ठाणे : ठाण्यातील प्रसिद्ध ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपखाडी, नामदेववाडी नाका येथे तब्बल ९ थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचला. गेल्या अनेक वर्षांपासून सरावाच्या ठिकाणी ९ थर उभारण्याचे पथकाचे स्वप्न होते. शनिवारी रात्री हे स्वप्न साकार झाल्याने पथकातील गोविंदांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
गेल्या कित्येक महिन्यांपासून पथकातील युवक दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत सराव करत होते. यंदाच्या सरावाच्या सुरुवातीलाच ९ थर उभारण्याचा संकल्प पथकाने केला होता. त्यासाठी गोविंदांनी अथक मेहनत घेतली. अखेर शनिवारी रात्री ९ थरांची यशस्वी उभारणी करत पथकाने आपला संकल्प पूर्ण केला. माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या गोविंदा पथकाने ठाण्यातील दहीहंडी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवात ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने पहिल्यांदा ८ थर उभारण्याचा विक्रम केला होता. या कामगिरीनंतर पथकाला ठाण्यात विशेष ओळख मिळाली.
मात्र, मध्यंतरीच्या काळात पथकाच्या वाटचालीला काहीशी मरगळ आली होती. त्यानंतर परिसरातील युवकांनी एकत्र येत पथकाची धुरा आपल्या खांद्यावर घेत पुन्हा नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली. पथकासाठी जोशपूर्ण गीत तयार करण्यात आले, तसेच आकर्षक टी-शर्टही तयार करण्यात आले. त्यामुळे गोविंदांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गेल्यावर्षी ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने विविध दहीहंडी उत्सवांमध्ये ९ थरांची यशस्वी उभारणी केली होती. मात्र, ज्या ठिकाणी पथकाचा सराव होतो, त्या कर्मभूमीवर ९ थर उभारण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नव्हते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यंदा सरावाच्या सुरुवातीपासूनच ९ थर उभारण्याचे ध्येय पथकाने निश्चित केले होते.
अखेर शनिवारी रात्री पाचपखाडी, नामदेववाडी नाका येथील सरावाच्या ठिकाणी ९ थरांची यशस्वी उभारणी करून पथकाने अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले. ९ थर उभारल्यानंतर गोविंदा आणि परिसरातील युवकांनी एकच जल्लोष करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. दहीहंडी उत्सवाच्या आधीच ‘ठाण्याचा राजा’च्या या कामगिरीने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
