Author: bittambatami.com

बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत पोलिसांकडून आव्हान

नवी मुंबई, :- एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस पडून असलेल्या  मोटार  दुचाकी, स्कुटर, ऑटो रिक्षा,फोर व्हिलर  या वाहनांच्या मालकी हक्काबाबत एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. अशी माहिती एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यांनी दिली आहे. एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणास्तव प्राप्त झालेली 55 दुचाकी वाहने, 4- चारचाकी वाहन, 1 थ्री व्हीलर एकूण 60 बेवारस वाहने एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. वर्षानुवर्षे या वाहनांचे मूळ मालक सदर वाहने घेऊन जाण्यास आलेले नसल्याने एन आर आय सागरी पोलीस ठाण्यामार्फत सदर वाहनांच्या मूळ मालकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने कागदपत्रे दाखवून या बातमी सोबत दिलेल्या यादीतील आपल्या वाहनांची ओळख पटवून ती घेऊन जावी असे आवाहन एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यानी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई

टिटवाळा, अंबरनाथ आणि वाड्यात कल्याण/वसई: एप्रिल महिन्यात महावितरणच्या टिटवाळा, अंबरनाथ पूर्व आणि वाडा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. टिटवाळा उपविभागा‍त १२४ जणांविरुद्ध कारवाई करून ४१ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. अंबरनाथ पूर्व उपविभागात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या १९ ग्राहकांकडे २६ लाख ३५ हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. तर वाडा उपविभागात तब्बल १०४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून १ कोटी ९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सातत्याने सुरू आहे. त्यानुसार टिटवाळा उपविभागातील जीआर नगर, बल्याणी गाव, आंबिवली रोड, वैष्णवी देवी चाळ, गुरुवली पाडा, शिवनगरी चाळ भागात एकाच दिवशी राबवलेल्या शोध मोहिमेत १२४ जणांकडे सुरू असलेल्या वीजचोऱ्या शोधण्यात यश आले. या १२४ जणांकडून सुमारे ४१ लाख रुपये किंमतीची १ लाख ८० हजार ८८१ युनिट विजेची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार, अलंकार म्हात्रे यांच्या पथकांने ही कारवाई केली. अंबरनाथ पूर्व उपविभागात ३३३७ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यात १९ वीज मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याचे आढळून आले. या १९ ग्राहकांनी २६ लाख ३५ हजार रुपये किंमतीची ९८ हजार ९९६ युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, सहाय्यक अभियंते वैशाली पाटील, प्रशांत नाहीरे, हरेश विशे, प्रतिक म्हात्रे, मोहित ठाकुर, रविंद्र नाहिदे, सहायक लेखापाल मयुरी बोरसे यांच्या पथकांनी ही कारवाई केली. तर वाडा उपविभागात वाडा शहर आणि ग्रामीण, गोऱ्हा, अंबाडी, कुडूस आदी भांगामध्ये राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत १०४ जणांकडे विजेचा चोरटा वापर आढळून आला. या १०४ जणंनी १ कोटी ९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत या रकमेचा भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे. वाड्याचे उपविभागीय अभियंता अविनाश कटकवार, सहायक व कनिष्ठ अभियंते, जनमित्र तसेच सुरक्षारक्षक यांच्या चमुने ही कामगिरी केली.

पंतप्रधान मोदींचे बाळासाहेब ठाकरेंबद्लचे विधान हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’

वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल मुंबई : पराभवाच्या भितीने घाबरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दारूण पराभव होणार असल्याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दल आपुलकी व प्रेम व्यक्त करत आहेत. एवढेच जर प्रेम असते तर बाळासाहेबांची शिवसेना कटकारस्थान करून फोडली नसती. मोदींनी व्यक्त केलेले बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दलचे प्रेम व आदर हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा समाचार घेत प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, महाविकास आघाडीचे सरकार पाडले. बाळासाहेबांबदद्ल प्रेम, आदर व आपुलकी असती तर भाजपाने असे उद्योग केलेच नसते. शिवसेना व काँग्रेस यांची विचारधारा वेगळी आहे, असे असले तरी उद्धव ठाकरे संकटात असताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांनी फोन करून सोबत असल्याचा शब्द दिला, उद्धवजी आजारी असतानाही त्यांची विचारपूस केली पण जाहीरपणे वक्तव्य करून त्याचे राजकीय भांडवले केले नाही, हा शिष्टाचाराचा व राजकीय संस्क़ृतीचा भाग आहे आणि उध्दव ठाकरे आजारी असताना कटकारस्थान करून शिवसेना पक्ष फोडणे याला विकृती म्हणतात. “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही, ज्या दिवशी कौटुंबिकदृष्ट्या श्रीमान उध्दव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा पहिला मदतीला धावून मी जाईन’’ ही नरेंद्र मोदी यांचे विधान स्पष्ट, स्वच्छ आणि निर्मळ भूमिका असणारे नाही तर वातावरण निवळण्यासाठी चालवलेला खटाटोप आहे. नरेंद्र मोदी आज काहीही बोलले तर शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनता त्यांना माप करणार नाही. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सकाळी लोकमान्य टिळक नगर, येथील गोल मैदान येथे मार्निंग वॉक करत स्थानिक लोकांशी संवाद साधला. वाकोला मार्केट येथे विविध समाजाच्या प्रमुख नेत्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. वांद्रे-कुर्ला कॉमप्लेक्समधील मोहमद इस्टेट येथील स्थानिकांशी संवाद साधला. तसेच टिळक नगर, कुर्ला, कलिना भागातील शिवसेना शाखांना भेटी दिल्या.

ऐन उन्हाळ्यात कलिंगड विक्री थंड

नवी मुंबई : उन्हाळा सुरू होताच थंडगार शीतपेय, रसाळ फळांना अधिक मागणी असते. यंदा तर अधिक उष्मा आहे. मात्र असे असताना देखील सध्या बाजारात आंब्याचा हंगाम सुरू असल्याने कलिंगडची मागणी रोडावली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते. आंब्यापाठोपाठ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फळ बाजारात कलिंगड दाखल होण्यास सुरुवात होते तर मार्च-एप्रिलपासून मागणीत वाढत होते. सध्या बाजारात लाल रंगाच्या रसरशीत शरीराला थंडावा देणारी कलिंगड बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, तिची चव चाखण्यासाठी ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसीत सध्या महाराष्ट्रसह तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून आवक होते. सध्या बाजारात कलिंगडच्या १०० ते १३० गाड्या दाखल होत आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलोला ११ते १२ रुपये दर आहेत. तेच एप्रिल मध्ये १५ ते १६ रुपये बाजारभाव होते. एपीएमसीत आता आंब्याची आवक जास्त होत असून इतर फळांची मागणी कमी आहे. बहुतांशी ग्राहक आंबा खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे बाजारात कलिंगडला म्हणावी तशी मागणी नाही. कोट एपीएमसी घाऊक बाजारात सध्या आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे ग्राहक आंबा खरेदीला पसंती देत असून कडक उन्हाळा असूनही रसाळ कलिंगडाची मागणी कमी आहे. मुर्तीझा खान, कलिंगड व्यापारी, एपीएमसी

‘राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको’

जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला ठाणे : ज्या गुंडांना गेल्या अडीच वर्षांत राजाश्रय देण्यात आला होता. त्या गुंडांनीच शिवसेनेच्या रॅलीत टोळीयुद्ध घडविले. हे गुंड कुणाचेच नसतात. आज ते एकमेकांच्या अंगावर गेले; उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यास जात असताना त्यांच्या रॅलीत सहभागी गुंडांमध्ये टोळीयुद्ध झाले. यासंदर्भात आव्हाड यांनी एक्स पोस्ट करून टीका केली. आपण जे पेरतो, तेच उगवत असतं. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात असताना,  ज्या गुंडांना गेली अडीच वर्षे राजाश्रय दिला होता; त्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भररस्त्यात उघडपणे मारामारी झाली. स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते ज्या शहरात राहतात; त्याच शहरात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची मिरवणुकीत टोळीयुद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. पूर्ण महाराष्ट्रात ठाण्याची लाज गेली. माझी खात्री आहे, पोलीस याच्यावर कुठलीही कारवाई करणार नाहीत. एखादा गुन्हा असलेल्यांना तडीपार करण्याच्या ऑर्डर काढणाऱ्या पोलिसांचे मला कौतूक वाटते. ज्या दोन गुंड टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध झाले. त्या टोळ्यांचे म्होरके हे कित्येक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जणूकाही ते प्रशासनाचे जावई आहेत.  म्हणूनच आपण कोणाला जवळ ठेवतो आणि कोणाला मोठं करतो, याचे भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला हवे. आज ते एकमेकांच्या अंगावर गेलेत. कारण ते कुणाचेच नसतात. उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, असे आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

पालघरमधून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी आठ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. त्यात महाविकास आघाडीच्या तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या भारती कामडी यांचाही समावेश आहे. त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात आता अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या तथा उद्धव गटाच्या भारती कामडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पालघर-बोईसर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात माजी मंत्री आदित्य ठाकरे, कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा व आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांचीही उपस्थिती होती. यावेळी काढलेल्या रॅलीत तारपा नृत्य, ढोल-ताशांच्या गजरात मोठे शक्तिप्रदर्शन केले गेले. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या उपस्थितीत उमेदवार कल्पेश भावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीतर्फे भरत वनगा, मार्क्सवादी लेनिन पार्टीतर्फे राहुल मेढा, सुरेश जाधव, दिनकर वाढान, भारत आदिवासी पार्टीतर्फे मोहन गुहे तसेच वासंती झोप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दोन दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीतर्फे आमदार राजेश पाटील वंचित बहुजन आघाडीतर्फे विजया मात्रे तर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे मीना भड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनामुळे ठाणेकर कोंडीत

ठाणे: ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून मिरवणूक निघत आहे. या मिरवणुकीमुळे तलाव पाली, राम मारुती रोड, नौपाडा क्षेत्रात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे यामुळे हाल होत आहेत. ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निघाले आहे. ठाणे लोकसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची असल्याने सकाळपासूनच शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते ठाणे तलावपाली येथील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. दाखला करण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने मिरवणूक काढली जाणार आहे. ठाणे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, बाजारपेठ, जिल्हाधिकारी कार्यालय अशी निघणार आहे. नवी मुंबई, मिरा भाईंदर, ठाणे ठाणे या भागातून मोठ्या बस गाड्या ठाणे शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. परंतु याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊ लागला आहे. या­ बस गाड्या गडकरी रंगायतन परिसरात उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय हे शहराच्या महत्त्वाच्या मार्गावर असल्याने तलाव पाली राम मारुती रोड, नौपाडा, गोखले रोड टेंभीनाका या भागात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. ठाणे शहरातील विविध भागातून सकाळी कामानिमित्त नागरिक वाहतूक करत असतात. परंतु वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. वाहतूक बदलामुळे पोलीस आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत.

कल्याण डोंबिवलीतील वृक्ष विद्युत रोषणाई मुक्त

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील झाडांवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई काढून टाकून पालिकेच्या उद्यान विभागाने पालिका हद्दीतील वृक्ष प्रदूषक रोषणाई मुक्त केले आहेत. गेल्या आठवड्यापासून ही मोहीम उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने सुरू केली होती. पालिका हद्दीतील अनेक झाडांवर काही हाॅटेल, ढाबे मालकांनी विद्युत रोषणाई करून झाडांचे विद्रुपीकरण, विद्युत रोषणाई करून प्रदूषण निर्माण केले होते. झाडांवरील पक्ष्यांच्या अधिवासाला, जैवविविधतेला धोका पोहोचविला होता. याविषयी मुंबई उच्च न्यायलयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावेळी न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व पालिकांना आपल्या हद्दीत झाडांंवर विविध व्यावसायिक, नागरिकांकडून करण्यात आलेली विद्युत रोषणाई तातडीने हटविण्याचे आदेश दिले होते. कल्याण डोंबिवली पालिकेने टिटवाळा, कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, शिळफाटा रस्ता भागातील झाडांवर हाॅटेल्स व्यावसायिक, शिकवणी चालक, विकासक, गॅरेज चालक, ढाबे मालक यांनी केलेली विद्युत रोषणाई काढून टाकली. याशिवाय झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावणे, झाडांना बाधा होईल अशा प्रकारची कृती करणे अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी घेतला आहे. पालिका हद्दीतील सुमारे तीनशेहून अधिक झाडांवरील विद्युत रोषणाई काढून टाकण्यात आली आहे. या कामासाठी उद्यान विभागाने विशेष पथके तयार केली होती. झाडांना विद्युत रोषणाई केल्याने या झाडांवरील पक्ष्यांच्या अधिवासाला धोका उत्पन्न होत असल्याचे, याशिवाय झाडावर विविध प्रकारचे परिणाम होत असल्याची निरीक्षणे पर्यावरण अभ्यासकांनी काढली आहेत. मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीचे उद्यान अधीक्षक महेश देशपांडे आणि पथकाने ही कारवाई केली. कोट पालिका हद्दीतील झाडांवर नागरिक, व्यावसायिकांकडून करण्यात आलेली सर्व विद्युत रोषणाई काढून टाकण्यात आली आहे. अशाप्रकारची कृती कोणीही केली तर त्यांच्यावर यापुढे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. – संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक, कडोंंमपा.

नरेश म्हस्केच्या मिरवणुकीत दोन गटात हाणामारी

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. हे दोघेही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. परंतु वैयक्तिक वादातून ही हाणामारी झाली असून त्याचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचे बोलले जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मासुंदा तलाव येथील शिवसेना जिल्हा शाखा ते टेंभीनाका अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही मिरवणूक बाजारपेठेतून जात असताना, मिरवणुकीत सामील झालेले सिद्धेश अभंगे आणि अजय पासी या दोघांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अचानकपणे झालेल्या हाणामारीमुळे मिरवणुकीत सहभागी झालेले शिवसैनिक चक्रावले आणि त्यांच्यासह पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना बाजुला केले. सिद्धेश अभंगे आणि अजय पासी हे दोघेही युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. हे दोघे एकेकाळी जिगरी मित्र होते. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाले असून ते आता एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. यामुळे वैयक्तिक वादातून ही हाणामारी झाली असून त्याचा शिवसेनेशी काही संबंध नसल्याचे बोलले जात आहे.

भिवंडीत उसळला हजारोंचा जनसागर!

कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेला हजारो नागरिकांचा जनसागर उसळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीने केलेल्या शक्तीप्रदर्शनाने गर्दीचे सर्व जुने विक्रम मोडले गेले. तर जय श्रीराम व मोदी मोदीच्या गजरामुळे संपूर्ण भिवंडी शहर महायुतीमय झाल्याचे पाहावयास मिळाले. भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील हे मुंबई महानगर क्षेत्रात विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडी येथील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे, महेश चौघुले,संजय केळकर, निरंजन डावखरे, रमेश पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दौलत दरोडा, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदुराव, रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय गायकवाड, कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे अशोक साप्ते, माजी आमदार नरेंद्र पवार, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, संतोष शेट्टी, सुभाष माने आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. ढोल, झांज आणि ताशांच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले होते. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष, श्रमजीवी संघटना, कुणबी सेनेच्या ध्वजांबरोबर जय श्रीराम व मोदी मोदी गजर सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजारो नागरिकांना संबोधित केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला मिळालेली जनतेची पसंती दिसून येत आहे. आताची लोकसभा निवडणूक ही देशासाठी महत्वाची आहे. देशाचे भविष्य घडविणारी ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदींनी रोटी, कपडा और मकान दिले. परंतु, आता कॉंग्रेसचे नेते तुमची अर्धी प्रॉपर्टी सरकारजमा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसचा हा प्रयत्न हाणून पाडावा.” भिवंडीत झालेली ही अभूतपूर्व गर्दी पाहून `एमएमआरडीए’ क्षेत्रातून सर्वाधिक मतांनी कपिल पाटील निवडून येतील, याची खात्री होत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कपिल पाटील यांना मतदान करून लोकसभेत पाठवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे इंजिन देशाला प्रगतीकडे नेणारे आहे. या इंजिनाला भिवंडीतून साथ द्यावी. तर २६ पक्षांची खिचडी असलेल्या पक्षांकडून प्रत्येक जण मीच इंजिन असल्याचे सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ कोटी गरीबांची प्रगती केली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला उमेदवारी दिली. मात्र, कॉंग्रेसकडून उज्वल निकमांनी देशद्रोही अजमल कसाबची बदनामी केली, असा आरोप केला जात असल्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.