Month: March 2026

एस.एस.टी. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिमाखात संपन्न

एस.एस.टी. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिमाखात संपन्न कल्याण: एस.एस.टी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा सोहळा महाविद्यालयाच्या वातानुकूलित प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला उल्हासनगर महानगरपालिकेचे उपमहापौर  अमर लुंड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केटचे जनरल मॅनेजर संजीव बजाज तसेच सुप्रसिद्ध मेंटर आणि उद्योजक सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे  संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरस्वानी आणि प्रभारी प्राचार्य डॉ. दीपक गवादे यांचेही मार्गदर्शन लाभले. अध्यक्ष डॉ. पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत महाविद्यालयाशी असलेले नाते पुढेही टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मेंटर  सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जात आपल्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. समारंभात विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान समारंभाचा पोशाख परिधान करून पदव्या स्वीकारल्या. काही विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा साजरा करत महाविद्यालयाने त्यांच्या यशाचा गौरव केल्याने हा सोहळा संस्मरणीय ठरला.

नाशिक पोलीस आयुक्तालय राज्यात प्रथम

नाशिक पोलीस आयुक्तालय राज्यात प्रथम १५० दिवसांचा ई-प्रशासन उपक्रम हरिभाऊ लाखे नाशिक – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १५० दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय गटात ‘नाशिक जिल्हा – कायद्याचा बालेकिल्ला’ उपक्रम राबविणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई – प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा ई प्रशासन सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई कार्यालय, कार्यालयाचा ‘डॅश बोर्ड’, ‘व्हॉटस ॲप’, ‘चॅटबॉट’, कृत्रिम बुद्धिमत्ता व ‘ब्लॉक चेन’चा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या सात घटकांवर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यात ‘नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम’ राबविणाऱ्या नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाने सर्वाधिक १५६.२५ गुण मिळवून पोलिस आयुक्तालय गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पोलीस आयुक्तालयाने डिजिटल उपक्रम राबविले. नागरिकांशी थेट संवादाचे उपक्रम राबविले. यामध्ये ‘ई मीट वीथ सीपी’, ‘वॉक इन टूर’, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आदींचा समावेश आहे. यामुळे पोलिस दलाच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला. या विषयी पोलीस आयुक्त संदीपकर्णिक यांनी राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नाशिक पोलिस दलाने प्रभावी कामगिरी बजावली. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिस आयुक्तालय सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्हा परिषदेचाही गौरव ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा सन्मानपत्रक देऊन गौरव करण्यात आला. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. सात निकषांत उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक जिल्हा परिषदेने एकूण १६५.७५ गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला.

‘डिलिव्हरीचा मेसेज, पण सिलेंडर गायब!’

‘डिलिव्हरीचा मेसेज, पण सिलेंडर गायब!’ दिव्यात गॅस वितरणात गंभीर गैरव्यवहार दिवा, दि. २८ मार्च (आरती परब): दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर कंपनीकडून “सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा” मेसेज येत असला, तरी प्रत्यक्षात ८ ते १० दिवस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक कुटुंबांची रोजची स्वयंपाकाची व्यवस्था विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे, काही प्रकरणांमध्ये डिलिव्हरी बॉय किंवा संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांना पुन्हा नवीन सिलेंडर बुक करण्यास सांगितले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार सरळसरळ फसवणूक असून न दिलेले सिलेंडर काळाबाजारात विकले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, देशात सध्या आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची चर्चा असताना, दिवा शहरातील काही गॅस एजन्सींकडून नागरिकांची उघडपणे लूट सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः भारत गॅस कंपनीशी संबंधित काही एजन्सींविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संबंधित एजन्सींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसेने प्रशासनासमोर पुढील मागण्या केल्या आहेत: १) संबंधित गॅस एजन्सींवर तात्काळ चौकशी करावी २) दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ३) गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून नागरिकांना वेळेत सिलेंडर उपलब्ध करून द्यावा तसेच, काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर तातडीने कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशांत प्रभाकर गावडे, सचिव, दिवा शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना–  दिवा शहरातील नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मी केली आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त रंगली संगीत रजनी

सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त रंगली संगीत रजनी स्मरणिका `प्रतिबिंब’चे प्रकाशन ठाणे – ज. ए. ई. चे मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय आणि अभिरुची मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त २८ मार्च, सायंकाळी ६ वा शाळेच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांद्वारे संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी विद्यार्थी, प्रसिद्ध निवेदिका, अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, उपकार्याध्यक्ष प्रदीप राका, संस्थेचे कोषाध्यक्ष आणि अभिरुची मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तामरस, संस्थेचे उपकार्यवाह महेश केळकर आणि संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना संपदा जोगळेकर यांनी आपल्या शाळेविषयीच्या आठवणी सांगितल्या. शाळेतील खुल्या रंगमंचामुळे त्या रंगभूमी कडे वळल्या आणि आता रंगभूमी कडून प्रत्यक्ष भूमी कडे वळल्या आहेत असे सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिक्षा बोर्डे आणि माजी विद्यार्थी संदेश झारापकर यांनी केले. शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या सर्व कलाकार यांनी शाळेप्रती असलेली त्यांची कृतज्ञता त्यांच्या कलेमार्फत व्यक्त केली. यामध्ये माजी विद्यार्थी संवादिनी वादक डॉ.पंडित, प्रकाश चिटणीस, प्रसिद्ध गायक जगदीश पाटील, प्रसिद्ध गायक धीरज मढवी, गीतकार राजेंद्र ठाकूर, प्रिया सुरेश, खोल्लम आणि ग्रुप, रिद्धेश तरे, वृषाली दाबके आणि वर्षा कोल्हटकर, डॉ. वैशाली दुधे आणि समूह,  माजी शिक्षिका- ज्योती साटम, आजी शिक्षक मारुती सोनमोरे, सुनेत्रा मेस्त्री, उमेश महाजन, अर्जिता कुलकर्णी या सर्वांनी आपली कला सादर केली. शिवाय शाळेचे शुभचिंतक म्हणून प्रसिद्ध गायक अभिषेक कोसंबी यांनी देखील आपली कला सादर केली. तसेच यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी शिक्षक आणि आजी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे सांगता सोहळा कार्यक्रमात नृत्य, गायन, वादन यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला व कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

 उपनगरीय रेल्वे गाड्यांचे तातडीने १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करा

उपनगरीय रेल्वे गाड्यांचे तातडीने १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करा खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी नवी दिल्ली – मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे गाड्यांचे वेळेवर १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करावे, ‘स्वयंचलित’ दरवाजा बंद होणारी प्रणाली सर्व गाड्यांमध्ये अनिवार्य करावी आणि स्थानकांवरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशा महत्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या. दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे अध्यक्ष असलेल्या रेल्वेच्या तांत्रिक सल्लागार समितीची बैठक संसद भवन येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या कमिटीचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातून खासदार नरेश म्हस्के व खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. रेल्वेच्या देशापातळीवरील विविध महत्वपूर्ण कामांची माहिती बैठकीत देऊन, चर्चा करुन निर्णय घेतले जातात व धोरण निश्चित केले जाते. रेल्वे राज्यमंत्री  वी. सोमन्ना, रवनीत सिंह बिट्टू तसेच रेल्वेचे केंद्रीय स्तरावरील सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते. त्यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई उपनगरीय सेवेबद्दल महत्वपूर्ण सूचना केल्या.  सुरक्षितता, नोकर भरती, धोरण व उपाययोजनेबाबत यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत विस्तृतपणे माहिती दिली. देशभरातून प्रत्येक राज्यातून ज्यांना या कमिटीमध्ये प्रतिनिधीत्व दिले आहे त्यांनी सुध्दा या बैठकीत चर्चा केली. आज देशपातळीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचा जो विकास होत आहे त्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे कौतुक केले. आज स्टेशनवर होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमधून पडून हजारो प्रवाशांचा मृत्यू होत आहे. १२ डब्यांच्या ट्रेनमधून क्षमतेपेक्षा ४ पट अधिक प्रवासी मजबुरीने प्रवास करत आहेत. यामुळे ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होणे, जखमी होणे आणि कायमचा प्रवासी जायबंदी होण्याच्या घटना नित्याच्या झाल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणली. याकरता १५ डब्यांच्या लोकल गाड्या तातडीने मोठ्या संख्येने सुरु कराव्यात, स्वयंचलीत दरवाजे तातडीने बसवावेत, फलाटांची उंची व रुंदी वाढविण्याचे काम जे संथ गतीने सुरु आहे ते जलद गतीने सुरु करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच रेल्वे स्थानकांतील गर्दीवरील नियंत्रणासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याची महत्वपूर्ण सूचनाही नरेश म्हस्के यांनी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढे मांडल्या. सिडको प्राधिकरण आणि रेल्वे यांच्यात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे बेलापूर मधील रेल्वे स्थानकांचा विकास थांबला आहे. रेल्वे मंत्र्यांनी यात स्वत: लक्ष घालण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी करत दोन्ही प्राधिकारांमधील विसंवाद दुर करण्याची सूचना  केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीने यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता बेलापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा विकास होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी ठाणे, मिरा भाईंदर, वाशी आणि एमएमआर रिजन मधील रेल्वे स्थानकांच्या समस्यांचे निवेदन खासदार नरेश म्हस्के आणि खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांना दिले.

 फ्युएलचा सोशल आयपीओ ३० मार्चला एनएसईवर

फ्युएलचा सोशल आयपीओ ३० मार्चला एनएसईवर ४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन पदवी अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करुन देणार राजेंद्र साळसकर पुणे – सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण देणारी देशातील पहिली शैक्षणिक संस्था फ्युएलचा आयपीओ एनएसईच्या सोशल स्टॉक मार्केटमध्ये येणार आहे. सोमवार, ३० मार्चला दुपारी ३ वा. मुंबई येथील एनएसई अ‍ॅट्रियम, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे या आयपीओचा बेल रिंगिग समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे कौशल्य विकास व उद्योग मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती फ्यूल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी दिली. तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला की, संस्थेची विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेमुळे आयपीओला चांगला प्रतिसाद मिळेल. डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, अत्यंत काटेकोर निकषातून निवड झालेल्या ४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेनचा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी आयपीओ काढण्यात येणार आहे. या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचा मानस आहे. सोशल आयपीओच्या संकल्पनेनुसार हा आयपीओ घेणार्‍या भागधारकांना कोणत्याही स्वरुपाचा आर्थिक लाभ मिळत नाही. मात्र, सोशल आयपीओमध्ये येणार्‍या संस्थांची कार्यक्षमता, उद्दिष्ट आणि फलित, विश्वासार्हता याची काटेकोर छाननी करण्यात येणार आहे. या मुळे सामाजिक कार्यासाठी देत असलेल्या निधी योग्य ठिकाणी गेल्याची खात्री आणि समाधान भागधारकांना मिळेल. सामाजिक भरीव कार्य करणार्‍या संस्थांना निधी उपलब्ध व्हावा आणि सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा निधी योग्य ठिकाणी पोहोचावा या उद्देशाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात ही योजना मांडली. सध्या ७० सामाजिक संस्था सोशल स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत आहेत. डॉ. देशपांडे यांनी सर्व संस्थांना आवाहन केले की, सामाजिक कार्य करणार्‍या ना नफा ना तोटा या तत्वावरील संस्थांनी सोशल आयपीओमध्ये भाग घ्यावा

इंदुमिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा

इंदुमिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा गाझियाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिस्थमंडळाने केली पाहणी.. मुंबई: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. २०१८ साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, २०२६ पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किंमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ३५० फूट उंचीच्या या भव्य पुतळ्यापैकी सध्या सुमारे ५० फूट काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बूट आणि पॅंटचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र स्मारकाच्या कामाला २०२८ उजाडणार असल्याचे चित्र आहे. या स्मारकाबाबत बोलताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरणार आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरेल, तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिव्यांग प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या समस्यांचे आज निराकारण होणार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची उपस्थिती

दिव्यांग प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या समस्यांचे आज निराकारण होणार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची उपस्थिती अशोक गायकवाड रत्नागिरी : दिव्यांग प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे आज सोमवार…

हर्षित माहीमकर उपांत्य फेरीत

मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा हर्षित माहीमकर उपांत्य फेरीत मुंबई, २९ मार्च: माटुंगा जिमखाना कोर्टवर खेळल्या जात असलेल्या योनेक्स सनराईज मनोज रामचंद्र स्मृती महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक आरसीएफ टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून; अव्वल १६ कार्पोरेट संघांचा सहभाग मुंबई, २९ मार्च: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक २०२६ वार्षिक…