पुणे : महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर आहे, मॉन्सून राज्यात दाखल झाला आहे. आज गुरूवारी मॉन्सून कोकणात आला आहे . रत्नागिरीसह पावासाने राज्यात आज दमदार हजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात उष्णतेचा पाऱ्याने उच्चांक गाठला होता.. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते. मात्र आता मॉन्सुन दाखल झाल्याने नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकला आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे  महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल अतिशय हळू सुरू होती. केरळमध्ये काही दिवस मुक्काम होता. त्यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटकात काही काळ थांबला होता. आज मात्र त्याने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. हा मॉन्सून रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेढक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून पुढे सरकला आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यामध्ये आजपासून पुढील तीन-चार दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गुरूवारी तर, शुक्रवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *