Author: bittambatami.com

आशा सेविका चार महिने मानधनापासून वंचित

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचे काम ७४ हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक करीत आहेत. मात्र मागील चार महिन्यांपासून राज्य सरकारकडून देण्यात येणारे मानधन या आशा स्वयंसेविकांना मिळालेले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आश स्वयंसेविकांना अवघड बनले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी ७४ हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या आशा स्वयंसेविकांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून मानधन देण्यात येते. राज्यातील आशा स्वयंसेविकांना महिन्याला १३ हजार रुपये मानधन मिळते. त्यापैकी ८ हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जातात, तर मानधनाची उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाते. केंद्र सरकारकडून देण्यात येणारे मानधन आशा स्वयंसेविकांना वेळेवर मिळत आहे. मात्र राज्य सरकारच्या हिश्यातून देण्यात येणारे मानधन जानेवारीपासून मिळालेले नाही. त्यामुळे आरोग्य सेविकांची आर्थिक कोंडी होत आहे. अल्प मानधनावर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका मिळणाऱ्या मानधनातूनच प्रवास खर्च करून गावागावात, खेडोपाडी जाऊन नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे काम करतात. मात्र सरकारी यंत्रणांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार महिन्यांपासून राज्य सरकारने मानधन न दिल्याने आशा स्वयंसेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना जानेवारी २०२४ पासूनचे थकीत मानधन विनाविलंब देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

मतदानाच्या जागृतीसाठी ठाण्यात शनिवारी मिनी मॅरेथॉन

ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम ठाणे (०८): येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे…

ठाणे प्रीमियर टी २० क्रिकेट लीग स्पर्धा

एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (ब) अंतिम फेरीत ठाणे :दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये प्रकाश झोतात खेळल्या गेलेल्या लढतीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने ठाणे वॉरियर्स क्रिकेट क्लबचा सहा गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर टी २० क्रिकेट लीग स्पर्धेतील  सलग चौथे विजेतेपद मिळवण्याकडे वाटचाल केली. अन्य लढतीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने बॉईज क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत अंतिम फेरीतले स्थान निश्चित केले उपांत्य फेरीत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने ठाणे वॉरियर्स क्रिकेट क्लबला १६.४ षटकात१०५ धावांवर गुंडाळले.रमणप्रीत सिंग (२६) आणि जितेश राऊतने ३३ धावा केल्यामुळे ठाणे वॉरियर्स क्रिकेट क्लबला शतकी धावसंख्या उभारता आली. प्रतिस्पर्ध्यांना मर्यादित धावांवर रोखताना धृमील मटकरने आठ धावांत ३, हेमंत बुचडे आणि अर्जुन शेट्टीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. उत्तरादाखल अमन खान,निखिल देसाई आणि आशय सरदेसाईने जबाबदारीपूर्ण खेळी करत ८.५ षटकात ४ बाद १०९ धावसंख्येसह एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाला निर्णायक फेरीत पोहचवले. या डावात खिजार दाफेदारने दोन, अजित यादव आणि यासिन शेखने प्रत्येकी एक बळी मिळवला. अन्य लढतीत बॉईज क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १६० धावांचे आव्हान उभे केले. त्यात आदित्य रावत (६९) आणि हर्षल जाधवने (५४) अर्धशतकी धावसंख्येचे योगदान दिले. प्रथमेश महाले, परीक्षित वळसंगकर,भाविन दर्जीने प्रत्येकी दोन बळी मिळवले. या आव्हानाला सामोरे जाताना प्रसाद पवारने नाबाद ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. श्रीराज घरतने नाबाद ३९ आणि अनिल रोंनकीने  ४९ धावा करत  संघाला विजयी केले. हर्षल जाधव, निनाद  ठाकूर आणि यश सिंगने प्रत्येकी एक गडी बाद केला.

निवडणुकीनंतर मुंबईची रक्तवाहिनी बेस्ट बस सेवा ठप्प होणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही बेस्ट कंत्राटदार ऐकत नसल्याने आम्ही पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करणार आहे. त्यामुळे बस सेवा ठप्प झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही असा इशारा बेस्ट कंत्राटी बस चालकांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. बेस्ट परिवहन सेवेत कंत्राटी बस जास्त असून बेस्ट च्या बसेस कमी आहेत.आमचे कंत्राटी वाहकांचे कामाचे तास व कामाची गुणवत्ता ही बेस्ट परिवहनच्या कायम कामगाराप्रमाणेच असताना वेतनात फरक का ? आम्ही जिवंत वाहक आहोत की अदृश्य वाहक आहोत. १७ हजारात घर चालते का ? आमचे कुटुंब या मुंबईत एवढ्या वेतनात राहू शकत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया रघुनाथ यांनी यावेळी दिली. सहा कंत्राटदार बेस्ट परिवहन सेवेत बस सह आम्हा चालकांची सेवा जनतेला देत आहेत. हे सहा कंत्राटदार गब्बर होत असताना आम्ही आत्महत्या करण्याच्या वाटेवर आलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालूनही कंत्राटदार जर ऐकत नसतील तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असे रघुनाथ यांनी सांगितले. सुट्ट्या नाहीत, कामाची गॅरंटी नाही, मेडिकल सुविधा नाही, रजेचा पगार नाही, महागाई वाढली असताना १७ हजार वेतन मिळते हे जगाच्या. पाठीवरील वाहन चालकांचे एकमेव उदाहरण असेल असे रघुनाथ यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेशी जास्त वाट लावणारा हा म्हस्केच

नरेश म्हस्के यांना मी जवळून ओळखतो;आयुष्यभर शकुनीमामा कोंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा थेट आरोप ठाणे : नरेश मस्के या व्यक्तीला मी अत्यंत जवळून ओळखतो, आयुष्यभर त्यांनी शकुनीमामाचे काम केले आहे. त्याच भूमिकेत ते राहिले आहेत. शिवसेना आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांची जास्त वाट लावणारा हाच नरेश म्हस्के आहे. त्यावेळी सतत धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात भूमिका म्हक्से घ्यायचा असा थेट आरोप ठाणे कोंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण बोलत होते. नरेश म्हस्के हा माझ्या नंतरचा नगरसेवक आहे. धर्मवीर आनंद दिघे हे गेल्यानंतर यांच्याकडे संपती कशी आली? हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,उध्दव ठाकरे यांच्या जीवनावर यांनी पैसे कमावले आहेत ना, असा टोला देखील विक्रांत चव्हाण यांनी लगावला. ज्यांनी शिवसेना चोरली, पक्ष चोरला त्यांना कायमचे तडीपार करा आणि राजन विचारे या सच्चा शिवसैनिकाला विजयी करा असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले.

ब्रिटिश काळातल्या पोर्ट ट्रस्ट कामगार संघटनेला १०४ वर्ष पूर्ण

रमेश औताडे मुंबई : कोणतीही संघटना कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठी होते. त्यांच्या सहकार्यामुळेच संघटना वाढत असते.  त्यामुळे कामगार  संघटनेमध्ये कामगार कार्यकर्ते फार महत्त्वाचे असतात.  असे मत ज्येष्ठ कामगार नेते ॲड.  एस.के. शेट्ये यांनी ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या कामगार संघटनेला १०४ वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्धापन दीन समारंभ प्रसंगी व्यक्त केले. ब्रिटिश काळात ३ मे  १९२० रोजी स्थापन झालेल्या बी. पी. टी. एम्प्लॉईज जुनियनला ( आताचे नाव – मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन )     १०४ वर्ष पूर्ण झाली असून, ३ मे २०२४  रोजी माझगाव येथील  कामगार सदन सभागृहात या संघटनेचा वर्धापन दिन संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड . एस. के. शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय  भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले  की, कामगारांच्या मागण्या मिळवण्यासाठी संप हे कामगारांचे शेवटचे हत्यार आहे. परंतु हे हत्यार देखील आता बोथट झाले आहे.  सध्याच्या काळात काम करताना सहकार्य, सामंजस्य व सुसंवाद हा त्रिसूत्री  मार्ग फार उपयोगी  आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यात कामगार विरोधी  बदल केले असून,  भविष्यात कामगार संघटनांमध्ये कार्य करणे फार कठीण जाणार आहे.  केंद्र सरकारच्या धोरणामुळे कायमस्वरूपी कामगार कमी होत असून,  प्रत्येक उद्योगात कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे असंघटितांना  संघटित करणे हे खऱ्या अर्थाने कामगार चळवळी समोर मोठे आव्हान आहे.  त्या दृष्टीने कामगार कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे.  शेवटी  कामगारांचे कोणतेही प्रश्न सोडवायचे असतील तर कामगारांची एकजूट फार महत्त्वाची आहे.  या एकजूटीवरच कामगारांच्या मागण्या मान्य होऊ शकतात. असे शेट्ये म्हणाले. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज,  कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल,  सेक्रेटरी विद्याधर राणे,  सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी विजय रणदिवे, उपाध्यक्ष शीला भगत,  निसार युनूस,  प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस मनीष पाटील यांनी युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त कामगार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  युनियनचे पदाधिकारी विकास नलावडे, संदीप कदम, विष्णू पोळ,  संदीप चेरफळे, प्रदीप नलावडे, त्याचप्रमाणे  कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी

मतदान केंद्रांबाहेर मंडपाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा,–सुरेश म्हात्रे राजीव चंदने मुरबाड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून तापमान ४० ते ४२ अंशापर्यंत पोहोचले आहे.२० मे रोजी भिवंडी लोकसभेसाठी मतदान होणार असून या काळातही तापमानात वाढ असणार असल्याने मतदारांना मतदान केंद्राबाहेर उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी व वाढत्या तापमानामुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रानबाहेर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, खुर्च्या व खेळती हवा राहील अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे  केली आहे.

श्री गणेश आखाड्यातर्फे निवासी कुस्ती शिबिर

मुंबई : मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर पश्चिम  यांच्यातर्फे येत्या २१ मे ते १० जून २०२४ या कालावधीत उन्हाळी निवासी कुस्ती, संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय प्रशिक्षक, खेळाडू, पंच यांच्याकडून कुस्तीपटूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जाईल. तसेच नविन नियमांची माहिती करुन देण्यात येईल. कुस्तीसोबत योगासने, प्राणायामाचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. २० मेपर्यंत शिबिराच्या प्रवेशिका स्विकारण्यात येतील. शिबिराचे प्रवेश शुल्क ७०००/- रुपये आहे. नितिन शिंदे, महेंद्र जाधव, विवेक नायकल, वैभव माने, अनिल बागाव, कोमल देसाई हे सर्व एन आय एस प्रशिक्षक कुस्तीपटूंना या खेळाचे धडे देतील. शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यांना प्रमाणपत्र, ट्रॅकसूट, सन्मान चिन्ह भेट देण्यात येईल. शिबिराच्या प्रवेशासाठी मिलिंद लिमये, ९६१९०२४३३३, वसंतराव पाटील ८३२९६०९०३८, सदानंद पाटील ९३७२४१३३२५, रुपचंद माने ९८६९१०४१२२,  कोमल देसाई ७०३९१२५९८५ यांच्याशी संपर्क साधावा.

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ मे २०२४ रोजी लोकमान्य मंडळ बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, डॉ. सी. जी. देसाई मार्ग, मनमाला मंदिरासमोर, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई – ४०००१६ येथे मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार असून स्पर्धेची नावे ९ मे २०२४ रोजी सायंकाळी ठिक ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, आश्रय हॉटेलच्या मागे, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, मुंबई – ४०० ०१६ येथे क्लब मार्फत स्वीकारण्यात येतील.

रिक्षा-टॅक्सीच्या उत्पन्नात तापमानवाढीमुळे घट

उन्हामुळे मुंबईकरांचे त्रस्तीचे जीवन मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामध्ये मुंबईकर घराबाहेर पडायचं टाळत आहेत. अशा कडक उन्हातदेखील वाहतूक पोलिस, रिक्षा-टॅक्सी चालक, पोस्टमन आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात उन्हामुळे रिक्षा, टॅक्सीच्या प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाल्याचे रिक्षा, टॅक्सीचालकांनी सांगितले. मुंबईतील दादर, सीएसएमटी, भायखळा, सायन, चेंबूर आदी ठिकाणी नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.  यंदा उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त होत आहेत. अशा परिस्थितीतदेखील वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक पोलिस चौकाचौकात कर्तव्य बजावत आहेत. वाहतूक पोलिसांना उन्हामध्ये शहरातील चौकात उभे राहून कर्तव्य बजावावे लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना काही काळ विसावा घ्यायचा झाल्यास त्यांना उड्डाणपूल किंवा जवळच्या झाडाखाली उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. उन्हामुळे रिक्षाचालकांचे खूप हाल होत आहेत. रिक्षाचे छत तीव्र उन्हामुळे तापत आहे. अशात वाढत्या तामपानामुळे शहरातील ६० रिक्षा रस्त्यावर असून ४० टक्के रिक्षाचालक गावी गेले आहेत, असे मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन यांनी सांगितले. सध्या प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटल्याचे त्यांनी सांगितले. तापमान असह्य झाल्यामुळे झाडाखाली रिक्षा, टॅक्सी उभी करून चालक विसावा घेत आहेत. तापमान वाढल्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची, वाद होण्याचे प्रमाणही वाढल्याचे सांगण्यात येत आहे.