मनसे नेते राजू पाटील यांची मागणी

कल्याण : देशभरात खासदार-आमदारांची संख्या वाढण्याची चर्चा सुरु असताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी धाडसी वक्तव्य केलं आहे. प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्यासाठी माजी खासदार आणि आमदारांना मिळणारी पेन्शन आणि इतर सुविधा तातडीने बंद कराव्यात,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या मागणीत त्यांनी स्वतःचाही समावेश केला आहे.
राजू पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून (ट्विट) या विषयावर भूमिका मांडली आहे. त्यांच्या मागणीमागील प्रमुख कारण म्हणजे, आगामी काळात देशात होणारी जनगणना आणि त्यानंतर होणारी पुनर्रचना यामुळे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. प्रतिनिधींची संख्या वाढली की, पर्यायाने माजी खासदार आणि आमदारांच्या पेन्शन आणि सुविधांचा आर्थिक भार सरकारी तिजोरीवर, म्हणजेच पर्यायाने जनतेवर वाढत जाणार आहे. सामान्य नागरिक आणि करदात्यांच्या पैशाचा असा वापर होणे चुकीचे आहे. ही नासाडी आताच थांबवणे गरजेचे आहे,” असे राजू पाटील यांनी नमूद केले.
राजू पाटील यांनी म्हटले की, माजी आमदार म्हणून मी सुद्धा या पेन्शन योजनेत येतो, पण मलाही ही सवलत नको आहे. सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केवळ राजकीय मुद्द्यांऐवजी लोकप्रतिनिधींच्या पेन्शनसारख्या महत्त्वाच्या विषयावरही चर्चा होऊन ऐतिहासिक निर्णय घेतला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. वाढत्या महागाईच्या काळात सामान्य जनतेला सुविधा देताना हात आखडता घेणाऱ्या सरकारने लोकप्रतिनिधींच्या पेन्शनवर कोट्यवधी रुपये खर्च करू नयेत, ही यामागची मूळ भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *