विक्रोळीत ३५० टनांचा कटरहेड उतरवला
ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला असून मुंबईतील विक्रोळी येथे टनेल बोरिंग मशीन (TBM) चा ३५० टन वजनाचा पहिला कटरहेड यशस्वीरित्या खाली उतरवण्यात आला आहे. १३.६ मीटर व्यासाचा हा कटरहेड TBM च्या मुख्य शिल्डच्या प्राथमिक असेंब्लीमधील अंतिम टप्पा मानला जात आहे.
सध्या ३,००० टनांहून अधिक वजनाच्या दोन अत्याधुनिक TBM मशीनची जोडणी सुरू असून त्या मुंबईतील २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी १६ किलोमीटर भागाचे खोदकाम करणार आहेत. या प्रकल्पात ठाणे खाडीखालून जाणारा सुमारे ७ किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदाही उभारला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल मानला जात आहे.
दरम्यान, यंदाच्या मान्सून काळात प्रथमच कार्यरत होणाऱ्या मेट्रो मार्गिका २ब आणि ९ साठी एमएमआरडीएने स्वतंत्र “मान्सून रेडीनेस ऑडिट” करण्याचे आदेश दिले आहेत. या ऑडिटमध्ये जलनिस्सारण व्यवस्था, संरचनात्मक संवेदनशीलता मूल्यांकन आणि कार्यात्मक सुरक्षा पूर्वतयारीची तपासणी केली जाणार आहे.
मान्सूनपूर्व सर्व बांधकाम पॅकेजेसमध्ये आपत्कालीन मॉक ड्रिल्स, रुग्णालयांशी समन्वय, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अलर्ट प्रणालीचे एकत्रीकरण तसेच औपचारिक सुरक्षा तपासण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय मान्सून काळात रिअल-टाईम समन्वय आणि सार्वजनिक माहिती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मीडिया मॉनिटरिंग व जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाला दरवर्षी अत्यंत आव्हानात्मक नागरी मान्सून परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्व पायाभूत सुविधा आणि नागरी संस्थांनी कमाल पूर्वतयारी, प्रतिबंधात्मक नियोजन आणि जलद प्रतिसाद समन्वय सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्यानुसार एमएमआरडीएने मेट्रो, रस्ते, बोगदे आणि विविध पायाभूत प्रकल्पांवर व्यापक पूर्वतयारी मोहीम हाती घेतली आहे.”
उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “मान्सून काळात सुरक्षित बांधकाम क्षेत्रे, सुरळीत वाहतूक, जलनिस्सारण तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद राखण्यासाठी सर्व कंत्राटदार, सल्लागार आणि प्रकल्प संस्थांना सविस्तर मान्सून एसओपी जारी करण्यात आले आहेत. सार्वजनिक सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.”
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले की, “सर्व सक्रिय पायाभूत सुविधा आणि मेट्रो प्रकल्प मार्गिकांवर विकेंद्रित मान्सून व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात आली आहे. प्रकल्पस्तरीय निरीक्षण, आपत्कालीन समन्वय, जलनिस्सारण व्यवस्थापन आणि कार्यात्मक सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्यपूर्ण निरीक्षण ठेवले जाणार आहे.”
०००००००००००००००
