अशोक गायकवाड

रायगड : मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामादरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वोतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. तसेच नैसर्गिक, मानवनिर्मित अश्या कोणत्याही आपत्ती किंवा संकटाच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या जीवनदूत यांची सामाजिक बांधिलकी अतिशय कौतुकास्पद असून त्यांना शासनस्तरावरून पुरेसे सहकार्य देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५ अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस यांच्यावतीने जीवनदूत सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन आर. सी. एफ. सभागृह कुरुळ येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना मंत्री गोगावले म्हणाले, रायगड जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या विविधता असलेला आहे. येथे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला सामारे जावे लागते. यावेळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्या मदतीला विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक तात्काळ उपलब्ध असतात. अनेकदा जीवाची पर्वा न करता हे जीवनदूत सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करीत असतात. रायगड जिल्ह्यातील मागील आपत्ती काळात त्यांनी केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांच्या या सेवेसाठी त्यांचे अभिनंदन. तसेच या जीवनदूत यांना शासनामार्फत सहकार्य देण्यासाठी शासन स्तरावर देखील पाठपुरावा करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असेही मंत्री गोगावले यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी अपघात ग्रस्ताना मदत देणाऱ्या स्वयंसेवक किंवा नागरिकांना शासनाने सहकार्य देण्याची भूमिका स्विकारली आहे. संबंधित मदत देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. त्याला पुरेसे संरक्षण देण्यात येईल असेही सांगितले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली,साई सहारा प्रतिष्ठान पेण,साळुंके रेस्क्यू टीम,माणगाव आणि महाड, (एसव्हीआरएसएस) रेस्क्यू टीम कोलाड,शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीम,शेलारमामा रेस्क्यू टीम माणगाव,युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था,एल अँड टी कन्ट्रक्शन महाड,बस चालक,रुग्णवाहिका चालक या जीवन दूतांचा सम्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले तर आभार अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *