ठाणे : दिवा शहरातील जवळपास 90% वाहतूक व्यवस्था ही रिक्षा वाहतुकीवर अवलंबून आहे. सुरवातीपासूनच दिव्यात शेअर पध्द्तीनुसार रिक्षा भाडे आकारणी केली जात आहे. नुकतेच दिवा शहरातील शेअर रिक्षा वाहतुकीचे दर हे रिक्षा युनियन कडून वाढवण्यात आले.

ज्याची अंमलबजावणी दिनांक २१ एप्रिल २०२४ पासून करण्यात आलेली आहे. रिक्षा युनियनकडून करण्यात आलेल्या या दरवाढीला सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेला विरोध, भाडेवाढीवर नाराजी ही व्हॉट्स ॲप आणि फेसबुक या सामाजिक माध्यमांवरून दिसून येत आहे. तर रिक्षा युनियनला ही फोन करून व प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी ही रिक्षा भाडेवाढीला विरोध दाखवला आहे.

वास्तविक पाहता दिवा शहरातील मुख्य लोकवस्ती ही साधारणपणे दिवा रेल्वे स्थानकापासून एक ते साडे तीन किलोमीटरच्या पट्यात पसरलेली आहे. उदा. दिवा स्टेशन ते आगासन फाटक (3 किमी), दिवा स्टेशन ते बेडेकर नगर (2.1 किमी), दिवा स्टेशन ते गणेश नगर (1.9 किमी), दिवा स्टेशन ते ग्लोबल शाळा (1.6 किमी), दिवा स्टेशन ते दातिवली फाटक (1.7 किमी), दिवा स्टेशन ते विठ्ठल मंदिर- दातिवली (1.5 किमी), दिवा स्टेशन ते साबे जीवदानी मंदिर (1.5 किमी)

प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) ने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे मीटर नुसार रिक्षा वाहतुकीचे भाडे पहिल्या दिड किलोमीटर साठी 23 रुपये आकारले जाते. त्यानुसार जर साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळे पर्यंतचे अंतर हे अनुक्रमे 1 किमी आणि 1.6 किमी आहे. नवीन दरानुसार साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळेपर्यंत 15 रुपये दर करण्यात आला आहे. तीन सीट प्रमाणे त्याचे मूल्यमापन केल्यास रिक्षाचालकला साधारणपणे 45 रु. मिळतात. मार्च 2020 लॉकडाऊन पूर्वी ग्लोबल शाळेकडून दिवा स्टेशनसाठी सीटमागे प्रत्येकी 10 रुपये आकारले जात होते. पण शासनाने त्यावेळी परिस्थिती अनुरूप रिक्षा मध्ये फक्त दोन प्रवासी बसवण्याची सक्ती केली होती म्हणून रिक्षा चालकांकडून 10 रुपयांच्या ऐवजी 15 रुपये आकारण्यास सुरवात करण्यात आली. नागरिकांनीही त्यास विरोध केला नाही, कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. पण काळानुरूप जेव्हा परिस्थिती सामान्य होऊन पूर्वीप्रमाणे रिक्षा प्रवासी संख्या सुरू करण्यात आली; तेव्हा मात्र रिक्षाचे वाढवण्यात आलेले भाडे तसेच ठेवण्यात आले, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

डोंबिवली स्टेशन पासून रिजेन्सी अनंतम गेट पर्यंत साधारण 20 रुपये शेअर ऑटोचे भाडे आकारले जाते. किलोमीटनुसार पाहायला गेल्यास हे अंतर अंदाजे 3 किलोमीटर आहे. त्या हिशोबाने दिव्यात नक्कीच रिक्षा भाडेवाढ जास्तच असल्याने नागरिक उघडपणे विरोध दाखवत आहेत. तर डोंबिवली सारखे दिव्यातील शेअर ऑटोचे दर देखील आकारले गेल्यास दिव्यातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच इतर शहारांप्रमाणे दिव्यातही मीटरनुसार रिक्षा सेवा वाहतूक विभागाने सुरू केल्यास त्याचा फायदा रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांनाही होऊ शकेल, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. ज्यांना शेअर भाडे जास्त वाटत असेल ते मीटर प्रमाणे रिक्षा वापरू शकतील. तर प्रादेशिक परिवहन विभागाने दिव्यातील दोन्ही रिक्षा युनियन आणि प्रवाशांशी चर्चा करून यावर सर्वसहमत असा मार्ग काढण्याची मागणी दिव्यातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *