Author: bittambatami.com

‘मी मतदान करणारंच .. आपणही मतदान करा’

ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती ठाणे : ‘मी मतदान करणारंच.. आपणही मतदान करा आणि लोकशाही बळकट करा’ अशा घोषणा देत 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघांतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी भास्कर कॉलनी येथील हजेरी शेड या ठिकाणी मतदान जनजागृती केली. स्वीप कार्यक्रमातंर्गत शहरात विविध ठिकाणी मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. १४८ ठाणे मतदार संघ सहा.निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (२९ एप्रिल) सफाई कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या ठिकाणी मतदान जनजागृतीपर सामूहिक घोषणा देऊन सफाई कामगारांना मतदान करण्यासाठी आवाहन करुन मतदानाची सामूहिक  शपथ घेण्यात आली. या मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक सफाई कामगारांना मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा या संदेशासह मतदानाची तारीख  दर्शवणारे माहितीपत्रकाचेही वाटप करण्यात आले. सर्व स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांना मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मतदान आपला अधिकार आणि आपली जबाबदारी आहे याची जाणीव त्यांना करून देण्यात आली. सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांनी व तुम्ही राहता तेथील आजूबाजूच्या नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मेला अवश्य मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या आवाजात सामूहिक पणे “आम्ही राबऊ स्वच्छ्ता अभियान,पण तुम्ही करा हक्काने मतदान या घोषणे द्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

कुंभारखाणपाडा येथे ‘महारेरा’ गुन्ह्यातील बेकायदा इमारत भुईसपाट

डोंबिवली: डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांंधकाम परवानग्या न घेता, महारेराचा नोंदणी क्रमांंक मिळवून उभारलेली बेकायदा इमारत पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या तोडकाम पथकाने पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने भुईसपाट केली. पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता अशा इमारतींना महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाचा (महारेरा) नोंंदणी क्रमांंक मिळवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका ग्राहकांना बेमालुमपणे विकून त्यांची फसवणूक करण्याचा उद्देश भूमाफियांचा होता. याप्रकरणी प्रसिध्द वास्तुविशारद संदीप पाटील यांंनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरून तत्कालीन पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी अशी बेकायदाशीर कृती करणाऱ्या डोंबिवलीतील ६५ भूमाफियांवर नगररचना अधिकाऱ्यांच्या साह्याय्याने मानपाडा, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या गन्ह्यात कुंभारखाणपाडा येथील अजिंक्य नारकर आणि सुनील नारकर या बंधूंंनी वास्तुरचना वास्तुविशारद फर्मचे पांडुरंग म्हात्रे यांच्या साहाय्याने उभारलेल्या सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचा समावेश होता. यापूर्वी या इमारतीवर दोन ते तीन वेळा जुजुबी कारवाई यापूर्वीच्या साहाय्यक आयुक्तांकडून करण्यात आली होती. हरितपट्ट्यातील अडगळीच्या जागेत असलेल्या या इमारतीचे पाडकाम साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांंच्या मार्गदर्शनाखाली तोडकाम पथकाने मागील पधरा दिवसांंपासून पोकलेन यंंत्राच्या साहाय्याने सुरू केले होते. या इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांंवर खूप राजकीय दवाव होता. परंतु, साहाय्यक आयुक्त सावंत यांंनी हे दबाव न जुमानता आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून ही बेकायदा इमारत बुधवारी भुईसाट केली. या कारवाईने भूमाफियांना मोठा तडाखा बसला आहे. या कारवाईने भूमाफियांचे सुमारे दोन ते तीन कोटीचे नुकसान झाल्याचे समजते. या इमारतीत एका माजी नगरसेवकाने ‘खुशी’ (बोनस) म्हणून दोन ते तीन सदनिकांची मागणी भूमाफियांकडे केली होती. या कारवाईनंतर ह प्रभागाकडून ठाकुरवाडीतील अग्निदेवी मंदिराजवळ उभारलेली प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांंची फशी हाईट्स, गटारावर उभारेली बेकायदा इमारत, राहलुनगर मधील रमाकांत आर्केड, सुदामा हाईट्स आणि खंडोबा मंदिर भागातील बेकायदा इमारती, गरीबाचापाडा येथील वसंत हेरिटेज, जुनी डोंबिवलीतील शाळेच्या आरक्षणावरील शिव लिला आणि कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याच्या खुराड्यावर कधी कारवाई केली जाते याकडे नागरिक, तक्रारदारांचे लक्ष लागले आहे.

मुंब्रा येथे कपड्याच्या दुकानाला आग

आगीत दोन दुकानांमधील वस्तू खाक मुंब्राः येथील दोन कपडे विक्रीच्या दुकानांना लागलेल्या आगीत दुकानातील कपडे तसेच इतर वस्तू जळून खाक झाल्या.मुंब्रा शहरातील कौसा भागातील नशेमन काँलेनी परीसरातीलएका एका  हाँटेलच्या जवळ असलेल्या दहा बाय दहा फूट आकाराच्या कपडे विक्रीच्या दुकानांमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आणि  मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.जवानांनी एक फायर आणि दोन हायराईज फायर वाहनांच्या मदतीने अल्पावधित  आग पूर्णपणे विझवली.या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु भाडेतत्वावर दुकान चालवत असलेल्या अब्दुल लतिफ आणि मोहम्मद शेख या दोघांच्या  दुकानातील कपडे,कपाट,विद्युत वायरींग,वातानाकुलित यंत्र(एसी) पूर्णपणे जळून खाक झाले असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. दरम्यान सदरच्या दुकानांमधील आग शाँर्टसर्किटमुळे लागल्याची तसेच दोन  दुकानांमधील लाकडी पार्टिशनमुळे ती दुस-या दुकानामध्ये पसरल्याची माहिती मुंब्रा अग्निशमन दलाचे स्थानक प्रमुख एन.वाय.शिंदे यांनी दिली.

ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज

ठाणे : ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ काँग्रेस ऑफिस वरून वळसा मारून शिवाजी मैदान अशी रॅली काढून शक्ती प्रर्दशन केले. ठाणे  लोकसभा  मतदार संघातून उद्धव सेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी साडे अकरा वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील  समाधीस्थळाला भेट देऊन त्यांचे आर्शिवाद घेतले.त्यानंतर  त्यानंतर  तेथूनच  एक   रॅली काढण्यात आली.या रॅलीत  जांभळी नाका परिसरात  शिवसेनानेने  युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, हे सामील झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे शहरअध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते.या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते. दुपारी साडे बारा च्या मुहुर्तावर विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे, मुलगी लतिका विचारे, धनश्री विचारे हे उपस्थित होते.

शाळांमधून मतदानाविषयी जनजागृतीपर उपक्रमांचे उत्साही आयोजन

ठाणे : 25 ठाणे सार्वत्रिक लोकसभा २०२४ ची निवडणूक 20 मे रोजी होत असून या निवडणुकीच्या मतदार जागृतीसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यासोबतच मुलांमार्फत पालकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन स्तरावरही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये – आईबाबांस मतदान करण्याविषयीचे पत्रलेखन, मतदानाचा संदेश प्रसारित करणारी चित्रकला आणि रांगोळी रेखाटन, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंधलेखन, गायन, प्रभातफेरी, पथनाटय असे नानाविध उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय शाळांमध्ये पालकसभा आयोजित करून त्याठिकाणीही पालकांना मतदानाचे महत्व विशद करीत लोकसभा निवडणूकीत मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून शाळा आणि त्यालगतच्या परिसरातील नागरिकांचेही प्रबोधन करण्याचा प्रयत्न शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळाशाळांतील विद्यार्थ्यांनी केला. हे नानाविध उपक्रम महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी श्रीम अरूणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील 174 शाळा आणि 39 कनिष्ठ महाविद्यालये याठिकाणी बेलापूर, शिरवणे, तुर्भे आणि वाशी या केंद्रांचे केंद्र समन्वयक श्रीम.रेखा पाटील, श्री.सागरनाथ भंडारी, श्रीम. जयमाला पाटील आणि श्री.प्रशांत म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

सह्याद्रीच्या अंतरंगाची वेगळी ओळख करून देणा-या सदाशिव टेटविलकर लिखित ‘सह्याद्री परिक्रमा’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन

ठाणे : सह्याद्रीचे अभेद्य कवच असल्यामुळेच इथल्या पर्यावरणाची जपणूक झाली व निसर्गसंपन्नता वाढली. सह्याद्रीच्या डोंगरद-यांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकारण्यात बहुमोल योगदान दिले. अशा सह्याद्रीचे विलक्षण आकर्षण माझ्यासह प्रत्येकाला वाटते. त्यामुळे इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या 4 मित्रांसह 40 वर्षांपूर्वी केलेली सह्याद्री पदभ्रमणाची पुस्तकरूपात प्रकाशित होत असलेली मोहीम सह्याद्रीच्या अंतरंगाची अधिक माहिती करून देणारी व त्याच्याविषयीची ओढ अधिकच वाढविणारी असल्याचे मत उद्योजक रविंद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. ठाणे येथील शिवसमर्थ विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित व श्रीकृपा प्रकाशन प्रकाशित ‘सह्याद्री परिक्रमा’ या पुस्तक प्रकाशन समारंभाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रविंद्र प्रभुदेसाई बोलत होते. याप्रसंगी शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक प्रदीप केळकर, ज्येष्ठ संपादक मिलींद बल्लाळ, आनंद विश्व गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते. लेखणीतील सातत्य हे टेटविलकरांचे वैशिष्ट्य असून त्यांची 13 पुस्तके इतिहासाच्या अनेक दुर्लक्षित घटकांकडे बघण्याची वेगळी दृष्टी देतात असे सांगत रविंद्र प्रभुदेसाई यांनी विविध उत्पादनांतून पितांबरी उद्योगसमुह कार्यरत  असताना त्यात सेवाभावी दृष्टीकोन जपण्यामुळे समाजाचे ऋणमुक्त होण्याचे समाधान लाभते असे मत मांडले. विक्रमवीर गिर्यारोहक प्रदीप केळकर यांनी सामान्य कुटुंबातून येऊन असामान्य कर्तृत्व गाजविणारे सदाशिव टेटविलकरांचे व्यक्तिमत्व आम्हां दुर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत सह्याद्रीची परिक्रमा हे त्यांचे पुस्तक भटक्यांचा मार्गदर्शक ठरेल असे मत व्यक्त केले. सह्याद्रीने आम्हाला माणुसकी शिकवली असे सांगून त्यांनी आपण निसर्ग वाचवायला शिकले पाहीजे हे अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले. ज्येष्ठ संपादक मिलींद बल्लाळ यांनी साध्यासोप्या शैलीत इतिहास मांडणा-या टेटविलकरांच्या लेखनशैलीचे कौतुक करीत स्थानिक इतिहास जपण्यासाठी डॉ. दाऊद दळवी, सदाशिव टेटविलकर अशा व्यक्तींनी केलेल्या ठोस स्वरूपाच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. ठाण्यात वस्तुसंग्रहालय उभे राहणे गरजेचे असून त्यादृष्टीने आपण प्रयत्नरत असल्याचे सांगत नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणे ही पालकांची जबाबदारी असून त्यांनी मुलांना मॉलऐवजी म्युझियमची सफर घडवावी असा पर्याय त्यांनी सांगितला. आनंद विश्व गुरूकुलचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी 50 वर्षांपासूनच्या टेटविलकरांशी असलेल्या मैत्रीच्या आठवणींचा पट खुला करीत साधेपणा आणि सहनशीलता हा त्यांचा महत्वाचा गुण असल्याचे सांगितले. लेखक सदाशिव टेटविलकर यांनी आपल्या मनोगतात 1983 मध्ये 4 मित्रांसह केलेल्या सह्याद्री परिक्रमेच्या आठवणी सांगताना दुर्गप्रेमी गो.नी.दांडेकर यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा प्रोत्साहक वरदहस्त याचा विशेष उल्लेख केला. 40 वर्षांपूर्वी प्रवासाची वा संपर्काची फारशी साधने उपलब्ध नव्हती त्यावेळी परिक्रमा करताना द-या, खो-या, जंगल, डोंगरवाटा पार करताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली मात याच्या चित्तथरारक आठवणी त्यांनी सांगितल्या. सह्याद्रीच्या द-याखो-यातील माणसांनी ‘अतिथी देवो भव’ म्हणत केलेल्या सहकार्याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. सीमा टेटविलकर – कोंडे यांनी भावना व्यक्त करताना आपल्या वडिलांनी केलेल्या साधेपणाच्या संस्कारांचा आवर्जून उल्लेख करीत त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपसुक तयार झाला आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची जडणघडण होत गेली असे सांगितले. लहानपणापासून वडिलांनी फिरायला नेले ते किल्ल्यांवरच हे सांगताना त्यांनी सह्याद्री भ्रमणासाठी मित्रांसह बाहेर पडलेल्या वडिलांनी तिथून पाठवलेल्या खुशालीचे पत्र आल्यानंतर आईला झालेल्या आनंदाचे वर्णन केले. महेंद्र कोंडे यांनी ओघवते सूत्रसंचालन केलेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी लेखक सदाशिव टेटविलकरांसोबत सह्याद्री परिक्रमेत सहभागी झालेले त्यांचे मित्र सुभाष मांडले तसेच पुस्तक निर्मितीत सहकार्य करणारे पद्माकर शिरवाडकर व सरिता जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कोकण इतिहास परिषदेच्या सचिव विद्या प्रभू व पदाधिकारी भारती जोशी तसेच रसिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

मुंबई उत्तर मतदासंघाकरीता

दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे…

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरीता

राजकुमार चंदन, किरण छत्रपती खर्च निरीक्षक मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे.…

‘आरटीई’त मिळणारे मोफत शिक्षण खासगी इंग्रजी शाळांमधून बंद

भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी वेधले लक्ष ठाणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधून गरीब मुलांना मिळणारे मोफत शिक्षण यंदाच्या वर्षापासून बंद झाले आहे. या निर्णयामुळे गरीब मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमधून मिळणाऱ्या मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रश्नाची दखल घेऊन भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन दिले. तसेच खासगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण कायम ठेवण्याची मागणी केली आहे. या वेळी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचीही उपस्थिती होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २००९ पासून मुलांना मोफत शिक्षण दिले जात होते. मात्र, या वर्षी बदललेल्या नियमानुसार `आरटीई’मध्ये महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. तर खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्यात आल्या आहेत. त्याचा फटका इंग्रजी शिक्षणासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या प्रश्नावर पालकांच्या भावना तीव्र असून, राज्य सरकारने पूर्वीच्या नियमांप्रमाणेच `आरटीई’मधून गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण द्यावे, अशी मागणी अनेक पालकांनी माजी नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या निर्णयामुळे राज्यभरात शेकडो गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना इंग्रजी शिक्षण मिळण्यास अडचणी येणार आहेत. काही जणांना नाईलाजाने इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, याकडे श्री. चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले. या प्रश्नावर निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.

कृत्रिम प्रज्ञेमुळे रोगनिदान व उपचार खर्च कमी व्हावा-राज्यपाल रमेश बैस

अशोक गायकवाड नवी मुंबई : कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे रोगनिदान व उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचा रोग, दंत चिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञेमुळे परिवर्तनकारी बदल होत आहेत. या तंत्रज्ञानामुळे जनसामान्यांचा रोगनिदान व उपचाराचा खर्च कमी झाला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी रविवार येथे केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व बॉम्बे हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या ‘आरोग्यसेवा व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील एक दिवसाच्या चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी  बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या दोन शतकांमध्ये लसीकरण, बधिरीकरण, मेडिकल इमेजिंग, प्रतिजैविके, अवयव प्रत्यारोपण, स्टेम सेल थेरपी इत्यादी महत्वपूर्ण स्थित्यंतरे झाली आहेत . कृत्रिम प्रज्ञा हे क्रांतिकारी तंत्रज्ञान देखील वैद्यकीय क्षेत्रातील एकूणच परिदृश्य बदलवणारे असेल असे सांगून कृत्रिम प्रज्ञेच्या मदतीने मधुमेह व इतर जीवनशैली संबंधी समस्यांचे ओझे कसे कमी करता येईल या संबंधी संशोधन झाले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. डॉक्टर व विशेषज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारताना रुग्णांसोबत सुसंवाद व सहानुभूती कमी होऊ देऊ नये तसेच गरीब रुग्णांच्या सेवेबाबत विशेष तत्पर राहावे, असे राज्यपालांनी सांगितले. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने व्हावा तसेच रुग्णाच्या आजाराबाबत योग्य ती गोपनीयता जपली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांच्या हस्ते नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस माजी फेलो दिवंगत डॉ बी के गोयल व डॉ एल एच हिरानंदानी यांना मरणोपरांत सन्मानित करण्यात आले. अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ केवल तलवार, डॉ पी व्ही देसाई, डॉ बी एस सिंघल, डॉ सरोज गोपाल, डॉ अशोक गुप्ता डॉ देवेन तनेजा, डॉ नादीर भरुचा, डॉ सुनील पंड्या, डॉ सतीश खाडिलकर डॉ अरुण जामकर डॉ अनिल शर्मा आदींना देखील सन्मानित करण्यात आले. चर्चासत्राला नॅशनल अकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ शिव कुमार सरीन, नियोजित अध्यक्ष डॉ दिगंबर बेहरा, चर्चासत्र आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ सतीश खाडिलकर, सहाध्यक्ष डॉ अशोक गुप्ता, बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्टचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ राजकुमार पाटील, हृदयविकार विभाग प्रमुख डॉ अनिल शर्मा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व तज्ज्ञ उपस्थित होते.