मुंबई, 16 एप्रिल : अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी नवीन पनवेल येथील त्यांच्या अकादमीच्या मैदानावर झालेल्या एच. डी.एफ.सी. कप साठी खेळविण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात सांगितले. पनवेल आणि आसपासच्या परिसरात क्रिकेटची गुणवत्ता ठासून भरलेली असून ती शोधून काढण्याची आणि ती विकसित करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान करण क्रिकेट अकादमी संघाने ऑल राऊंडर क्रिकेट अकादमी संघावर ९ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
प्रथम फलंदाजी करणारा ऑल राऊंडर क्रिकेट अकादमी संघ २०.१ षटकांत ७६ धावांत गुंडाळला गेला. आयुष जाधव (४३) आणि अभय कन्नुजिया (१०) यांनी सातव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केल्याने त्यांना एवढी मजल मारता आली. आदर्श जैस्वाल (२ धावांत २ बळी), राजवीर पाटील (२० धावांत २ बळी), श्लोक कवडे (१७ धावांत २ बळी) आणि लीला संघवी (९ धावांत २ बळी) यांनी टिच्चून गोलंदाजी करत ही करामत केली. या आव्हानाचा पाठलाग करताना रिषभ बिस्वास (१०) आणि पियुष दांडे (नाबाद ४१) यांनी २५ धावांची सलामी दिली तर नंतर दांडे आणि लीला संघवी (नाबाद १८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची अभेद्य भागीदारी करून आपल्या संघाच्या विजेतेपदावर शिक्का मोर्तब केले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आदर्श जैस्वाल याला गौरविण्यात आले तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून रिषभ बिस्वास आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून मनसवा नांदोस्कर यांची निवड करण्यात आली. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सुमीत झुंजारराव यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :- ऑल राऊंडर क्रिकेट अकादमी संघ २०.१ षटकांत सर्वबाद ७६ (आयुष् जाधव ४३, अभय कन्नुजिया १० ; आदर्श जैस्वाल २ धावांत 2 बळी , राजवीर पाटील २० धावांत २ बळी, श्लोक कवडे १७ धावांत २ बळी, लीला संघवी ९ धावांत २ बळी) पराभूत वि. करण क्रिकेट अकादमी १६.२ षटकांत १ बाद ७८ (रिषभ बिस्वास १०, पियुष दांडे नाबाद ४१, लीला संघवी नाबाद १८).
