कल्याण: दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून कल्याणमध्ये राजकारण तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी सत्ताधार्यांवर सडकून टीका केली आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळत नाही, सत्ताधारी पक्ष संघटनांना आंदोलनाची भाषा करावी लागत हे लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याचे विजय साळवी यांनी सांगितले. तसेच बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी येथील श्री दुर्गादेवी मंदिर दर्शनासाठी होणारे निर्बंध व मंदिर बंद ठेवण्याची प्रथा तात्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पशनि पवित्र झालेले ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. किल्ले दुर्गाडीवरील थी दुगदिवी मंदिर हे ठाणे जिल्हयातील जागृत देवस्थान असुन लाखो हिंदु भाविकांच्या श्रध्देचे केंद्र आहे. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करुन दुर्गाडी मंदिर परिसरात निर्बंध लादले जातात. मंदिराकडे जाणारे मार्ग बंद केले जातात, घंटानादावर निर्बंध आणले जातात आणि अनेक भाविकांना देवीच्या दर्शनापासून वंचित रहावे लागते. अशा प्रकारे हिंदुंच्या धार्मिक अधिकारांवर घाला घालण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरु आहे.
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असुन या सरकारच्या काळातच हिंदुंना आपल्या आराध्य देवीच्या दर्शनासाठी संघर्ष करावा लागणे ही अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक बाब आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी श्री दुर्गादेवी मंदिर परिसरातील सर्व अनावश्यक निर्बंध तात्काळ हटवावेत. हिंदु भाविकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय देवीचे दर्शन घेण्याची हमी द्यावी. घंटानाद, आरती व इतर धार्मिक परंपरांवर कोणतेही निर्बंध लागू करू नयेत. संबंधित पोलिस व प्रशासकीय यंत्रणेला हिंदु भाविकांच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्याची मागणी विजय साळवी यांनी केली आहे.
अन्यथा हिंदु समाजाच्या भावना, श्रध्दा आणि घटनात्मक अधिकारांच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
00000000
