अजित पवारांच्या अपघातादरम्यान खरातच्या बँकेत ६२ वेळा पैसे जमा
मुंबई : अजित पवारांचा मृत्यू २८ जानेवारी २०२६ ला झाला, या घटेनच्या आधी आणि नंतर अशा एकूण पाच दिवसात तब्बल ६२ वेळा विविधवेळा भोंदू अशोक खरातच्या बँकेत पैसे जमा झाल्याचे मेसेज आल्याचा खळबळजनक आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. अजित पवारांचा घातपात करण्यासाठी तर हे पैसे खरातला कुणी दिले होते का याची चौकशी झाली पाहीजे अशीही मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे.
‘समता’ नावाच्या पतसंस्थेचा उल्लेख करत काही संशयास्पद बाबी अंजली दमानिया यांनी मांडल्या. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, १ एप्रिल २०२५ ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत या पतसंस्थेकडून दर महिन्याला मर्यादित मेसेज येत होते. मात्र २७ जानेवारी २०२६ रोजी, म्हणजेच अजित पवार यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी, तब्बल पैसे जमा झाल्याचे १७ मेसेज आले. त्यानंतर २८ जानेवारी रोजी १९ मेसेज, २९ जानेवारीला २० संदेश, तर ३० आणि ३१ जानेवारीला प्रत्येकी ८ असे एकुण ६२ पैसे भरल्याचे मेसेज आले.
हे प्रमाण अत्यंत असामान्य असल्याचा दावा करत, “जे संदेश कधी महिनाभरातही येत नव्हते, ते एका दिवसात येऊ लागले. नेमकं काय घडलं?” असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला. या सर्व पुराव्यांची एसआयटीमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या नव्या दाव्यांमुळे अशोक खरात प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण ? – संजय निरुपम
अशोक खरात प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनात शिंदेंवर होणाऱ्या टीकेला माजी खासदार आणि शिंदेंच्या सेनेचे नेते संजय निरुपम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “राजकारणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात बाबांना भेटतात, पण त्यांच्या बंद खोलीतील कृत्यांचे समर्थन करत नाहीत. एकनाथ शिंदे यांना खरातचे कारनामे माहित असते तर त्यांनी त्याला कधीच तुरुंगात पाठवले असते.” तसेच, अंजली दमानिया यांनी कोणाच्या तरी हातातले बाहुले बनून मोठ्या नेत्यांविरुद्ध वापरले जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
