राजाराम साळवी गौरव विचारमंच’ आयोजित व्याख्यानमालेत
‘वन्यजीव प्रेमी’ व मान्यवरांची विशेष उपस्थिती
ठाणे : ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ तर्फे आयोजित व्याख्यानमालेचे ‘तिसरे पुष्प’ येत्या बुधवार, १५ एप्रिलला गुंफले जाणार आहे. ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ या अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा सोहळा मनीषा विद्यालय व जुनिअर कॉलेज, सभागृह , कळवा येथे दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे.
या तिसऱ्या पुष्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ एक व्याख्यान नसून ती एक संपूर्ण ‘अनुभवयात्रा’ असणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वनसंपदेचे दर्शन घडविणारे भटकंती छायाचित्र प्रदर्शन, वन्यजीव अभ्यासकांशी थेट संवाद साधणारा लाईव्ह टॉक शो, थरारक साहसी मोहिमांचा स्लाईड शो आणि वन तज्ञांचे विशेष व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शैलेंद्र पाटील, वन अभ्यासक हे ‘वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी’ या विषयावर आपले अनुभव मांडतील. प्रदीप भाऊ साळवी (संचालक, एकलव्य रायफल व आर्चरी क्लब, कासणे) हे ‘वन्यप्राणी संवर्धन, निसर्ग साहस व ग्रामीण युवाशक्ती’ या विषयावर संवाद साधतील. सौ. सुरेखा मोरे या टॉक शोच्या माध्यमातून संवादक/मुलाखतकार म्हणून तज्ञांशी संवाद साधतील. सचिन रेपाळे (उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग, महाराष्ट्र राज्य) हे वन्यजीव संरक्षण व वन कायद्यांविषयी विशेष मार्गदर्शन करतील. दा. कृ. सोमण (प्रसिद्ध खगोलशास्त्र अभ्यासक व पंचांगकर्ते) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी साधना वझे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन राहुल साळवी (संयोजक अध्यक्ष) आणि प्रदीप साळवी (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे. या उपक्रमाला मनीषा एज्युकेशन ट्रस्ट, कळवा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद (ठाणे), शोभा वेल्फेअर असोसिएशन आणि मैत्रिण ग्रुप हे सहआयोजक म्हणून जोडले गेले आहेत.
