भाजपा बँक ठेवी मोडून महानगरपालिका दिवाळखोरीत काढणार :-सुरेशचंद्र राजहंस
मुंबई : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून मागील १२ वर्षांत काहीही विधायक कार्य केले नसून काँग्रेस सरकारने ७० वर्षात उभी केलेली देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा लावला आहे. देश विकणाऱ्या भाजपाची वक्रदृष्टी आता मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतील मुदत ठेवींवर पडली असून ३६ हजार ६२३ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी मोडण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. हा पैसा मुंबईकरांचा असून त्यावर भाजपा दरोडा टाकत आहे असा आरोप मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
भाजपा सरकारने देशातील विमानतळ, बँका, विमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग एक-एक करून विकण्याचा सपाटाच लावला आहे. देश विकून देश चालवला जात आहे, आता त्यांची नजर मुंबई महानगरपालिकेत असलेल्या ८१ हजार ४४९ कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील काही वर्षापूर्वी मुंबई दौऱ्यावरील भाषणात त्यांनी ‘पैसा बँकेत पडून’ असल्यावर भाष्य केले होते तेंव्हाच ह्या मुदत ठेवी भाजपा सरकार मोडीत काढणार अशा शंका उपस्थित झाली होती व तसेच झाले असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.
