महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी विकास पानसरे यांची नियुक्ती
अनिल ठाणेकर ठाणे- महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार पर्यटन संचालनालयाच्या संचालक पदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (भा.प्र.से.) नियुक्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने विकास पानसरे (भा.प्र.से.) यांची पर्यटन संचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुवार, ३० जुलैपासून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे (एमएसएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. विकास पानसरे यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पर्यटन संचालनालयाच्या धोरणांची अंमलबजावणी, पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसिद्धी तसेच जगाच्या नकाशावर राज्याला एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नव्याने ओळख मिळवून देण्याचे काम विकास पानसरे करणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील अनुभवाचा उपयोग राज्याच्या शाश्वत आणि पर्यटन विकासाला गती देण्यासाठी होईल, अशी खात्री आहे. यापूर्वी मंगेश जोशी (भा.प्र.से.) पर्यटन संचालक म्हणून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे काम पाहत होते. मंगेश जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, राज्यातील पर्यटन स्थळांना प्रसिद्धी मिळवून देणे आणि पर्यटन क्षेत्रातील खासगी भागीदारी वाढवण्यावर त्यांनी अधिक भर दिला. यामुळे राज्याच्या पर्यटनाला देशपातळीवर तसेच जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली. मंगेश जोशी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पर्यटन संचालनालयाने त्यांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामध्ये विकास पानसरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विकास पानसरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या पर्यटनाला नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ००००
– कावड यात्रेसाठी विशेष सुविधांची मागणी
शिवसेनेचे केडीएमसीला निवेदन कल्याण : श्रावण महिन्यात निघणारी कावड यात्रा सुरक्षित व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी शिवसेना उत्तर भारतीय विभागाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिवसेना कल्याण शहर (उत्तर भारतीय विभाग) प्रमुख सी. पी. मिश्रा यांनी महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना कल्याण शहर प्रमुख निलेश शिंदे तसेच पदाधिकारी प्रशांत तिवारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिरातून हजारो शिवभक्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात जलाभिषेकासाठी कावड यात्रा काढतात. या यात्रेत युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सी. पी. मिश्रा यांनी यात्रा मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजविणे, संपूर्ण मार्गाची स्वच्छता करणे, विविध ठिकाणी मोबाईल शौचालयांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कचरा व्यवस्थापन तसेच अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बहुतांश कावड यात्रेकरू अनवाणी चालत असल्याने मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रद्धाळूंच्या भावनांचा सन्मान राखत महानगरपालिकेने या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, जेणेकरून कावड यात्रा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
केडीएमसीच्या सुका कचरा संकलन मोहिमेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ऍड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन विभागाने शाश्वत शून्य कचरा मोहीम हाती घेतली…
ठाकरेंच्या शिवसेनेकडून राम मंदिरात महाआरती आणि रामरक्षा पठण करत चोरीच्या घटनेचा केला निषेध
कल्याण : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी व कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने रविवारी सायंकाळी डोंबिवली पूर्व येथील बाजीप्रभू चौकातील राम मंदिरात महाआरती करत आणि रामरक्षा पठण करत चोरीच्या घटनेचा जाहीर…
रायगड जिल्ह्यात महसूल प्रशासनाचे ऐतिहासिक निर्णय
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या कामगिरीचे महसूलमंत्र्यांकडून कौतुक अशोक गायकवाड रायगड-अलिबाग : रायगड जिल्ह्यात महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खासगी जमिनींवरील ‘वन’ शिक्के हटवून मालकी हक्क पूर्ववत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी होणार आहे. तसेच ७० हजार एकर जमिनीवरील कलम ३५ च्या नोटिसा रद्द करून नागरिकांना दिलासा देण्याची घोषणा करण्यात आली. कांदळवनाखाली गेलेल्या ११ हजार हेक्टर जमिनींच्या प्रश्नासाठी नवीन कायदा आणण्याचाही निर्णय घेण्यात आला. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने’अंतर्गत २ हजार ९५० शेतरस्त्यांचे मोजमाप करून ३१ मार्च २०२७ पर्यंत अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. उर्वरित शेतरस्त्यांचेही तीन महिन्यांत सीमांकन करण्यात येणार असून, रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी प्रति किलोमीटर १५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील व १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खासगी जमिनीवरील पात्र बांधकामधारकांना मालकी हक्काची कागदपत्रे देण्यात येणार आहेत. पोटहिस्सा नोंदणी २०० रुपयांत करण्याबाबत शासन सकारात्मक असून, “सलोखा” योजनेत कौटुंबिक वाटणी ५०० रुपयांच्या मुद्रांकावर नोंदविता येणार आहे. विकास न झालेल्या संपादित जमिनींचा फेरआढावा, शेती जमीन खरेदीवरील नियमांची काटेकोर अंमलबजावणी, आदिवासी लाभार्थ्यांना सातबारा व मालकी हक्क, कुळवहिवाट प्रकरणे, तुकडेबंदी पुनर्सर्व्हेक्षण, मोजणी अर्ज १५ दिवसांत निकाली काढणे, ‘गुरुचरण’ जमिनींची नोंद, महसूल सप्ताह, तसेच गंभीर त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. जिल्ह्यात ५० एम-सँड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शासकीय बांधकामांमध्ये एम-सँडचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. ‘जिवंत सातबारा मोहीम’ आणि अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढण्यात रायगड जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे व संपूर्ण महसूल यंत्रणेचे विशेष कौतुक केले. हे बैठकीचे प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, रवीशेठ पाटील, प्रमोद जठार, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ००००
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुळे येथे पाणंद रस्त्याची केली पाहणी
रायगड-अलिबाग : (अशोक गायकवाड ) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुळे या गावातील मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची पाहणी केली. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद कृषी सभापती वैकुंठ पाटील, सदस्या मानसी दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील आदी उपस्थित होते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वर्षभर शेतापर्यंत सहज पोहोचता येणार असून, शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देत शेतकऱ्यांच्या विकासाला गती देणारी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सरकारच्या विविध विकासकामांचा वेग वाढवून जिल्ह्यातील जनतेला अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही ते शेवटी म्हणाले. ००००००००
शिक्षक आमदार होण्यासाठी मंगेश चिवटे यांनी कंबर कसली
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : एकेकाळी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पत्रकारितेत ठसा उमटवून नंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उतरलेले मंगेश चिवटे यांनी विधानपरिषदेत प्रवेश करण्याची जय्यत तयारी केली असल्याचे दिसून येते. पुणे शिक्षक…
मुरबाडच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून १० कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर
भूमिगत विद्युत वाहिनी आणि सी.सी टी.व्ही प्रकल्पामुळे मुरबाडच्या विकासाला नवी गती राजीव चंदने मुरबाड : मुरबाड नगरपंचायत क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशाने माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट)मुरबाड तालुका प्रमुख, रामचंद्र दुधाळे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुरबाडकरांच्या दीर्घकालीन मागणीला मंजुरी देत १० कोटी रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे मुरबाड शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होणार आहे. या निधीतून राबवल्या जाणाऱ्या दोन प्रमुख प्रकल्पांमुळे मुरबाडच्या चेहरा-मोहऱ्यात आमूलाग्र बदल होईल. सद्यस्थितीत असलेली मुरबाड नगरपंचायत ते शिरवली जलकुंभपर्यंतची जीर्ण आणि ओव्हरहेड विद्युत वाहिनी पूर्णपणे भूमिगत करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे एकीकडे शहराचे सौंदर्य वाढेल तर दुसरीकडे पावसाळ्यात होणारे वीज खंडित, अपघात, आणि वीज, वाहिन्यांचे नुकसान याला पूर्णविराम मिळेल. नागरिकांना अखंड, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे शक्य होईल. तसेच मुरबाड नगरपंचायत हद्दीतील सर्व प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा आणि गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले जाणार आहे. या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येईल आणि २४x७ केंद्रीय नियंत्रण कक्षातून शहरावर लक्ष ठेवता येईल. या विकासकामांच्या मंजुरीमुळे मुरबाडकरांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. रामचंद्र दुधाळे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नेतृत्वामुळे मुरबाडच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे. दुधाळे यांच्या प्रयत्नांमुळे शहराला हा निधी मिळाल्याबद्दल समस्त मुरबाडकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ‘मुरबाडला स्मार्ट आणि सुरक्षित शहर बनवणे हे माझे स्वप्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या निधीमुळे ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. मुरबाडकरांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’ असे वक्तव्य मुरबडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र दुधाळे यांनी व्यक्त केलं. ०००००
राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग स्पर्धेत रायगडला विजेतेपद
पनवेल : नुकत्याच छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाईबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत रायगडने विजेते पदाचा मान मिळवला. रायगडने या स्पर्धेत ४४ सुवर्ण, २१ रौप्य, ८ कांस्य अशी एकूण…
