सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी
नवी मुंबई : आसामंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत ‘सागर महोत्सव – SEAVERSE २०२६’ या चारदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पर्यटन संचालनालयामार्फत प्रायोजकत्व देण्यात आले आहे. हा चार दिवस चालणारा कार्यक्रम रत्नागिरीतील विविध पर्यटन स्थळांवर आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती कोकण विभागीय पर्यटन कार्यालयामार्फत देण्यात आली आहे
‘सागर महोत्सव – SEAVERSE २०२६’ साजरा करण्यासाठी चार दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन पुढील प्रमाणे राहील दि. १५ जानेवारी २०२६ रोजी अभ्यासफेऱ्यांद्वारे महोत्सवाची सुरुवात होणार असून, पहिल्या दिवशी सकाळी खारपुटी जंगलाची अभ्यासफेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीत तज्ज्ञ हेमंत कारखानीस व शांभवी चव्हाण यांच्या उपस्थितीत खारपुटी व किनारी परिसंस्थेचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. यानंतर दोन बोटीतून फेऱ्या घेतल्या जाणार असून प्रत्येक फेरीस सुमारे ९० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या उपक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
सायंकाळी खडकाळ किनारा अभ्यासफेरीचे आयोजन करण्यात आले असून, प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे यांच्या मार्गदर्शनाखाली भाटकरवाडा परिसरातील शैवाळ व खडकाळ किनारी आढळणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
१६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून, मुख्य अतिथी म्हणून डॉ. शैलेश नायक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात होईल. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक, पर्यटन विभागाचे सचिव, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी विविध विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
या अंतर्गत डॉ. बाबन इंगळे, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त मुख्य वैज्ञानिक, सागरी खनिजसंपत्ती व जैवविविधतेवरील परिणाम या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. आपटे, आली प्रसिद्ध सागरी पर्यावरणशास्त्रज्ञ व संवर्धनतज्ज्ञ, यांची मुलाखत (संवादक : डॉ. अमृता भावे) आयोजित करण्यात आहे. जबाबदार पर्यटनावरील लघुपट व स्ट्रीट प्लेचे सादरीकरण फर्ग्युसन महाविद्यालय आणि गोगटे–जोगळेकर महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार आहे. डॉ. संतोष शिंत्रे पर्यावरण संप्रेषण या विषयावर व्याख्यान देतील, तर डॉ. ईशा बोपर्डीकर सागरी सस्तन प्राणी या विषयावर सादरीकरण करणार आहेत.
१७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी भाट्ये समुद्रकिनारी पुळणी (बीच) किनारा अभ्यास फेरी आयोजित करण्यात आली असून, तज्ज्ञांच्या सहभागाने उपस्थितांना प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जाणार आहे. याच दिवशी व्याख्यानमालेत डॉ. नरसिंह ठाकूर (NIO) सागरी संशोधन ते उद्योगविश्व, समीर दामरे (NIO) महासागरातील निर्जीव संसाधने या विषयांवर मार्गदर्शन करतील. तसेच डॉ. शेखर मांडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव, हवामान बदल आणि जनसहभागाची भूमिका या विषयावर व्याख्यान देतील. त्यानंतर भाटकरवाडा येथे खडकाळ किनारा अभ्यासफेरी आयोजित करण्यात येणार असून, डॉ. अमृता भावे व प्रदीप पताडे मार्गदर्शन करतील.
दि. १८ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा भाट्ये येथील पुळणी किनारा अभ्यासफेरीने दिवसाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर डॉ. संजय देशमुख (ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) ‘The Ocean Within Us – आपल्या आतला ‘महासागर’ या विषयावर सादरीकरण करतील. शमा पवार, माजी उपसंचालक, विभागीय पर्यटन कार्यालय, कोकण, जबाबदार पर्यटन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यानंतर समुद्रकिल्ल्यांच्या वन्यजीव सर्वेक्षणाचा अनुभव, सहभागींना बक्षीस वितरण आणि महोत्सवाचा अधिकृत समारोप करण्यात येणार आहे. भोजनावकाशानंतर दुपारी ‘संगीत कुर्माख्यान’ या मॅग्रोव्ह फाउंडेशनच्या लोकनाट्याचे सादरीकरण होणार आहे.
समुद्र संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार पर्यटनाचा संदेश देणारा ‘सागर महोत्सव – SEAVERSE २०२६’ हा उपक्रम पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विनामुल्य आसून हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. या उपक्रमाचा नागरिकांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन कोकण विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
००००००००००
