तुकाराम बीजनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील कोपर येथील मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. या यावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, माजी उपसरपंच विजय घरत, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, किशोर पाटील, साईचरण म्हात्रे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नालेसफाईची कामे १५ एप्रिलपासून सुरू करण्यात यावीत
आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा ठाणे : नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले. या बैठकीत, नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, १५ एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील ८६ अती धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा, असेही श्री. राव यांनी स्पष्ट केले. इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरिक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे. त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा. अती धोकादायक इमारतीत रहिवासी रहात असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. माणुसकीचा दृष्टीकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी, असेही श्री. राव यांनी सांगितले. अती धोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी, इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात, याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्त श्री. राव यांनी केली. वंदना एसटी स्टॅण्डसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली. मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आप्तकालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे, असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तत्काळ प्रतिसाद दिला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. आपत्कालीन कक्षाला भेट बैठकीनंतर, ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त श्री. राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली. तसेच, मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आप्तकालीन कक्षात असावेत, असे आयुक्त श्री. राव म्हणाले. त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिली. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तिव्रता कमी होते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. टीडीआरएफची केली पाहणी हाजूरी येथील टीडीआरएफच्या शिबिरालाही आयुक्त श्री. राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधनसामुग्री, गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखी कोणती साधनसामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी, असेही आयुक्तांनी या पथकाला सांगितले. डाटा सेंटरचा वापर वाढवावा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अदययावत डाटा सेंटरलाही आयुक्तांनी भेट दिली. हे सेंटर अद्ययावत आहे. त्यामुळे त्याचा वापर वाढवून कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीचा अर्लट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या भेटीदरम्यान, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते. 00000
ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो ?
राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार पक्षाने काढले परांजपे-मुल्लांचे वाभाडे अनिल ठाणेकर ठाणे : आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा परांजपे-मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचे हाॅस्पीटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? , याचे उत्तर परांजपे-मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी वाभाडे काढले. जो नाही झाला बापाचा; जो नाही झाला ठाकरे-शिंदेंचा; जो नाही झाला आव्हाडांचा , तो काय होणार अजित पवारांचा? , असा सवाल करीत सुहास देसाई म्हणाले की, आनंद परांजपे यांना महायुतीतच काय तर त्यांच्या पक्षातही महत्व नाही. त्यामुळेच ते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर उठसूठ टीका करून महत्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे दोन वेळा कॅबिनेट मंत्री होते. पण, त्यांनी कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण, पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात, हे सबंध ठाण्याला माहित आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरूवात केली आहे. परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत सबंध आहेत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांनी जाहीरपणे कसेकाय सांगितले होते? शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इसमाला कोणी दिली होती? कुणाच्या ऑफिसमध्ये इसीसचा सदस्य कामाला होता? एवढेच नाही तर ज्या कोकण मर्क॔टाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पहात आहेत; त्या बँकेत कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लीम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबविली? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचे बिल कोणी भरले होते, याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा ! कार्यालयातील खाणं-पिणं, टिपटाॅपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे. तेव्हा याच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळले होते, याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला. विक्रम खामकर यांनी, गद्दार गटाचे आनंद परांजपे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गाड्या भरून माणसे अजित पवार यांच्या बंगल्यावर नेली होती. पण, त्यांचे नावही कुणी घेतले नाही. लोकसभेला तर किंचीतसा उल्लेखही झालेला नाही. पक्षात किमंत नसल्याने ते नैराश्यातून अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या पत्नी म्हणजेच आनंद परांजपेंच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत, अशी टीका केली. तर , रचना वैद्य यांनी, रिकाम्या भांड्याचा मोठा आवाज येत असतो. आनंद परांजपे हे असेच रिकामे भांडे आहे. ठाण्यातील स्वतःचे नाव उंच करण्यासाठी परांजपे हे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करीत आहेत. पण, त्यांना त्यांचेच लोक गांभीर्यपूर्वक घेत नाहीत, हे सत्य त्यांनी स्वीकारावे, असे सांगितले. या पत्रकार परिषदेस ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे आदी उपस्थित होते.
संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ठाणे मुक्ती दिन’ साजरा
ठाणे : सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ‘ठाणे मुक्ती दिन’ मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदाचे वर्ष १० वर्ष होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, प्रशांत आलुगडे, संगीता श्री. सीताराम राणे, परिवहन सदस्य श्री. विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळाली होती. या जाचातून सोडविण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्रीत स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोरतुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला आणि ठाणे मुक्त केलं. या लढाईत बलकवडे, ढमढरे, अंजूर चे नाईक यांनी पराक्रम गाजवाला. अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली व ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला.तर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
ऑस्ट्रेलियन नागरिकाला होरायझन हॉस्पिटलने दिले जीवदान
श्वास घेणेही झाले होते कठीण, मित्रही आला धावून; दाखविले माणुसकीचे दर्शन नितिन दूधसागर ठाणे : भारतीय वंशाचा 49 वर्षीय ऑस्टेलियन नागरिक ठाण्यात सासूला भेटण्यासाठी भारतात आला. मात्र निमित्त झाले खोकल्याचे आणि अचानक त्यांची प्रकृती खालावून श्वासही घेणे कठीण झाले. संसर्गजन्य आजाराने त्रस्त झालेल्या या रुग्णाला तातडीने नौपाडा येथील होरायझन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. होरायझन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उपचार करुन शर्थीच्या प्रयत्नांनी जीवदान दिले आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक हे 16 फेब्रुवारी 2024 रोजी बाळकुम, ठाणे येथे राहणाऱया त्यांच्या सासूला भेटण्यासाठी भारत भेटीवर आले. भारतात आल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांना खोकला आणि अशक्तपणाचा त्रास होऊ लागला. छातीत किरकोळ जळजळ आणि संसर्ग आहे असे समजून त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडून खोकला आणि अशक्तपणावर उपचार सुरू केले. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनतर खोकल्यावर थोडीशी रक्ताची थुंकी दिसल्यानंतर ते अधिक चिंतेत पडले. हळूहळू त्यांना अधिक अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ऑस्ट्रेलियात असलेल्या आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉलवर त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. तिने ताबडतोब भारतातील आपल्या डॉक्टर मित्राशी बोलणे पेले. त्यांना 28 फेब्रुवारी 2024 रोजी ठाण्यातील नौपाडा येथील होरायझन हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजिस्ट, इन्टेन्सिव्हिस्ट आणि वैद्यकीय संचालक यांच्या ओळखीच्या एका फिजिशियनमार्फत होरायझन रुग्णालयात आणले. रुग्णालयात दाखल होताच त्यांना ताप आणि श्वसनाचा त्रास होत होता. खोलीच्या हवेत ऑक्सिजन सॅच्युरेशन 65 टक्के पर्यंत ऑक्सिजन सॅच्युरेशनसह ऊर्जेची कमतरता होती. त्यांना तातडीने एनआयव्हीसपोर्ट देण्यात आला. सखोल तपासणीनंतर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दुसऱयाच दिवशी म्हणजे 29 फेब्रुवारी 2024 रोजी रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे व श्वसनदर व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. व्हेंटिलेटरचा आधार असूनही त्यांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि श्वसनात सुधारणा झाली नाही; हे प्राथमिक फुफ्फुस निकामी होण्याचे सूचक होते. जीवरक्षक उपाय म्हणून ईसीएमओ प्रक्रियेची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे मत घेण्यात आले आणि कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि समुपदेशन करण्यात आले. आवश्यक प्रक्रिया आणि वैद्यकीय व्यवस्थापनासह ईसीएमओ थेरपी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण टीमसाठी तिथला प्रवास खडतर होता. संपूर्ण आयसीयू परिचारिकांच्या कठोर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी डॉक्टर हृषीकेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, परफ्युजनिस्ट, ईसीएमओ थेरपी या महत्त्वाच्या निकषांचे दैनंदिन निरीक्षण तसेच पल्मोनोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ञ, ईएनटी सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट यांचा संपूर्ण प्रवासात सहभाग होता. रूग्णामध्ये सुधारणा दिसू लागल्यावर 7 मार्च 2024 रोजी ईसीएमओ थांबविण्यात आला. धमनी लाइन काढून टाकण्यात आली. टीटी ट्यूब काढून टाकण्यात आली. रुग्णाने संपूर्ण थेरपीला चांगला प्रतिसाद दिला आणि 11 मार्च 2024 पर्यंत आपली स्थिती पूर्णपणे परत मिळवली. या सर्व प्रक्रियेत रुग्णाचा मित्र वेळेत धावून आला आणि आपल्या माणुसकीचे दर्शन दिले. तर अत्याधुनिक सामुग्री आणि योग्य उपचार तसेच देवाच्या कृपेने आज रुग्ण ऑस्ट्रेलीयाला जाण्यास सज्ज असल्याचे डॉक्टर हृषीकेश वैद्य यांनी सांगितले.
‘गडकोटांचे संवर्धन व्हायला हवे, आज ते तग धरुन आहेत उद्या ते दिसणारच नाही’ – हमीदा खान
ठाणे : गडकोटांमुळे इतिहासाबदद्लचा आदर निर्माण होतो, तसेच, इतिहासाची माहिती मिळते. नुसती भटकंती न करता आपण त्याचा अभ्यास करु लागतो असे मत गडरागिणी हमिदा खान यांनी व्यक्त केले. गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे. आज ते तग धरुन आहे, उद्या ते दिसणारच नाही. त्यामुळे आजच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि ते जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे कळकळीचे आवाहन हमिदा यांनी केले. शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्वतर्फे श्री शिवराज्याभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशी (तिथी नुसार) ३५०वे वर्ष साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ६५० किल्ले सर करणाऱ्या दुर्गकन्या हमिदा यांची “शिवाजीमहाराजांच्या गड-दुर्गांची भ्रमंती” याविषयावर शिवकालीन नाणी संग्राहक, अभ्यासक प्रशांत ठोसर यांनी मुलाखत घेतली. हमिदा यांनी ६५० किल्ले सर करताना आलेले अनुभव, अडचणी, मित्रांकडून मिळालेली प्रेरणा हे सांगत आप्पा परब यांनी दिलेले प्रोत्साहन याचा प्रवास उलगडला. माझी गड कोटांची सुरूवात १९९० साली रायगड पासून झाली खरी पण १९९८ साली रायगडला पुन्हा भेट दिल्यावर आप्पांनी रायगडच्या इतिहासाचा खडान खडा सांगितला त्यावेळी सगळेच गडकोट बघण्याचा निश्चय केला आणि १९९९ साली मी एका वर्षात १०० किल्ले सर केले. आप्पांनी गडकोटांची माहिती दिली नसती तर गडकोटांची भटकंती झाली नसती असे त्यांनी आवर्जुन नमूद केले. छत्रपती शिवरायांचे ३५० किल्ले पार करायला औरंगजेबला किती वेळ लागला असता हे त्यांचे किल्ले पाहिल्यावरच अनुभूती येते. सह्य्ाद्रीतील गडकोट ही आपली दौलत आहे अशी सह्याद्री आपल्याला लाभली याचा मला अभिमान आहे. स्वराज्याची दौलतच हे गडकोट आहेत. या गडकोटांमुळेच महाराजांना स्वराज्य जिंकता आले आहे. महाराजांचे हे गडकिल्लेच स्वराज्याचे साक्षीदार आहेत. काही किल्ले तग धरुन आहेत, काही नामशेष होत आहेत तर काहींचा शोध लागत आहे. नामशेष झालेल्.ा गडकोटांच्या चिराही आपल्यासाठी पूजनीय आहेत. काही किल्ल्यांमध्ये तर चक्क गाव वसले आहे त्यामुळे गडकोटांच्या खाणाखुणा शोधाव्या लागत आहेत पण त्या दिसल्या तरी महाराजांची प्रचिती येते अशा भावना हमीदा यांनी व्यक्त केल्या. सर्वांत आवडता किल्ला कोणता हे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, रायगडा हा किल्ला मला अतिप्रिय आहे कारण त्यावर माझ्या राजांचा वास होता. शिवरायांच्या गडकोटांचे वैशिष्ट्य वेगळे आहे त्यामुळे एका किल्लयाची दुसऱ्या किल्ल्यासोबत तुलना करुच शकतन नाही असेही त्या म्हणाल्या. रायगड ही ट्रेकर्स मंडळीची पंढरी आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात तिथीच्या दिवशी ममहाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यादिवशी महाराज सििंहासनाधिश्वर झाले. या क्षणाचा रायगड हा साक्ष आहे. म्हणून ट्रेकर्स हे रायगडावर जाऊन, महाराजांना मुजरा करुन पुढची वाटचाल करत असल्याचे हमीदा यांनी शेवटी सांगितले.
केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरुद्ध कर्नाक बंदर येथे गोदी कामगारांची प्रचंड निदर्शने
ठाणे : भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून नवीन वेतन करार लागू आहे. आत्तापर्यंत या करारासाठी सात मिटिंग झाल्या असून, इंडियन पोर्ट असोसिएशनने ४ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांच्या पाचही महासंघाच्या राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे कडाडून विरोध केला असून, केंद्र सरकारच्या या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्व प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांनी निदर्शने केली. मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशन, फ्लोटिला वर्कर्स असोसिएशन, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समिती, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी./ एस. टी. अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशन या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने २७ मार्च २०२४ रोजी जेवणाच्या सुट्टीत कर्नाक बंदर येथे कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. याप्रसंगी ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स) जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, गोदी कामगारांचा वेतन करार आत्तापर्यंतच्या प्रथेनुसार मूळ पगारात महागाई भत्ता समाविष्ट करून केला पाहिजे. सरकार व मालक आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे, हे आपण ओळखले पाहिजे. आपणांस लढल्याशिवाय काही मिळणार नाही, त्यासाठी सर्व कामगारांनी एकजुटीने लढा देण्याची काळाची गरज आहे. ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरशी पारेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, अधिकाऱ्यांपेक्षा कामगारांना जास्त पगार मिळता कामा नये, ही सरकारची अट चुकीचे आहे. गोदी कामगारांना मूळ पगारात महागाई भत्ता समाविष्ट करून १७ टक्के पगारवाढ मिळालीच पाहिजे. सरकारने पगार वाढीसाठी घातलेल्या अटी मागे घेतल्या पाहिजेत. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार व मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनचे पदाधिकारी विजय कांबळे, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे सचिव उदय चौधरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मीनास मेंडोसा, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी./एस. टी. अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी गिरीश कांबळे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी विजय रणदिवे, शीला भगत, अहमद काझी, मारुती विश्वासराव, मनीष पाटील, संदीप चेरफळे, प्रदीप नलावडे, ट्रान्स्पोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी बबन मेटे, बापू घाडीगावकर, फिलिप्स आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लडाखच्या न्याय लोकचळवळीला जनआंदोलनांचा पाठिंबा-जगदीश खैरालिया
अनिल ठाणेकर ठाणे : लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि त्यांच्या बरोबर लडाखचे हजारो नागरिक लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि लडाखच्या समृद्ध आणि अद्वितीय अशा पर्यावरणाचे जतन व्हावे यासाठी गेले २१ दिवस उपोषण करत होते; काल त्याचा शेवटचा दिवस होता. दिनांक २३ मार्च २०२४ रोजी शहिद भगतसिंगांच्या शहादत दिनी व डॅा. राम मनोहर लोहिया जयंतीदिनी जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय महाराष्ट्रने लडाखच्या न्याय्य लोकचळवळीला पाठिंबा म्हणून दिवसभर उपवासाचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रभरातून २२ जिल्ह्यांतील सुमारे २०० जणांनी तसेच दिल्ली, कॅनडा आणि लंडन येथूनही काहीजणांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असा दिवसभराचा उपवास केला. यात ठाण्यातील २५ जणांनी सहभाग घेतला , अशी माहिती समन्वयाचे ठाणे जिल्हा संयोजक जगदीश खैरालियांनी दिली. लडाख सारख्या प्रदेशात विकासाच्या नावाने पर्यावरणावर होत असलेले आघात आणि स्थानिकांच्या मतांना प्राथमिकता न देण्याचा परिणाम म्हणून तेथील नागरिक संविधानाच्या ६ व्या अनुसूची मार्फत होणार्या विकास नियोजनात सामील होण्याचा अधिकार मागत आहेत. यावर प्रश्न विचारणारे त्यांना ‘विकास विरोधी’ संबोधत आहेत, हे चुकीचे आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ ची घोषणा सुद्धा यामुळे खोटीच ठरली आहे. संविधानाच्या अनुच्छेद २४३, २४४ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचे पालन तसेच आदिवासींच्या (अनुसूचित जमाती) क्षेत्रात ‘पेसा’ कायद्याचे पालन न झाल्याने संपूर्ण देशात विकासाचे नियोजन लोकशाही पद्धतीने न होता ते भांडवलशाही, बाजार आणि राजकीय आधारावर होत आले आहे आणि त्यामुळे असमानता, विनाश आणि विस्थापनच्या रुपात सामान्य जनता विशेषतः आदिवासी आणि जनजाती समुदाय त्याचा त्रास भोगत आहे. याच परिप्रेक्षात लडाखच्या लोकांच्या मागण्यांना समर्थन देणे आवश्यक आहे, असं समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक डॅा. संजय मंगला गोपाळ म्हणाले. यात उल्लेखनीय बाब अशी की भाजप सरकाराने स्वतः आपल्या २०१९ च्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात लडाखला ६ व्या अनुसूचित सामील करण्याचे आश्वासन दिले होते पण आता ५ वर्षा नंतरही ते आश्वासन पाळले नाही. कॉर्पोरेट घराण्याच्या दबाव आणि प्रभावाखाली सर्वात जास्त काम करणारे हे सरकार मुळात तिकडच्या लोकांना आपल्या लोकशाही हक्कांपासून वंचित करुन लडाखला कंपन्यांच्या हवाली करण्याच्या विचारात आहे. या पर्यावरणीयदृष्टया संवेदनशील क्षेत्रात जिथे जमिनीची लूट आणि निसर्गाशी खेळ करणे खूप महागात पडू शकतं तिथे संविधानाचे संरक्षण असणे महत्वाचे आणि गरजेचे आहे, असं मिक्ता श्रीवास्तव यांनी सांगितलं. आज देशात संविधानिक मूल्ये, संघराज्य रचना, समता, न्याय, बंधुता, समाजवाद, निसर्गाचे रक्षण आणि लोकशाही प्रक्रियेने विकेंद्रित आणि निरंतर विकास यांची कास धरत प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजांची पूर्ति करणे गरजेचे आहे. याच व्यापक विचारधारेच्या उद्देशासह लडाखच्या जनतेचा संघर्ष महत्वाचा आहे. हा संघर्ष सर्व भारतवासियांना एक विशेष संदेश देतो आहे, असं समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम म्हणाल्म्ही, लडाखच्या जन आंदोलनाला संपूर्ण समर्थन देत असताना भारत सरकारकडे मागणी करतो आहोत की त्यांनी लडाखच्या जनतेची मागणी पूर्ण करावी. कडाक्याच्या थंडीत २१ दिवसाच्या उपोषणाला बसलेल्या व्यक्तीबरोबर १८ दिवस झाले तरी सरकार द्वारा काहीही संवाद नाही, हे या सरकारची असंवेदनशीलता दर्शवते. आम्ही या पत्रकाद्वारे इशारा देतो की, केंद्र सरकाराने लडाखच्या जनतेचा अपमान करू नये आणि सत्याच्या विरोधात असत्य आणि दमनाचा मार्ग घेऊ नये; नाहीतर संघर्ष तीव्र होईल हे नक्की! केंद्र सरकारने लडाखच्या संघटनांशी, समन्वयाशी लगेच संवाद सुरु करावा ही मागणी करत आहोत, असे प्रतिपादन समन्वयाच्या राज्य समन्वयक सिरत सातपुते यांनी केले. आम्ही लडाखच्या लोकांना सुद्धा अपील करू इच्छितो की, आपल्या क्षेत्रात नैसर्गिक संपदा आणि सांस्कृतिक विविधतेला वाचवण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठीं त्यांनी भाजप आणि RSS यांच्या राजकीय इच्छा आकांक्षाना समजून घेणे आणि निवडणूकीत आणि प्रत्यक्ष जमिनीवर त्यांना हरवणे अतिशय जरुरी आहे. आपल्या देशाच्या व्यापक लोकशाहीला आणि संविधानाला वाचवतच आपण लडाखला वाचवू शकू, असं आंदोलन मासिकाच्या संपादक मंडळ सदस्य मीनल उत्तुरकरांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन अजय भोसले यांनी तर प्रास्ताविक दर्शन पडवळ या एकलव्य कार्यकर्त्याने केले.
विहंग प्रतिष्ठान आयोजित काव्यरंगोत्सव
ठाणे : विहंग प्रतिष्ठान या नेहरुनगर कुर्ला येथील संस्थेच्या वतीने शनिवार, ३० मार्च रोजी काव्यरंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्ला पूर्व येथील नेहरुनगरमधील शां. कृ. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहामध्ये सायंकाळी ६ वाजता हा काव्यरंगोत्सव होणार असून आहे. यानिमित्त घेण्यात आलेल्या हास्यकविता स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या १० कवितांचे सादरीकरण काव्यरंगोत्सवात संबंधित कवीद्वारे करण्यात येईल. काव्यरंगोत्सवास लेखिका माधवी कुंटे, कवयित्री लता गुढे, कवयित्री चारुलता काळे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालिका सायली वेलणकर या पाहुण्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. अधिक माहितीसाठी राजीव भांडारे (८१०८४३४८६४), राजश्री कदम (७७३८०५११४७) यांच्याशी संपर्क साधावा.
आयुषने दाखवला अंतिम फेरीचा रूट
४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा ठाणे : चार विकेटसह नाबाद ६९ धावांची खेळी करत आयुष वर्तकने रूट मोबाईल संघाला ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील अ गटाच्या अंतिम फेरीचा मार्ग मोकळा करून दिला. उपांत्य फेरीच्या सामन्यात रूट मोबाईल संघाने मुंबई पोलीसांच्या ब संघावर सहा विकेट्सनी विजय मिळवत निर्णायक फेरीत स्थान मिळवले. नाणेफेकीचा कौल जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय रूट मोबाईल संघासाठी फायदेशीर ठरला. आयुष वर्तकांची अचूक टप्प्यावरील गोलंदाजी आणि त्याला चांगली साथ देणाऱ्या हितेश परमार, दिनार गावकरच्या माऱ्यासमोर मुंबई पोलिसांनी १४७ धावांवर आपल्या बॅटी म्यान केल्या. संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून देताना अनुज गिरीने सर्वाधिक ५२ धावा केल्या. तन्मय गावकरने १४ धावा केल्या. बंगळुरु येथील १९ वर्षाखालील नॅशनल क्रिकेट अकॅडेमीतील प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या आयुषने ३७ धावांत चार बळी मिळवत मुंबई पोलिसांना चांगलेच त्रासावले. हितेश आणि दिनारने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या छोट्या आव्हानाला सामोरे जाताना तीन फलंदाज अवघ्या १८ धावांवर माघारी आल्यामुळे रूट मोबाईलचे नेटवर्क डळमळीत झाले होते. पण अथर्व काळे आणि आयुषने चौथ्या विकेटसाठी १३१ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाला विजयाच्या दिशेने नेले.अथर्वने ४९ धावांची खेळी केली. मुंबई पोलीसांच्या अतुल मोरेने दोन, साईप्रसाद हिंदळेकर आणि तन्मय मयेकरने प्रत्येकी एक गडी बाद केला. संक्षिप्त धावफलक : मुंबई पोलीस (ब) : ३३ षटकात सर्वबाद १४७ ( अनुज गिरी ५२, तन्मय मयेकर १४, आयुष वर्तक ७-३१-४, हितेश परमार ७-१-२४-२, दिनार गावकर २-१८-२, प्रभाकर निषाद ६-२५-१, अजय मिश्रा ७-२४-१) पराभूत विरुद्ध रूट मोबाईल : २०.२
