ई-बाईक टॅक्सीचालकांना
मंडळात सामावून घेणार !
मुंबई – महामुंबईसह राज्यातील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळामध्ये आता ई बाईक टॅक्सी चालकांनादेखील सामावून घेणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच सभासद नोंदणी शुल्क रद्द करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’ची स्थापना केली आहे. दरम्यान, या मंडळामध्ये नोंदणी शुल्क आणि वार्षिक शुल्कावरून वाद निर्माण झाला होता. याला विरोध करत ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते, तर नोंदणी शुल्क रद्द न केल्यास ते आणखी तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.
सरनाईक यांच्या मते मुंबईमध्ये धावणाऱ्या अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाईही सुरू आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात ज्यांचे परवाने रद्द केलेले आहेत, त्यांना कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा परवाने देण्यात येतील.
