संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव शहरांच्या नामांतरविरोधातील याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी नगर दौऱ्यावर आहेत. संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. छत्रपती संभाजी नगर हे नाव व्हावे ही बाळासाहेब ठाकरे यांची मनापासूनची इच्छा होती. परंतु बाळासाहेबांचा वारसा सांगणारे, संपत्तीचे वारस असणाऱ्यांनी आम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर दिखाऊपणासाठी संभाजीनगरचा डाव रचला. परंतु त्यांच्याकडे बहुमत नसल्याने तो निर्णय बेकायदेशीर होता. त्यामुळे सरकार स्थापन केल्यावर आम्ही संभाजी नगरचा निर्णय घेतला. या निर्णयावरआज उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हा संभाजीनगरवासियांचा भव्य विज असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव या दोन्ही नावाला मान्यता देऊन या विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत. जनभावना लक्षात घेऊन निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच संभाजीनगर आणि धाराशिवमधील नागरिकांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री दोन दिवस संभाजीनगरमध्ये असल्याबद्दल विरोधक टीका करतील. पण ठाण मांडून बसल्याने संभाजीनगरमध्ये करेक्ट कार्यक्रम होऊन महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
