Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 नगरपालिका आणि महापालिकांना केंद्र शासन देत असलेल्या निधीचे सुक्ष्म निरीक्षण करा- नरेश म्हस्के

नगरपालिका आणि महापालिकांना केंद्र शासन देत असलेल्या निधीचे सुक्ष्म निरीक्षण करा- नरेश म्हस्के केंद्रीय स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर खासदार नरेश म्हस्के यांच्या महत्वपूर्ण सूचना नवी दिल्ली – शहरांच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र शासन हे नगरपालिका आणि महापालिकांना विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी देत आहे. या योजनांच्या निधीचा सुक्ष्म अभ्यास करुन त्याची योग्य अंमलबाजावणी करणे अत्यंत गरजेची असल्याची बाब आज खासदार नरेश म्हस्के यांनी शहरी नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केली. तसेच पीएम स्वनिधी योजनेचे योग्य निरीक्षण, पंतप्रधान आवास योजनेला गती देणे, पीएम ई बसेसचे नियम शिथिल करणे, पर्यटन आणि गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करणे, समुद्र आणि नदीच्या ड्रेनेज यंत्रणेसाठी विशेष अनुदान देणे अशा महत्वपूर्ण विषयांवर खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत सूचना करुन शिफारशी केल्या.  नवी दिल्लीतील संसद भवनात आज शहरी नगर विकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक चेअरमन उंगाठा श्रीनिवास रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.   या बैठकीत सन २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाचे परिक्षण, चर्चा करण्यात आली. यावेळी या समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी चर्चेत भाग घेतला. केंद्र शासन नगरपालिका आणि महानगरपालिकांसाठी करोडो रुपयांचा निधी देत आहे. पालिकांच्या माध्यामातून शहरांचा योग्य दिशेने विकास होणे गरजेचे आहे. याचसाठी दिलेल्या निधीवर केंद्राची देखरेख असणे आवश्यक असल्याचे बैठकीच्या प्रारंभी खासदार नरेश म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिले. देशातील फेरीवाल्यांसाठी केंद्र शासनाने पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यामातून करोडो रुपयांचा निधी केंद्र शासन खर्च करत आहे. मात्र देशांतील पालिका ही योजना सुक्ष्मपणे राबवत नसल्याने त्याचा काही जण गैरफायदा घेत आहेत. बांगलादेशी फेरीवाल्यांचा यात प्रामुख्याने भरणा असणे ही चिंतेची बाब आहे. या योजनेचा लाभ बांगला देशी फेरीवाल्यांना मिळणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. पालिकांनी फक्त उद्देश पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवू नये, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य लाभार्थ्याला त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. खासदार हेमा मालिनी, खासदार रवींद्र वायकर, खासदार मेधा कुलकर्णा आणि देशातील सर्व पक्षीय खासदारांनी या सूचनेचे स्वागत करत पाठिंबा दिला. प्रदुषणमुक्त आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम ई बस योजना सुरु केली आहे. मात्र जाचक अटींमुळे काही पालिकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या योजनेतील अटी शिथील करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.   सागरी, नदी आणि खाडी किनारी असलेल्या मुंबई व ठाणे व देशातील इतर शहरांतील ड्रेनेज व्यवस्था मजबुतीकरासाठी विशेष अनुदान देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली. आज देशातील पर्यटन वाढत आहे. पर्यटन व गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी एक मॉडेल तयार करुन देशाअंतर्गत ती राबविण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.  शहरांचा विकास झपाट्याने होत आहे. मात्र सार्वजनिक कामांसाठी जमिनी कमी पडत आहेत. या जमिनी अधिग्रहण करण्यासाठी राज्य शासन, नगरपालिका मागे पडत आहेत. या जमिनी अधिग्रहणासाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आतापर्यंत देशात ९७.२० लाख घरांची निर्मिती झालेली आहे. मात्र अद्याप १८ लाख घरांची निर्मिती होणे बाकी असून ती पूर्ण करण्यासाठी तातडीने केंद्राने पावले उचलण्याची गरज आहे. तसेच कामगारांच्या रेटल हाऊसिंग योजनेची कामे गतीने सुरु करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.…

 ‘मोर्चा’ या कथेस प्रथम क्रमांक तर ज्ञान तेच देव या कथेस द्वितीय क्रमांक

राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा संपन्न ‘मोर्चा’ या कथेस प्रथम क्रमांक तर ज्ञान तेच देव या कथेस द्वितीय क्रमांक कल्याण : नाट्य रसिकहो कल्याण आयोजित राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेत इरसाल स्टोरी टेलर्स, मुंबई यांनी सादर केलेल्या “मोर्चा” या कथेचे अभिवाचन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तसेच ज्ञान वैखरी, पुणे या संस्थेने सादर केलेल्या “ज्ञान तेच देव” या कथा अभिवाचनास द्वितीय क्रमांकाचे व प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई यांनी सादर केलेल्या “राडा” या कथा अभिवाचनास तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच  स्टुडिओ- ६४ पुणे या संस्थेच्या “डियर फादर”, सुमंगल फाउंडेशन कल्याण या संस्थेच्या “गुडघ्या एवढ्या महापुराची कहाणी” व प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई  यांच्या बेईमान या कथा अभिवाचनाला सांघिक उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर झाला असल्याचे नाट्य रसिकहोचे अध्यक्ष व प्रमुख आयोजक सुरेश पवार यांनी सांगितले. या राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, नाशिक ठाणे तसेच कल्याण डोंबिवली मधील एकूण २३ संघांचा सहभाग होता. कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथील कॉन्फरन्स हॉलमधील या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ करिता नगरसेविका आर्या नाटेकर, ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी भिकू बारस्कर, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कार्यकारणी सदस्य शिवाजी शिंदे, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रवींद्र सावंत, बालरंगभूमी परिषद कल्याण अध्यक्षा सुजाता डांगे, ज्येष्ठ अभिनेते राम दौंड, आनंद जाधव, सुधीर चित्ते, डॉ. प्रदीप सरवदे, किरण डांगे आणि राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष हेमंत यादगिरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाट्य अभ्यासक आणि चतुरस्त्र रंग कर्मी अरुण कदम व आकाशवाणी वृत्त निवेदिका तसेच अनेक अभिवाचन कार्यक्रमाच्या अनुभव असलेल्या श्रद्धा वझे यांनी परीक्षण केले. नाट्य रसिकहो अध्यक्ष म्हणून बोलताना सुरेश पवार म्हणाले की, यंदाचे या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. व यंदाचा प्रतिसाद हा अधिकच सुखावह असाच असल्याने यापुढे सदर स्पर्धा अधिकाधिक आकर्षक व दर्जेदार करण्यासाठी निश्चितच कटिबद्ध राहू असे सांगितले.  याप्रसंगी अभिनेते सुधाकर वसईकर, अविनाश साळवी, विशाल राऊत, निलेश शास्त्री, किरण खांडगे, माणिक शिंदे, सिताराम शिंदे, महेश जोशी, हेमंत कर्णिक, डोंगरे, आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन ठाणे :- थोर समाजसुधारक, स्वच्छता व सामाजिक समतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वरुणकुमार सहारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, तहसीलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर, तहसीलदार (संगणक/सांख्यिकी) संदीप थोरात, तहसीलदार (रेतीगट) अमोल कदम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगे महाराज यांनी कीर्तनांच्या माध्यमातून समाजात स्वच्छता, नैतिकता आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्यातून समाजजागृतीची चळवळ उभी राहिली.

 ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्वतंत्र वाहतूक विभागासाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ची मागणी

ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्वतंत्र वाहतूक विभागासाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ची मागणी डंपर अपघाताने दिला इशारा कल्याण  : भरधाव डंपरच्या धडकेने नुकतेच टिटवाळा हादरले आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्या. वाढती जड वाहनांची वर्दळ, अपुरे नियंत्रण आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची भावना नागरिकांत तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, टिटवाळा शहर यांच्यावतीने ॲड. जितेंद्र जोशी यांनी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करण्याची ठाम आणि व्यापक मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या डंपर अपघातात वाहनांचे नुकसान होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेने केवळ टिटवाळ्यातीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे ग्रामीण परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि जड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे प्रभावी व समर्पित वाहतूक शाखेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. महत्वाचे म्हणजे, ही मागणी केवळ टिटवाळा किंवा कल्याण तालुका पोलीस ठाण्यापुरती मर्यादित नसून, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करण्याची आहे. सध्या उपलब्ध पोलीस यंत्रणेवर कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण या दोन्ही जबाबदाऱ्या असल्याने कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे मत व्यक्त होत आहे. या मागणीचा पाठपुरावा करत ॲड. जोशी यांनी  पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांची सुनियोजित भेट मिळावी यासाठी अधिकृत अर्ज सादर केला आहे. भेट निश्चित झाल्यानंतर ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा, आवश्यक मनुष्यबळ, विशेष पथके आणि जड वाहनांवर कठोर नियंत्रण यासाठी ते प्रखरपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुत्रा चावल्यानंतर रेबिज रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

कुत्रा चावल्यानंतर रेबिज रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने ३० वर्षीय युवकाची आत्महत्या कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने त्यापासुन होणारा त्रास आपल्या आईवडीलांना सहन होणार नाही या भावनेने ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयेश विश्वनाश अमिन असे या युवकाने नांव असून त्याच्या पश्चात एक भाऊ आणि वृध्द आई वडील असा परिवार आहे. तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी मध्ये राहणारा आयेश विश्वनाथ अमीन (३०) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गेली आठ वर्षांहून अधिक काळ भारत बँक, ठाणे शाखेत नोकरी करत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात एका भटक्या कुत्र्याने आयेश यांच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जाते. मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. दरम्यान, काल सायंकाळी घरात कोणीही नसताना आयेश यांनी आपण आत्महत्या का करीत आहोत याबाबतची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या सुसाईड नोट मध्ये ‘आपल्याला रेबिजमुळे जो त्रास होणार आहे तो त्रास आपले आई वडील सहन करू शकणार नाहीत त्यामुळे आपण आत्महत्या करीत असून आपल्या मृत्युस कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये’ असे त्याने नमुद केले असून या सुसाईड नोट सोबत डॉक्टरांचे प्रिशेपशनही जोडले असल्याचे समजते.या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस ठाणे करत आहेत.

‘माझी वसुंधरा’अभियानात केडीएमसीला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अभिमानास्पद बाब – महापौर हर्षाली चौधरी

‘माझी वसुंधरा’अभियानात केडीएमसीला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अभिमानास्पद बाब – महापौर हर्षाली चौधरी कल्याण : माझी वसुंधरा अभियान ५.० (सन २०२४-२५) अमृत गटात कोकण विभागीय स्तरावर कल्याण डोंबिवली महापालिकेला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी आज केले. महापालिकेला या मिळालेल्या पुरस्कारासाठी परिश्रम घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन आज स्थायी समिती सभागृहात करण्यात आलेले होते. त्यावेळी बोलताना महापौरांनी हे प्रतिपादन केले आणि पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. महानगरपालिका चांगले काम करीत आहे, याची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार आहे. चांगल्या कामाचे समाधान नक्कीच मिळते, असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात काढले. तथापि कचऱ्याची समस्या मोठी आहे, यासाठी कचरा विलगीकरण करणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रातील गृहसंकुले, विद्यार्थी, एनजीओ यांच्या मदतीने याबाबतची जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश  त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समन्वयाने शहराचा विकास पुर्णत्वास जावू शकतो, असे सांगत उप महापौर राहुल दामले यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपला सहभाग दर्शविला होता. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शहरात विविध पर्यावरणपूरक प्रकल्प, व्यापक जनजागृती मोहिमा, नागरीकांचा सक्रीय सहभाग तसेच पर्यावरण संवर्धन व साश्वत विकासासाठी तांत्रिक आणि व्यवहारीक उपयोजनांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात आली. त्यामुळे हे यश प्राप्त होण्यासाठी वर्षभर सातत्याने परिश्रम घेतलेले अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत आणि त्यांचे सहकारी, अतिरिक्त शहर अभियंता (जनि:मनि:) जगदीश कोरे आणि त्यांचे सहकारी, पर्यावरणाचे उपआयुक्त समीर भुमकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे आणि त्यांचे सहकारी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि त्यांचे सहकारी, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव आणि त्यांचे सहकारी तसेच कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, मनोज सांगळे, या अभियानाचे शहर समन्वयक गितेश झुंझारराव, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व मनपाच्या सोशल मिडीया टिमचे उमेश यमगर तसेच या अभियानासाठी परिश्रम घेतलेले इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग यांचा महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहुल दामले व उपस्थित शिवसेना गटनेते‍ विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, काँग्रेस गटनेते कांचन कुलकर्णी, एनसीपी गटनेते रमीज मनीयार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर आणि सुत्रसंचालन महापालिका सचिव किशोर शेळके यांनी केले. महानगरपालिकेने ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत महाराष्ट्र शासनाने  “Certificate Of Excellence” हा पुरस्कार महानगरपालिकेला जाहीर केला,  ऊर्जा संवर्धन क्षेत्रात योगदान दिल्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत /यांत्रिकी) प्रशांत भागवत आणि त्यांचे सहकारी यांचा  महापौर, आयुक्त व  उपमहापौर यांच्या हस्ते सन्मानपत्र  व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 १० वीच्या लेखी परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित

१० वीच्या लेखी परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार कल्याण :  इयत्ता १० वीच्या पहिल्या लेखी परीक्षेदरम्यान शाळेत वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना कल्याणमधील अनेक शाळांमध्ये घडली होती. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण अधिकारी भारत बोरनारे यांची भेट घेत निवेदन देत वीजपुरवठा खंडित झाल्यास शाळांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्याची मागणी केली. यावेळी भानुदास घुगे, दिनेश मढवी, प्रेमनाथ मढवी, मजरखान पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. २० फेब्रुवारीला इयत्ता १० वीचा पहिला लेखी पेपर सुरू असताना कल्याण डोंबिवली महानगर पालिका शेत्रातील शाळांमध्ये सकाळी ११:३० वाजे पासून वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत उकाडा व अस्वस्थतेमध्ये परीक्षा द्यावी लागली. इयत्ता १० वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. वर्षभर कष्ट करून तयारी केलेल्या वि‌द्यार्थ्यांना योग्य वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र वीज नसल्यामुळे पंखे, लाईट तसेच इतर आवश्यक सुविधा बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता बाधित झाली व त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. ही बाब अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित शाळांना वीजपुरवठा नियमित व अखंडित ठेवण्याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, तसेच या घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी रुपेश थळे यांनी केली आहे.

 ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये विश्वविक्रम नोंद

 कोकण विभागात ५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमला ‘हिंद-दी-चादर’  ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये विश्वविक्रम नोंद नवी मुंबई : (अशोक गायकवाड) – हिंदुस्थानी संस्कृती व मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी…

 पुण्याचे चैतन्य शिंदे आणि दीक्षा यादव ठरले सर्वात वेगवान जलतरणपटू

६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ दिमाखात संपन्न पुण्याचे चैतन्य शिंदे आणि दीक्षा यादव ठरले सर्वात वेगवान जलतरणपटू महाराष्ट्रासह ६ राज्यांतील ३३७ जलतरणपटूंचा जल्लोष मुंबई (क्री. प्र.) : ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) यांच्या वतीने आयोजित ऐतिहासिक ‘६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ स्पर्धा जल्लोषात पार पडली! अथांग अरबी समुद्राच्या थरारक लाटांवर जिद्द, वेग आणि सहनशक्तीचा अफलातून संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्रासह ६ राज्यांतील तब्बल ३३७ जलतरणपटूंनी गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने समुद्राला आव्हान दिले. त्यापैकी ३३० जलतरणपटूंनी हि स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण केली. पुण्याच्या चैतन्य शिंदे आणि दीक्षा यादव यांनी सर्वात वेगवान जलतरणपटूचा किताब पटकावत स्पर्धेवर आपली ठसठशीत छाप उमटवली. आठ गटांमध्ये मुलं-मुली, पुरुष-महिला आणि दिव्यांग खेळाडूंनी लाटांवर वर्चस्व गाजवत जलतरणाचा खरा महोत्सव रंगवला. वेगाचा विजेता ठरले पुण्याचे तारे…

 ओलेक्ट्रा ग्रीनटेकला इ बसची मोठी ऑर्डर

ओलेक्ट्रा ग्रीनटेकला इ बसची मोठी ऑर्डर १,०८५ इलेक्ट्रिक बसेसची १,८०० कोटींचे टेंडर मिळाले मुंबई : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात  महत्वाचा सहभाग असणारी हैद्राबादची कंपनी  ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला (Olectra Greentech) तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (TGSRTC) १,०८५ इलेक्ट्रिक बसेससाठी तब्बल १,८०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. या ऑर्डरमध्ये १,०२५ नॉन-एसी आणि ६० एसी बसेसचा समावेश आहे. या सर्व १२-मीटरच्या बसेस शहरांतर्गत वाहतुकीसाठी वापरल्या जातील. हा करार १२ वर्षांच्या कालावधीसाठी असून तो GCC (Gross Cost Contract) मॉडेलवर आधारित आहे. यामध्ये बसेसचा पुरवठा, संचालन आणि देखभाल ओलेक्ट्रा कंपनी करणार आहे. पुढील २० महिन्यांत या सर्व बसेसचा पुरवठा पूर्ण केला जाईल. गेल्या ३ वर्षात १५९% परतावा देणाऱ्या या कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये आता मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे शेअर बाजारतही या कंपनीची शेअर वर जाण्याची चर्चा सुरू आहे.