मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडेल आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मतदारांची मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. उन्हाच्या तीव्र झळा, त्यात नाव भेटत नसल्याने नागरिक हैराण होते.

मतदान केलं नाही तर पगार कापला जाण्याची भीती, तसेच काहींचे पहिलेच मतदान असून त्यांना ते करता न आल्याने मतदारांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले. कल्याण मतदारसंघाच्या अंतर्गत कल्याण ग्रामीण, डोंबिवली मतदान केंद्रावर (Dombivli Polling Station) मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. मतदार याद्यांचा घोळ पाहता भर उन्हात लोक मतदानासाठी बाहेर पडले.

नाव सापडत नसल्याने मतदार गोंधळून गेले आहेत. राजकीय पक्ष, नगरसेवक यांनी मतदारांची नावे शोधण्यासाठी बुथ लावले आहेत. दुपारच्या वेळी मतदारसंघात मतदान केंद्राऐवजी राजकीय पक्षाच्या बुथवर मतदारांची झुंबड उडाली होती. मात्र, नाव न सापडत नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून 5 वर्षे सतत काम केले पाहिजे. तरच हा गोंधळ पुढे होणार नाही, अशी मागणी शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली.

पगार कापला जाण्याची भीती

विशेष म्हणजे, मतदान न केल्यास तीन दिवसांचा पगार कापला जाणार असल्याची नोटीस कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांची यादीत नावेच नसल्याने हे मतदार रडकुंडीला आले आहेत. आम्हाला कोणीतरी मतदार यादीत नाव नाहीये इतकं तरी लिहून द्यावं, अशी याचना ते करत आहेत. आमचा हक्क आहे, आम्हाला आजच मतदान करायचं आहे, अन्यथा आमचा पगार कापला जाईल, त्याची जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न नोकरदार करत होते.

आमच्या घरात एकूण 9 ते 10 मतदार आहेत. यातील 2 जणांची केवळ नाव मतदार यादीत आली. बाकी सर्वांची नावे नाहीत. आम्हाला के.सी.गांधी येथे जाऊन 17 नंबरचा फॉर्म भरून घेऊन या, मग मतदान करता येईल असं सांगितलं. तिथे गेल्यावर असा कोणता फॉर्म नाही तुम्हाला मतदान करता येणार नाही असं सांगितलं गेलं. माझे वडील 85 वर्षाचे आहेत. दरवेळी ते मतदान करतात. आताच नाव कसे त्यांचे कट झाले. म्हणजे आम्ही मतदान करायचंच नाही का? असा सवाल डोंबिवलीतील राहुल पाटील यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *