१० हजार भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य

अनिल ठाणेकर

ठाणे : महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘रेबीजमुक्त ठाणे’ अभियान राबविण्यात येत आहे. रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे तसेच रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे, यासाठी हे अभियान राबिवण्यात येणार आहे. या अभियानात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात दहा हजार भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. गेल्यावर्षी सात हजाराहून अधिक श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले होते.

या उपक्रमात, ठाणे सीपीसीए, इंडियन सोसायटी फॉर व्हेटनरी ॲनिमल प्रोटेक्शन, सिटीझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, व्हीटीईएएमएस आणि पीएडब्ल्यू आशिया या संस्थाचे सहकार्य मिळणार आहे. भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा मृत्यूचे प्रमाण २०३०पर्यंत शुन्यावर आण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विशेष अभियान राबवून त्यात भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येते. गेल्यावर्षी ठाणे महानगरपालिकेने ७ हजार ४०९ भटक्या श्वानांना रेबीजची लस दिली होती. यंदाच्या वर्षातही पालिकेकडून हे अभियान राबविण्यात येईल.

ठाणे महापालिका क्षेत्रात या वर्षी दहा हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लसीकरणासाठी एकूण २५ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डाॅक्टर आणि तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसेच प्राणी मित्रांकडून जमा करण्यात आली असून त्याआधारे विभागवार लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे, अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *