Author: bittambatami.com

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर तांत्रिकऐवजी गैर तांत्रिक कामाचा अतिरिक्त ताण

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर तांत्रिकऐवजी गैर तांत्रिक कामाचा अतिरिक्त ताण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याचा आरोप योगेश चांदेकर पालघरः राज्यातील पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय तांत्रिक कामे करण्यासाठी आवश्यक वेळ न देता त्यांना गैरतांत्रिक कामात गुंतवून ठेवले जाते. त्याचा परिणाम राज्यातील पशुवैद्यकीय सेवेवर होत असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यक्षमता कमी असल्याचे दाखवून तुच्छतेची वागणूक दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उद्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पशुवैद्यक राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल गडाख व सरचिटणीस डॉक्टर किरण देवकाते,डॉ राहुल संखे, महाराष्ट्र राज्य राजपात्रित पशुवैद्यकीय संघटना पालघर यांनी याबाबत राज्य सरकारला इशारा देणारे निवेदन दिले आहे. महाराष्ट्र राज्यातील पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली असून महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलने करण्याची घोषणा केली आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागातील राजपत्रित अधिकारी संघटनेने म्हटले आहे, की पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी द्याव्या लागतात. पशु आरोग्यसेवा, उपचार, मार्गदर्शन, शिबिरे, लसीकरण, रोग नियंत्रण करण्यासाठी आवश्यक वेळ व संधी दिली जात नाही. त्याऐवजी त्यांच्याकडून वारंवार विविध ऑनलाइन नोंदी ‘एनडीएलएम’ पोर्टल वरील डेटा नोंद अहवाल व कागदपत्रांची पूर्तता यासारखी पूर्णपणे लिपिक वर्गीयाची डेटा एन्ट्री स्वरूपाची कामे करून घेतली जात आहेत. त्याचा परिणाम पशुवैद्यक विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. प्रशासनाची वागणूक अन्यायकारक या परिस्थितीत काम कमी केले, कार्यक्षमता कमी झाली, अशा कारणावरून संबंधित अधिकाऱ्यांना तुच्छतापूर्ण वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. राज्य सरकारची ही वागणूक अन्यायकारक व मनोबल खच्ची करणारी आहे, असे संघटनेने म्हटले आहे. वास्तविक पाहता तांत्रिक काम करण्यासाठी आवश्यक वेळ प्रशासनाकडून उपलब्ध करून दिला जात नाही. आणि उलट गैरतांत्रिक कामांचा अतिरेक करून घेतला जातो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे योग्य नसल्याची बाब संघटनेने निदर्शनास आणून दिली आहे. संघटनेचे आक्षेप संघटनेने राज्य सरकारला दिलेल्या निवेदनानुसार पशुसंवर्धन विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून केवळ तांत्रिक स्वरूपाचे कामे करून घेण्यात यावीत व अनावश्यक ऑनलाईन लिपिकिय कामाचा भार कमी करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांशी सन्मानपूर्वक न्याय्य वर्तणूक ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय प्रशासनावर संघटनेने अनेक आक्षेप घेतले आहेत. त्यात प्रामुख्याने अत्यल्प मनुष्यबळावर अनेक गावांचा कारभार, रात्री- अपरात्री तात्काळ सेवा देण्याची अपेक्षा, वैयक्तिक मोबाईलवर शासकीय कामांचा ताण, सतत ऑनलाईन अहवाल व अपडेट, विनाकारण दवाखान्याच्या वेळामध्ये बदल, जिओ फेस बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची, अधिकारी २४ तास उपलब्ध असावेत अशी अवाजवी अपेक्षा, ‘एफएमडी’, ‘एसओपी’ नुसार काम करून घेणे खात्याची पुनर्रचना होऊनदेखील प्रशासकीय बाबी व मूलभूत सुविधांची वाणवा, तांत्रिक अधिकाऱ्यांना अतांत्रिक कामे करण्यास प्रवृत्त करणे अशा आक्षेपांचा समावेश आहे. पशु वैद्यकीय दवाखान्याची वेळ अडचणीची राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार पशुवैद्यकीय दवाखान्याची वेळ सकाळी आठ ते दुपारी दीड व दुपारी तीन ते सायंकाळी पाच अशी करण्यात आली असून, त्याचबरोबर गाव भेटी, ग्रामसभा उपस्थिती, प्रशिक्षण, साप्ताहिक अहवाल व २४ तास आपत्कालीन सेवा देण्याची जबाबदारी ही सोपवण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यासाठी बायोमेट्रिक ऑनलाइन उपस्थिती नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. संघटनेच्या मते कमी मनुष्यबळात या सक्तीच्या अटी लादण्यात आल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर दररोज १२ ते १६ तास अपेक्षा जास्त काळ कामाचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे हे अधिकारी मानसिक तणावाखाली आले आहेत. या निर्णयाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यात आपत्कालीन उपचार उशिरा मिळणे, लसीकरण मोहिमा बाधित होणे, कृत्रिम वेतन व गर्भ तपासणी कमी होणे, दूध उत्पादनात घट, रोग नियंत्रणात विलंब, पशुधन मृत्यू वाढण्याची शक्यता, गर्भ तपासणी व शस्त्रक्रियांमध्ये घट आधी बाबींचा समावेश आहे. आंदोलनाचे टप्पे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने शासनाच्या व्हाट्सअपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक मोबाईल व इंटरनेटचा वापर शासकीय कामासाठी करण्याचे बंद केले आहे. बुधवारी राज्यभर काळ्याफिती लावून प्रतिकात्मक निषेध करण्यात येणार आहे, तर गुरुवारी पशुवैद्यकीय अधिकारी सामूहिक रजा आंदोलन करणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमून निवेदन देणार आहेत. शुक्रवारी शासकीय अहवाल सादर करणे बंद करणार आहेत, तर नऊ तारखेला विविध मागण्यांसाठी पशुवैद्यकीय संघटना राज्यभर एक दिवशीय साखळी उपोषण करणार आहे. आंदोलनाची ही रुपरेषा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल गडाख व सरचिटणीस डॉ. किरण देवकाते डॉ राहुल संखे, महाराष्ट्र राज्य राजपात्रित पशुवैद्यकीय संघटना पालघर यांनी दिली.

शेअर ट्रेडिंग फसवणूक प्रकरणी ठाण्यात अखेर गुन्हा दाखल

आरोपी सागर कारिवडेकर फरार अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रातील अनेक गुंतवणूकदारांकडून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून करोडो रूपयांसह फरार झालेल्या सागर कारिवडेकर याच्यावर दोन महिन्यांच्या प्राथमिक तपासानंतर  अखेर ठाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींच्या तक्रारीनुसार, ठाणे येथील सचिन राणे आणि प्रिती राणे यांच्या कार्यालयामधून सागर कारिवडेकर नामक इसमाने अनेक गुंतवणूकदारांकडून करोडो रूपयांच्या ठेवी स्वतःच्या खात्यावर घेतल्या आणि नंतर तो हे पैसे परत देण्यास टाळाटाळ करू लागला. यामुळेच ज्यांचे कार्यालय या व्यवहारासाठी वापरण्यात आले त्या सचिन राणे यांचेही नाव आरोपी म्हणून FIR मधे समाविष्ट करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर कारिवडेकर याने आपलीही फसवणूक केली असून तो पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळी कारणे संशयास्पद व्हिडिओ प्रसारित करून देत आहे. फरार असलेल्या सागर कारिवडेकरने पोलीसांसमोर हजर होऊन या फसवणुकीत सचिन राणे अथवा आणखी कोणी सामील असल्यास पुरावे देणे अपेक्षित आहे अशी भूमिका प्रिती राणे यांनी मांडली आहे. स्वतः फरार राहून या प्रकरणात दिशाभूल करणारी वक्तव्ये करणाऱ्या सागर कारिवडेकर याच्यावर पोलीसांकडून लवकरच कारवाई होईल अशी खात्री प्रिती राणे यांनी व्यक्त केली.या प्रकरणात आजअखेरपर्यंत कोणालाही अटक झाली नसून , पोलीसांकडून सचिन राणे यांची प्राथमिक चौकशी सुरू आहे आणि फरार असलेला आरोपी सागर सुबोध कारिवडेकर याचा शोध सुरू आहे. गुंतवणूकदारांकडून या प्रकरणात कठोर कारवाईसाठी आणि सागर कारिवडेकरला पोलीसांनी ताब्यात घ्यावे यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येत असून दाखल तक्रारीनुसार फसवणूक करण्यात आलेली रक्कम एक कोटी अठ्ठयाहत्तर लाखाच्या आसपास असली तरी आरोपी सागर कारिवडेकरने फसवणूक केलेल्या रकमेचा आकडा आणखी मोठा असल्याची माहिती प्रिती राणे यांनी दिली आहे.दरम्यान सागर कारिवडेकर याचा शोध घेण्याचे आणि गुंतवणूकदारांकडून या प्रकरणाची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पर्यावरण पूरक होळीसाठी गोकास्ट होळी साजरी

पाटीदार समाज डोंबिवलीतर्फे कल्याण: गोमय पर्यावरण पूरक होळीसाठी गोकास्ट गाईच्या शेणापासून बनविलेले लाकूड याला मोठी मागणी आली असून अनेक ठिकाणी या प्रकारची होळी ही सोमवारी पेटविण्यात आली. अशा प्रकारची एक…

अपघात मुक्त प्रवास हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक

अपघात मुक्त प्रवास हेच परिवहन विभागाचे उद्दिष्ट-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर ठाणे, राज्याच्या परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना, हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे,’असे प्रतिपादन केले. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव-भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे नव्हे तर ‘अपघात मुक्त प्रवास’ हेच भविष्यात परिवहन विभागाचे उद्दिष्ट असले पाहिजे! ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच उद्योग-व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे. दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध  वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यात आल्याचे सांगताना त्यांनी ऑनलाइन परवाना प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकी विरुद्धची कठोर कारवाई यांचा विशेष उल्लेख केला. ‘आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे,’ असे ते म्हणाले. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असेल, परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, याचा अभिमान असल्याचे मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. आगामी काळात *सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन* सेवा उभारणी हे शासनाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ता सुरक्षा जनजागृती, पर्यावरणपूरक वाहने, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते.

आधारवाडी जेलमधील दोन कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

कल्याण: कल्याण आधारवाडी जेल येथे कार्यरत असलेल्या दोन जेल कर्मचाऱ्यांना लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शरद पानपाटील आणि सतीश…

नाल्याच्या कामासाठी तोडला नविन काँक्रीटचा रस्ता

एमआयडीसी निवासीतील रहिवाशी संतापले कल्याण :  डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये काँक्रीट रस्ते हे नियोजनविना घाईने बनविले गेले. त्यामुळे आता गटार, नाले, विद्युत, पाणी इत्यादी वाहिन्या यासाठी रस्ते तोडण्याचे काम सतत चालू असल्याने हे नविन बनविलेले सर्व काँक्रीट रस्ते आता खराब झाले आहेत. याचा फटका नागरिकांना व वाहनधारकांना येत्या पावसाळ्यात बसणार आहे. आतापर्यंत विद्युत, पाणी वाहिन्या टाकण्यासाठी पूर्ण आडवा रस्ता तोडायचा असेल तर जास्तीसजास्त दोन फुटाचा छेद मारून काँक्रीट रस्ता तोडला जायचा. पण आता एका नविन नाल्याचे बांधकामसाठी अंदाजे ४० फुट रुंदीचा काँक्रीट रस्ता आणि त्याला १० फुटाचा छेद देऊन हा रस्ता एमआयडीसी ठेकेदार कडून पूर्ण तोडण्यात आला आहे. हे काम मिलापनगर मधील गणेश विसर्जन तलाव रस्त्यावर ग्रीन्स स्कुल/श्रीराम वरदायीनी सोसायटी जवळ चालू आहे. यामुळे येथील रस्ता वाहतूकसाठी आणि पादचाऱ्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आला असून पुढे अनेक दिवस तो बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनधारक, पादचारी आणि शालेय विद्यार्थी याना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. तर काही विद्यार्थी, पालक व रहिवाशी हा वळसा वाचविण्यासाठी त्यातूनच कसरत करीत वाट काढून पुढे जात आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित मोठी दुखापत होऊन इजा होऊ शकते. एसएससी दहावी आणि बारावीचा परीक्षा चालू असून ग्रीन्स स्कुल हे त्याचे एक परीक्षा केंद्र आहे. प्रशासनाने  या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात आणि होळी/रंगपंचमी/शिवजयंती/गुढीपाडवा या उत्सवात हे काम चालू करायला नव्हते पाहिजे होते. हे नाल्याचे काम तातडीने करणे गरजेचे नसतानाही थोडे दिवस थांबले असते तरी काय फरक पडला नसता असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. आता अजून कमीतकमी एक महिना हे काम पूर्ण होणार नसल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. या काँक्रीट रस्त्यावरील नाल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर हा काँक्रीट रस्ता पूर्वीप्रमाणे ठाकठीक करण्यात येईल का ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. येत्या पावसाळ्यात या नविन बनविलेल्या सर्व काँक्रीट रस्त्यांची परिस्थिती पूर्वीप्रमाणे खड्डेमय खराब होण्याची शक्यता असून नाले/गटार कामाच्या वेळी अनेक झाडांच्या खोडाला, मुळाना धक्के बसल्याने पावसाळ्यात अशी झाडे पडू शकतात.  एकंदरीत प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नाही. कमीतकमी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.

 आनंद मेळावा आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने आनंद मेळावा आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा नवी मुंबई, सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने समागसेवक मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात ६० सभासदांचा वाढदिवस साजरा करून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (वय ९१) व ज्ञानेश्वर भोगले (वय ७५) यांचा कुटुंबासमवेत शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. तर संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी सांगितले की, संघाच्या सभासदांसाठी लवकरच आरोग्य शिबिर घेण्यात येईल. त्याचप्रमाणे आपल्या सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दिले जाणारे स्मार्ट कार्ड देण्यासाठी लवकरच एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे महत्व सांगितले.  संघाच्या उपाध्यक्ष सीमा बोराडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. संघाचे सहसचिव राजेंद्र कदम यांनी वाढदिवस असणाऱ्या मानकऱ्यांच्या नावांचे वाचन केले. संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी नवीन सभासदांचे स्वागत केले. तर संघाचे सहखजिनदार  नाना शिंदे यांनी देणगीदारांचे  आभार मानले.  संघाचे ज्येष्ठ सभासद पत्की आणि संघाच्या माजी उपाध्यक्षा डॉ.  विजया गोसावी व इतर सभासदांनी सामुहिकरित्या सुरेल आवाजात वाढदिवसाचे गीत म्हटले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानून ९१ वर्षाचे ज्येष्ठ सभासद देणगीदार ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या स्नॅक वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

कल्याणमध्ये रंगांची उधळण उत्साहात

कल्याण : ‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणत धुलीवंदनच्या दिवशी  कल्याणच्या रस्त्यांवर तरुणाई रंगांचा आनंद लुटताना दिसली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या रंगांच्या उत्सवात नाहून निघाले होते. यंदाही कल्याणकरांनी पाणी…

 कुंभमेळ्याचा डोलारा आणि कर्जाचा डोंगर

कुंभमेळ्याचा डोलारा आणि कर्जाचा डोंगर नाशिक मनपाचे ३०१० कोटींचे बजेट म्युनिसिपल बाँड्सद्वारे ४०० कोटींची उभारणी; शेअर बाजारात नाशिकचा डंका हरिभाऊ लाखे नाशिक: पुढील वर्षी गोदा काठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे शिवधनुष्य पेलताना महापालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे. शासनाने भरीव निधी दिला असला तरी एकाचवेळी रस्ते, पुलांसह विविध प्रकारची पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली गेली. त्यासाठी मनपाला स्वनिधी द्यावा लागत आहे. प्रगतीपथावरील कामांचे १३२५ कोटींचे दायित्व आहे. ४०६ कोटींच्या ठेवी मोडल्या गेल्या. गोदावरी स्वच्छतेसाठी स्वच्छ गोदावरी आणि पाणी पुरवठा योजना विस्तारासाठी हरित म्युनिसिपल बाँड याद्वारे ४०० कोटींचा उभारणी तसेच खासगी-भागिदारी तत्वावरील मलनिस्सारण प्रकल्पात ठेकेदाराने ४४४.४८ कोटींची केलेली गुंतवणूक या जवळपास ८४५ कोटींच्या दायित्वाची परतफेड पुढील पाच ते २५ वर्षात व्याजासह करावी लागणार आहे. जवळपास चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी स्थायी समितीला २०२६-२७ या वर्षासाठी कुठलीही करवाढ नसलेले ३०१० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. या वर्षात पालिकेला जीएसटी अनुदान, स्थानिक संस्था कर व एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभार, मालमत्ता, नगरनियोजन, पाणीपट्टी, मिळकत कर, परिवहन सेवा उत्पन्न याद्वारे ३०११.८५ कोटी रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली गेली आहेत. शहरातील २८ प्रमुख रस्ते व आठ पुलांची कामे, पंचवटीतील रुग्णालय नुतनीकरण, सिंहस्थ आराखड्यानुसार मंजूर कामांसाठी चालू वर्षात ६०० कोटींचा स्वनिधी, मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे, राम काल पथ अंतर्गत सुशोभिकरण, बालाजी कोट ते गणेशवाडी पर्यंत रामझुला पादचारी पूल, मुकणे धरण पाणी पुरवठा योजनेची क्षमता वाढ आदी कामांचा अंतर्भाव आहे. आगामी वर्षात तीन नवीन अग्निशमन केंद्र, खत प्रकल्पाची क्षमता वाढ, नगरसेवकांना प्रत्येकी ८० लाखाचा निधी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात अद्ययावत डायलिसिस केंद्र व चार नवीन शस्त्रक्रियागृह, साधुग्राममध्ये् नेत्र रुग्णालय आदींचा उल्ले्ख अर्थसंकल्पात आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून निधी उभारणीचे नियोजन आहे. शासनाकडून मंजूर होणाऱ्या आराखड्यात मनपा हिस्सा म्हणून २०२४ ते २०२६ या दोन वर्षात महापालिकेने एकूण ४२५ कोटींची तरतूद केली. स्वच्छ गोदावरी म्युनिसिपल बाँडद्वारे २०० कोटींचा निधी उभारल्याने केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत २६ कोटी प्रोत्साहनपर अनुदान तसेच अर्बन चॅलेंज फंडमधून प्रकल्पाच्या २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदानास पात्र होता येईल. पाणी पुरवठा विस्तार योजनेसाठी हरित म्युनिसिपल बाँडद्वारे २०० कोटींचा निधी उभारला जात आहे. त्यास अमृत योजनेतून २० कोटी आणि अर्बन चॅलेंज फंडमधून २५ टक्के अनुदानास पात्र होता येईल असे प्रशासनाकडून सांगितले जाते. प्रोत्साहनपर अनुदान मिळाल्यास व्याजाचा कुठलाही भार पडणार नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. एकाच वर्षात दोन बाँड्द्वारे निधी उभारून मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी नाशिक ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. याबद्दल स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत काही सदस्यांनी प्रशासनाचे कौतुकही केले. मात्र, कुंभमेळ्यामुळे मनपा तिजोरीवर मोठा भार पडल्याचे दिसत आहे.

मिरा-भाईंदरमध्ये पदक विजेत्या कुस्तीगीरांसह मान्यवरांचा गौरव सोहळा

मिरा-भाईंदर : मीरा भाईंदर महानगर पालिका यांच्या सौजन्याने तसेच मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्या वतीने शहरातील मा. महापौर, मा. उपमहापौर, मा. नगरसेवक आणि विविध स्तरावर पदक प्राप्त कुस्तीगीरांचा…