ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाची उमेदवारी शिवसेनेच्या गोटात गेल्यामुळे नवी मुंबईत नाराज झालेल्या नाईक समर्थकांनी राजीनामे दिले होते. यावर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना पक्षश्रेष्टींकडे पोहोचवण्यासाठी केलेली कृती असल्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले आहे. तसेच बंड थंडावल्याची चर्चांना उत्तर देताना प्रेमाने दिलेला निरोप अथवा आदेश स्वीकारतो. पण तंबी देणारा जन्मलेला नाही, अशा शब्दात प्रतिउत्तर दिले आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीकरिता माजी खासदार आणि भाजपचे नेते संजीव नाईक यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. प्रचार आणि पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठीनंतर संजीव नाईक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, असे चित्र तयार झाले होते. दरम्यान, अचानक ही उमेदवारी शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक नरेश म्हस्के यांच्या गळ्यात पडल्याने राजकारणाला कलाटणी मिळाली. भाजपकडे येणारी उमेदवारी अचानक मित्र पक्षाला मिळाल्याने भाजपच्या ऐरोलीतील नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
अनेकांनी नाईकांच्या क्रिस्टल हाऊसवर जाऊन असहकार्याची भूमिका जाहीर करून पदांचे राजीनामेही दिले आहेत. त्यामुळे महायुतीमधील हा बेबनाव उघड होऊ नये, म्हणून नाईक यांचे ठाण्यात नरेश म्हस्के यांच्यासोबत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणे झाले होते.
त्या चर्चेनंतरच नाईक यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समजावण्याची भूमिका जाहीर करावी लागल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
नाराजी दूर करण्याचा पुर्नउच्चार
नवी मुंबईत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. आता बरीचशी कमी झाली आहे. आता थोडीफार राहिलेली आहे, ती पण काढून टाकू असेही नाईकांनी स्पष्ट केले.
मात्र, आम्ही पक्षाच्या शिस्तीनुसार आम्ही काम करतो. आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो. आपल्याला तंबी देणारा आजपर्यंत जन्मलेला नाही, असा पुनर्उच्चार करत पक्षालाही इशारा दिला आहे.
