीएसएफच्या कंपन्या आहेत. वागळे इस्टेट परिमंडळ पाचमध्ये कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या रेल्वे सुरक्षा दल, बीएसएफ आणि राज्य राखीव दल अशा तीन कंपन्या नेमल्या आहेत. याशिवाय, ठाणे, कल्याण उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक, तर भिवंडीमध्ये दोन अशा सहा एसआरपीएफच्या प्लाटून आहेत.

मिरा-भाईंदर शहरात कडेकोट बंदोबस्त

भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) होत असलेल्या मतदानासाठी मिरा-भाईंदरमधील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. शहरात मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा काही भाग समाविष्ट आहे. या दोन्ही मतदारसंघात मिळून सुमारे ११७ ठिकाणी ६८१ मतदान केंद्रे आहेत. विशेष म्हणजे यातील एकही केंद्र संवेदनशील नाही. संपूर्ण परिसराचे पोलिस बंदोबस्ताच्या दृष्टीने २६ विभाग करण्यात आले आहेत. या सर्व विभागांसाठी मिळून मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील १०६ अधिकारी, ७४२ कर्मचारी, १६२ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, ८०० होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र दलाचे २०० जवान असे सुमारे २,७१९ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त ६७६ पोलिस कर्मचारी आणि ३३ अधिकारी अन्य ठिकाणाहून मागविण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर प्रत्येकी एक पोलिस कर्मचारी, होमगार्ड नियुक्त केला जाणार असून त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नजर असणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ३५ वाहने व पाच बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल अथवा वाहन आणण्यास मनाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या मनाई क्षेत्रातील दुकाने, त्याचप्रमाणे अन्य व्यावसायिक आस्थापनाही मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिरा-भाईंदर शहरात सुमारे १९६ बंदुकीचे परवाने देण्यात आले आहेत. त्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व बंदुका पोलिसांकडून जमा करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. प्रतिबंधात्मक कारवाई निवडणुकीची खबरदारी म्हणून गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती, गुन्हे दाखल असणारे अथवा संशयित गुन्हेगार अशा ५०० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त याआधीच्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून गुन्हे प्रवृत्तीच्या नऊ व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

लाखो कामगार मतदानापासून वंचित

भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या संख्येने विविध क्षेत्रांतील कामगार राहत आहेत. कुटुंबासह स्थायिक झालेले कामगार सोमवारी (ता. २०) मतदान करणार आहेत. मात्र, लाखोंच्या संख्येने असलेले अस्थायिक कामगार मतदानापासून वंचित राहणार आहेत. कारण या कामगारांना गावीसुद्धा जात येत नसल्याने मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम व भिवंडी ग्रामीण हे तीन विधानसभा मतदारसंघ भिवंडी शहर आणि परिसरात येत आहेत. या मतदारसंघाच्या क्षेत्रात मोठ्या संख्येने यंत्रमाग, सायझिंग, डाईंग, मोती कारखाने, गोदाम, औद्योगिक कारखाने आणि छोटे-मोठे व्यवसाय आहेत. या ठिकाणी काम करणारे सर्व कामगार येथील सर्व सुविधांचा लाभ घेत आहेत. मात्र, त्यांचे स्थायी राहण्याचे ठिकाण नसल्याने त्यांची नावे मतदार यादीत नाहीत. परप्रांतीय असल्याने काही कामगारांची नावे गावी नोंदवलेली आहेत. मात्र, त्यांना तेथेही जात येत नसल्याने नेहमी मतदानापासून वंचित राहतात. अनेक कामगार वर्षानुवर्षे काम करूनही रोजंदारी कामगार म्हणून त्यांची गणती होत असते. तर काही कामगारांची कायमस्वरूपी नोकरी असली, तरी या सर्व प्रकारच्या आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपगारी रजा मिळत नाही. या दिवसाचा पगार दिला नाही, तर सरकारी स्तरावरून कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील मालकवर्ग निर्ढावलेले आहेत. त्यामुळे अशा मालकांवर निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करणार काय? अशी विचारणा कामगारांकडून होत आहे. भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात काम करणारे आणि येथे कुटुंबासह स्थायिक झालेले कामगार मतदान करणार आहेत. मात्र, काही अस्थायिक कामगारांना मतदान करता येत नाही. असे अनेक कामगार विविध ठिकाणी काम करत आहेत. त्यांना यंत्रमाग मालक मतदानासाठी सुट्टी देत नाही. त्यासाठी मालकाचे नावही कामगारास माहिती नसते. अनेक वर्षांपासूनची ही शोकांतिका आहे. – विजय कांबळे, लाल बावटा असंघटित कामगार संघटना

देशासाठी सैनिक करतात बलिदान…तुम्ही करा ना मतदान…

जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांचे आवाहन ठाणे : देशासाठी  सैनिक करतात बलिदान… तुम्ही करा ना मतदान .. असा संदेश मतदान जनजागृती करण्यासाठी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात “संवाद मतदारांचा… संकल्प मतदानाचा” या सुसंवाद कार्यक्रमात ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मतदारांना दिला. देशाच्या सीमेवर सैनिक आपले रक्षण करीत असल्यामुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता प्रत्येक सैनिक डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करीत आहेत. सैनिक देशासाठी बलिदान देत आहेत..आपण निदान मतदान तरी करावे, असा संदेश या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून मनोज शिवाजी सानप यांनी दिला. सीमेवर देशाचे रक्षण करताना शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे या वीरमातेची गाथा त्यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून उभी केली. देशासाठी सैनिक म्हणून मुलाचे बलिदान हा अभिमान आणि दुसरीकडे मुलगा गमावल्याचे आईचे दु:ख हा प्रसंग एका वीरमातेच्या भूमिकेतून त्यांनी साकारला. आज सीमेवर सैनिक रक्षण करताना आपल्या प्राणाचे बलिदान देत आहेत, मग आपल्याला तर फक्त मतदान करावयाचे आहे, असे आवाहन करीत मतदान नक्की करा आणि आपली भारतीय लोकशाही बळकट करा, हे असे आवाहन वीरमाता मतदारांना करीत असल्याचा प्रसंग मनोज सानप यांनी साकारला. मतदान हे आपले पहिले कर्तव्य आहे, त्यामुळे ते प्रत्येकाने बजावणे आपला अधिकार आहे. सैनिक सीमेवर बलिदान करीत आहेत, आपल्याला फक्त मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे आहे, असे जनजागृतीपर आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील नाविन्यपूर्ण मतदार केंद्रे

ठाणे : ठाणे जिल्ह्यात २० मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानासाठी २५- ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त  नागरिकांनी मतदान करावे असे  आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग आणि युवा ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत सखी मतदान केंद्रे : १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ४३६ (रॉयल कॉलेज), १४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.४३९ (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. २ तळमजला), १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९९ (नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क, ओपन स्पेस पार्टीशन १ रोड नं. २२ वागळे इस्टेट, ठाणे), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २६५ (एनकेटी महाविद्यालय, खारकर आळी, तळमजला सभागृह ठाणे), ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १५२ (सरस्वती हायस्कूल, तळमजला, सेक्टर ५, ऐरोली), बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.१२४ (सेव्हनडे ॲडव्हेटेन्ज हायर सेकंडरी स्कूल,सेक्टर 8 सानपाडा) येथे सखी मतदान केंद्रे असणार आहेत. दिव्यांग मतदान केंद्रे- १४५ मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९१ (बिशॉप इंटरनॅशनल स्कूल), ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३२६ (टीएमसी जिद्द शाळा, तळमजला वसंतविहार, ठाणे )  कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३०६ (विठ्ठल रुक्मिणी सेवा संघ, कमल तलावासमोर, पार्टीशन नं २ गांधी नगर रोड, गांधीनगर ठाणे ), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २८३ (सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, तळमजला, पाचपाखाडी), १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १४१ (दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी ग्राऊंड फ्लोअर, ऐरोली सेक्टर 16),  बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २०५ (स्किल ॲण्ड ॲबॅलीटी बॉईज स्कूल, सेकटर ११ प्लॉट नं. ९ नेरुल नवी मुंबई) येथे ती असणार आहेत. युवा मतदान केंद्रे  – मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९६ (भाईंदर सेकंडरी स्कूल, तळमजला रुम नं १), ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३३२ (शिवाई विद्यालय, शिवाई नगर, ठाणे) कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १७० (ठाणे मॅन्युफॅक्चर असोसिएशन, जे.के. ऑडीटोरीयम हॉल, वागळे इस्टेट ठाणे), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३५३ (विद्याप्रसारक मंडळ कॉमर्स ॲन्ड आर्टस कॉलेज, बि नं ३, बांदोडकर कॉलेज ऑफ कॉमर्स, ठाणे ), ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १६९ (जमनाबाई जनार्दन माधवी नवी मुंबई महापालिका शाळा क्र 48 तळमजला, सेक्टर ७ दिवा गांव ऐरोली), बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २८ (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी) येथे तयार करण्यातआली आहेत.

वर्तकनगर रहिवाशांचा मतदान बहिष्कार निर्णय मागे !

प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर अनिल ठाणेकर ठाणे : पुनर्विकास रखडल्याने वर्तकनगर येथील रहिवाशांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने आता या रहिवाशांनी  मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नं. १२ इमारतीचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. पाठपुरावा करूनही विकासक दाद देत नव्हता. अखेर येथील ३२ कुटुंबांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी राजू फाटक यांनी विनंती करत बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट करून दिली. आमदार प्रताप सरनाईक यांनी रहिवाशांच्या बैठकीत विकासकाला फोन केला. विकासकाने येत्या ८ दिवसात रहिवाशांशी चर्चा करतो असे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांना दिले. यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी या रहिवाशांना लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर रहिवाशांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या शब्दाला मान देऊन मतदान बहिष्कार निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मतदान साहित्य पोहोचले मतदान केंद्रांवर !

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील भिवंडी, कल्याण,  ठाणे या तीनही लोकसभा मतदारसंघातील कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राधर पोहचले आहेत. मतदान साहित्य वाटप आणि ते मतदान केंद्रांवर घेऊन जाणे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्तम असे नियोजन केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना* बजावता येणार मतदानाचा हक्क – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील २३ भिवंडी, २४ कल्याण व २५ ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण ६६०४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.  या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात आले आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघ   – एकूण मतदार – २०८७६०४ (पुरुष मतदार-११२९७१४, महिला मतदार- ९५७१९१, तृतीय पंथी मतदार-३३९, सेवा मतदार-३६०). भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 324046 (पुरुष मतदार-168329, महिला मतदार-155638, तृतीय पंथी मतदार-11, सेवा मतदार-68). शहापूर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 279176 (पुरुष मतदार-143402, महिला मतदार-135735, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-39). भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 304975 (पुरुष मतदार-176499, महिला मतदार-128338, तृतीय पंथी मतदार- 122, सेवा मतदार-16) भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 336124 (पुरुष मतदार-198044, महिला मतदार-137887, तृतीय पंथी मतदार- 179, सेवा मतदार-14) कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 400278 (पुरुष मतदार-212612, महिला मतदार-187514, तृतीय पंथी मतदार- 12, सेवा मतदार-140). मुरबाड विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 443005 (पुरुष मतदार-230828, महिला मतदार-212079, तृतीय पंथी मतदार- 15, सेवा मतदार-83). कल्याण लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार – 2082800 (पुरुष मतदार-1117414, महिला मतदार-964021, तृतीय पंथी मतदार-786, सेवा मतदार-579). अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 353661 (पुरुष मतदार-189844, महिला मतदार-163654, तृतीय पंथी मतदार- 56, सेवा मतदार-107).…

‘वोट जिहाद’ला ‘वोट यज्ञ’ने चोख उत्तर देणार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भिवंडीत इशारा भिवंडी : लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून `वोट जिहाद’ घडविले जात आहे. त्याला `वोट यज्ञ’ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त `वोट’ एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्ये `समिधा’ म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजुरफाटा येथे आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अनुसुचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष व श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, भाजपाचे आमदार महेश चौघुले, निरंजन डावखरे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष माने, मनोज काटेकर, भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, मनसेचे मनोज गुळवी आदींसह महायुतीचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी मतदान करा, असे कोणी सांगत असेल, त्यांना `जो मोदी का नही, वो हमारे काम का नही’, असे उत्तर द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाभारतातील लढाईचा संदर्भ देत इंडी आघाडीत राहुल गांधी, उद्धव ठाकरे असे कौरव जमा झाले असून, या लढाईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पांडवांकडून शस्त्राने नव्हे तर `वोट’ ने उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. यंदाची निवडणूक ही जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा निवडीची आहे, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले भिवंडी शहराचा २०१४ पासून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व भाजपाचे आमदार महेश चौघुले यांच्याकडून विकास केला जात आहे. एकेकाळी भिवंडी हा अप्रगत भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र, येथील नागरिकांनी भाजपाला मत दिल्यामुळे भिवंडी शहराचा चेहरामोहरा बदलला, असे प्रतिपादन श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्यामा-श्याम सत्संग समितीचा भिवंडीत कपिल पाटील यांना पाठिंबा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये भिवंडीतील अग्रगण्य श्यामा-श्याम सत्संग समितीने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच गेल्या दहा वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या कार्याबद्दल आनंद व्यक्त करून मला पाठिंबा दिला. या वेळी समितीचे अध्यक्ष श्यामबाबू गुप्ता, उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, महासचिव सत्यनारायण लोहिया, सचिव प्रशांत धुमाळ, खजिनदार भरत शहा यांच्यासह समितीचे सत्संगी उपस्थित होते. चौकट फडणवीसांच्या ११५ व्या सभेने भिवंडीत प्रचाराचा समारोप देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत देशभरासह महाराष्ट्रात ११५ सभा घेतल्या. भिवंडीतील उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारावेळी झालेल्या सभेत श्री. फडणवीस यांनी ही माहिती दिली. तसेच राज्यात महायुतीचा विजय होणार असल्याची ग्वाही दिली.

भिवंडीतील मतदान केंद्रावर होणार आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन

महिला, युवा, दिव्यांग या नाविन्यपूर्ण मतदान केंद्रावर होणार मतदान – अशोक शिनगारे अनिल ठाणेकर ठाणे: २० मे रोजी होत असलेल्या लोकसभा २०२४ निवडणुकांसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मेहनत घेत असून महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद्र एकसारखी असावीत यासाठी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकी १ या प्रमाणे १८ केंद्रे सखी मतदान केंद्रे, १८ युवा मतदान केंद्रे, १७ दिव्यांग केंद्रे व काही मतदान केंद्रे हे आगरी –कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारी करण्यात येणार आहे. महिला मतदान केंद्रावर संपूर्ण पथक हे  महिलांचे असणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष,तीन मतदान अधिकारी, शिपाई म्हणून महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी थीम गुलाबी रंग ठरविण्यात आली आहे. यामध्ये महिला मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व महिला कर्मचारी यांनी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या महिलांचे फोटो लावण्यात येणार आहेत. युवा मतदान केंद्रावर सर्व युवा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी पिवळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुध, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी पिवळया रंगाचे वस्त्र (टिशर्ट/शर्ट) परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या युवा यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्रज्ञ, अभिनेता यांचे फोटो लावण्यात येणार आहेत,ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये १७ मतदान केंद्रांवर दिव्यांग कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी फिक्कट निळा/आकाशी रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी फिक्कट निळा/आकाशी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या दिव्यांग यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्र, अभिनेता, लेखक यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. भिवंडी ग्रामिण मतदार संघामधील सारंग या गावातील मतदान केंद्र क्र.३२१ हे विशेष (युनिक) मतदान केंद्र असणार आहे. हे मतदान केंद्र ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी संस्कृतीने सजविण्यात येणार आहे. यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, मासे विक्रीसाठी वापरण्यात येणा-या टोपल्या, बोट, रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी हे पारंपारीक कोळी वेशभुषेत असतील. २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना केले आहे.